बुलडाणा जिल्हा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव आणि त्यानंतर मुघल व मराठा साम्राज्यांच्या कालखंडात या प्रदेशाने अनेक राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. मेहकर हे गाव प्राचीन काळी मेघंकर नगरी म्हणून ओळखले जात असे. पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाचा उल्लेख स्कंद पुराण, पद्म पुराण आणि मत्स्य पुराणासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आलेला आहे. याच शहरात असलेले शारंगधर बालाजी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रीविष्णू व श्रीलक्ष्मीची एकत्रित मूर्ती असलेले देशातील हे दुर्मिळ मंदिर असल्याचे सांगण्यात येते. गंडकी शिळेत घडवलेली येथील मूर्ती शिल्पशास्त्रातील एक आश्चर्य मानले जाते.
या मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी की मेहकर शहर आज जेथे आहे तेथे प्राचीन काळी दंडकारण्याचा भाग असलेले घनदाट अरण्य होते. येथील पैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर अनेक ऋषी-मुनी आपल्या आश्रमात राहून तपश्चर्या आणि यज्ञादी कर्मे करत असत. असे मानले जाते की प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने एका महायज्ञाच्या वेळी आपल्या ‘प्रणिता पात्रा’तून पैनगंगा नदीची निर्मिती केली होती. त्यामुळे या नदीला आणि परिसराला अत्यंत पवित्र मानले जात असे. परंतु, या पवित्र वातावरणाला मेघंकर नावाच्या एका क्रूर असुराने ग्रहण लावले होते. हा असुर सतत ऋषींच्या यज्ञात विघ्ने आणत असे. यज्ञकुंड भ्रष्ट करत असे आणि अनेकदा तपस्वी ऋषींना ठार मारून भक्षण करत असे.
त्याच्या या अत्याचाराने त्रस्त झालेल्या ऋषींनी भगवान विष्णूची करुणा भाकली. त्यानुसार भगवान विष्णू भक्तांच्या रक्षणासाठी येथे आले. भगवान विष्णू आणि मेघंकर असुर यांच्यात येथे घनघोर युद्ध झाले. दैत्याच्या मायावी शक्तींचा सामना करण्यासाठी भगवंताने आपल्या धनुष्यातून बाणांचा वर्षाव केला. यात मेघंकराचा अंत झाला. या युद्धात विष्णूने शार्ङ्ग (शारंग) धनुष्य धारण केले होते म्हणून येथील विष्णूच्या रूपाला शारंगधर असे नाव पडले. या विजयानंतर ऋषींनी भगवान विष्णूला विनंती केली की त्यांनी भक्तांच्या रक्षणासाठी तिथेच वास्तव्य करावे. त्यानुसार भगवान विष्णू येथे चतुर्भुज रूपात स्थिर झाले. येथील मूर्तीच्या हातात प्रत्यक्ष धनुष्य दिसत नसले, तरी डोक्यावरील मुकुटावर आणि प्रभावळीत धनुष्य धारण केलेल्या विष्णूची कोरीव प्रतिमा आहे.
मेहकर शहराभोवती पूर्वी तटबंदी होती. या तटबंदीचा उत्तरेकडील काही भाग सध्या शिल्लक आहे. येथील प्रवेशद्वारातून आत आल्यावर एका उंचवट्यावर किल्लेवजा गढी होती. ही गढी पूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली होती व तिचा अर्धा भाग गावातील देशमुख पाटील आणि भिसे पाटील यांच्या मालकीचा होता.
त्यापैकी रामभाऊ भिसे पाटील यांच्या मालकीच्या जागेत शाळेच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, ७ डिसेंबर १८८८ या दिवशी जमिनीखाली शारंगधर मूर्ती सापडली. खोदकामादरम्यान येथे दगड व विटांनी बांधलेले तळघर आढळले. या तळघरात एका लाकडी पेटीत ३.४ मीटर उंचीची ही भव्य मूर्ती आडव्या स्थितीत ठेवलेली होती. पेटीत मूर्तीसोबत गरुड, केशवराज व बालाजीची लहान मूर्ती, गणेश व तुळजाभवानीची मूर्ती, तसेच काही ताम्रपत्रे, शिलालेख व मौल्यवान वस्तूही सापडल्या. ही मूर्ती सापडल्याची बातमी समजताच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ती जप्त करण्याचा आदेश जारी केला. तत्कालीन ब्रिटिश डेप्युटी कलेक्टर सर रिचर्ड टेंपल यांनी ताम्रपट, शिलालेख व मौल्यवान वस्तू ताब्यात घेऊन त्या लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये पाठवल्या. शारंगधराची मूर्तीही लंडनला पाठवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, याची कुणकूण लागताच ग्रामस्थांनी तातडीने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरविले. त्यानंतर गावातील जानकीराम आप्पा पाठक, रामभाऊ थिटे पाटील आणि अण्णासाहेब देशमुख आदी प्रतिष्ठित व्यक्तींनी ग्रामस्थांच्या मदतीने पहाटे चार वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
त्यामुळे संतप्त झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ६० हून अधिक ग्रामस्थांना तुरुंगात डांबले. जानकीराम पाठक व अन्य दोघांना सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला, तर रामभाऊ थिटे पाटील यांना पोलीस पाटील हे पद गमवावे लागले.
त्यानंतर ग्रामस्थांनी ही मूर्ती सापडलेल्या परिसरातील वाडे विकत घेऊन किंवा दान मिळवून तो परिसर मोकळा करवून घेतला. त्यानंतर गावातून व आजूबाजूच्या परिसरातून लोकवर्गणी काढण्यात आली. अनेकांनी दान केलेल्या साहित्यातून मंदिराची भव्य वास्तू उभारण्यात आली. या मंदिराच्या बांधकामासाठी १८८८ च्या सुमारास दीड लाख रुपये खर्च झाला, असे सरकारी गॅझेटमध्ये नमूद आहे.
मंदिर परिसरात सापडलेले पांढरे दगड व चिऱ्यांचा वापर करून हे मंदिर उभारण्यात आले. लोणार परिसरातील पाथरवटांकडून मंदिरासाठी वापरलेले दगड तासून कोरून घेण्यात आले. मंदिर उभारण्यासाठी लागलेले सागवान लाकूड चंद्रपूर परिसरातून आणण्यात आले. मंदिराचे बांधकाम उत्कृष्ट व्हावे, यासाठी सोलापूर परिसरातून कुशल कारागीर व गवंडी आणण्यात आले. मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी १८८८ ते १९१३ असा सुमारे २५ वर्षांचा कालावधी लागला.
१९१३ मध्ये प्रल्हादबुवा गिरोलीकर शास्त्री यांच्या हस्ते या मंदिरात मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली.
या मंदिराच्या चारही बाजूंनी विस्तीर्ण प्रांगण आहे. पूर्व दिशेला बुरुज व तट बांधलेला आहे. या तटाच्या मध्यभागी कोरीव काम असलेले दगडी महाद्वार आहे. १८९० ते १९०० या कालावधीत हे महाद्वार बांधण्यात आले. येथून काही पावलांवर दुसरे महाद्वार आहे. या महाद्वारावर पूर्वेकडून पश्चिमेकडे सज्जे आहेत. प्रारंभीच्या काळात त्याचा नगारखाना म्हणून उपयोग होत असे. भव्य प्रांगणात समोरच मंदिराची देखणी वास्तू आहे. खुला मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून पाच पायऱ्या चढून मंडपात प्रवेश होतो. या मंडपातून बंदिस्त असलेल्या सभामंडपात जाता येते. या सभामंडपात लाकडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर सभामंडपाच्या तीन बाजूंनी ओसऱ्या आहेत. येथील वितानावरही सुबक नक्षीकाम आहे. सभामंडपातून तीन पायऱ्या चढून खुल्या अंतराळात प्रवेश होतो. या अंतराळातूनच गर्भगृहात असलेल्या बालाजी मूर्तीचे दर्शन घेता येते.
गर्भगृहातील वज्रपिठावर शारंगधर बालाजी मूर्ती विराजमान आहे. ३.४ मीटर उंच असलेल्या या मूर्तीची जाडी ०.७५ मीटर व रुंदी १.२ मीटर आहे. समचरणस्थितीत उभ्या असलेल्या या मूर्तीच्या शिरोभागी उभट मुकुट आहे. या मुकुटाच्या प्रारंभी कीर्तीमुख असून मधल्या मोकळ्या जागी ‘शारंग’ धनुष्य धारण केलेल्या विष्णूची प्रतिमा कोरलेली आहे. मूळ मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात पद्म आणि वरच्या हातात गदा आहे. वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख आहे. प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. त्यात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह व वामन या अवतार मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांच्या वरच्या रथिकेमध्ये हंसासह त्रिमुखी ब्रह्मदेव आहे. डाव्या बाजूला वरच्या बाजूला असलेल्या रथिकेत नंदीसह शिव आहेत. त्यानंतर परशुराम, राम, बलराम आणि कल्की हे अवतार कोरलेले आहेत. या मूर्तीच्या केसांची महिरप मुकुटाखालून रुळत आहे. मूर्तीच्या भुवया धनुष्याकृती आहेत आणि तिचे नाक धारदार आहे. मूर्तीच्या छातीवर भृगुलांच्छन (भृगू ऋषींनी श्रीविष्णूंच्या छातीवर लाथ मारली होती, अशी पौराणिक कथा आहे. या लाथेचे चिन्ह) उमटलेले आहे. त्रिमितीत कोरलेल्या या मूर्तीच्या गळ्यात एकावली, फलकहार, प्रलंबहार आहे. खांद्यावर स्कंदपत्र, दंडामध्ये केयूर, उदरबंध, कटिसूत्र, पादांगद व पादपत्र आहेत. बालाजीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीलक्ष्मी आहे आणि तिची नजर शारंगधराच्या चरणाकडे आहे. समोर श्रीविष्णूंचे द्वारपाल जय व विजय यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. उजव्या बाजूला भूलक्ष्मी बसलेली आहे.
मूर्तीच्या उजव्या बाजूस काळ्या पाषाणात घडवलेली आणखी एक मूर्ती आहे. ती ८३ बाय ५३ सेंटिमीटर उंच व रुंद आहे. शारंगधराची मूर्ती व ही मूर्ती शिल्पवैशिष्ट्यांच्या दृष्टीने समान आहेत. त्यामुळे या दोन्ही मूर्ती एकाच कारागिराने घडवलेल्या असाव्यात, असे मानले जाते. वृंदावनमध्ये ‘वृंदावन बिहारी लाल की जय’ असे, तर तिरुपती येथे ‘गोविंदा गोविंदा’ म्हणत बालाजीचा जयघोष केला जातो. तर मेहकर येथे ‘लक्ष्मीरमण शारंगधर गोविंदा गोविंदा’ असा जयघोष केला जातो.
या मंदिराच्या समोरच गरुडदेवाचे मंदिर आहे. ज्या ठिकाणी जमिनीत शारंगधराची मूर्ती सापडली त्याच ठिकाणी ही मूर्ती सापडली होती. गंडकी काळ्या पाषाणात घडवलेली ही मूर्ती पक्षी आकारात नसून मानवाकृती आहे. याशिवाय मंदिर परिसरात श्रीसिद्धगणेश व तुळजाभवानी, जगदंबामाता, संकटमोचक हनुमान यांची मंदिरे आहेत. गणेश मंदिराच्या उजवीकडे केशवराज मंदिर आहे. केशवराजला बालाजीचे थोरले बंधू मानले जाते. केशवराजाची मूर्तीही काळ्या गंडकी शिळेत कोरलेली आहे.
मंदिर परिसरात प्रसादालय आहे. येथे दररोज सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अन्नदान करण्यात येते. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी परिसरात भक्तनिवासही बांधण्यात आले आहे. या मंदिराजवळून पैनगंगा (प्रणिता) नदी वाहते. ती उत्तरेकडून दक्षिण दिशेस येऊन पश्चिमवाहिनी झाल्याने तिला गंगेसारखे पवित्र मानण्यात येते.
हे मंदिर दररोज पहाटे ५.३० ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले असते. मंदिरात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, विजयादशमी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यात येथे महिनाभर विष्णूसहस्रनामाचा जप तसेच गणेशाचे अथर्वशीर्ष पठण केले जाते. अश्विन महिन्यात बालाजीचा नवरात्रोत्सव असतो. विजयादशमीच्या दिवशी मंदिरातील उत्सवमूर्तीला सीमोल्लंघनासाठी नेण्यात येते. यावेळी या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. त्रिपुरारी पौर्णिमेला कुरवंडी उत्सव साजरा केला जातो. यावेळी पणत्यांची आरास केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी शारंगधराची मूर्ती सापडली. त्यामुळे या दिवशी येथे शारंगधर प्रकटदिन साजरा केला जातो. नागदीपावली म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ते पौर्णिमेपर्यंत येथे दहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. या कालावधीत मूर्तीला वारानुसार पोषाख व अलंकार घातले जातात.