
पेण–खोपोली मार्गावर खोपोलीनजीक असलेल्या ताकई येथील टेकडीवर धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेले विठोबा–रखुमाईचे मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संतश्रेष्ठ जगत्गुरू तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे ठिकाण वारकऱ्यांमध्ये ‘बोंबल्या विठोबा’ या नावाने विशेष प्रसिद्ध आहे. कार्तिकी एकादशीपासून १५ दिवस चालणाऱ्या येथील यात्रेत गुरे व सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणात खरेदी–विक्री होते. त्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात व राजस्थानमधून अनेक व्यापारी येथे येतात. याशिवाय तांदूळ, मीठ व घोंगड्या यांचीही येथे खरेदी–विक्री होते.
या विठोबाला ‘बोंबल्या विठोबा’ असे म्हणण्यामागे एक आख्यायिका आहे. ती अशी की संत तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी देहूवरून कोकणात येत असत. तुकाराम महाराजांचे मराठीतील पहिले चरित्र कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी लिहिले. ‘अध्यात्मिकज्ञानरत्नावली’ या नियतकालिकात ते १८९३पासून क्रमशः प्रसिद्ध होत होते. १८९६ मध्ये ते ‘तुकारामबोवांचे चरित्र’ या नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले. या चरित्रात तुकोबांच्या या व्यापाराचा उल्लेख आलेला आहे. माता–पित्याचा मृत्यू, तसेच थोरल्या बंधूने गोसावीवृत्ती धारण करून केलेला गृहत्याग यामुळे तुकोबांना वैराग्य आले होते. अनेकदा व्यापार करता करता ते हरिभक्तीत तल्लीन होऊन जात. कोणी मिरच्या घेऊन जात असेल, तर त्यांच्याकडून ते पैसेही मागत नसत. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक व्यापारी त्यांचे पैसे बुडवत असत.
हा अनुभव त्यांना साजगाव–ताकई येथेही आला होता. त्यावेळी एकदा तुकारामांची देणी वसूल करण्यासाठी विठोबाने तुकारामांच्या नोकराचे रूप घेतले आणि येथील व्यापाऱ्यांची नावे घेऊन उधारी वसूल करण्यासाठी बोंबा मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे लाजेखातर व्यापाऱ्यांनी आपापली उधारीची
रक्कम तातडीने या नोकराकडे जमा केली. सर्व वसुली झाल्यानंतर ती रक्कम तुकारामांकडे देऊन हा नोकर सध्या जिथे मंदिर आहे त्या टेकडीवर गेला व गुप्त झाला. जेव्हा गावकऱ्यांना समजले की प्रत्यक्ष पांडुरंग तुकारामांसाठी येथे आले तेव्हा त्यांनी या जागेवर पांडुरंगाचे मंदिर बांधले. आपल्या भक्ताची उधारी वसूल करण्यासाठी देवाने बोंबा मारल्या म्हणून त्याचे नाव ‘बोंबल्या विठोबा’ असे पडले.
मात्र या नावामागे वेगळा संदर्भ असल्याचे मत इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मांडले आहे. ते असे की बोंबल्या विठोबा म्हणजे भौम आडनावाच्या मराठ्यांनी स्थापिलेला विठोबा होय. याबाबत ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथाच्या संशोधनपूर्ण प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की ‘बिंब या आडनावाप्रमाणेच भौम हे आडनावही प्राचीन आहे. भौमचा अपभ्रंश मराठी भोम. भौम शब्दाचा आणिक एक मराठीत अपभ्रंश बोंब. बोंब शब्दास स्वार्थ–कल–प्रत्यय लागून बोंबले (ला–ली–ले) व बोंबल्या हे मराठी शब्द निर्माण होतात. पेण–खोपोली रस्त्यावर जो बोंबल्या विठोबा आहे त्याच्या नावाचा हा बोंबल्या शब्द येतो. बोंबल्या विठोबा म्हणजे भौम आडनावाच्या मराठ्यांनी स्थापिलेला विठोबा. बोंब म्हणजे शंखध्वनी या शब्दाशी बोंबल्या विठोबा या शब्दांतील बोंबल्या या शब्दाचा काहीएक संबंध नाही. तसाच बोंबील माशाशीही बोंबल्या ह्या शब्दाचा संबंध नाही.’
पेण–खोपोली मार्गापासून ३०० मीटर अंतरावर, एका मध्यम आकाराच्या टेकडीवर बोंबल्या विठोबाचे मंदिर आहे. मंदिराच्या खालच्या बाजूने चक्राकार वाहणाऱ्या पाताळगंगा नदीमुळे हा संपूर्ण परिसर सुंदर भासतो. या नदीवर पुंडलिकाचे मंदिर आहे. तेथून वर असलेल्या या मंदिरात येण्यासाठी ७० पायऱ्या आहेत. याशिवाय येथे येण्यासाठी थेट गाडीरस्ताही उपलब्ध आहे. पंढरपूर क्षेत्राप्रमाणेच देव, तीर्थ, नाम आणि भक्ती या चारही बाबी येथे असल्यामुळे या क्षेत्राला ‘धाकटी पंढरी‘ असे नाव पडले आहे. या मार्गावरून
पंढरपूर व आळंदीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या आवर्जून येथे थांबा घेतात.
टेकडीच्या पठारावर असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मुख्य मंदिराच्या समोर भाविकांच्या व येथे येणाऱ्या वारकरी दिंड्यांच्या सुविधेसाठी पत्र्याची शेड टाकून मोठा मंडप उभारलेला आहे. सभामंडप व गर्भगृह अशी येथील मुख्य मंदिराची रचना आहे. एकावेळी १००० ते १२०० भाविक बसू शकतील, असा प्रशस्त सभामंडप आहे. या सभामंडपात १९८६ पासून अखंड वीणावादन सुरू आहे. मंदिर समितीकडून त्यासाठी सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहात एका वज्रपीठावर काळ्या पाषाणातील विठ्ठल–रुख्मिणीच्या कटेवर कर ठेवलेल्या सुमारे तीन फूट उंचीच्या मूर्ती आहेत. विठ्ठलाच्या मूर्तीवर चांदीचा मुकुट, कर्णकुंडले व पायात चांदीचे जोडवे आहेत. तसेच रुख्मिणीच्या मस्तकी चांदीचा मुकुट व गळ्यात अनेक अलंकार आहेत.
या मूर्तींबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की एकदा तुकोबांनी येथील काही विठ्ठलभक्तांना पंढरपूरला येण्यास सांगितले. ते पंढरपूर येथे गेले असता तुकोबांनी आधीच बनवून घेतलेल्या विठ्ठल–रुख्मिणीच्या मूर्ती त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. पुढे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुकोबारायांच्या हस्तेच या मूर्तींची येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्या वर्षापासून मंदिराच्या समोरील मोठ्या पटांगणात यात्रा सुरू झाली. ही यात्रा बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या यात्रेला ३५० हून अधिक वर्षांची परंपरा आहे.
कार्तिकी एकादशीपासून पुढे १५ दिवस चालणाऱ्या येथील यात्रेत परिसरातील अनेक भाविक दिंड्या–पताका घेऊन येथे येतात. यावेळी टाळ–मृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. कार्तिकी एकदशीच्या आदल्या दिवशी ताकई गावातील दिवंगत देहू कुशाबा पाटील यांच्या निवासस्थानी माऊलींच्या पादुका असलेल्या पालखीचे आगमन होते. पाटील कुटुंबीयांकडून पादुकांची यथोचित पूजा–अर्चा झाल्यानंतर येथे कीर्तन होते. त्यानंतर पालखीची वाजत–गाजत ताकई गावाला प्रदक्षिणा घातली जाते व ती पालखी धाकटी पंढरीच्या मंदिरात येते. एकादशीला पहाटे महापूजा आणि काकड आरतीनंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात येते.
या यात्रेनिमित्ताने येथे भरणारा बाजारही प्रसिद्ध आहे. त्यातही गुरांचा व सुक्या मासळीचा व्यापार येथे जास्त चालतो. या काळात येथे कोट्यवधींची उलाढाल होते. यात्रोत्सवाशिवाय फाल्गुन शुद्ध दशमीपासून पुढे नऊ दिवस येथे बीजउत्सव साजरा होतो. यावेळी राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने येथे होतात. पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी होतात. येथील आणखी एक मोठा उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जयंती. २२ दिवस चालणाऱ्या या उत्सवात काकडा, हरिपाठ, भागवत पारायण, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होतात. यावेळी उपस्थितांना महाप्रसादही देण्यात येतो. प्रत्येक एकादशीलाही हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येतात.