शीतलादेवी मंदिर

शीतलादेवी मंदिर मार्ग, माहीम (प.), मुंबई

मुंबईचा आद्यराजा प्रताप बिंब आणि त्याच्या नंतर सुमारे दीडशे वर्षांनी सत्तेवर आलेला सुप्रसिद्ध राजा बिंबदेव ऊर्फ भीमदेव यादव यांच्या राजधानीचे नगर म्हणजे माहीम. प्राचीन काळी ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नगरात शीतलादेवीचे प्राचीन व सुप्रसिद्ध देवालय आहे. शीतला किंवा शितलामाता ही लोकदेवता आहे. ती दुर्गेचा अवतार मानली जाते. ही देवी क्षत्रिय तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील अनेक कुटुंबीयांची कुलस्वामिनी आहे. येथील शीतला देवी जागृत आणि विविध आजारांचे निवारण करणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे या मंदिरात नेहमी भाविकांची वर्दळ असते.

संस्कृतमध्ये ‘शीतला’ या शब्दाचा अर्थ ‘जी थंडावा देते ती’ असा होतो. शीतलादेवी ही मूळची लोकदेवता आहे. पूर्वी साथीच्या रोगांच्या देवी कल्पून त्यांची पूजा केली जात असे. उदाहरणार्थ, ‘जरी’ ही तापाच्या साथीची देवी मानली जात असे, तर ‘मरी’ ही पटकी आणि देवी यांसारख्या रोगांच्या साथीची देवी मानली जाते. त्याचप्रमाणे, शीतलादेवी ही लहान मुलांस होणाऱ्या ज्वर, गोवर आणि कांजण्या या आजारांचा नाश करणारी देवता समजली जाते. अनघड पाषाणाच्या वा तांदळ्याच्या स्वरूपात या देवीची स्थापना केली जाते. कालांतराने वैदिक आर्य धर्माने या देवीचे उन्नयन करून तिला पौराणिक चरित्र बहाल केले. या देवीचे उल्लेख ‘स्कंदपुराणाच्या’ ‘प्रभासक्षेत्रमाहात्म्य’ तसेच ‘अयोध्यामाहात्म्यात’ आढळतात. ‘अयोध्यामाहात्म्यात’ या देवीचे मंदिर अयोध्येत होते, असे म्हटलेले आहे.

मध्ययुगातील ‘भावप्रकाश’ या आयुर्वेदविषयक ग्रंथातील एका प्रकरणात गोवर आणि कांजण्या यांच्याविषयीची चर्चा आहे. त्याच्या उपप्रकरणामध्ये ‘शीतलास्तोत्र’ दिलेले आहे. त्यामध्ये शीतलादेवी ही रोगांची देवता असल्याचे म्हटले आहे. ‘भावप्रकाश’ या ग्रंथाप्रमाणेच ‘बृहन्नारदीय महापुराणात’ शीतलादेवीच्या मूर्तीचे वर्णन केलेले आहे. तिच्या वंदनामंत्रातूनही तिच्या स्वरूपाचे दर्शन होते. हा मंत्र “वन्देऽहं शीतलां देवीं रासभस्थां दिगम्बराम्। मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्।।” असा आहे. याचा अर्थ “गर्दभावर विराजमान, दिगंबरा, हातात झाडू तसेच कलश धारण करणाऱ्या आणि सूपाने अलंकृत मस्तक असलेल्या शीतला देवीस मी वंदन करतो” असा होतो. या श्लोकानुसार या देवीचे वाहन गाढव आहे आणि तिच्या हातात झाडू व कलश आहे. यावरून ही स्वच्छतेची देवी असल्याचे मत व्यक्त केले जाते.

शीतलादेवीचा उल्लेख असलेला सर्वात जुना शिलालेख राजस्थानातील जोधपूरनजीकच्या ओसिया येथील ‘साचिया माता’ प्राचीन मंदिरात आढळतो. ही साचिया माता असुर राजा पौलोमाची कन्या मानली जाते. तिच्या मंदिरातील गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील शिलालेखामध्ये इसवी सनाच्या अकराव्या शतकात साचिया, शीतला आणि चंडिका अशा तीन देवींच्या मूर्ती स्थापन केल्याचा उल्लेख आहे. तिच्या सर्वात प्राचीन मूर्तींपैकी एक मूर्ती राजस्थानातील झालरापाटननजीक चंद्रभागा नदीच्या तीरावरील शीतलेश्वर महादेव मंदिरात आहे. हे मंदिर इ.स. ६८९ मध्ये उभारण्यात आले होते, असे सांगण्यात येते. गुजरातमधील अकराव्या शतकातील मोढेरा सूर्यमंदिरातही शीतलादेवीचे शिल्प आढळते. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भागांत या देवीची प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते. महाराष्ट्रात या देवीची पूजा बाराव्या शतकापासून होत असावी, असा कयास आहे. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब याचा गुजरातशी संबंध असल्यामुळे मुंबईतील शीतलादेवी ही गुजरातमधून आली, असे अभ्यासकांचे मत आहे.

‘महिकावतीच्या बखरीनुसार’, प्रताप बिंब हा गुजरातमधील अनहिलवाड पाटणच्या चालुक्यांचा मांडलिक असलेल्या चंपानेरचा राजा गोवर्धन बिंब याचा भाऊ होता. या बखरीच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सोलंकी म्हणजेच चौलुक्य किंवा चालुक्य हे मूळचे मराठा कुळ असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. या कुळाबरोबर पाटणप्रांती म्हणजेच अनहिलवाड पाटण येथे गेलेल्या इतर अनेक मराठी कुळांमध्ये बिंबांचे एक मराठा कुळ होते. या बिंब आडनावाच्या क्षत्रियांचा संबंध पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम आडनावाच्या क्षत्रियांशी होता. बिंब हे मूळचे महाराष्ट्रीय म्हणजेच मराठे होते. चंपानेरच्या गोवर्धन बिंबाने आपला भाऊ प्रताप बिंब याला इ.स. ११३८ मध्ये उत्तर कोकणवर हल्ला करण्यास पाठवले आणि इ.स. ११४० मध्ये त्याने दमण ते चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहीम व वसईपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. केळवे-माहीम म्हणजेच महिकावती येथे प्रताप बिंबाने आपली राजधानी स्थापन केली. त्यानंतर त्याने आपला पुत्र मही बिंब याला चंपानेरहून देशवसाहत करण्यासाठी येथे लोक आणण्यास सांगितले आणि मही बिंब याने तेथून ६६ कुळे आणली. या कुळांनी येथे आपल्यासोबत आपल्या देवता आणणे स्वाभाविक होते. केळवे-माहीम येथे आजही शीतलादेवीचे प्राचीन मंदिर आहे. गुजरात व राजस्थानसारख्या राज्यांतूनही अनेक भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात.

यानंतर, इ.स. ११४२ मध्ये प्रताप बिंब याने आपला प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यास वालुकेश्वरपर्यंतचा प्रदेश सर करण्यास पाठवले. हा भाग जिंकल्यानंतर प्रताप बिंबाने येथे ‘देशवसाहत’ केली. येथील ‘बरडबेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावर त्याने आपली राजधानी वसवली आणि त्याला आपल्या पहिल्या राजधानीचे म्हणजे माहीम-केळवेचे नाव दिले. तेच आजचे माहीम. प्रताप बिंब याने आपल्या सोबतच्या अनेक अधिकारी, सेनापती इत्यादींना येथील काही गावे इनाम म्हणून दिली आणि येथे माहीम-केळवेतून आलेल्या लोकांना वसवले. या लोकांनी येथील गाव-पाड्यांना आपल्या आधीच्या गाव-पाड्यांची नावे दिली आणि आपल्या दैवतांचीही येथे प्रतिष्ठापना केली. त्यावेळी माहीम-केळवेमधील शीतलादेवीही या नव्या माहीम-मुंबईमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आली असावी, असा अभ्यासकांचा कयास आहे.

माहीममध्ये या देवीच्या नावाने नवे मेट्रो स्थानक उभे आहे. येथील लेडी जमशेटजी मार्गानजीक प्रशस्त आवारामध्ये हे मंदिर वसले आहे. अलीकडे बांधलेले दगडी प्रवेशद्वार असलेल्या या आवारातून आत शिरताच डावीकडे विठ्ठल-रखुमाईचे देवालय आहे. संपूर्ण कातीव पाषाणात बांधलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील शिखर होय. साधारणतः कलशाच्या आकाराचे हे शिखर आडव्या दगडी पट्ट्या एकावर एक ठेवून बांधल्यासारखे भासते. या मंदिरास भव्य पाषाणी कमानी असलेला सभामंडप आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवळ्यांत हनुमान आणि गरुडाची मूर्ती आहे. तसेच आत उंच अधिष्ठानावर विठ्ठल-रखुमाईची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. एरवी प्रवेशद्वारांवर असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती या मंदिराच्या गर्भगृहातील अधिष्ठानावर दोन्ही कोपऱ्यांत विराजमान आहेत. या मंदिरानजीक संगमरवरी चौथऱ्यावर उंच अष्टकोनी दीपमाळ आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. याशिवाय या आवारात महादेव, साईबाबा, हनुमान, तीनमुखी महाकाली माता तसेच शांतादुर्गा देवी यांचीही मंदिरे आहेत. शीतलादेवी मंदिरासमोर सुमारे दीड शतकापूर्वी उभारण्यात आलेली मोठी दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या शिलालेखावर शालीवाहन शके १८०७, संवत १९४२, माघ वद्य दशमी, रविवार (१८ फेब्रुवारी १८६६) या दिवशी “सूर्यवंशी क्षत्रिय कुळाची गंगा भागीरथी बुधीबाई उर्फ जनाबाई फकिर बापु पाटिल यांची विधवा हिणे ही दिपमाळ आपला स्वर्गवाशी बाप हिरा पांडु राऊत याचा स्मर्णार्थ बांधिली असे” असे लिहिले आहे.

शीतलादेवीचे मंदिर जुन्या कोकणी व इस्लामी स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेले आहे. सभामंडप आणि दोन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपावर दोन्ही बाजूंनी उतरते असलेले कोकणी पद्धतीचे छप्पर आहे. मंदिरावर गोल घुमटाकार शिखर आहे आणि त्यावर उंच कलश आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या सभामंडपामध्येच एका उंच वेदीवर शीतलादेवी विराजमान आहे. हे मंदिर सध्या जेथे उभे आहे, त्यापासून काही अंतरावर पूर्वी या देवीचे स्थान होते, असे सांगितले जाते. नंतर तिची या मंदिराच्या सभामंडपात विधिपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली. देवी येथे केवळ मुखवटा स्वरूपात प्रतिष्ठापित आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मुखवट्यावर मोठे डोळे ठळकपणे दिसतात. देवीच्या मस्तकी अंगचाच कोरीव मुकुट आहे. नवरात्रोत्सवात या देवीस सोन्याचा मुखवटा घातला जातो. देवीच्या या वेदीच्या डाव्या बाजूला असलेल्या गर्भगृहात हनुमान आणि गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या दोन्ही मूर्ती पाषाणाच्या आणि शेंदूरचर्चित आहेत. हनुमानाच्या मूर्तीवर पितळेचा मुखवटा आहे. उजवीकडील गर्भगृहात शिवशंकराच्या पिंडी विराजमान आहेत. एकाच गर्भगृहात एकमेकांलगत असलेल्या दोन पिंडी हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यातील एका पिंडीची शाळुंका चौकोनाकार आहे आणि दुसरीची शाळुंका गोलाकार आहे. त्यांची प्रणाल पुढे जाऊन एका ठिकाणी मिळालेली आहे. पिंडीवरील पाषाणाच्या लिंगावर पितळी आवरण आहे. त्यावर नागछत्र आणि अभिषेकपात्र आहे. या पिंडीनजीक गर्भगृहाच्या मागील भिंतीलगत छोट्या अधिष्ठानावर शंकर-पार्वती-गणपती तसेच चतुर्भुज सुहास्यवदन दुर्गादेवी व गायत्री देवी यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

येथील मंदिरांचा कारभार गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञातीच्या ‘जीएसबी टेम्पल ट्रस्ट’तर्फे पाहिला जातो. शीतलादेवीच्या मंदिरात सकाळी ६ ते १ आणि सायंकाळी ४ ते ९ ही दर्शनवेळा आहे. मंदिरात रोज सकाळी ८.३० आणि सायंकाळी ७ वाजता आरती होते. देवीच्या दर्शनासाठी येथे रोज असंख्य भाविक आणि खासकरून महिला येतात. मुंबई आणि माहीम परिसरातील कोळीबांधवांची या देवीवर नितांत श्रद्धा आहे. कोणत्याही शुभकार्याच्या वेळी येथील कोळीबांधव देवीस ‘सांगणे’ घालतात. या मंदिराच्या परिसरात एक प्राचीन विहीर आहे. लग्नप्रसंगी या विहिरीचे पाणी आवर्जून नेले जाते आणि या पाण्यात भिजवलेली हळद वधू-वरांना लावण्याची प्रथा येथे आजही पाळली जाते. लहान मुलांना गोवर, कांजण्या इत्यादी रोग झाल्यास या विहिरीतील पाण्याने त्यांना स्नान घातले जाते. यामुळे हे रोग बरे होतात, अशी काहींची श्रद्धा आहे. काही महिला आपण अखंड सौभाग्यवती राहावे, याकरिता येथे देवीची ओटी भरतात. रायगड जिल्ह्यातील चौल येथे शीतलामतेचे एक प्राचीन मंदिर आहे. प्राचीन काळातील या वैभवशाली नगरातील शीतलादेवी आणि माहीमची शीतलादेवी यांचा विशेष संबंध आहे. चौल येथे जाऊन अनेक लोक शीतलादेवीला नवस करतात. चौलला जाणे अशक्य असलेले लोक नवसपूर्तीसाठी माहीमच्या शीतलादेवी मंदिरात येतात आणि ही नवसपूर्ती चौलच्या शीतलादेवीला पोहोचते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण शुक्ल सप्तमी ही ‘शीतला सप्तमी’ म्हणून ओळखली जाते. त्या दिवशी येथे देवीची विशेष पूजा केली जाते. नवरात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव होय. या काळात येथे रोज सकाळी सनई-चौघड्याने सोहळ्यास प्रारंभ होतो. रोज सकाळी आणि सायंकाळी आरती होते. या सायंआरतीला मुंबईतील अनेक मान्यवर आणि सुप्रसिद्ध व्यक्ती आवर्जून उपस्थिती लावतात. या देवीचा नवरात्रातील अष्टमीचा होम प्रसिद्ध आहे. या होमाच्या वेळी येथे किमान सात ते आठ हजार लोक येतात, असे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८८२८२८९१२४

शीतलादेवी मंदिर

शीतलादेवी मंदिर रोड, माहिम (पश्चिम), मुंबई

Back To Home