खामगावमधील सराफा बाजार परिसरातील ‘अय्याची कोठी’ भागात वसलेले मानाचे लाकडी गणपती मंदिर हे शहराचे आराध्यदैवत आहे. आंध्र प्रदेशातून येथे स्थायिक झालेल्या अय्या (आचारी) लोकांनी १३० वर्षांपूर्वी सहा फूट उंचीच्या या लाकडी मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर असलेला भागही ‘अय्याची कोठी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातूनही अनेक भाविक येतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवादरम्यान या मूर्तीची पूजा झाल्याशिवाय शहरातील अन्य सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीतही या मूर्तीचा मान पहिला असतो; मात्र या मूर्तीचे कधीही विसर्जन केले जात नाही.
खामगाव शहरात पूर्वी कापसाची मोठी बाजारपेठ होती. दूरदूरचे कापूस व्यापारी येथे कापूस खरेदीसाठी येत. याच काळात आंध्र प्रदेशमधून अनेक अय्या (आचारी) उदरनिर्वाहासाठी या परिसरात स्थायिक झाले. त्यांनी खास लाकडापासून गणेशाची मूर्ती घडवून घेतली आणि त्यानंतर सराफा बाजार परिसरात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
या परिसरात त्या काळात अय्या लोकांची मोठी वस्ती असल्याने या भागाला ‘अय्याची कोठी’ असे नाव पडले. अन्य एका आख्यायिकेनुसार, १३० वर्षांपूर्वी शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात लाकडाचा मोठा ओंडका वाहत आला. त्याचा आकार हुबेहूब गणेशाच्या मूर्तीसारखा जाणवल्याने ग्रामस्थांनी तो पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पूर्वी एका चबुतऱ्यावर ही मूर्ती विराजमान होती. खामगावमधील स्थानिक मंडळी सुरुवातीला या मूर्तीची पूजा-अर्चा करत असत. १९६० च्या दशकात काही समाजकंटकांनी या मूर्तीची विटंबना करण्याचाही प्रयत्न केला होता. १९५७ मध्ये खामगावमधील अडते मेसर्स जयनारायण नंदलाल जोशी यांच्या पुढाकाराने मंदिराच्या विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. शहरातील बालाभगत अग्रवाल यांनी या मंदिरासाठी जागा दिली. सुरुवातीला या मंदिराचे स्वरूप छोटेखानी होते. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने १९९७ मध्ये या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला. सप्टेंबर २०२५ मध्ये या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर हे मंदिर आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराच्या देखण्या वास्तूची संरचना आहे. मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गजराजांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृहात संगमरवरी मखरात चांदीच्या पाटावर गणेशाची लाकडी मूर्ती विराजमान आहे. मूळच्या लाकडी मूर्तीवर शेंदरी रंग देण्यात आला आहे. मूर्तीच्या उजवीकडील वरच्या हातात परशू आहे आणि खालील हात आशीर्वाद मुद्रेत आहे. डावीकडील वरच्या हातात पाश तर खालील हातात मोदक आहे. हात, कान आणि सोंडेच्या मधल्या भागावर चांदीचे आवरण आहे. मुकुट तसेच मूर्तीमागील प्रभावळही चांदीची आहे. मूर्तीच्या अंगावरही चांदीचे दागिने आहेत. मूर्तीच्या उजवीकडे मूषक आहे. मूर्ती असलेल्या पाटाच्या डाव्या बाजूस चांदीचा मूषक आहे. पीठासनाच्या खालील भागात दोन्ही बाजूंना गजराज आहेत आणि मध्यभागी कमळ आहे.
ही मूर्ती जागृत असल्याने तिच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, या श्रद्धेमुळे अनेक भाविक दर्शनासाठी येथे येतात. मंगळवार, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर गजबजलेले असते.
भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवादरम्यान या मूर्तीची पूजा झाल्याशिवाय शहरातील अन्य मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत येथील गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. या कालावधीत मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असल्याचे काही भाविक सांगतात. या उत्सवादरम्यान येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश, मराठवाडा, मुंबई आणि पुण्यातील शेकडो भाविक या उत्सवादरम्यान येथे दर्शनासाठी येतात. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात आदी राज्यांतील भाविकांची संख्याही मोठी असते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीतही या मूर्तीचा मान पहिला असतो. ही मूर्ती निघाल्याशिवाय शहरातील या मिरवणुकीला सुरुवात होत नाही. मिरवणुकीपूर्वी ‘अय्याची कोठी’ येथे मानाच्या लाकडी गणपतीची आरती करण्यात येते. बैलगाडीतून मूर्तीची मिरवणूक निघते. मात्र या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही; केवळ मूर्ती हलवून प्रतीकात्मक विसर्जन केले जाते. मिरवणुकीनंतर मूर्ती पुन्हा मंदिरात आणली जाते.