भुलेश्वर आणि कावसजी पटेल टँक (सी.पी. टँक) हा परिसर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईतील एक प्रमुख व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित झाला. या भागात स्थायिक झालेल्या गुजराती, मारवाडी, तसेच भाटिया या पारंपारिक व्यापारी समाजांनी येथे आपल्या कुलदेवता आणि इष्टदेवतांची, तसेच आराध्य दैवतांची अनेक मंदिरांची स्थापना केली. सत्यनारायण मंदिर हे याच समृद्ध व्यापारी कालखंडातील एक जुने मंदिर मानले जाते. सी.पी. टँक भागातील गुलालवाडी येथे हे मंदिर स्थित आहे.
मराठी विश्वकोशानुसार, सत्यनारायण हे बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले एक काम्य, म्हणजे काही इच्छा मनात ठेवून केलेले व्रत आहे. सत्यनारायण ही या व्रताची प्रमुख देवता आहे. याखेरीज गणपती, गौरी, वरुण, अष्टदिक्पाल, नवग्रह इत्यादी परिवारदेवताही या व्रतात पूजल्या जातात. सत्यनारायणाची कथा स्कंदपुराणाच्या रेवाखंडात आहे. स्कंद म्हणजे शिवाचा पुत्र. त्याच्या नावाने हे पुराण प्रसिद्ध आहे. त्यातील कथेनुसार, नैमिष्यारण्यात शौनक वगैरे मुनींनी सूताला विचारले की “मुनीश्रेष्ठा, मनातली सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हांला सांगा.” त्यावर सूत म्हणाले की “पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्रीविष्णूला विचारला होता.” तेव्हा श्रीविष्णू म्हणाले की “नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
स्वर्गात किंवा मृत्युलोकात कोणालाही माहिती नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुम्हाला सांगतो. हे व्रत करणारा सर्वकाळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे आहे, तसेच ते धनधान्य, सौभाग्य आणि संतती देणारे आहे.” याला श्रीसत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. प्रत्यक्ष विष्णूने नारद मुनींना सांगितलेले हे व्रत आहे.
या व्रताच्या अनेक कथा रेवाखंडामध्ये आहेत. त्यातील काशीपूर गावातील एका निर्धन ब्राह्मणाने आणि एका दरिद्री लाकूडतोड्याने सत्यनारायणाचे व्रत केल्यामुळे त्यांना समृद्धी प्राप्त झाली. तसेच, उल्कामुख नावाच्या राजाने हे व्रत केल्याने त्याला संतानप्राप्ती झाली. या कथा सत्यनारायण पूजेच्या प्रसंगी सांगितल्या जातात. यातील नवस केल्याप्रमाणे इच्छापूर्ती झाल्यानंतरही सत्यनारायणाचे व्रत न करणाऱ्या साधू वाण्यावर कशी संकटे कोसळली ही कथा विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विश्वकोशातील अ. र. कुलकर्णी यांची या व्रताविषयीची नोंद सांगते की “पेशवेकालीन कागदोपत्री या पूजेचा (व्रताचा) उल्लेख आढळत नाही… सत्यनारायणाची पूजा व मुसलमान पीरांच्या पूजेत काही साम्य दिसते. मुसलमान पीरांच शिरणी (प्रसाद) अर्पण करण्याची चाल आहे.
तशी प्रथा बंगाली हिंदूंच्या सत्यनारायण पूजेत दिसून येते. तिथून ती महाराष्ट्र व अन्य प्रदेशात प्रचलित झाली… सत्यनारायणाची सार्वजनिक पूजाही करतात. सध्या या पूजेला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.”
देशात ठिकठिकाणी सत्यनारायणाची अनेक मंदिरांची निर्मिती झाली आहे. यातील वीर व्यंकट सत्यनारायण स्वामी मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशातील अन्नवरम येथील ‘रत्नगिरी’ टेकडीवर सन १८९१ मध्ये स्थापित झालेले हे मंदिर देशातील भगवान सत्यनारायणाचे सर्वात प्रसिद्ध, मोठे आणि मुख्य मंदिर मानले जाते. तिरुपती बालाजी मंदिरानंतर आंध्र प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून याला ओळखले जाते. याचप्रमाणे सत्यनारायण तुळशी मानस मंदिर (वाराणसी, उत्तर प्रदेश, स्थापना – १९६४), गुडेम गुट्टा सत्यनारायण स्वामी मंदिर (गुडेम-दंडेपल्ली, तेलंगणा, स्थापना – १९६४), तसेच सत्यनारायण मंदिर (मलहापारा, मुंगेली, छत्तीसगढ) ही मंदिरेही विशेष लोकप्रिय आहेत. बंगालमधील ‘बागला ग्रुप’ या उद्योगसमूहाचे संस्थापक राजा रायबहादूर शिवबक्ष बागला हे सत्यनारायणाचे परमभक्त होते. त्यांनी सन १८७१ मध्ये म्यानमारमध्ये लाकूड व्यापार सुरू केला. त्यांनी १८७५ मध्ये म्यानमारमधील मौलमेन येथे, १८८३ मध्ये कोलकात्यातील कॉटन स्ट्रीटवर, तर १८८७ मध्ये वाराणसीमध्ये सत्यनारायण आणि लक्ष्मी मातेचे भव्य संगमरवरी मंदिर उभारले. रायबहादूर शिवबक्ष बागला यांचे घराणे मूळचे राजस्थानातील चारू येथील. राजस्थान तसेच गुजरातमधून आलेल्या व्यापाऱ्यांमध्ये पूर्वापार सत्यनारायणाची पूजा केली जाते. यातीलच एका व्यापाऱ्याने सी.पी. टँक परिसरात सत्यनारायणाचे हे मंदिर उभारले.
हे मंदिर शेठ भाणजी या व्यापाऱ्याने उभारले, परंतु त्याच्या स्थापनेचा नेमका इतिहास अनुपलब्ध आहे. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी सन १८९५ मध्ये ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्या काळातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, तसेच ‘द टाइम्स ऑफ इंडिया’,
‘न्यूजमन’, ‘बॉम्बे गॅझेट’, ‘द ख्रिश्चियन पॅट्रियट (मद्रास)’ अशा नियतकालिकांनी नावाजलेल्या या पुस्तकामध्ये मुंबईतील अनेक मंदिरांची माहिती देण्यात आली आहे. त्यात मलबार हिलवरील ‘शिडी रोड’वरील सत्यनारायणाच्या एका साध्या, सहा बाय दहा फुटांच्या व बिनाघुमटाच्या मंदिराची माहिती आहे. मात्र सी. पी. टँक परिसरातील या मोठ्या मंदिराचा उल्लेख नाही. यावरून हे मंदिर सन १८९५ नंतरचे असावे असे स्पष्ट होते.
येथील गजबजलेल्या बाजारपेठेत स्थित असलेले हे मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे. मंदिरास छोटासा मुखमंडप आहे. त्याच्या कमानदार प्रवेशद्वाराच्या स्तंभांवर राजस्थानी शैलीतील, दंड व खड्गधारी द्वारपालांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर डावीकडे वरच्या भागात कोरीव नक्षीदार महिरपी कमानीमध्ये गणेशाची, तर उजवीकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारास जुन्या हवेल्यांना असतो तसा भक्कम सागवानी दरवाजा आहे. प्रवेशद्वाराच्या वर छतावर तत्कालीन बरोक वास्तुशैलीची छाप असलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. तिच्या तळाशी पाश्चात्य परंपरेतील देवदूतांची शिल्पे आहेत,
तर शीर्षस्थानी गरुडावर बसलेल्या भगवान विष्णूची मूर्ती आहे. मुखमंडपातील सहा पायऱ्या चढून या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपास दोन मोठ्या स्तंभांवर मकरतोरण असलेले उंच प्रवेशद्वार आहे. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या प्रशस्त सभामंडपात समोरच मंदिराचे गर्भगृह आहे. या गर्भगृहासमोर उंच व रुंद स्तंभांवर उभारलेला व घुमटाकार छत असलेला अर्धमंडप आहे. कोरीव नक्षीकाम केलेले स्तंभ, त्यांच्या शीर्षभागातील श्रीराम, श्रीकृष्ण, लक्ष्मीमाता आदी देवदेवतांच्या मूर्ती, स्तंभांमधील महिरपी कमानी, या कमानींवरील पानाफुलांची नक्षी, तसेच सूरसुंदरींची शिल्पे यांद्वारे हा अर्धमंडप सुशोभित करण्यात आला आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोरील दोन्ही बाजूंच्या दोन स्तंभांवर राजस्थानी शैलीतील दंडधारी द्वारपालांची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या नक्षीदार द्वारचौकटींच्या खालच्या बाजूलाही द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत, तर उत्तरांग भागामध्ये कमलपुष्पात उभ्या असलेल्या चतुर्भुज देवी लक्ष्मीचे उठावशिल्प कोरलेले आहे. या शिल्पाच्या दोन्ही बाजूंना दोन ऋषीप्रतिमाही आहेत. गर्भगृहात उंच वेदीवर संगमरवरी पाषाणात घडवलेली भगवान सत्यनारायणाची उभी मूर्ती विराजमान आहे. सत्यनारायण हे विष्णूचे एक रूप मानण्यात येते. येथील मूर्तीही विष्णुमूर्तीप्रमाणेच समपद आणि चतुर्भुज आहे. तिच्या वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि पुष्प आहे, तर खालच्या हातात चक्र आणि गदा आहे. प्रसन्नवदन अशा या मूर्तीस भरजरी वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेले आहे. मूर्तीसमोर वेदीच्या पायऱ्यांवर गोमातेच्या दोन आणि गजराजांच्या दोन चांदीच्या मूर्ती आहेत. मंदिरावर दाक्षिणात्य शैलीतील उंच शिखर आहे. त्यावर त्रिस्तरीय आमलक आणि त्यावर सोनेरी कलश आहे. शिखराजवळ दक्षिणेत बालाजी मंदिरासमोर असतो तसा उंच सोनेरी ध्वजस्तंभ आहे.
या मंदिरात सकाळी ६ ते ७, ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८.३० या काळात भाविक देवदर्शन घेऊ शकतात. येथे सकाळी ६.०५ वाजता आरती होते. सकाळी १० वाजता देवाचा शृंगार केला जातो. १०.३० वाजता भोग (नैवेद्य) अर्पण केला जातो. त्यानंतर सकाळी ११ वाजता, तसेच ६.३० वाजता देवाची आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता भोग अर्पण केल्यानंतर ८.३० वाजता देवाची शयन आरती केली जाते. मंदिरात विविध सण व उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यात येथे विधिवत सत्यनारायण महापूजा केली जाते.