विदर्भातील सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चंद्रपूरमधील बाजार वार्डमध्ये स्थित असलेले प्राचीन विठ्ठल मंदिर हे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी ते एक महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरामुळे येथील परिसराला ‘विठ्ठल खिडकी’ असे नाव पडले आहे. आषाढी एकादशीला साजरा होणारा येथील पाच दिवसांचा पालखी उत्सव (रथयात्रा) हा चंद्रपूरमधील मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. त्यावेळी विदर्भातील हजारो वारकरी दिंड्या घेऊन येथे विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.
विठ्ठल मंदिराचीआख्यायिका अशी की येथे राहणारे गोविंदराव खडाखडी हे बालाजीचे निस्सीम भक्त होते. १७५० साली एके दिवशी सकाळच्या वेळी बालाजीची प्रार्थना करताना अचानक त्यांना घराबाहेर एक काळ्या दगडाची सुंदर शिळा दिसली. यापूर्वी त्यांनी ही शिळा येथे कधी पाहिली नव्हती. त्यामुळे बालाजीचे काही संकेत असतील, असे समजून त्यांनी या शिळेपासून बालाजीची मूर्ती घडवावी, असे मनोमन ठरविले. त्यानुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी पाथरवट (छिन्नी–हातोडीने दगड फोडणारे) आणले व त्या शिळेची पूजा करून गोविंदरावांनी ‘जय लक्ष्मी व्यंकटेश’ (बालाजीचे एक नाव) असे म्हणून त्या शिळेवर घाव घातला असता शिळेतून ‘हरी विठ्ठल…’ असा प्रतिध्वनी उमटला. शिळेवरील प्रत्येक घावानंतर ‘हरी विठ्ठल…’ असाच प्रतिध्वनी येत होता. असाच प्रकार ३ दिवस सुरू होता. गोविंदरावांना काय करावे हे समजत नव्हते. शेवटी त्यांनी श्री बालाजीचा धावा केला व यातून मार्ग सुचवावा, अशी विनंती केली.
तिसऱ्या दिवशी गोविंदरावांना बालाजीने स्वप्नदृष्टांत दिला व बालाजी आणि विठ्ठल एकच आहेत. बालाजीची मूर्ती बनविण्याचा हट्ट सोडून विठ्ठलाची मूर्ती बनवावी, असे त्यांना सुचविले. त्यानुसार पाथरवटांना आदेश देण्यात आले व अल्पावधीतच त्या शिळेपासून विठ्ठल–रुख्मिणीच्या सुंदर मूर्ती घडविल्या गेल्या. त्यावेळी येथे असलेल्या चंद्रपूर किल्ल्याच्या नैऋत्य खिडकीजवळ लहानसे मंदिर बांधून एका शुभमुहूर्तावर या मूर्तींची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या परिसराची ओळख ‘विठ्ठल खिडकी’ अशी झाली. त्यानंतर उर्वरित आयुष्य गोविंदरावांनी या विठ्ठलाच्या सेवेत घालविले. गोविंदरावांनंतर त्यांचे शिष्य सदाशिवभट्ट अयाचित ऊर्फ जनार्दन महाराज यांनी या मंदिराची सेवा केली. असे सांगितले जाते की जनार्दन स्वामी यांना या विठ्ठलाच्या भक्तीमुळे अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या व अनेकदा त्यांनी मृत शरीरही जिवंत केले होते. काही दिवसांनी ते ईश्वरआज्ञेने तीर्थयात्रेला निघून गेले. त्यानंतर गोविंद आवळे हे मंदिराचे सेवेकरी होते. गोविंद आवळे यांचा मुलगा गोपाळ यांनी येथे आषाढी व कार्तिक एकादशीला रथयात्रा सुरू केली, ती आजतागायत सुरू आहे.
चंद्रपूर बस स्थानकापासून जवळच असलेल्या विठ्ठल खिडकी येथील विठ्ठलाचे मंदिर हे प्राचीन असले तरी १९९१ साली झालेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मूळ गर्भगृह कायम ठेऊन ग्रामस्थांनी प्रशस्त व दुमजली मंदिर बांधले आहे. या मंदिरासमोरील प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे असून दोन्ही बाजूला सुमारे २५ फूट उंचीच्या वीणा व वरच्या बाजूने चिपळ्यांनी त्या जोडल्या आहेत. हे प्रवेशद्वार येथील आकर्षण समजले जाते. शहराच्या मध्यभागी असूनही मंदिराच्या प्रांगणात अनेक प्राचीन व मोठे वृक्ष असल्यामुळे हा परिसर शांत व निसर्गरम्य भासतो.
विठ्ठल मंदिर दुमजली असून मुख्य प्रवेशद्वारावर विशेष कलाकुसर नसली तरी येथील मूळ गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. दुमजली असणाऱ्या सभामंडपाच्या मध्यभागी संत नामदेवांची ५ फूट उंचीची मूर्ती आहे. याशिवाय येथील भिंतींमध्ये असलेल्या कोनाड्यांमध्ये संतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरात ३ गर्भगृह असून मुख्य गाभाऱ्यातील चौथऱ्यावरील पितळी मखरामध्ये विठ्ठल–रुख्मिणीच्या मूर्ती आहेत. मूळ गर्भगृहाच्या वर घुमटाकार शिखर, त्या बाजूला २ लहान शिखरे आहेत. मुख्य गर्भगृहाच्या डावीकडील गर्भगृहात श्रीकृष्ण, श्रीदत्त, संत ज्ञानेश्वर यांच्या संगमरवरी मूर्तींसह अर्धनारीनटेश्वराची वैशिष्ट्यपूर्ण अशी बैठी मूर्ती आहे. उजवीकडील गर्भगृहात गायत्री देवीची संगमरवरी मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहाबाहेर असलेल्या एका कोनाड्यात कुत्र्यावर बसलेली ४ हातांची भैरवाची मूर्ती आहे.
दररोज सकाळी ७ वाजता विठ्ठलाची पूजा होते. सायंकाळी ४ वाजता ज्ञानेश्वरी व भागवत या ग्रंथांचे वाचन केले जाते. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठ्या यात्रा भरतात. आषाढीच्या वेळी येथे ५ दिवस पालखी उत्सव असतो. ५व्या दिवशी रथयात्रा काढून ती येथील इरई नदीपात्रावर नेली जाते. याशिवाय तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी व दत्त जयंती या दिवशीही येथे उत्सव साजरे करण्यात येतात.