बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात वसलेले जानोरी हे गाव श्री नृसिंहांच्या ‘लक्ष्मीनृसिंह’ या अतिशय शांत आणि विलोभनीय रूपामुळे भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बनले आहे. भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील नृसिंह अवतार हा एरवी पराकोटीच्या उग्रतेचे प्रतीक मानला जातो; मात्र जानोरी येथील मंदिरात त्यांचे अत्यंत सौम्य आणि वात्सल्यपूर्ण रूप पाहावयास मिळते. अनेक वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात सापडलेली ही प्राचीन चतुर्भुज मूर्ती गरुडावर विराजमान असून, श्री नृसिंहांच्या देशातील मोजक्या महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक मानले जाते. येथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर जीवनातील संकटांतून मार्ग निघतो आणि मनाला शांती लाभते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.
या रूपामागील पौराणिक संदर्भ अतिशय रंजक आहे. श्रीमद्भागवत पुराणातील कथेनुसार, जेव्हा हिरण्यकशिपूचा नाश करण्यासाठी श्री नृसिंह स्तंभातून प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या अर्ध्या सिंह आणि अर्ध्या मानवी रूपाचा दरारा त्रैलोक्याचा थरकाप उडवणारा होता. असुराचा वध झाला तरी भगवंतांच्या क्रोधाची ज्वाला शमत नव्हती आणि ब्रह्मा, शिव किंवा इंद्रासारख्या देवांनाही त्यांच्या सन्मुख जाण्याचे धाडस होत नव्हते. अखेरीस, आदिमायेचा अंश असलेल्या माता महालक्ष्मी जेव्हा भगवंतांसमोर उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनाने प्रभूंच्या क्रोधाचा दाह मावळला.
भगवंतांनी मातेला आपल्या डाव्या मांडीवर स्थान दिले आणि हेच ते जगद्वंद्य ‘लक्ष्मीनृसिंह’ रूप होय. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर नृसिंह हे न्याय आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तर लक्ष्मी ही सृजन आणि करुणेची अधिष्ठात्री आहे. नृसिंह जेव्हा एकटे असतात तेव्हा ते संहारक असतात, पण जेव्हा ते लक्ष्मीसह विराजमान होतात, तेव्हा ते पूर्णतः ‘भक्तवत्सल’ होतात. आदि शंकराचार्यांनी रचलेल्या ‘लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्रा’त या विलोभनीय रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे की, संसाराच्या दुःखद सागरात बुडणाऱ्या भक्ताला जेव्हा कोणताही आधार उरत नाही, तेव्हा हे युगल रूप आपला हात पुढे करून त्याला सावरते.
बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, उमरद आणि मेहकर येथेही नृसिंह मंदिरे आहेत; मेहकरच्या मूर्तीचा उल्लेख स्कंदपुराणातही आढळतो. जानोरी या गावाला पूर्वी ‘जानोरी निपाली’ किंवा ‘जानोरी गव्हाटी’ म्हणूनही ओळखले जात असे. गावातील रस्त्यालगत एका उंचवट्यावर हे मंदिर वसलेले आहे. पूर्वी याचे पूर्ण बांधकाम दगडी होते, ज्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर डावीकडे शनिशिळा, छोटे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती दृष्टीस पडते.
सभामंडपाच्या डाव्या बाजूला असलेल्या पाषाणी गर्भगृहामध्ये सुमारे एक मीटर उंचीची, काळ्या पाषाणातील लक्ष्मीनृसिंहाची चतुर्भुज मूर्ती स्थित आहे. गरुडावर आरूढ असलेल्या या मूर्तीच्या तीन हातांमध्ये शंख, पद्म व गदा असून चौथ्या हाताने त्यांनी श्रीलक्ष्मीला आलिंगन दिले आहे. ही मूर्ती अत्यंत सौम्य असल्याने येथे उग्र रूपातील हिरण्यकशिपू दिसत नाही. श्रीलक्ष्मीचा उजवा हात नृसिंहाभोवती आहे व तिच्या डाव्या हातात ‘महाळुंग’ हे फळ आहे. याच गर्भगृहात श्रीविष्णूंची प्राचीन मूर्ती तसेच कयाधू आणि नारदमुनींच्याही मूर्ती आहेत. विशेष म्हणजे, येथील गर्भगृहाखाली एक विहीर असून येथून त्यात नाणे टाकल्यास पाण्याचा आवाज येतो, असे सांगितले जाते.
मंदिरातील दैनंदिन उपक्रमही अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात. दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते आणि सकाळी-सायंकाळी आरतीसह हरिपाठाचे पठण केले जाते. उत्सवाच्या प्रसंगी मूर्तीवर चांदीचा मुकुट चढवला जातो. दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला येथे नृसिंह जयंतीचा मोठा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने सात दिवसांचा ‘सप्ताह’ आयोजित केला जातो. नृसिंहाची उपासना केल्याने मनोबल वाढते, नकारात्मकता दूर होते आणि भक्ताला शौर्य व शक्ती मिळते, या श्रद्धेपोटी नृसिंह जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील हजारो भाविक या शांत रूपाचे दर्शन घेण्यासाठी जानोरीत गर्दी करतात.