
चिमूर तालुक्यातील साठगाव येथील टेकडीवर स्थित असलेले श्रीदत्त मंदिर चिमूरमधील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. चंद्रपूर, नागपूर व भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर हे स्थान आहे. या मंदिरातील एकमुखी श्रीदत्त मूर्तीचा मूळ गाभा ‘विशेष‘ (पवित्र दगड) असून तो माहूर गडावर असलेल्या देवाचा अंश आहे, अशी श्रद्धा आहे. दत्त जयंतीनिमित्त येथे ३ दिवस चालणारी यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेला सुमारे १६० वर्षांची परंपरा असून महानुभाव पंथीयांमध्ये हे जागृत व विशेष स्थान मानले जाते.
‘महानुभाव’ ग्रंथामधील उल्लेखानुसार, चांदापूर (आताचे चंद्रपूर) येथे १७८५ मध्ये राजे भोसले यांचे इंग्रजांशी युद्ध झाले होते. त्यावेळी माहूर संस्थानातून भोसले यांचा राज्य कारभार चालत असे. यावेळी युद्धात विजय मिळविलेल्या राजे भोसले यांच्याकडून विजयी सेनाप्रमुखांचा गौरव केला जात असे. त्यानुसार गावंडे कुटुंबातील पराक्रमी वीराला साठगाव परगणे मालगुजारीत मिळाले होते. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून गावंडे कुटुंब साठगावला स्थायिक झाले.
मात्र काही नैसर्गिक आपत्ती व पेंढारी (लुटारू) यांच्या लुटीमुळे साठगाव पूर्णपणे उद्धवस्त झाले होते. अशाही परिस्थितीत मालगुजार गावंडे पाटील साठगावला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी धडपडत होते. या काळात ते दरमहा माहूर येथील श्रीदत्त निद्रास्थान असलेल्या देवदेवेश्वरी मंदिरात बैलगाडीने दर्शनासाठी जात असत.
महानुभाव पंथीयांच्या श्रद्धेनुसार माहूर गडावरील श्रीदत्तांच्या ‘विशेष’ (पवित्र) दगडाला हात लावल्यास त्याचा एखादा भाग हाती येतो आणि त्यालाच दत्तप्रभू मानून या ‘विशेष’ची पूजा केली जाते. नेहमीप्रमाणे माहूर येथे श्रीदत्त व सर्वतीर्थांचे दर्शन घेऊन साठगावकडे परतत असताना मालगुजार गावंडे पाटील यांच्या बैलाच्या एका खुरामध्ये विशेष दगड अडकला होता. पूर्वी तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर थेट गावात न येता गावाच्या वेशीवर किंवा तेथील मंदिरात मुक्काम करावा लागत असे. त्यानुसार साठगावच्या वेशीवरील टेकडीवर मालगुजार गावंडे पाटील यांनी एक रात्र मुक्काम केला. त्यावेळी
त्यांना स्वप्नदृष्टांत झाला, ‘मी बैलाच्या खुरात आलो आहे. येथेच माझ्या पूजेची व्यवस्था कर, त्यामुळे गावाचे भाग्य उजळेल.’ त्यानुसार गावंडे पाटील यांनी पाहिले असता खुरामध्ये अडकलेला तो ‘विशेष’ त्यांना दिसला. स्वप्नदृष्टांतानुसार त्याच जागेवर त्यांनी त्याची प्रतिष्ठापना करून तेथेच झोपडीवजा मंदिर बांधले. तेव्हापासून या मंदिरात माहूर येथील देवाचा अंश असलेल्या या विशेष पवित्र दगडाची पूजा–अर्चा सुरू झाली.
ऐतिहासिक नोंदींनुसार, १८६४ साली राधाबाई धर्माजीराव गावंडे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून येथे दत्त जयंती उत्सवास सुरुवात झाली. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात ३ दिवस दत्त जयंतीचा उत्सव येथे साजरा होतो. यानंतर राधाबाईंनी पूर्वापार चालत आलेली माहूरवारी बंद करून गोंदिया जिल्ह्यातील डाकराम–सुकळी (चक्रधर स्वामींचे चरणाकिंत स्थान) येथील वारी सुरू केली. ती वारी आजही केली जात असून या वारीत शेकडो भाविक सहभागी होतात. राधाबाई यांच्यानंतर त्यांचा मुलगा कवडूजी पाटील यांनी, तर त्यानंतर रामचंद्रजी, हरिचंद्रजी, देविदासजी व उमेशजी पाटील यांनीही श्रीदत्त जयंती यात्रेचा वारसा जोपासला.
नागपूर–गडचिरोली राज्य महामार्गावरील भिवापूरपासून जवळ साठगाव आहे. येथील एका टेकडीवर श्रीदत्तांचे मंदिर स्थित असून त्यामध्ये श्रीदत्तांची पाषाणाची प्रतिमा आहे. या प्रतिमेला विलेपन करून त्यावर एकमुखी दत्ताचा चांदीचा मुखवटा बसविला आहे. हे प्रामुख्याने महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे. महानुभाव पंथाचे भाविक हे श्रीकृष्ण व एकमुखी दत्ताची भक्ती करतात.
मार्गशीर्ष पौर्णिमेपासून येथे श्रीदत्त जयंती यात्रा महोत्सवाला सुरुवात होते. पहिल्या दिवशी श्रीदत्तांचा जन्मोत्सव. त्यानंतर लाकडी रथावर दत्त मूर्तीची स्थापना केली जाते. हा रथ परंपरेप्रमाणे प्रथम मालगुजार यांच्या म्हणजेच कवडूजी पाटील गावंडे यांच्या वाड्यात जातो. तेथे आरती होते आणि काला करून प्रसाद वाटला जातो. नंतर वाद्यांच्या गजरात रथाला गावात फिरवून मंदिरात आणले जाते. दुसऱ्या दिवशी जत्रेला मोठे स्वरूप येते. या दिवशी भजन, प्रवचन, कीर्तन, दहीहंडी, गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तिसऱ्या दिवशी गोपाळकाला व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच यात्रेनिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मैदानी खेळ व नाटकाचे आयोजन केले जाते. यात्राकाळात विदर्भातील अनेक भाविक येथे हजेरी लावतात. त्यामध्ये महानुभाव पंथीय भक्तांचा व महंतांचाही मोठा सहभाग असतो.