माधवराव महाराज मंदिर

चंदनखेडा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर

भद्रावती तालुक्यात चंदनखेडा गावात असलेले माधवराव महाराज यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. गोंडकालीन राजाचे हे समाधी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिरात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या घोडा उत्सवासाठी या गावातील माहेरवाशिणी जावयांना खास निमंत्रण पत्रिका पाठवून सन्मानपूर्वक बोलावले जाते त्यांचा उत्सवादरम्यान यथोचित सत्कार केला जातो. त्यामुळे या उत्सवासाठी माहेरवाशिणी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आवर्जून उपस्थित राहतात.

चंदनखेडा नगरीसंदर्भातील ऐतिहासिक नोंदींनुसार, वीरशाह हा चंद्रपूरमधील गोंड घराण्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर राणी हिराईने राजा वीरशाह यांचे चुलतबंधू राजा गोविंदशाह यांचा मुलगा रामशाह याला दत्तक घेऊन गादीवर बसविले. राजा गोविंदशाह तेव्हा चंदनखेडा येथील राज्य कारभार पाहत होते. गोंड राणी हिराई हिच्या काळात चंद्रपूर हे राजधानीचे, तर चंदनखेडा हे उपराजधानीच्या दर्जाचे ठिकाण होते. रामशाह तेव्हा वर्षांचा होता. तो सज्ञान होईपर्यंत सुमारे १९ वर्षे राणी हिराईने त्याच्यावतीने राज्यकारभार सांभाळला. पुढे राणी हिराईच्या म्हणजेच आईच्या तालमीत तयार झालेला राजा रामशाह याने चंद्रपूरचा खऱ्या अर्थाने विकास केला. त्याच्या काळात चंद्रपूरमध्ये पाण्याची व्यवस्था, रस्ते, सौंदर्यीकरण, राजवाडे, महाल, बागबगिचे आदींचा विकास झाला. चंद्रपूर गोंड राज्याला रामशाह यांच्या रूपाने चंदनखेडा गावानेविकासपुरुषदिला होता, असे म्हटले जाते.

चंदनखेडा ही ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेली नगरी समजली जाते. नागपूर विद्यापीठाद्वारे झालेल्या संशोधनामधून तसेच उत्खननातून या गावात सातवाहन कालीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. या नगरीच्या दक्षिणेला प्राचीन किल्ला असून त्या शेजारी गोंडकालीन राजा माधवराव आत्राम यांची समाधी आहे. माधवराव आत्राम हे राजा गोविंदशाह यांचे पूर्वज होते. ते एका लढाईत त्यांच्या घोड्यासह शहीद झाले होते म्हणून त्यांची येथे समाधी आहे.

माधवराव महाराजांचे येथील समाधी स्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. कोणत्याही शुभकार्यासाठी जेव्हा येथील ग्रामस्थ बाहेर जातात त्याआधी किंवा काम झाल्यानंतर ते माधवरावांच्या समाधीच्या दर्शनाला आवर्जून येतात. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले हे समाधी मंदिर अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्याचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारानंतर धार्मिक कार्यक्रमांसोबतच येथे सामाजिक कार्यक्रमांचीही सुरुवात करण्यात आली. पूर्वी या मंदिरात महिलांना प्रवेश नव्हता, तसेच येथील प्रसाद ग्रहण करण्याचीही त्यांना अनुमती नव्हती; परंतु गावातील तरुणांनी एकत्र येऊन समाजजागृती करून महिलांना मंदिर प्रवेश प्रसादग्रहण सुरू केले.

माधवराव महाराज देवस्थानात जाण्यासाठी प्रथम तटबंदीचे प्रवेशद्वार लागते. हे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याचे असावे, अशी त्याची रचना आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे असलेल्या सुंदर उद्यानातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी फरसबंदी वाट आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ घोड्यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय दुमजली दिसणाऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावरही घोड्याची मूर्ती विराजमान आहे. येथे नवसपूर्तीनंतर घोड्याची मूर्ती देवाला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडप त्यातच लहानसे गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहासमोर सभामंडप नव्याने बांधल्याचे जाणवतेगर्भगृहात माधवराव महाराजांची घोड्यावर आसनस्थ अशी मूर्ती आहे. याशिवाय गर्भगृहात आणखी घोड्यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या किल्ल्याजवळही घोड्यांच्या शेकडो मूर्ती पाहायला मिळतात.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध घोडा उत्सवाची सुरुवात होते. या उत्सवात चंदनखेडा गावातील मुली लग्न करून सासरी गेल्या आहेत त्यांना पतीसह (जावई) खास आमंत्रित केले जाते. त्यामुळे या उत्सवासाठी सर्व माहेरवाशिणी त्यांच्या कुटुंबासह यावेळी चंदनखेडा गावात उपस्थित असतात. याशिवाय येथील ग्रामस्थ जे नोकरी वा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात त्यांनाही आवर्जून पत्रिका पाठवून बोलावण्यात येते. त्यामुळे उत्सवाच्या या दिवसांत गावात दिवाळीसारखे वातावरण असते.

यावेळी सजविलेल्या घोड्याची गावातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणूक मार्गावर प्रत्येक घरासमोर रांगोळ्या, सजावट पताका लावल्या जातात. प्रत्येक घराजवळ या उत्सवमूर्ती घोड्याची पूजा केली जाते. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी २५ ते ३० हजार लोक येथे उपस्थित असतात़; परंतु आजपर्यंत येथे कोणत्याही प्रकारचा पोलिस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता भासली नाही. हा उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडतो. या उत्सवात पूर्वीपासून येथील मालगुजार (खोत) पोलिस पाटील यांना विशेष मान असतो.

उपयुक्त माहिती:

  • भद्रावती येथून २४ किमी, तर चंद्रपूर येथून ५० किमी अंतरावर
  • भद्रावतीहून चंद्रखेडासाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home