कापड बाजाराची लगबग, सोन्या-चांदीच्या पेढ्यांची झळाळी आणि जुन्या मुंबईची गजबज म्हणजे भुलेश्वरचा परिसर होय. गर्दी आणि कोलाहलाने भारलेल्या या परिसरात अर्थ आणि धर्म हे मानवी जीवनातील दोन पुरुषार्थ एकमेकांना समांतर पद्धतीने नांदत आहेत. अनेक देवालयांना सामावून घेणाऱ्या या परिसरातील एक महत्त्वपूर्ण मंदिर म्हणजे भगवान श्री स्वामीनारायण मंदिर होय. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उभारण्यात आलेले हे मंदिर मुंबईच्या स्थित्यंतराचे आणि व्यापारी उत्कर्षाचे साक्षीदार आहे. वैशिष्ट्यपूर्ण त्रिशिखर रचनेमुळे प्रसिद्ध असलेले हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाच्या वडताल येथील लक्ष्मीनारायण गादी संस्थानाशी निगडित आहे.
‘स्वामीनारायण’ हा भारतातील एक प्रसिद्ध धार्मिक संप्रदाय आहे. या संप्रदायाचे संस्थापक स्वामी सहजानंद यांचे मूळ नाव ‘घनश्याम पांडे’ असे होते. उत्तर प्रदेशातील अयोध्येजवळील छपैया या गावात ३ एप्रिल १७८१ रोजी रामनवमीच्या दिवशी एका सामवेदी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी सात वर्षे भारतभ्रमण केले, तसेच हिमालयात तपश्चर्या ही केली. या काळात ते ‘नीलकंठ वर्णी’ या नावाने ओळखले जात होते. इ.स. १८०० मध्ये सौराष्ट्रातील मांगरोळ येथे स्वामी मुक्तानंद आणि नंतर पीपलाणा येथे गुरु रामानंद यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी गुजरात हे आपले धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले. ‘नीलकंठ वर्णी’ यांना ‘सहजानंद’ हे नाव रामानंद यांनी दिले.
इ.स. १८०१ मध्ये ‘सहजानंद’ हे ‘रामानंदी उर्फ उद्धव संप्रदायाचे’ प्रमुख बनले. रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत व वल्लभाचार्यांच्या शुद्धाद्वैत या तत्त्वज्ञानाचा आधार घेत स्वामी स्वामीनारायण यांनी समन्वयकारी धर्माचा प्रसार केला. तत्कालीन समाजातील सती प्रथा, भ्रूणहत्या यांसारख्या अनिष्ट गोष्टींचा, तसेच मद्य-मांस भक्षण, हिंसा, पशुहत्या, चोरी, जुगार, व्यभिचार, अंधश्रद्धा, आणि होळीसारख्या सणांतील बीभत्सता व अश्लीलता यांचा त्याग करण्याची शिकवण ते देत असत. जैन धर्मीयांप्रमाणेच त्यांचाही अहिंसा आणि शाकाहारावर भर होता. त्या काळातील काही हिंदू संप्रदायांमधील स्त्री-पुरुष संबंधांतील अनैतिकता त्यांना नापसंत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या संप्रदायात याबाबत कडक नियम केले होते. स्वामीनारायण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत आणि लोकांनी त्यांना शरण जावे, हा त्यांचा उपदेश होता. अहिंसा ही पारलौकिक असल्याचे ते सांगत असत. ते यज्ञातील हिंसेच्याही विरोधात होते. सहजानंद तथा ‘श्रीजी’ ऊर्फ ‘नीलकंठ वर्णी’ हेच स्वामीनारायण म्हणजेच ईश्वराचा अवतार आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. १ जून १८३० रोजी त्यांचे निर्वाण झाले.
तत्पूर्वी इ.स. १८२५ मध्ये त्यांनी आपल्या संप्रदायात दोन गाद्यांची निर्मिती केली. त्यांच्यापैकी पहिली गादी अहमदाबाद येथे ‘नर-नारायण देव गादी’ म्हणून आणि दुसरी वडताल येथे ‘लक्ष्मी-नारायण देव गादी’ म्हणून ओळखली जाते. या पंथाचे आचार्यपद वंशपरंपरागत चालावे, असा आदेश त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी अहमदाबाद येथील ‘नर-नारायण देव गादीवर’ आपले ज्येष्ठ बंधू रामप्रताप पांडे यांचे पुत्र अयोध्याप्रसाद यांची, तर वडताल येथील ‘लक्ष्मी-नारायण देव गादीवर’ धाकटे बंधू इच्छाराम यांचे पुत्र रघुवीर यांची नियुक्ती केली.
पुढे आचार्यपदाच्या या मुद्द्यावरून या संप्रदायातून इ.स. १९०५ मध्ये शास्त्री यज्ञपुरुषदास (‘शास्त्रीजी महाराज’) यांनी बोचासन येथे एका वेगळ्या संस्थेची स्थापना केली. ही संस्था ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ (बीएपीएस) म्हणून ओळखली जाते. स्वामीनारायण हे संप्रदायाच्या गुणातीत गुरूंच्या माध्यमातून पृथ्वीवर जिवंत आहेत, अशी या संस्थेची श्रद्धा आहे. पुढे इ.स. १९६६ मध्ये बीएपीएस मधून ‘गुणातीत समाज’ ही स्वतंत्र संस्था निर्माण झाली. याशिवाय अहमदाबाद गादीपासून फुटून इ.स. १९४० मध्ये ‘स्वामीनारायण गादी’ (मणिनगर) ही संस्था तयार झाली. स्वामी स्वामीनारायण यांनी त्यांच्या कार्यकाळात अहमदाबाद (१८२२), भुज (१८२३), वडताल (१८२४), ढोलेरा (१८२६), जुनागढ (१८२७) आणि गढडा (१८२८) येथील सहा मंदिरांची स्थापना केली. स्वामीनारायण यांनी अहमदाबादेत उभारलेल्या पहिल्या मंदिराच्या उभारणीस तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याने सहाय्य केले होते. आज जगभरात या संप्रदायाच्या विविध संस्थांची अनेक मंदिरे आहेत. त्यांच्यापैकी लक्ष्मीनारायण गादीच्या編धिपत्याखालील एक मंदिर भुलेश्वर येथे आहे.
या मंदिराचा इतिहास दोन टप्प्यांत विभागला गेला आहे. सन १८६८ मध्ये वैशाख शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर शेठ रणछोडदास प्राणजीवनदास यांनी मुंबईतील या पहिल्या स्वामीनारायण मंदिराची पायाभरणी केली. सात्विक वृत्तीच्या रणछोडदास यांनी स्वतःचे राहते घर पाडून त्या जागी ‘हरिमंदिर’ उभारले आणि आपल्या आयुष्याची सर्व कमाई या मंदिरासाठी अर्पण केली. त्या वेळी आचार्य महाराज श्री भगवतप्रसादजी यांच्या हस्ते या मंदिरात ‘हरिकृष्ण महाराज’, ‘गोलोकविहारी’ आणि ‘राधिका’ यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यानंतर ३७ वर्षांनी, म्हणजेच सन १९०३ मध्ये, या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला आजचे भव्य स्वरूप देण्यात आले. या मंदिराच्या निर्मितीत ‘रावबहादूर’ करमसी दामजी (१८४४-१९१८) यांचे मोठे योगदान आहे. कच्छमधील एका गरीब कुटुंबात जन्मलेले करमसी आपल्या मातेसोबत मुंबईत आले होते. त्यांनी सुरुवातीचे दिवस पदपथावर काढले. प्रामाणिकपणे मेहनत करून त्यांनी व्यापारात अफाट यश मिळवले. सन १८९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीत त्यांनी सामाजिक भान दाखवले होते. तसेच, सन १८९६ च्या प्लेगच्या साथीत त्यांनी मोठे कार्य केले.
या त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली होती. सन १९०३ मध्ये वैशाख शुद्ध द्वादशीला वडताल गादीचे तत्कालीन आचार्य लक्ष्मीप्रसाद महाराज यांच्या हस्ते या मंदिरात ‘घनश्याम महाराज’ आणि ‘लक्ष्मी-नारायण देव’ यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
भुलेश्वरच्या सुप्रसिद्ध फूलगल्लीत वसलेल्या या मंदिराचा बाह्य दर्शनी भाग ऐतिहासिक हवेलीसारखा सुशोभित आहे. या चारमजली वास्तूच्या तळमजल्यावर मंदिराचे सभागृह आहे. येथे सदोदित सत्संग, प्रवचन, भजन आदी कार्यक्रम होत असतात. हवेलीच्या मुख्य प्रवेशद्वारातून २५ संगमरवरी पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथे डाव्या बाजूस सुंदरशा देवळीत गणेशाची, तर उजवीकडे हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपास कोरीव नक्षीकामाने सुशोभित केलेले ५४ स्तंभ आहेत. त्यावर घुमटाकार वितान आहे. त्यात श्रीकृष्णाच्या विविध लीलांची रंगीत चित्रे चितारलेली आहेत. या सभामंडपाच्या बाजूच्या भिंतींवर स्वामीनारायण तसेच वडताल गादीशी संबंधित आचार्य आणि सत्पुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. हे मंदिर त्रिकूट प्रकारचे आहे. येथे तीन गर्भगृहे आहेत. या गर्भगृहांना कोरीव नक्षीकाम असलेला सोनेरी पत्रा जडवला आहे.
त्यांपैकी मधल्या गर्भगृहात संगमरवरी वेदीवरील सोनेरी मखरामध्ये ‘घनश्याम महाराज’, ‘भगवान नारायण’ आणि ‘लक्ष्मी’ यांच्या प्रसन्नवदन संगमरवरी मूर्ती आहेत. येथे भगवान नारायणाची मूर्ती चतुर्भुज आहे, तर लक्ष्मीमाता अभयमुद्रेत आहे. स्वामीनारायण मंदिरांतील प्रथा-परंपरांनुसार या मूर्ती भरजरी वस्त्रे, अलंकार आणि सोनेरी मुकुट यांनी शृंगारलेल्या आहेत. बाजूच्या एका गर्भगृहात ‘हरिकृष्ण महाराज’, ‘गोलोकविहारी’ आणि ‘राधिका’ यांच्या मूर्ती विराजमान आहेत. येथील ‘गोलोकविहारी’ म्हणजे कृष्णकन्हैयाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. ‘हरिकृष्ण महाराजांच्या’ चेहऱ्यावर सोनेरी मुखवटा आहे, तर ‘राधिकेची’ मूर्ती शुभ्र पाषाणात घडवलेली आहे. या मूर्तींनाही भरजरी वस्त्रालंकारांनी शृंगारलेले आहे. येथील तिसऱ्या गर्भगृहामध्ये स्वामींची शय्या आहे. येथे दोन सोनेरी सिंहमूर्ती असलेल्या मोठ्या पलंगावर स्वामीनारायणांच्या मूर्ती तसेच मुकुट ठेवलेले आहेत. येथे स्वामीनारायण यांची राजस्थानी चित्रशैलीतील भव्य चित्रप्रतिमा लावलेली आहे. या मंदिराच्या सभामंडपावर घुमटाकार शिखर आहे. त्यावर चार स्तरांचा आमलक आणि कळस आहे. तीन गर्भगृहे असल्याने या मंदिरास तीन शिखरे आहेत. कोरीव नक्षीकाम आणि उभी कलशरांग असलेल्या या शिखरांतील मधले शिखर सर्वांत उंच आहे. उरुशृंग पद्धतीच्या या शिखरावर पाच स्तरांचा आमलक आणि त्यावर एकावर एक तीन कलश आहेत.
स्वामीनारायण मंदिरात भाविक सकाळी ७.३० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८.३० या काळात दर्शन घेऊ शकतात. स्वामी सहजानंद यांचा जन्म रामनवमीचा असल्यामुळे या मंदिरात रामनवमी हा सर्वांत मोठा उत्सव असतो. या सोहळ्यात मुंबईतील वडताल गादीचे हजारो अनुयायी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या काळात येथे प्रवचन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंदिरात जन्माष्टमी, महाशिवरात्र, गणेशोत्सव, नृसिंह जयंती, तसेच श्रावण महिन्यात ‘हिंदोला’ हे उत्सवही हरिभक्तांच्या प्रचंड गर्दीत आणि उत्साहात साजरे केले जातात.