
मलंग वेशात प्रगट होऊन श्रीदत्तात्रेयांनी संत एकनाथ महाराजांना दर्शन दिले ते स्थान म्हणजे खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन पर्वतावरील दत्तधाम होय. पुराणांतील उल्लेखांनुसार, जनार्दन स्वामींकडून दीक्षा मिळाल्यानंतर संत एकनाथांनी सुलीभंजन पर्वतावरील ज्या शिळेवर बसून बारा वर्षे तपस्या केली, ती शिळाही येथे आहे. निसर्गरम्य पर्यटनस्थळ, तसेच धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलीभंजन येथील दत्तधामी भागवत सांप्रदायाचे हजारो भाविक, तसेच पर्यटक नित्यनेमाने भेट देतात. असे सांगितले जाते की येथे असलेल्या संजीवनी शिळेवर हलकासा आघात केल्यास त्यातून सप्तसूर निघतात.
संत एकनाथांचा जन्म इ. स. १५३३ मध्ये पैठण येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला होता. लहान असतानाच आई–वडिलांचे छत्र हरविल्याने त्यांचा सांभाळ आजोबा चक्रपाणी यांनी केला. संत एकनाथ लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे होते. ते सहा वर्षांचे असताना आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडिताची नेमणूक केली. त्या पंडिताकडून एकनाथांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आदी ग्रंथ आत्मसात केले. त्या काळी पैठणमध्ये अनेक साधू–संत, बैरागी, योगी व तपस्वींचा वावर असे. परिसरात सतत भजन, कीर्तन, प्रवचन चालू असे. मात्र, एकनाथांना या साऱ्यात एक प्रकारचा कोरडेपणा, ढोंगीपणा व अंधश्रद्धा दिसत असे. समाजाला योग्य मार्गदर्शन करायचे असेल तर मार्गदर्शकालाही ईश्वराची प्रचिती असायला हवी, अन्यथा ती नुसतीच पोपटपंची होईल, या धारणेतून त्यांनी परमेश्वराची कृपा संपादन करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी गुरुचा शोध सुरू केला.
एके दिवशी शिवमंदिरात चिंतन–मनन करत असताना तेथे आलेल्या एका वृद्ध गृहस्थाने एकनाथांना सांगितले की तुला आत्मज्ञान प्राप्त करायचे असल्यास देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामींकडे जा. ईश्वरप्राप्ती आणि समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथांनी पैठणहून ५० मैल अंतर चालत जाऊन फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी देवगिरी गाठली. त्यावेळी ते १२ वर्षांचे होते. देवगिरीवर संत जनार्दन स्वामींची भेट घेतल्यावर एकनाथांनी त्यांना येण्याचा हेतू सांगितला. त्यावर तू पैठणहून येथे आला आहेस, हे मला माहीत आहे. तुझी सर्व माहिती मला माझे गुरू श्रीदत्तात्रेय यांनी दिलेल्या दृष्टांतामुळे समजली आहे. तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो, असे जनार्दन स्वामी म्हणाले. त्यानंतर एकनाथांनी जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली.
एकीकडे गुरुसेवा करत असताना एकनाथांनी गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, भागवत, उपनिषदे आदी ग्रंथांमधील ज्ञान आत्मसात केले. न्याय व मीमांसा ही शास्त्रे अभ्यासताना त्यांनी पातंजल योगचाही अभ्यास केला.
आधात्म्य आणि गुरुसेवा दोन्ही साधत असताना ते तलवारबाजीही शिकले. त्यांची दिवसेंदिवस दृढ होत जाणारी भक्ती आणि त्यांचे संस्कार पाहून संत जनार्दन स्वामींनी एकनाथांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला. जनार्दन स्वामी नेहमी सुलीभंजन डोंगरावर जाऊन गुरुंशी संवाद साधत. एके दिवशी, गुरुवारी त्यांनी एकनाथांनाही सोबत घेतले. स्नानसंध्या झाल्यावर जनार्दन स्वामी ध्यानाला बसले. त्यावेळी एक मलंग (फकीर) येथे आला. अंगभऱ कातडे पांघरलेल्या त्या फकिराचे डोळे आरक्त होते. सोबत कुत्री आणि तिची पिल्ले होती. मात्र एकनाथांना तेच दत्तात्रेय असल्याची कल्पना नव्हती. काही वेळाने ध्यानातून जागे झालेल्या जनार्दन स्वामींनी त्या फकिराच्या चरणी माथा टेकविला. काही वेळाने त्या फकिराने जनार्दन स्वामींना कुत्रीचे दूध काढून आणायला सांगितले. स्वामींनी तसे केल्यावर फकिराने आपल्या झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून दुधाच्या भांड्यात भिजवले. त्यानंतर तो फकीर आणि जनार्दन स्वामी त्याच भांड्यातून भाकरी खाऊ लागले. खाणे झाल्यावर जनार्दन स्वामींनी एकनाथांना भांडे धुऊन आणण्यास सांगितले. त्यावेळी एकनाथांनी तो फकीर म्हणजेच श्रीदत्तात्रेय असल्याचे जाणले. धुण्यासाठी भांड्यात ओतलेले पाणी स्वतः प्राशन करून त्यांनी ते भांडे धुऊन फकिराच्या हातात दिले आणि त्याला साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर उठून पाहिले असता त्यांना श्रीदत्तात्रेयांच्या साक्षात रूपाचे दर्शन झाले.
श्रीदत्तात्रेयांनी साक्षात्कार दिल्यानंतर काही दिवसांनी जनार्दन स्वामींनी एकनाथांना मार्कंडेय ऋषींची तपोभूमी असलेल्या सुलीभंजन पर्वतावर मौन धारण करून आत्मसाधना करण्यास सांगितले. गुरुंच्या सांगण्यावरून एकनाथ सुलीभंजन डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी आले. एके दिवशी ते तप करण्यासाठी बसले होते. त्यावेळी एका नागाने त्यांच्या डोक्यावर फणा धरला होता. मात्र, एकनाथांना त्याबाबत कल्पनाही नव्हती. काही वेळाने जनार्दन स्वामी येथे आले असता, त्यांना हे दृश्य दिसले. त्यावर त्यांनी नागाला येथून जाण्याची आज्ञा करत एकनाथांना ध्यानातून जागे केले. त्यानंतर त्यांनी एकनाथांना घरी जाऊन गृहस्थाश्रम पत्करण्याची आज्ञा केली.
‘तू संसारात राहूनच परमार्थ साधणार आहेस. भोळ्याभाबड्या लोकांचे अज्ञान दूर करतानाच तुझ्या हातून अमूल्य ग्रंथरचना होणार आहे,’ असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरहून खुलताबादकडे जाताना डाव्या बाजूस एक कमान लागते. या कमानीपासूनच सुलीभंजन गडावर येण्याचा रस्ता आहे. सूर्यभंजन, शुलीभंजन, नाथगड आदी नावांनीही हे ठिकाण ओळखले जाते. काशीखंड, पद्यपुराण, श्रीदत्त प्रबोध, नाथचरित्र आदी प्राचीन ग्रंथांतून या ठिकाणाचा महिमा वर्णिला गेला आहे. येथे मार्कण्डेय ॠषींनी तपश्चर्या केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. मार्कण्डेय ॠषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने त्यांच्यावरील मृत्यूचे संकट टाळल्याची कथा शुलीभंजन या ग्रंथात आहे.
सुलीभंजन पर्वतावर येण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. निसर्गसौंदर्य न्याहाळत डोंगरमाथ्यावर आल्यावर दत्तधामची सुंदर वास्तू नजरेस पडते. मंदिराच्या प्रांगणात एका झाडाखाली सुंदर दत्तमूर्ती आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्याआधी येथे नगारखाना लागतो. नगारखान्याच्या प्रवेशद्वाराच्या वरील भागात मध्यभागी कमळावर बसलेल्या लक्ष्मीची मूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंना गजराज आहेत. या प्रवेशद्वाराजवळ संत एकनाथांनी तपश्चर्या केलेली शिळा आहे. शिळेच्या मागे एकनाथ महाराजांची ध्यानस्थ मूर्ती असून तिच्यावर नागाने छत्र धरले आहे. येथून बाहेर पडून मंदिराच्या प्रांगणातून पुढे आल्यावर काही पावलांवरच मुख्य मंदिराचा सभामंडप लागतो. या सभामंडपाच्या भिंतींवर संत एकनाथ आणि जनार्दन स्वामींच्या जीवनातील विविध प्रसंग, चित्र आणि माहिती स्वरूपात लावलेले आहेत. गर्भगृहात एका उंच चौथऱ्यावर श्रीदत्तात्रेयांची मूर्ती असून मूर्तीच्या डावीकडे जनार्दन स्वामींची, तर उजवीकडे संत एकनाथांची मूर्ती आहे. मूर्तींसमोरच्या चौथऱ्यावर संत एकनाथांच्या पादुका आहेत. या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. दत्तजयंती व गुरुपौर्णिमेला येथे मोठे उत्सव साजरे होतात.
या मंदिराच्या बाहेरील बाजूला राखाडी–पांढरट रंगाची एक शिळा आहे. ती संजीवन शिळा म्हणून प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की लहानसा दगड घेऊन या शिळेवर वाजवल्यास घंटीसारखा ‘टन–टन’ आवाज येतो. या दगडाने या शिळेच्या वेगवेगळ्या भागांत हलकासा आघात केल्यास सप्तसुरांची प्रचिती येते.
येथून जवळच असलेल्या कैवल्येश्वर येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेले प्राचीन शिवमंदिर आहे. भव्य सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात नंदीशिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारानजीकच्या भिंतींवरील देवळ्यांमध्ये गणेश व अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शिवलिंग असून त्यावरील गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. येथे गणेशाची तसेच पार्वती मातेचीही मूर्ती आहे. गर्भगृहाच्या वरच्या भागात भिंतीला गोलाकार खिडकी असून वर्षातील काही दिवस त्यातून येणारा सूर्यप्रकाश थेट पिंडीवर पडतो. या मंदिराच्या मागील बाजूस सूर्यकुंड व चंद्रकुंड ही दोन कुंडे आहेत. ही दोन्ही कुंडे विटांनी बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी सहस्त्रलिंग सरोवरही असल्याचे बोलले जाते.