चारही बाजूला हिरवेगार डोंगर व त्यामधून वाहणाऱ्या मृडानी नदीच्या तीरावर राजापूर तालुक्यात धोपेश्वर हे गाव वसले आहे. या गावातील श्री देव धूतपापेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे. शरण आलेल्या भक्ताचे पाप धुऊन काढून त्याला पवित्र करणारा तो धूतपापेश्वर, अशी या देवाची सर्वत्र ख्याती आहे. या मंदिराला ९०० हून जास्त वर्षांचा इतिहास असून चालुक्य काळातील इ.स. १०९४ च्या सापडलेल्या ताम्रपटात या मंदिराचा उल्लेख आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील चौल येथे राज्य करणाऱ्या झंज राजाने शंकराची बारा मंदिरे बांधली असून त्यापैकी धूतपापेश्वर हे एक मंदिर होय.
मंदिराची अख्यायिका अशी की या परिसरात निळोबा भट नावाचे गरीब ब्राह्मण राहत होते. ते सतत शंकराच्या भक्तीत रममाण असत. दरवर्षी काशी विश्वेश्वराचे दर्शन व गंगास्नानासाठी ते काशीची वारी करीत असत. त्यांच्याकडे एक गाय होती. ती गाय चरण्यासाठी ते गुराख्यासोबत जंगलात पाठवत असत. तिच्या दुधावर निळोबा अवलंबून होते; परंतु अचानक तिनेही दूध देणे बंद केल्याने निळोबांची उपासमार होऊ लागली. गुराख्याकडे विचारणा केल्यावर त्यालाही गाय का दूध देत नाही याची कल्पना नव्हती. अखेर या दोघांनी गायीवर पाळत ठेवली तेव्हा ती गाय एका झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाहून संतप्त झालेल्या गुराख्याने आपल्या हातातील कुऱ्हाडीचा तेथील खडकावर घाव घातला. निळोबांनी त्या खडकाकडे निरखून पाहिले असता त्यांना तेथे तुटलेले शिवलिंग दिसले. खडक तुटल्याच्या आवाजाने ती गाय घाबरून तेथून पळू लागली व जवळच असलेल्या डोहात पडून तिचा मृत्यू झाला. शिवलिंगाचा भंग व गाईच्या मृत्यूस आपणच जबाबदार आहोत, याचे प्रायश्चित्त म्हणून निळोबांनी गायीपाठोपाठ त्याच कुंडात देहविसर्जन करून पापक्षालन केले. तेव्हापासून हे क्षेत्र धूतपापेश्वर म्हणून, तर येथील कुंड हे कोटीतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले.
राजापूर शहरापासून सुमारे पाच किमी अंतरावर धूतपापेश्वर मंदिर आहे. धोपेश्वर गावातील अरुंद वाटेतून या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. हा मार्ग थेट मंदिराच्या महाद्वारापर्यंत जातो. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला वीरभद्र, तर उजव्या बाजूला कालभैरव यांची मंदिरे आहेत. त्यासमोर दीपमाळा असून मुख्य मंदिराचा मोठा सभामंडप आहे. सभामंडपाच्या डाव्या बाजूला नैवेद्यासाठीची खोली आणि धर्मशाळा आहे. सभामंडपामध्ये नंदी स्थानापन्न आहे. येथेच नवग्रह आणि मारुती, गणपती व विष्णू यांच्या मूर्ती आहेत. येथील गर्भगृहात काळ्या पाषाणातील स्वयंभू शिवलिंग असून आजही हे तुटलेले दिसते. गर्भगृहाला लागून पार्वतीचे निवासस्थान आहे.
मंदिराच्या मागील बाजूस कामेश्वराचे (राखणाचे) दगडी मंदिर आहे. ज्यावेळी पाऊस पडत नाही त्यावेळी कामेश्वराच्या मंदिराचा गाभारा पाण्याने भरला जातो. गाय, म्हैस यांसारखी जनावरे दूध देत नसतील अथवा आजारी असतील तर या देवाच्या अंगाऱ्याने गुण येतो, अशी श्रद्धा आहे. मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणाऱ्या मृडानी नदीचे पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे, तो कोटीतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. या कोटीतीर्थाच्या शेजारी एक मोठी पितळी गाय व डोहाजवळ एक शिवपिंडी आहे. या डोहाच्या तळाशी अद्याप कोणी जाऊ न शकल्याने तेथे काय आहे, याबाबत गूढ कायम आहे. असे सांगितले जाते की जेव्हा गगनगिरी महाराज येथे यायचे तेव्हा या डोहात तासनतास बसून ध्यानधारणा करीत असत. धूतपापेश्वर मंदिराशेजारी असलेल्या नदीवर एक लहानसा पूल बांधलेला असून त्या पुलावरून नदीपलीकडे असणाऱ्या दत्त मंदिरात जाता येते. या नदीपात्रात काही अंतरावर अग्नितीर्थ, ब्रह्मतीर्थ, सरस्वतीतीर्थ, वेदतीर्थ अशी तीर्थे आहेत.
माघ वद्य १० ते फाल्गुन शुद्ध १ असे सात दिवस येथे महाशिवरात्र उत्सव साजरा केला जातो. मंदिरातील हा सर्वात महत्त्वाचा उत्सव होय. यानिमित्त भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. विजयादशमीला सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. या दिवशी देवाची पालखी येथील निशाणापर्यंत नेली जाते. त्याचवेळी राजापूरच्या गुजर आळीतील लक्ष्मीनारायणाची पालखीही तेथे येते. हरिहर भेटीच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक भाविक येथे येतात. मंदिरात सात दिवसांचा माघी उत्सव साजरा केला जातो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी श्रावण आणि माघ महिन्यातील येथील पूजा–अर्चेची व्यवस्था केली होती, ती आजही सुरू आहे.
रामनवमी, हनुमान जयंती, श्रावणी सोमवार, दसरा, दिवाळी, मार्गशीर्ष महिना व होळी या दिवसांत येथे उत्सव साजरे केले जातात. उत्सवकाळात मंदिरात महानैवेद्य, पूजा, मंत्रपुष्प, रुद्राभिषेक, प्रदक्षिणा व महाआरती होते. दररोज येथे दुपारी व रात्री महानैवेद्य, रात्री देवास वस्त्रे नेसवून व मुखवटा ठेवून महापूजा, आरती व मंत्रपुष्प हे विधी होतात. दररोज रात्री शेवटची महापूजा झाल्यानंतर शंकर–पार्वतीसाठी सारीपाटाचा (सोंगट्यांचा) खेळ मांडला जातो. नंतर गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. असे सांगितले जाते की दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा त्या सोंगट्या विखुरलेल्या असतात. शंकर व पार्वती तेथे येऊन सारीपाट खेळून जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.