विदर्भातील प्राचीन देवालयांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मार्कण्डेय मंदिराला ‘चक्रवर्ती’, तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बालाजी मंदिराला ‘सम्राट’ ही उपमा दिली जाते. चिमूरमधील बालाजी मंदिरातील मूर्ती ही तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी मंदिरातील मूर्तीसारखीच आहे. या स्थानाला ‘श्रीहरी बालाजी’ असेही म्हटले जाते. संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर येथील ‘घोडायात्रे‘साठी प्रसिद्ध असून या यात्रेला सुमारे २५० वर्षांची परंपरा आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की येथील शेतकरी भिकुजी पाटील यांना या स्थानावर जनावरांसाठी गोठा बांधायचा होता. त्यासाठी त्यांनी येथे खोदकाम सुरू केले. काम सुरू असताना एका ठिकाणी कुदळ धातूला लागल्यासारखा आवाज आला. त्यांनी तेथील माती बाजूला केली असता तेथे एक मूर्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हळूवारपणे मूर्ती मातीतून काढली व स्वच्छ केली. ती बालाजीची मूर्ती होती. याच ठिकाणी त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
ऐतिहासिक नोंदींनुसार, १७५७ साली पेशव्यांचे दिवाण दिवाकर पुरुषोत्तम ऊर्फ देवाजीपंत चोरघडे यांच्या विनंतीवरून जानोजी भोसले यांनी येथे बालाजी मंदिर उभारण्यासाठी २०० एकर जमीन दिली. तसेच मंदिराच्या खर्चासाठी १६१२ रुपयांचे वार्षिक उत्पन्न लावून दिले. २०० एकर जागेपैकी ६० एकरावर पाण्यासाठी तलाव बांधण्यात आला. मराठ्यांच्या इतिहासात नावारूपाला आलेल्या साडेतीन शहाण्यांपैकी चिमूरचे देवाजीपंत चोरघोडे एक होत. याच चोरघोडे यांनी चिमूरच्या श्रीहरी बालाजीच्या घोडायात्रेची सुरुवात केली.
विविधतेने नटलेला विदर्भ हा नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची चिमूर ही कर्मभूमी. येथे असलेले बालाजी मंदिर महाराष्ट्राचे तिरुपती म्हणून प्रसिद्ध आहे. तिरुपतीच्या बालाजीला बोललेला नवस येथे फेडलेला चालतो, पण या बालाजीला केलेला नवस तिरुपतीला फेडले जात नाहीत, ते येथेच फेडावे लागतात, अशी मान्यता आहे. तटबंदीयुक्त प्रासाद असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीवकाम आहे. येथील लाकडी सभामंडपात १२ स्तंभ आहेत. त्यावर हत्ती, वाघ असे प्राणी कोरलेले आहेत. त्यापुढे ४ दगडी खांब असलेला अजून एक सभामंडप आहे.
मंदिरातील बालाजीची काळ्या पाषाणातील मूर्ती १००० ते १२०० वर्षे प्राचीन असावी, असे सांगितले जाते. या मूर्तीस ‘सनक सदानंद’ असे म्हटले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला सिद्ध पुरुषांच्या पद्मासनातील प्रतिमा आहेत. देवाजीपंत चोरघडे यांच्या प्रयत्नाने इ.स. १७७२ साली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. या मंदिरातील बालाजीची म्हणजेच विष्णूची मुख्य मूर्ती काळ्या गंडकी पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीच्या मुखावरील भाव शांत आहेत. ही मूर्ती ४ फूट ७ इंच उंचीची असून तिच्यावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून पाठशिळा २.५ फूट रुंदीची आहे. पाठशिळेवर मत्स्यापासून ते कल्कीपर्यंतचे दशावतार कोरलेले अत्यंत स्पष्टपणे दिसतात. छातीवर श्रीवत्स चिन्ह, डोक्यावर मुकुट, कर्णभूषण, जानवे, उदरबंध, नेसलेले वस्त्र, शेला, वैजंयतीमाळा या मूर्तीवर कोरलेल्या आहेत. शरीरावरील वस्त्राच्या निऱ्याही प्रमाणबद्ध आहेत. जिल्ह्यातील अनेकांचे बालाजी हे कुलदैवत आहे.
मंदिराच्या आवारात गरुड खांब असून त्याशेजारी काही समाध्या आहेत. माघ शुद्ध पंचमीला निघणारी येथील ‘घोडा यात्रा’ प्रसिद्ध आहे. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेचे नाव ‘श्री बालाजीची अश्वारूढ यात्रा‘ असे असले तरी ती ‘घोडा यात्रा’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. चिमूरमधील एका कारागिराने एकसंध लाकडाच्या ओंडक्यातून तयार केलेल्या घोड्यावरून ही यात्रा निघते. हा घोडा सजवून रथात ठेवण्यात येतो आणि त्यावर स्वारमुद्रेत असलेल्या बालाजीची काष्ठप्रतिमा ठेवली जाते व शहरभर रथाची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात गुरांची खरेदी–विक्री होते. घोडा यात्रा हे येथील प्रमुख आकर्षण आहे. चिमूरमधील ही घोडायात्रा महाराष्ट्रासह मध्य भारतातील भाविकांसाठी पर्वणी असते. रात्री १२ वाजता ही यात्रा सुरू होते. रथ ओढण्यासाठी धोतर, शर्ट आणि फेटा किंवा टोपी असा पोशाख परिधान केलेले शेकडो भाविक असतात. रथाच्या समोर दिंड्या, नृत्य, लेझीम खेळणारी पथके आपल्या कला सादर करतात. यावेळी शहरातील रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या जातात. मिरवणूक मार्गावर दिव्यांची रोषणाई, फुलांची सजावट व पताका लावल्या जातात. पहाटेपर्यंत ही मिरवणूक चालते.
मंदिर समितीतर्फे मंदिराच्या आवारात भव्य भक्त निवास बांधण्यात आले असून आवारात उपाहारगृहाची सुविधा आहे. सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना मंदिरात श्रीहरी बालाजींचे दर्शन घेता येते.