
देवभूमी म्हणून गौरव केलेल्या चौल–चंपावतीचा उल्लेख राज्यातील अतिप्राचीन गावांमध्ये होतो. नारळी–पोफळीच्या बागांमध्ये वसलेल्या या ऐतिहासिक गावातील मुखरी (मुख्य) गणपती मंदिर हे जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ३०० वर्षापूर्वीच्या या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही स्वयंभू व नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. माघी गणेशोत्सवाच्या काळात येथे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी हजारो भाविक येतात. १९६७ पासून या उत्सवाची परंपरा आहे.
ऐतिहासिक व प्राचीन माहितीनुसार, सध्याच्या चौल परिसरात पूर्वी चंपक म्हणजे चाफ्याची खूप झाडे होती. म्हणून चंपावती नगरी म्हणून हा परिसर प्रचलित होता. इतिहास संशोधक जे. गर्सन डिकुन्हा यांच्या ‘नोट्स ऑन द हिस्टरी अँड अँटिक्विटिज ऑफ चौल अँड बसीन‘ या इ.स. १८७६ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात चौलचे प्राचीन चंपावती हे नाव चंपा या राजाच्या नावावरून पडल्याचे म्हटले आहे. या राजाने चंपावती नगरीची मुहूर्तमेढ
रोवली, असे या पुस्तकात म्हटले आहे. या शहरास प्राचीन हिंदू चंपावती, ग्रीक सिम्यल्ला, अरब सैमूर, तर प्राचीन मुस्लिम ग्रंथकार चिवेल या नावाने ओळखत असत. इतिहासकारांचे असे मत आहे की चैमुल किंवा चांवुल या नावांचा चौल हा अपभ्रंश असावा. मुंबई जवळच्या कान्हेरी येथे सापडलेल्या एका शिलालेखात इ.स.च्या दुसऱ्या शतकात दोन योद्ध्यांनी ‘चेमुला’ गाव स्थापन केल्याचा उल्लेख आहे. इतिहास संशोधकांच्या मते तेच आजचे चौल गाव आहे.
एका पौराणिक आख्यायिकेनुसार, द्वापारयुगात चंपावती नगरीमध्ये पिठोर राजा राज्य करीत होता. चौलचा उल्लेख इ.स. ८० ते १५० या काळातील टॉलेमी, आरियन अशा इतिहासकारांच्या पुस्तकातही आढळतो. हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर होते. इ.स. पूर्व ३०० ते इ.स. १७०० या काळात ते सक्रिय होते. संपन्न परिसर व मोक्याचे बंदर असल्यामुळे येथे अनेक देशांतील व्यापाऱ्यांचे येणे जाणे असे. १५०८ मध्ये दहा इजिप्शियन व्यापारी जहाजे इथे आल्याचे उल्लेख सापडतात. येथे शिलाहार, राष्ट्रकुट,
मौर्य, चालुक्य, कदंब, यादव, सिद्दी, तसेच इंग्रजांचा वेळोवेळी अंमल होता. चौलच्या बंदरात ८ सप्टेंबर १५२४ रोजी वास्को द गामाचे जहाज लागले होते. मात्र तो चौलच्या भूमीवर उतरला नव्हता, अशीही ऐतिहासिक नोंद आहे.
इ.स. १७३४ ते १७५८ या दरम्यान येथे आंग्रेंची कारकीर्द होती. त्यावेळी या परिसरात अनेक मंदिरे बांधण्यात आली व जुन्या मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्याचवेळी लक्ष्मीबाई आंग्रेंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, अशा नोंदी आहेत. त्यावेळी हे लहानसे घरवजा मंदिर व त्यावर कौलारू छप्पर होते. १३ सप्टेंबर १७५८ मधील जुन्या कागदपत्रांमध्ये या मंदिराबाबतची नोंद आढळते. सध्या असलेले मंदिर हे १९९७ साली बांधण्यात आले आहे. त्यामध्ये आतील मुख्य लहान मंदिर दगडी बांधकामाचे आहे.
या मंदिराची अख्यायिका अशी की सुमारे ३०० वर्षांपूर्वी गावातील राऊत यांच्या शेतात जमिनीखाली गणरायाची ही मूर्ती सापडली होती. ज्या जागेवर ही मूर्ती सापडली तिथेच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. एकदा चौल
गावातील मुखरी नावाचा कोळ्याचा मुलगा मच्छिमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेला होता. दोन दिवस झाले तरी तो न परतल्याने त्याचे आई–वडील काळजीत पडले. त्यांनी या गणपतीला नवस केला की मुलगा परत आला तर या ठिकाणी तुझे मंदिर बांधेन. काही दिवसांनी मुखरी सहिसलामत किनाऱ्यावर आला आणि त्याच्या वडिलांनी नवस फेडण्यासाठी हे गणपतीचे मंदिर बांधले. तेव्हापासून हे स्थान ‘मुखरी गणपती’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
अलिबाग–रेवदंडा रस्त्याला लागून असलेले हे मंदिर नारळी–पोफळीच्या बागांमध्ये स्थित आहे. रस्त्यावरून मंदिराच्या फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात एका चौथऱ्यावर प्राचीन दीपस्तंभ आहे. यामध्ये प्रत्येक स्तरांवर दीपकोष्टके आहेत. या दीपस्तंभाच्या शेजारीच भलीमोठी दगडी बांधकाम असलेली पोखरण (बारव) आहे. या पोखरणीमध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. असे सांगितले जाते की या पोखरणीमध्ये बाराही महिने पाणी असते. ती कधीही आटत नाही. या पाण्याने शुचिर्भूत
होऊन मग मंदिरात जाण्याची प्रथा आहे. याशिवाय प्रांगणात एक वैशिष्ट्यपूर्ण तुलसीवृंदावन आहे. त्या गोलाकार वृंदावनातील देवकोष्टकांत श्रीदत्तगुरू, साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, दुर्गामाता यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या शेजारी भाविकांसाठी शेड उभारण्यात आलेली आहे. मंदिरासमोर असलेल्या खुल्या जागेत दोन्हीकडे भाविकांसाठी आसने आहेत. मुखमंडप, सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या खुल्या स्वरूपाच्या या मुखमंडपात असलेले चार स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. मुखमंडपातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा नंतरच्या काळात मंदिरासमोर बांधल्याचे जाणवते. गर्भगृहात जमिनीवर सुमारे अडीच फूट उंचीची गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे. शेंदूरचर्चित असलेल्या या मूर्तीवर चांदीचा मुकूट व मागील बाजूस नक्षीकाम असलेला चांदीचा मखर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गणपतीची मूर्ती ही कोणत्याही आसनावर वा वज्रपिठावर नाही.
दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीपासून सुरू होणारा माघी गणेशोत्सव हा येथील प्रमुख उत्सव आहे. ग्रंथांमधील माहितीनुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म जाला. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्र पटीने कार्यरत असते. असे सांगितले जाते की चौलपासून काही अंतरावर असलेल्या मुरुडजवळील नांदगाव येथे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा होत होता. मुखरी गणपती मंदिरासमोर राहणाऱ्या गंगाबाई चिंतामण पाटील यांचे नांदगाव हे माहेर. सासरी आल्यानंतरही त्या माघी गणेशोत्सवासाठी दरवर्षी माहेरी जात असत. १९६४–६५–६६ अशी सलग तीन वर्षे माघी उत्सवासाठी त्या माहेरी जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे माहेरी जाण्याऐवजी आपल्या घरासमोरच असलेल्या गणपतीचा उत्सव सुरू करावा, असे त्यांच्या मनात आले.
त्यांनी मंदिराची जबाबदारी असलेल्या पाखाड्यांकडे (गावकी) उत्सवाची परवानगी मागितली. ग्रामस्थांनी केवळ परवानगीच दिली नाही, तर ते मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी झाले. अशा पद्धतीने १९६७ साली सुरू झालेला उत्सव आजतागायत जल्लोषात साजरा केला जातो. गणेशजन्माच्या वेळी ढोलताशांच्या गजरात मूर्तीचे आगमन, प्राणप्रतिष्ठा, सहस्त्र दुर्वांकूर पूजा व गणेशजन्माचे कीर्तन असा भक्तिमय सोहळा रंगतो. या वर्षिक महोत्सवाबरोबरच प्रत्येक संकष्टी चतुर्थी व मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांकडून मुखरी गणपतीला गुळखोबऱ्याचे सारण आणि तांदुळाच्या कणकेचे आवरण असलेल्या २१, १०८ किंवा १२१ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो.