आगाशे काका समाधी मंदिर

अमृतनगर, खामगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

विदर्भाची पावन भूमी अनेक संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. याच परंपरेत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हे शहर ‘आगाशे काका माऊली’ यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. श्री अरविंद आगाशे काका, ज्यांना भक्तांनी ‘काका माऊली’ किंवा ‘दत्तदास’ ही नामाभिधाने प्रेमाने बहाल केली, त्यांनी खामगावच्या अमृतनगर भागात स्थापन केलेले ‘बरसाना’ मंदिर आज हजारो भाविकांसाठी चैतन्याचे ऊर्जापीठ ठरले आहे. या परिसरात प्रवेश करताच जाणवणारी शांतता ही काकांच्या प्रदीर्घ तपस्येचे आणि सात्त्विकतेचे जिवंत प्रमाण मानली जाते.

काकांचा कौटुंबिक वारसा पाहिला तर त्यांचे मूळ कोकणात आढळते. तिथून त्यांचे पणजोबा भिकाजीपंत व्यवसायानिमित्त साधारण १८८४ च्या सुमारास विदर्भातील हिंगणघाट येथे स्थायिक झाले. बुद्धिमत्ता आणि समाजसेवेची शिदोरी त्यांना त्यांचे आजोबा मोरेश्वर आगाशे यांच्याकडून मिळाली. मोरेश्वरपंत त्या काळी उच्चशिक्षित होते आणि सार्वजनिक कार्यात नेहमी अग्रभागी असत. रावसाहेब आगाशे आणि आई अक्का यांच्या पोटी १८ ऑगस्ट १९३१ रोजी नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर काकांचा जन्म झाला. नागपंचमी ही तिथी आध्यात्मिक दृष्ट्या गुरुतत्वाशी आणि कुंडलिनी शक्तीशी जोडलेली असल्याने काकांचा जन्म हा एका दैवी कार्याचा संकेतच होता, असे मानले जाते.

काकांचे बालपण वर्ध्यातील एका वाड्यात गेले. तेथील श्रीदत्त, श्रीराम आणि गणपती मंदिरांच्या सान्निध्यात त्यांच्यावर भक्तीचे संस्कार झाले. त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक समतेचे संस्कार केले होते. त्यामुळे त्याकाळी समाजात भेदभाव असतानाही आगाशे यांच्या घरात सर्वांना सारखीच मायेची वागणूक मिळे. याच संस्कारांनी पुढे काकांच्या ‘माऊली’ या रूपाची घडण केली. शालेय शिक्षणानंतर अध्यात्मिक क्षेत्राकडे वळलेल्या काकांनी २००५ मध्ये खामगाव येथे ‘बरसाना’ची निर्मिती केली. उत्तर प्रदेशातील राधाराणीचे जन्मस्थान असलेल्या मूळ ‘बरसाना’प्रमाणेच खामगावचे हे स्थानही भक्ती आणि प्रेमाचा वर्षाव करणारे ठरावे, अशी त्यांची संकल्पना होती. जरी हे स्थान सपाट भूभागावर असले, तरी तेथील आध्यात्मिक स्पंदने एखाद्या पर्वतशिखरावरील पवित्र तीर्थक्षेत्रासारखीच प्रबळ असल्याचे भाविक सांगतात.

आगाशे काकांच्या जीवनाशी अनेक अलौकिक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्यांच्या हातून भोजन ग्रहण केल्याची कथा भक्तांमध्ये अत्यंत श्रद्धेने सांगितली जाते. त्यांचे आणि त्यांचे सद्गुरू इंदूरचे प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे नाते तर पूर्वजन्मीचे संकेत देणारे होते; कारण या गुरु-शिष्यांचा जन्म एकाच तिथीला म्हणजेच नागपंचमीला झाला होता. काकांनी आपली संपूर्ण हयात सद्गुरूंच्या सेवेत अर्पण केली आणि त्यांचा हा अधिकार पाहूनच नाना महाराजांनी त्यांना आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून आशीर्वाद दिला होता. आध्यात्मिक प्रगतीसोबतच काकांनी साहित्याच्या माध्यमातून ‘सोऽहं’ साधना आणि नामस्मरणाचा सोपा मार्ग जनसामान्यांसाठी खुला केला. ‘अमृतवाणी’, ‘दास तरंग’ आणि ‘मार्तंड स्तवन’ यांसारख्या त्यांच्या साहित्यातून आजही ते भक्तांशी संवाद साधत असल्याचे जाणवते.

काकांचे व्यक्तिमत्व केवळ आध्यात्मिक गुरूंपुरते मर्यादित नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसुधारकही होते. त्यांनी तरुणांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोठे कार्य केले आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांना आधुनिक संगणक प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले. प्रसिद्धीची कोणतीही हाव न धरता गरिबांना अन्न-धान्य आणि गरजूंना उद्योगासाठी मदत करणे हा त्यांच्या दैनिंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. १५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांनी महासमाधी घेतली असली, तरी ‘सद्गुरू सेवा मंडळ’ आजही त्यांचा वारसा अखंडपणे चालवत आहे. गेल्या २३ वर्षांपासून खामगाव ते कारंजा लाड अशी निघणारी पायदळ पालखी आणि काकांनी संपन्न केलेले ४१ मोठे यज्ञ हे त्यांच्या कार्याची व्यापकता दर्शवतात. संकटाच्या काळात स्मरण करताच धावून येणारी त्यांची ‘स्मर्तुगामी’ शक्ती आजही जीवनात आधार आणि शांती प्रदान करते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे.

खामगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अमृतनगर परिसरात असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडपात भाविकांकडून ‘सोऽहं’ साधना व ग्रंथांचे पारायण केले जाते. गर्भगृहात समोर आगाशे काकांच्या पादुका व त्यापुढे त्यांचे समाधी स्थान आहे. या समाधी स्थानाच्या चौथऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या संगमरवरी मखरात मध्यभागी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. श्रीकृष्ण मूर्तीच्या दोन्ही बाजूंना श्री अरविंद आगाशे काका (काका माऊली) आणि त्यांचे सद्गुरू प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्या मूर्ती आहेत.

श्रीक्षेत्र बरसाना स्थित प.पू. श्री कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध आध्यात्मिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात. यामध्ये चैत्र वद्य दशमीला प.पू. नाना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा, ज्येष्ठ वद्य पंचमीला प.पू. काका माऊली समाधी प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन, आषाढ शुद्ध प्रतिपदेला प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची पुण्यतिथी आणि आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न होतो. श्रावण शुद्ध पंचमीला प.पू. नाना महाराज व प.पू. श्री काका माऊली यांची संयुक्त जयंती साजरी केली जाते, तर श्रावण वद्य पंचमीला प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती साजरी होते. याच महिन्यात श्रावण वद्य अष्टमीला गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव साजरा करून भाद्रपद वद्य प्रतिपदेला प.पू. श्री काका माऊली यांच्या पुण्यतिथीने वार्षिक महोत्सवांची सांगता होते. दररोज सकाळी ११ ते २ व सायंकाळी ७ ते ९ या काळात भाविकांसाठी महाप्रसाद दिला जातो. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव बस स्थानकापासून १.३ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५३ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून खामगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : डॉ. राजेश अग्रवाल, अध्यक्ष, मो. ७०५८५२३४९२, नामदेव खिर्डेकर, उपाध्यक्ष, मो. ९६०४९०४२२९

अगाशे काका समाधि मंदिर

अमृतनगर, खामगांव, खामगांव, जिला. बुलढाणा

Back To Home