
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरासह तालुक्याचे ग्रामदैवत असलेले अंबादेवीचे मंदिर हे जागृत व नवसाला पावणाऱे देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच १५० वर्षे प्राचीन असलेले हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की वरोरा शहरासह तालुक्यातील भाविक नवरात्रीच्या आधी या मंदिराच्या गाभाऱ्यातून ज्योत प्रज्वलित करून घेऊन जातात व आपापल्या घरात घटस्थापना केलेल्या देवीसमोर ती ठेवतात. ही अखंड ज्योत ९ दिवस प्रज्वलित ठेवली जाते. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडूनही या मंदिरातून आपल्या देवीसमोर प्रज्वलित करण्यासाठी येथून वाजत गाजत अखंड ज्योत नेली जाते.
वरोरा शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर सध्या ज्या ठिकाणी आहे तो परिसर खांजी वॉर्ड म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी या ठिकाणी खांजी हे लहानसे खेडे होते. या गावाभोवती घनदाट जंगल होते. सुमारे १५० वर्षांपूर्वी या परिसराची मालगुजारी सरमुकादम नावाच्या एका व्यक्तीकडे होती. एका रात्री सरमुकादम यांना देवीने खांजी परिसरात आपले वास्तव्य असल्याचा स्वप्नदृष्टांत दिला. त्यानुसार सरमुकादम यांनी दामू पाटील सातपुते यांच्या शेतात खोदकाम केले आणि तेथे त्यांना देवीची एक शेंदूरचर्चित मूर्ती (तांदळा) आढळली. त्यांनी तेथेच एक लहानसे मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. वस्ती वाढल्याने हा खांजी परिसर आता वरोरा शहराचाच भाग झाला. तेव्हापासून देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अंबादेवीची प्रचिती येऊ लागल्याने दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत गेली. त्यामुळे काही वर्षांपूर्वी येथे मोठे मंदिर बांधण्यात आले.
नवीन मंदिर बांधण्यात आले असले तरी देवीची तांदळास्वरूपातील मूळ मूर्ती त्याच ठिकाणी आहे. मूळ मंदिरासमोर नव्याने सभामंडप बांधलेला असून
त्यापुढेही भाविकांच्या सोयीसाठी आणखी एक सभामंडप (निवारा शेड) आहे. गर्भगृहात असलेल्या लहानशा चौथऱ्यावर ३ फूट उंचीची अंबादेवीची मूर्ती असून ती समोरील बाजूस काहीशी झुकल्यासारखी दिसते. देवीच्या मूर्तीला चांदीचा मुकुट व मुखवटा आहे. मंदिराच्या आवारात शिवलिंग व त्यासमोर नंदी आहे. मंदिरासमोर वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ आहे. दररोज सकाळी देवीची महापूजा व सायंकाळी आरती होते. मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची येथे जास्त गर्दी असते. याशिवाय आश्विन आणि चैत्र नवरात्रात येथे यात्रा भरते. या ९ दिवसांत हजारो भाविक येथे देवीला नवस बोलण्यासाठी, तसेच फेडण्याठी येतात. उत्सवकाळात सायंकाळी आरतीनंतर भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. काही वर्षांपासून वरोरा शहरात सुरू झालेली नवरात्रीच्या कालावधीत निघणारी ‘दुर्गामाता दौड’ विशेष प्रसिद्ध असून वरोरा शहरातील दुर्गामातेच्या मंदिरापासून निघणाऱ्या या मिरवणुकीत (दौड) शेकडो युवक–युवती भगवा ध्वज हातात घेऊन सहभागी होतात. शहरातील अनेक ठिकाणी जाऊन त्यानंतर अंबामाता मंदिरात या मिरवणुकीची सांगता होते.
असे सांगितले जाते की सुमारे १२५ वर्षांपासून दरवर्षी या परिसरातील शेतकरी आपापल्या शेतातील धान्य आणून या मंदिर परिसरात भंडारा (जेवण, महाप्रसाद) करीत व देवीला नैवेद्य दाखवून एकत्र महाप्रसादाचा आस्वाद घेत असत. ही परंपरा मागील काही वर्षांपर्यंत सुरू होती; परंतु आता शहरीकरण झाल्यामुळे शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आता येथे मोठ्या प्रमाणात हा भंडारा होत नसला तरीही तालुक्यातील गावांमधील अनेक शेतकरी आपापल्या सोयीनुसार येथे येऊन त्यांच्या शेतातील धान्यापासून भंडारा तयार करून त्याचा देवीला नैवेद्य दाखवितात.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या दगडी कोळशाच्या खाणींमुळे हे शहर ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेच. याशिवाय याच जिल्ह्यात असलेले वरोरा हे शहर प्रसिद्ध आहे ते येथे सापडलेल्या ६,००,००,००० वर्षांपूर्वीच्या (सहा कोटी) बेसॉल्ट खडकांमुळे. वरोरा येथील वर्धा नदीपात्राच्या गाळात व येथील जमिनीत डायनोसोरसारख्या प्राण्यांचे हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष आढळले आहेत, असा अभ्यासकांचा दावा आहे.