निर्मळ या नावाचा अर्थ स्वच्छ, शुद्ध. अपरान्त म्हणजे कोकणाची इ.स.पू. १५०० ते इ.स. १३०० या काळातील राजधानी असलेल्या शूर्पारक अर्थात सोपाऱ्यानजीक हे तीर्थक्षेत्र आहे. स्कंदपुराणात ‘सिद्धिपीठं तथा ख्यातं निर्मलं तीर्थमुत्तमम्’ म्हणजे हे सर्व पवित्र तीर्थांमधील एक उत्तम व सिद्धीचे स्थान असलेले तीर्थ आहे, असे म्हटले आहे. पौराणिक धारणांनुसार येथे जो पवित्र ऋचा उच्चारतो आणि पापांपासून दूर राहतो, त्याला सप्तकोटी पट पुण्य लाभते. अशा या क्षेत्रात जगद्गुरू शंकराचार्य स्वामी मंदिर वसलेले आहे.
‘निर्मल माहात्म्य’ या ग्रंथात निर्मळविषयी अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे की त्रेतायुगात वैतरणी नदीच्या काठी विमल नामक असूर राहात असे. येथील ऋषींना तो त्रास देत असे. त्याचा वाढता उत्पात पाहून परशुरामाने त्याच्याशी युद्ध करून पराभव केला. त्यानंतर पश्चात्ताप झालेल्या विमलासुराने येथे कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला मृत्यूमुक्तीचे वरदान व तुंगार डोंगरावर एक पवित्र जलस्रोत दिला. शिवाने त्याला सांगितले की जर त्याने ब्राह्मणांना त्रास देणे थांबवले, तर त्याला तीनही लोकांमध्ये कोणाची भीती राहणार नाही. परंतु काही काळाने विमलासुर पुन्हा ब्राह्मणांना त्रास द्यायला लागला. त्यामुळे शिवाने परशुरामाला पुन्हा त्याला आवरण्यास सांगितले. दरवेळी परशुराम त्याचे हातपाय छाटत असे, पण शिवाच्या कृपेने ते परत नवीन होत.
अखेरीस परशुरामाने शंकराच्या साह्याने विमलासुरावर विजय मिळवला. शरण आलेल्या विमलासुरास परशुरामाने क्षमा केली व परशुरामाने ज्या ठिकाणी तो पडला तेथे एक शिवलिंग स्थापन केले व त्याचे नाव विमलेश्वर ठेवले. विमल या नावावरून, तसेच परशुरामाने विमलासुराचा वध करून पवित्र केल्याने हे स्थान निर्मळ म्हणून ओळखले जाऊ लागले. या विमलेश्वर महादेवाच्या मंदिराबरोबरच सनातन वैदिक धर्माचे महान आचार्य शंकराचार्य यांच्या मंदिरामुळे निर्मळ हे स्थान ख्यातकीर्त आहे.
शंकराचार्य स्वामी मंदिराबाबत अशी दंतकथा आहे की प्राचीन काळी वैदिक धर्म प्रचारासाठी राजा जलौक (जलूक) याने आदि शंकरचार्यांना येथे पाचारण केले होते. जगद्गुरू शंकरचार्यांनी इ.स.पू. ४९७ मध्ये या तीर्थास भेट दिली. इ.स.पू. ५०४ मध्ये कार्तिक महिन्याच्या उत्पत्ती एकादशीला त्यांनी येथे समाधी घेतली. यानंतर राजा जलौक याने येथे शंकराचार्यांचे हे समाधी मंदिर बांधले. आचार्यपरंपरेनुसार आदि शंकराचार्यांचा जन्म इ.स.पू. ५०७ मध्ये म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या शतकात झाला. असे सांगण्यात येते की ज्या जलौक राजाने येथे शंकराचार्यांचे मंदिर बांधले. तो जलौक हा सम्राट अशोकाचा पुत्र होता. त्याचा काळ इसवी सन पूर्व तिसरे शतक हा आहे व कवी कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथानुसार तो काश्मीरचा राजा होता. आदि शंकराचार्य व जलौक यांच्या काळात तीन शतकांचे अंतर आहे. या शिवाय कांची पीठानुसार, आदि शंकराचार्यांचे समाधीस्थान कांचीपुरम् येथे आहे. त्यामुळे हे मंदिर आदि शंकराचार्यांनंतर होऊन गेलेल्या शंकराचार्यांचे असावे असे सांगण्यात येते.
१८८२च्या ‘गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी’, खंड १४ मध्येही, हे मंदिर आदि शंकराचार्यांच्या ‘धार्मिक वंशजा’चे असावे असे नमूद केलेले आहे. काही अभ्यासकांच्या मते, हे मंदिर शृंगेरी पीठाचे बारावे शंकराचार्य विद्यारण्य यांचे आहे. विद्यारण्य यांचा जीवनकाल इ.स. १२९६ ते १३८६ असा आहे. विद्यारण्य यांची विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका होती. या साम्राज्याची उभारणी करणारे हरिहर आणि बुक्क या बंधूंचे ते सल्लागार होते. त्यांनी या स्थानी समाधी घेतली, अशी आख्यायिका सांगण्यात येते. ‘गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी’नुसार, वसईच्या मोहिमेत आपला पराक्रम गाजविलेले पेशव्यांचे सरदार शंकराजी केशव फडके यांनी निर्मलमध्ये इ.स. १७५०च्या सुमारास आठ मंदिरे बांधली. शंकराचार्य स्वामी मंदिर हे त्यातीलच एक आहे. या मंदिरास १८८२च्या काळात ब्रिटिश सरकारकडून ४२ पौंड म्हणजे त्या काळातील ४२१ रुपये एवढे वार्षिक अनुदान दिले जात असे. यावरून येथील सध्याचे मंदिर हे सुमारे पावणे तीनशे वर्षे जुने असल्याचे स्पष्ट होते.
निर्मळ गावातील हे मंदिर एका टेकडीवर वसले आहे. मंदिर परिसरात येण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. याशिवाय येथे येण्यासाठी मोटार रस्ताही आहे. भाविकांच्या सोयीसाठी, या पायरीमार्गावर मध्ये थोडी सपाट जागा ठेवण्यात आली आहे. त्या जागेच्या दोन्ही बाजूला दोन प्राचीन दीपस्तंभ आहेत. टेकडीवर येताच समोरच मंदिराची भव्य वास्तू दिसते. मंदिराभोवती मोठे आवार आहे. येथे कातीव दगडांच्या मोठ्या चौथऱ्यावर एक भव्य दीपमाळ आहे.
येथील मंदिरवास्तू एखाद्या भुईकोटासारखी आहे. उंच दुमजली भिंत, त्यात खिडक्या, दोन्ही बाजूंना बुरुजासारखा आकार, मध्ये प्रवेशद्वार, त्यासमोर छोटा कमानदार मुखमंडप, त्यावर सज्जासारखी रचना असे या मंदिराचे बाह्यस्वरूप आहे. सहा पायऱ्या चढून मुखमंडपात व तेथून मंदिराच्या मुख्य प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात चारी बाजूंनी ओवऱ्या आहेत. मध्यभागी मंदिराची वास्तू आहे. येथे शंकराचार्य समाधी मंदिर, शंकराचे मंदिर, तसेच विष्णू मंदिर आहे. ही तिन्ही मंदिरे एकमेकांलगत आहेत. मंदिरांवर घुमटाकार शिखरे आहेत. यातील बाजूचे दोन घुमट मोठे व मधला घुमट तुलनेने लहान आहे. घुमटावर आमलक आणि कळस आहेत.
मुख्य मंदिराच्या समोरील बाजुस गरुडमंडप व नंदीमंडप आहेत. त्यामध्ये पाषाणातील गरुड व नंदी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात मध्यभागी शंकराचार्य स्वामींची समाधी स्थान आहे. येथे असलेल्या विष्णू मंदिरातील गर्भगृहात मध्यभागी महाविष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजुला सत्यभामा, अक्रुर, गरूड व उजवीकडे रुक्मिणी, बलराम, नारद व उद्धव यांच्या मूर्ती आहेत.
येथे कार्तिकी उत्पत्ती एकादशीला मोठी यात्रा असते. ही यात्रा निर्मळची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ती एक महिना चालत असे. मात्र आता १५ दिवसांची असते. यात्राकाळात असंख्य भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. उत्पत्ती एकादशीच्या पहाटे अभिषेक व पूजा करून यात्रासोहळ्यास प्रारंभ होतो. द्वादशीला मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी शंकरचार्य स्वामींची पालखी परिसरात असलेल्या सुएश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघते. निर्मळ सरोवराला प्रदक्षिणा घालून ती मंदिरात परत येते. सुएश्वरी मंदिरातही सर्वत्र दिवे लावून रोषणाई केली जाते. गावात जागोजागी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले जाते.
उपयुक्त माहिती