काळकाई देवी मंदिर

भरणे, ता. खेड, जि. रत्नागिरी 

निसर्गरम्य कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरणे येथे काळकाई देवीचे जागृत स्थान आहे. काळधर्म निवारण करणारी, नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली ही देवी या गावातून लग्न होऊन गेलेल्या स्त्रियाच्या (माहेरवाशिणी) पाठीशी कायम उभी राहते, अशी भक्तांची धारणा आहे. नवरात्रोत्सवादरम्यान मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागांतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सव शिमगोत्सवाला निघणाऱ्या देवीच्या पालखीला प्रथम पोलीस दलातर्फे शासकीय सलामी देण्यात येते त्यानंतरच पालखी मार्गस्थ होते.

मंदिराची अख्यायिका अशी की भरणे गावात पूर्वी घनदाट जंगल होते. परिसरातील गावांतील अनेक गुराखी गायींना चरण्यासाठी या जंगलात घेऊन येत असत. त्यापैकी येथील शिंदे यांची एक गाय गुराख्याची नजर चुकवत रोज जंगलातील एका झाडाखाली असलेल्या लहानशा शिळेवर पान्हा सोडत असे. एके दिवशी गुराख्याच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला. हे दैवीस्थान असल्याची ग्रामस्थांची खात्री पटली. तेव्हापासून या शिळेची पूजाअर्चा होऊ लागली. असे सांगितले जाते की एकदा या गावात अचानक रोगराई पसरू लागली. त्यावेळी याच शिळेतून देवी प्रकट झाली आणि काळासोबत लढून त्याला वेशीबाहेर हाकलून लावले. त्या रात्री या देवीने गावातील पुजाऱ्याला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की गावात आलेल्या काळाबरोबर मी लढले. त्याला हाकलून देताना मी दमून गेले आहे. लढताना माझ्या साडीचा पदर कळकीच्या बेटात अडकून फाटला आहे. पुजाऱ्याने काही ग्रामस्थांना सोबत घेऊन कळकीच्या बेटात पाहिले असता तेथे देवीच्या फाटलेल्या जरीच्या पदराचा तुकडा होता. तेव्हापासून काळाचे हरण करणारी देवी म्हणून काळकाई देवी या नावाने प्रसिद्ध झाली.

मुंबईगोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाक्याजवळ हे प्रशस्त सुंदर मंदिर आहे. भरणे नाक्यावरून पायी मंदिरात जाता येते. मंदिराच्या मार्गावर अनेक पूजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंदिराभोवती तटबंदी असून तटबंदीमध्ये असलेल्या कमानीयुक्त प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या वरच्या अर्धवर्तुळाकार भागावर काळकाई देवीची मूर्ती असून त्याच्या वर लहानसे शिखर आहे. सर्वत्र फरसबंदी केलेल्या आवारात मंदिराच्या डाव्या बाजूला मिराशी बाबांचे (रखवालदार) मंदिर आहे. त्याच्या शेजारीच एक मोठा रंचमंच आहे. मंदिरात उत्सवांदरम्यान येथे कार्यक्रम होतात.

मुख्य मंदिर हे दुमजली पांढऱ्या रंगाने रंगविलेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तुलशी वृंदावन असून दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपातून सभामंडपात प्रवेश केल्यावर सभामंडपाच्या मध्यभागी लाकूड काचेचा वापर करून गर्भगृह बनविलेले दिसते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. या गर्भगृहात मध्यभागी एका चौथऱ्यावर सुंदर लाकडी मखरात देवीची प्रसन्न मूर्ती आहे. देवीला चांदीचा मुखवटा घातलेला असून देवीवर अनेक अलंकार वस्त्रे आहेत. मागील प्रभावळही लाकडाची असून त्यावर कोरीवकाम केलेले दिसते. या मूर्तीच्या मागील बाजूला एका चौरंगावर देवीचा पूर्वीचा चांदीचा मुखवटा ठेवलेला दिसतो.

गर्भगृहाच्या मागील बाजूस असलेल्या झाडाजवळ पान्हा सोडणाऱ्या गायीचे शिल्प आहे. त्याखाली शिवलिंग असून त्यावर नागाने छत्र धरले आहे. पिंडीसमोर नंदीची छोटी मूर्तीही आहे. असे सांगितले जाते की याच झाडाखाली पूर्वी देवीचे स्थान होते; परंतु नंतरच्या काळात ते झाड तसेच ठेऊन त्यापुढे मंदिर बांधण्यात आले. २००२ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. मंदिराला एकूण पाच शिखरे असून सभामंडपाच्या पुढील मागील भागात दोनदोन गर्भगृहावर एक शिखर आहे. मे २०१० रोजी गर्भगृहावरील शिखरावर सोन्याचा कळस लावण्यात आलेला आहे.

वर्षभऱ भाविकांची रीघ असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सव आणि शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. शिमगोत्सवात नऊ दिवस कीर्तन, भजन, हरिपाठ, आदी कार्यक्रम होतात. नऊही दिवस देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. या गावात माहेर असलेल्या स्त्रियांची पाठराखण करणारी, अशी ख्याती असलेल्या या देवीची खणानारळाने ओटी भरण्यासाठी हजारो स्त्रिया या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. देवीला नवस बोलण्यासाठी तसेच नवसपूर्तीसाठी मुंबई, पुणे तसेच घाटमाथ्यावरूनही हजारो भाविक या काळात येथे येतात. शिमगोत्सवादरम्यान देवीची पालखी गावातून वाजतगाजत फिरते. नंतर खेडमधील खेडजाई, रेडजाई, पाथराजाई आणि रामवरदायिनी यांची भेट घेऊन देवी पुन्हा मंदिरात परतते. या पाच देवी बहिणी असल्याची मान्यता आहे. या मोठ्या उत्सवांशिवाय दरवर्षी १२ मे हा दिवस मंदिराचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी सकाळी देवीची मिरवणूक काढली जाते. या कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांना सकाळी सायंकाळी महाप्रसाद दिला जातो. मंदिराच्या मागील बाजूस देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांसाठी सुसज्ज भक्त निवास बांधलेला आहे. याशिवाय देवस्थानतर्फे परिसरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवाही पुरविली जाते. (संपर्क : महेश जगदाळे, अध्यक्ष, मो. ९८५०३७६४७२, अल्पेश फागे, लिपिक, मो. ८२६३०३७७५०)

उपयुक्त माहिती:

  • भरणे नाक्यापासून पायी पाच मिनिटांवर
  • खेडपासून चार किमी, तर रत्नागिरीपासून ११८ किमी अंतरावर
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : अनंत जंगम, पुजारी, मो. ९३०७५३३३४३
Back To Home