क्षात्रकुलीन सरदारांच्या विजयश्रीचे प्रतीक असलेले चिपळूण तालुक्यातील मजरे–दादर येथील रामवरदायिनी देवीचे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. शिंदे घराण्याची कुलस्वामिनी, तसेच तालुक्यातील दसपटी विभागातील गावांचे कुलदैवत असलेल्या देवीचे हे मंदिर येथील लोकजीवनाचे व पारंपरिक अस्मितेचे प्रतीक आहे. वैतरणा व पंचगंगा यांच्या संगमापासून काही अंतरावर, विस्तीर्ण पठारावर, सुमारे चार एकरांत बांधलेले हे मंदिर, अनेकांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या देवीच्या यात्रेला लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
मंदिराची अख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर व्याकुळ होऊन सीतेचा शोध घेणाऱ्या श्रीरामांची परीक्षा घ्यावी, असे माता पार्वतीच्या मनात आले. ती सीतेचे रूप घेऊन श्रीरामांपुढे उभी राहिली व माझा शोध का घेता, मी येथेच आहे, असे ती म्हणाली. मात्र श्रीरामांनी जेव्हा अंतरज्ञानाने माता पार्वतीला ओळखले तेव्हा माता पार्वती येथे मूळ रूपात प्रगट झाली. ‘सीता निष्कलंक असून तुझ्या हातूनच रावणाचा वध होईल व त्याचे राज्य नष्ट होईल,’ असा वर तिने श्रीरामाला दिला. श्रीरामांना वरदान देणारी म्हणून या देवीचे नाव रामवरदायिनी झाले.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, बाराराव कोळ्यांवर स्वारी करण्यासाठी निघालेले शिंद्यांचे पूर्वज सोमाजीराव आणि सिदोजीराव यांना वाटेत एक साधू भेटला. त्याने आपल्याकडील झोळीतून देवीची मूर्ती काढून त्यांना दिली. या स्वारीत यश आणि दौलत मिळेल, असा आशीर्वादही त्याने दिला. त्यानंतर या स्वारीत यश मिळाल्यास तुझी स्थापना करून तुला आम्ही कुलदेवता मानू, असा नवस सोमाजीराव आणि सिदोजीराव यांनी देवीला केला. स्वारीत यश मिळाल्यानंतर त्यांनी आपला नवस पूर्ण केला.
चिपळूण–कराड मार्गावरील कान्हे–पिंपळी गावातून पूर्वेकडे वळणारा रस्ता रामवरदायिनी मंदिराकडे जातो. दसपटीचा मध्यबिंदू असलेल्या मजरे–दादर येथे हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. २००१ मध्ये झालेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणामुळे मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचवेळी येथे देवीच्या जुन्या मूर्तीच्या जागी नव्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली. चहुबाजूने तटबंदी असलेल्या या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश केल्यावर तेथून मंदिरापर्यंत जाणारी एक फरसबंदी वाट आहे. या वाटेवरून पुढे गेल्यावर काचेने बंदिस्त केलेल्या छोट्या जागेत शंकराची मूर्ती आणि १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत. तेथून काही अंतरावर गणपती आणि साईबाबा यांची मंदिरे आहेत. संपूर्ण मंदिर प्रांगणात सुंदर उद्यान विकसित केलेले आहे. त्यात असलेल्या विविध शोभेच्या व फुलझाडांमुळे येथील मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते.
मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस दोन्हीकडे उंच दीपमाळा आहेत. सुमारे चार फूट उंच जोत्यावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी दहा पायऱ्या आहेत. सभामंडप व तीन गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात आकर्षक नक्षीकाम असून येथे भाविकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. येथील छतावर असलेले सुंदर झुंबर लक्ष वेधून घेतात. सभामंडपाच्या उजव्या बाजूला असलेल्या गर्भगृहात महिषासुरमर्दीनी व डाव्या बाजूच्या गर्भगृहात वाघजाई–त्रंबकीदेवीच्या मूर्ती आहेत. येथील देवी रामवरदायिनीच्या मुख्य गर्भगृहाभोवती असलेले १३ खांब, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या प्रत्येक भागावर असलेले १३ भाले, मंदिराला असलेली १३ लहान लहान प्रवेशद्वारे, तसेच मंदिराच्या शिखरावर असलेले १३ घुमट यातून दसपटीतील १३ गावांना दिलेला मान प्रतीत होतो. मुख्य गर्भगृहात पाच अश्वांच्या, सारथी असलेल्या, चांदीच्या रथावर आरूढ झालेली रामवरदायिनीची सुंदर मूर्ती आहे. वस्त्र व विविध अलंकार ल्यालेल्या मुकुटधारी देवीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. देवीच्या मागील बाजूस चांदीची सुबक कलाकुसर केलेली आहे.
विविध वार्षिक उत्सवांसोबतच चैत्र पौर्णिमेला होणारी रामवरदायिनीची यात्रा हा येथील सर्वात मोठा व प्रमुख उत्सव असतो. यावेळी देवीला शृंगार करून तिची साडी–चोळीने ओटी भरली जाते. रात्री देवीची बहीण असलेली कळकवणेची ग्रामदेवता झोलाईची पालखी, कादवडचे ग्रामदैवत असलेल्या काळभैरवाची परडी, जत्रेचे यजमान असलेल्या नांदिवसेकर शिंदेंचे ग्रामदैवत कालभैरवाचे निशाण येथे येते. दोन्ही बहिणींच्या या भेटीचा सोहळा विविध वाद्यांच्या गजरात साजरा होतो. यात्रेदरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाते. दररोज सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत भाविकांना रामवरदायिनी देवीचे दर्शन घेता येते.
शिवपूर्वकालीन कोकणातील दाभोळ–अंजनवेल–चिपळूण या प्रांतातील दहा गावांचा समूह म्हणून या भागास दसपटी म्हटले जात असले तरी येथे १३ गावे आहेत. शिंदे घराण्याची ११ आणि कदम घराण्याची दोन अशी गावांची विभागणी आहे. मजरे–दादर हे गाव १५२०–२२ दरम्यान दसपटीकरांना देवीसाठी इनाम देण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, शाहू छत्रपती यांनी या मंदिरासाठी सनद दिली होती. हा परिसर महाराष्ट्राच्या पाच शतकांतील ऐतिहासिक घडामोडींचा, उलथापालथीचा आणि चढ–उतारांचा साक्षीदार असून कर्तृत्ववान आणि धुरंधर सेनानींची, नरवीरांची ही कर्मभूमी आहे.