नागपूरमधील तेलंगखेडी येथील संकट मोचन बडे हनुमान मंदिर नागपूरसह विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भोसले काळापूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. तेलंगखेडी गावात असल्यामुळे ‘तेलंगखेडी हनुमान’ म्हणून ते जास्त प्रसिद्ध आहे. येथील हनुमान जागृत व नवसाला पावणारा असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हनुमान मंदिरासोबतच तेलंगखेडीमधील कल्याणेश्वर शिवमंदिरही प्रसिद्ध असून विदर्भातील अनेक भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे.
फुटाळा तलाव आणि सेमिनार हिलच्या मध्यभागी असलेल्या एका टेकडीवर हनुमानाचे हे मंदिर आहे. येथील हनुमानाची मूर्ती स्वयंभू असून ती नेमकी कधी प्रकट झाली याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी अभ्यासकांच्या मते, हे मंदिर भोसले राजवटीच्या आधीचे आहे. असे संगितले जाते की आज जेथे मंदिर आहे तेथे सुमारे ३०० वर्षांपूर्वी घनदाट जंगल होते. त्याकाळी ही भूमी साधूंची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध होती. अनेक नागा साधू येथे होम–हवन करत असत. त्यावेळची धुनी आजही मंदिर परिसरात पाहायला मिळते. या शिवाय ज्या महंतांनी या मंदिराची सेवा केली आहे, त्यांच्या समाध्याही या ठिकाणी आहेत. या टेकडीवर सत्ययुगात श्रीरामांचे काही काळ वास्तव्य होते, अशी मान्यता आहे.
नागपूर शहराच्या सीमेवर सेमिनार टेकडीजवळ मुख्य मार्गाला लागून या मंदिराचे कमानीवजा प्रवेशद्वार आहे. येथे ५० ते ६० पूजा साहित्याची दुकाने आहेत. उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी येथून सुमारे ६० पायऱ्या आहेत. या संगमरवरी पायऱ्यांवर दुभाजक असून भाविकांना जाण्यासाठी व येण्यासाठी स्वतंत्र मार्गिका बनविण्यात आल्या आहेत. या पायरी मार्गाच्या बाजूला प्राचीन वडाचे वृक्ष असून येथेही काही शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. मुख्य मंदिराआधी गंगागिरी महाराजांची समाधी आहे. मुख्य मंदिराच्या भव्य सभामंडपात असलेल्या गर्भगृहात एका चौथऱ्यावर हनुमानाची सुमारे ६ फूट उंचीची स्वयंभू शेंदूरचर्चित मूर्ती आहे. हनुमानाच्या डोक्यावर मुकुट व त्यामागे वैशिष्ट्यपूर्ण रचनेची प्रभावळ आहे. मुख्य गर्भगृहाच्या आजूबाजूला श्रीगणेश, श्रीदत्त, राम–लक्ष्मण–सीता, सरस्वती माता, गायत्री देवी, श्रीविष्णू–लक्ष्मी, गौरीशंकर, कपिल मुनी, भगवान परशुराम, त्रिमुखी कार्तिक स्वामी, पंचमुखी हनुमान, महादेव, राधा–कृष्ण व दुर्गामाता यांची मंदिरे आहेत.
मंदिर परिसर प्रशस्त असून येथे धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठा सभामंडप आहे. मंगळवारी व शनिवारी येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. हनुमान जयंतीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पहाटे हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर आरती आणि हनुमान चालिसा पठण होते. यावेळी दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये अखंड रामायण पाठ, भजन व कीर्तन असे कार्यक्रम असतात. मंदिर समितीतर्फे येथे योगशाळा व गोशाळा चालविली जाते. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना येथील मंदिरात हनुमानाचे दर्शन घेता येते.
तेलंगखेडी हनुमान मंदिरापासून साधारणतः १.५ ते २ किमी अंतरावर असलेले कल्याणेश्वर शिवमंदिरही नागपूरमधील प्रसिद्ध व प्राचीन धार्मिक स्थळ मानले जाते. पूर्वाभिमुख असलेले हे शिवमंदिर ऐतिहासिक नोंदींनुसार दुसऱ्या रघुजींची आई आणि मुधोजींची पत्नी चिमाबाई यांनी १७९४ मध्ये बांधले होते. त्यामुळे हे मंदिर २३० वर्षांहूनही अधिक प्राचीन आहे. या मंदिराला उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून अशी २ प्रवेशद्वारे आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर १२ स्तंभ असून ते वरच्या बाजूला ११ महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपात ३२ स्तंभ असून अंतराळाच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी तीन अर्धस्तंभ आहेत. याशिवाय काही स्तंभ भिंतींमध्ये आहेत. शहरातील हे एकमेव प्राचीन मंदिर आहे, ज्यामध्ये एकूण ९७ स्तंभ आहेत. अंतराळ आणि सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मोठी मूर्ती आहे.
अंतराळात असलेल्या दोन देवकोष्टकांपैकी एकामध्ये दोन फूट उंचीची पितळी गणेशमूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर विशेष कोरीव काम नसले तरी दोन्ही बाजूला द्वारपाल व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात मोठी शिवपिंडी असून तिला पितळी आवरण आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर पूर्वीपासून भोसले घराण्याचे दैवत होते. श्रावण महिन्यात भोसले कुटुंबातर्फे येथे पूजा–अर्चा होत असे. १९२५ मध्ये भोसलेंची येथील सर्व मालमत्ता न्यायालयाच्या ताब्यात गेली; परंतु हे मंदिर मात्र भोसले यांच्या वंशजांकडेच होते. सद्यस्थितीत जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या मंदिराचा समावेश झालेला आहे. नागपूरमधील प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे दररोज अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. श्रावणी सोमवारी हजारो भाविकांची येथे गर्दी असते. महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाच्या दिवशी सुमारे एक लाख भाविक येथे दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. सकाळी ५.३० ते रात्री १० पर्यंत या मंदिरात भाविकांना कल्याणेश्वराचे दर्शन घेता येते.