पलसिद्धस्वामी मठ

साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा

शिवोपासक संप्रदायांपैकी वीरशैव पंथाच्या अनुयायांसाठी श्रद्धेचे स्थान असलेला पलसिद्धस्वामी मठ सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा येथे आहे. पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या साखरखेर्डा गावातील या मठाला वीरशैव संप्रदायासाठी धर्मपीठाचे महत्त्व आहे. या मठात वीरशैव संप्रदायाच्या पाच पीठांपैकी उज्जयिनी पीठाचे ६०वे पीठाधीश जगद्गुरु मरुळसिद्ध शिवाचार्य महास्वामी यांचे मंदिर आणि समाधीस्थान आहे. शके ९८० मध्ये (इ. स. १०५८) पळसाच्या झाडाखाली संजीवन समाधी घेतल्याने त्यांना पलसिद्ध महास्वामी म्हणून ओळखले जाते.

वीरशैव संप्रदायाची रंभपुरी पीठ (बाळेहोन्नूर, कर्नाटक), उज्जयिनी पीठ (सद्धर्म सिंहासन), श्रीशैल, काशी पीठ तसेच सेतू पीठ ही पाच पीठे आहेत. त्यापैकी उज्जयिनी पीठाचे ६०वे पीठाधीश जगद्गुरु मरुळसिद्ध शिवाचार्य हे वीरशैव संप्रदायाचा प्रसार व प्रचारासाठी भारतभ्रमण करत असत. एकदा कर्नाटकमधील बिदर प्रांतातील राजे जयसिंग यांच्या राज्यात मोठा दुष्काळ पडला. राज्यात पाऊस पडावा यासाठी अनुष्ठान करण्यासाठी राजाने अनेक साधू-संतांना बोलावले. मात्र, या अनुष्ठानानंतरही पाऊस न पडल्याने त्याने या साधू-संतांना तुरुंगात डांबले. ही वार्ता समजल्यानंतर तेथे गेलेल्या मरुळसिद्ध शिवाचार्य महास्वामींनी अनुष्ठान केले व त्यानंतर पाऊस पडून दुष्काळाचे निवारण झाले.

पुढे मरुळसिद्ध शिवाचार्य महास्वामींनी कर्नाटकमधील उज्जयिनी येथे पीठाची स्थापना केली. नंतर ते वीरशैव धर्माच्या प्रचारासाठी पुन्हा भ्रमणाला निघाले. भ्रमण करता करता ते ‘खेटकपूर’ येथील अभयारण्यात आले. साखरखेर्डाचे जुने नाव ‘खेटकपूर’ असे होते. तो दंडकारण्याचा भाग होता. येथे वास्तव्याला असलेल्या खेटकासूर नावाच्या दैत्यावरून या गावाला हे नाव पडले होते. पौराणिक काळात येथे धौम्य ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. येथील अभयारण्यात त्यांनी अनेक वर्षे तप केले. येथील गुहेत त्यांचे वास्तव्य असे. उतारवयात धर्माच्या प्रचारासाठी भ्रमण करणे शक्य नसल्याने ते येथेच स्थायिक झाले. त्यांनी येथे अनेक लीलाही केल्या. या लीलांचे संकलन त्यांच्या चरित्रग्रंथामध्ये करण्यात आले आहे.

स्थानिक आख्यायिकेनुसार, ते गावातील संखेडी भागात राहात. त्यांनी गावात राहावयास यावे, यासाठी ग्रामस्थांनी विनंती केली असता, ‘मी गावात येण्यापेक्षा गावच माझ्यापर्यंत येईल,’ असे उत्तर त्यांनी दिले होते. शके ९८० मध्ये त्यांनी येथील पळसाच्या वृक्षाखालील गुहेत श्रावण वद्य तृतीयेच्या दिवशी संजीवन समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या हातातील दंड या झाडाजवळ रोवला. तो आजही येथे पाहायला मिळतो. पूर्वी समाधीशेजारच्या परिसरात एका विशिष्ट जागी रोज एक गाय प्रकट होत असे व तिचे दूध काढल्यावर ती अदृश्य होत असे, अशी आख्यायिकाही प्रसिद्ध आहे.

पळसाच्या झाडाखाली समाधिस्त झाल्याने मरुळसिद्ध शिवाचार्य महास्वामी यांना ‘पलसिद्ध महास्वामी’ असे नाव पडले. बिदर प्रांतात त्यांना ‘मळी (पाऊस पाडणारे) स्वामी’ म्हणून ओळखले जाते. पलसिद्ध महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे पट्टशिष्य सिद्धलिंग शिवाचार्य यांनी या गुहेचे वरचे द्वार बंद करून त्यांची समाधी बांधली. त्यानंतर त्यांनी येथे मठ स्थापन करून पलसिद्ध महास्वामींचे कार्य सुरू ठेवले. सध्या विस्तारीकरणामुळे हे समाधीस्थळ व मठ गावाच्या हद्दीच्या आत आले आहे. संतकवी लक्ष्मण यांनी याच मठातून प्रेरणा घेऊन विपुल अभंगवाङ्मय निर्माण केले. स्थापन झाल्यापासून सुमारे ३० स्वामींनी या मठाचा कारभार पाहिला. सध्या मठाधिपती वेदान्ताचार्य शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली या मठाचे कामकाज चालते. राज्य सरकारने या मठाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे.

साखरखेर्डा गावाचा मोठा इतिहास आहे. या गावाच्या नामकरणाबाबतही रोचक आख्यायिका आहे. पैनगंगा नदीची उपनदी असलेल्या भोगावती नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील गोड्या पाण्याच्या विहिरीवरून या गावाला हे नाव पडले. पूर्वी या गावातून साखरेचे व्यापारी साखर वाहतूक करत. एकदा या व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यादरम्यान त्यांनी साखरेच्या गोणी या विहिरीत टाकून दिल्या. त्यामुळे या विहिरीचे पाणी गोड झाल्याचे सांगण्यात येते. सन १७२४ मध्ये दख्खनवर निजामाचे वर्चस्व प्रस्थापित करणारी लढाई येथेच झाली. निजामाच्या राज्याचा संस्थापक निजाम-उल-मुल्क असफ शाह आणि मुघल सम्राटाचा प्रतिनिधी मुबारीझ खान यांच्यादरम्यान झालेल्या या लढाईत निजामाचा विजय झाला. या विजयाच्या स्मरणार्थ त्याने या गावाचे नाव बदलून ‘फतेहखेल्डा’ असे ठेवले. ते कालांतराने ‘फतेहखेर्डा’ (विजयाचे खेडे) झाले. इंग्रजांच्या राजवटीपर्यंत हेच नाव कायम होते. कालांतराने हे गाव पुन्हा मूळ नावाने ओळखले जाऊ लागले.

या मंदिराला सुंदर प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी त्रिशूळधारी शिवशंकरांची उभी मूर्ती आहे आणि या मूर्तीमागे नंदीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मोठे प्रांगण लागते. या प्रांगणात अनेक वृक्ष आहेत. प्रांगणातच असलेल्या मंदिराभोवती तटभिंत आहे. नगारखाना असलेल्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दगडी फरसबंदी केलेले प्रांगण लागते. तटभिंतीला आतील बाजूने ओवऱ्या आहेत. मूळ मठ अत्यंत अभेद्य व श्वापदांपासून सुरक्षित राहावा अशा रितीने बांधण्यात आला होता. दोन टप्प्यांमध्ये मठाच्या बांधकामाचा विस्तार झालेला आहे. मूळ मठाचे प्रवेशद्वार भुयारी मार्गासारखे आहे, त्यातून पुढे आल्यावर आतील भव्य मठ दृष्टीस पडतो.

येथील मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची चौकट चांदीच्या नक्षीदार कलाकुसर असलेल्या पत्र्याने सुशोभित केलेली आहे. द्वारपट्टीतील ललाटबिंबही चांदीच्या पत्र्याचे आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर चांदीच्या पत्र्यावर ‘श्रीमद् जगद्गुरु परमहंस मरुळाचार्यवर्य श्रीमद् भूरुद्र पळसिद्ध स्वामिन् प्रसिद श्रीमन् नृपशा. शके ९८०’ असा मजकूर कोरलेला आहे. पूर्वी हा मजकूर पाषाणात कोरलेला होता. या मजकुराच्या दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे कोरलेली आहेत. गर्भगृहात पलसिद्ध महास्वामींची संगमरवरी दगडात घडवलेली बैठ्या स्थितीतील मूर्ती आहे. पूर्वी ही मूर्ती पाषाणात घडवलेली होती. १९७१ च्या आसपास येथे संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मूर्तीखाली संगमरवरी शिवपिंडी आहे. गर्भगृहाबाहेरील उजवीकडील देवळीत गणेशाची मूर्ती आहे. त्याखालील चौथऱ्यावर परंपरागत गादीवर पादुका ठेवण्यात आल्या आहेत. या गादीवरच पीठाच्या नवीन पीठाधिपतींचा पट्टाभिषेक करण्यात येतो. या गादीजवळ गोत्रपुरुष म्हणून नंदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. येथून काही पावलांवरच मठाचे दिवंगत पीठाधीश शिवानंद यांची गादी आहे. या परिसरात वीरशैव संप्रदायाच्या उज्जयिनी पीठाचे संस्थापक व पंथातील पंचाचार्यांपैकी एक असलेल्या दारुकाचार्यांचे देवकोष्ठक आहे. येथे त्यांची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या बाजूला गणेशमूर्ती आहे. परिसरात मठाच्या दिवंगत सहा पीठाधीशांच्या समाधीही आहेत.

मठाच्या दुसऱ्या भागात मोठा सभामंडप तसेच धार्मिक कार्यासाठी येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठीच्या खोल्या आहेत. मठाच्या परिसरात काही पीठाधीशांच्या समाधी आहेत. नजीकच पूर्वी वापरात असलेले मोठे दगडी जाते व खलबत्ते ठेवलेले दिसतात. त्यावरून मठात पूर्वी अनेक लोकांचे वास्तव्य असावे, असा कयास बांधता येतो. परिसरात एक प्राचीन विहीरही आहे. नजीकच असलेल्या एका मार्गातून या विहिरीत उतरता येते. येथून काही पावलांवरच पलसिद्ध महास्वामींचे समाधीस्थान आहे. मोठ्या सभामंडपात पळसाच्या झाडाखाली हे समाधीस्थान आहे. या ठिकाणी कपिला गायीचे शिल्प व शिवपिंडी आहे. या सभामंडपातील भिंतींच्या वरच्या भागात पलसिद्ध महास्वामींनी केलेल्या लीलांचे सचित्र वर्णन दिसते. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मठाच्या परिसरात भक्तनिवासही बांधण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांतून वीरशैव संप्रदायातील असंख्य अनुयायी येथे दर्शनासाठी येतात. श्रावण वद्य तृतीयेला येथे तीन दिवसांचा मोठा उत्सव होतो. या उत्सवात अनेक अनुयायी पलसिद्ध महास्वामींच्या समाधीस्थानासमोर नतमस्तक होतात.

उपयुक्त माहिती:

  • सिंदखेड राजा येथून ५३ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५५ किमी अंतरावर
  • मेहकर व सिंदखेड राजा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : तानाजी गुंडाप्पा, व्यवस्थापक, मो. ८७९३३५१००८, ९४२१०८७३७७

पलासिद्धस्वामी मठ

साखरखेरदा, ताल. सिंदखेड राजा, जिला. बुलढाणा

Back To Home