सात आसरा मनमाला देवी मंदिर

माटुंगा (प.), मुंबई

पंचतत्त्वांपैकी जलतत्त्वाचे प्रतीक असलेल्या साती आसरांचे प्रसिद्ध मंदिर माटुंग्याच्या पश्चिम भागातील मनमाला टँक रोडवर स्थित आहे. हे मंदिर साती आसरांतील मनमाला या देवीला समर्पित आहे. हे मंदिर दोन ते अडीच शतके प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. येथील मनमाला देवी ही माटुंग्याची ग्रामदेवता असल्याचे मानले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की मनमाला ही मनातील इच्छा पूर्ण करणारी देवता आहे. यामुळे अनेक भाविक या देवीला नवस करतात. येथे साजऱ्या होणाऱ्या आश्विन नवरात्रोत्सवात परिसरातील असंख्य लोक सहभागी होतात.

या मंदिरातील साती आसरा जागृत असल्याची लोकश्रद्धा आहे. ‘भारतीय संस्कृती कोश’ नुसार आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. अप्सरा या गंधर्व वर्गातील स्त्रिया असतात आणि त्यांना गांधर्वी असेही म्हणतात. सायणाचार्यांनी या शब्दाची व्युत्पत्ती ‘अप् + सरस्’ म्हणजे ‘जलात क्रीडा करणाऱ्या त्या अप्सरा’ अशी दिलेली आहे. यामुळे यांना जलदेवता मानण्यात आलेले आहे. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात किंवा साती आसरा असे म्हणतात. ‘द फोकलोअर ऑफ बॉम्बे’ या आर. ई. एन्थोव्हेन यांच्या १९२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर ग्रंथात अशी माहिती देण्यात आली आहे की आसरांना काही भागांत मावलाया असेही म्हणतात. या आसरा मुले आणि तरुणींना त्रास देतात असा समज आहे.

विख्यात विदुषी दुर्गा भागवत यांनी त्यांच्या ‘धर्म आणि लोकसाहित्य – अभिचार किंवा जादुटोणा’ या लेखामध्ये (‘नवभारत’, नोव्हेंबर १९५९) असे प्रतिपादन केले आहे की भारतीय लोकपरंपरेमध्ये दोन प्रकारच्या रोगदेवता मानण्यात आलेल्या आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे भूदेवता आणि दुसरा जलदेवता. नदी, तलाव, विहिरी इत्यादी पाण्याच्या ठिकाणी या जलदेवतांचे स्थान असते. कोकणातील लोकसमजुतीनुसार सर्व जलसाठ्यांनजीक सात आसरांचे वास्तव्य असते. काहींच्या मते कमळे असलेल्या तलावातच त्या राहतात. सात आसरांच्या रोगकारक तामसी शक्तीमुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी त्यांना पूजले जाते. लोकपरंपरेनुसार गवळीदेव हा त्यांचा भाऊ आहे. सात आसरांबरोबरच त्याचीही पूजा केली जाते. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा आणि मकरी अशी सात आसरांची धर्मग्रंथांतील नावे होत. लोकपरंपरेत मात्र त्यांना विविध नावे आहेत. माटुंग्यातील या मंदिरामध्ये कान्होपात्रा, चंपावती, केवडावती, मनमाला, जरीमरी, शीतलादेवी आणि खोकलादेवी यांना सात आसरा म्हटलेले आहे. यातील जरीमरी, शीतलादेवी व खोकलादेवी या वस्तुतः लोकदेवता आहेत आणि त्या रोगांशी निगडित आहेत. त्यांची मंदिरे मुंबईत अन्यत्रही आढळतात.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत माटुंगा परिसर म्हणजे एक ओसाड रान होते. देवगिरीच्या रामदेवराव यादवाचा चौथा पुत्र असलेला राजा बिंबदेव ऊर्फ भीमदेव यादव हा तेराव्या शतकात येथे राज्य करीत होता. इ.स. १२९५ मध्ये त्याने माहीम (बिंबस्थान) येथे आपली राजधानी स्थापन केली. माटुंग्याच्या परिसरात या राजाची मोठी गजशाळा होती असे सांगण्यात येते. संस्कृतमध्ये हत्तीला मातंग असेही म्हटले जाते. यावरून या भागास मातंगालय असे म्हटले जाऊ लागले. त्याचा मातंगा, मातुंगा असा अपभ्रंश होत माटुंगा हे नाव पडले असावे. काहींच्या मते येथील हत्तींच्या देखभालीसाठी बिंब राजाच्या काळात येथे मातंग समाजाची वस्ती होती. त्यामुळे या भागास माटुंगा हे नाव पडले असावे. पौराणिक आख्यायिकेनुसार या परिसरात मतंग ऋषींचे निवासस्थान होते. त्यावरून माटुंगा हे नाव आले.

इ.स. १७२० ते १७२८ या काळात ब्रिटिशांनी वरळीचा बांध बांधला. त्यानंतर माहीमच्या खाडीत भराव टाकल्यावर महालक्ष्मी, परळ, वरळी, माहीम आदी ठिकाणांबरोबरच माटुंग्यात धान्यशेती होऊ लागली. या भागात मिठागरे देखील होती. हा परिसर पुढे एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी ब्रिटिश तोफखान्याचे ठाणे म्हणून उदयाला आला. येथे लष्कराची मोठी छावणी उभारण्यात आली. परंतु इ.स. १८३५ मध्ये रोगराईमुळे, त्यातही पाण्यातून होणाऱ्या नारू रोगाच्या साथीमुळे येथील छावणी पुण्यास हलवण्यात आली आणि हा परिसर पूर्णतः ओसाड पडला. या छावण्यांमधील मजुरांच्या काही कुटुंबांचे पाडे तेवढे या भागात असत. या भागाचे भाग्य उजळण्यास रोगाची एक साथच एका अर्थी कारणीभूत ठरली. इ.स. १८९६ मधील ग्रांथिक सन्नीपाताच्या म्हणजेच प्लेगच्या साथीनंतर मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी १९०० च्या पहिल्या दशकात ब्रिटिश सरकारने माटुंगा हे मुंबईतील पहिल्या नियोजित उपनगरांपैकी एक म्हणून विकसित केले.

सध्याच्या मंदिर परिसरात पूर्वी एक तलाव होता अशी येथील साती आसरा मनमाला देवी मंदिराची कथा सांगण्यात येते. त्या तलावात सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी काही व्यक्तींना या सात मूर्ती सापडल्या. या तलावाचे नाव मनमाला तलाव असे होते आणि तो नंतर बुजवण्यात आला. या तलावाच्या नावावरूनच यातील एका देवीस मनमाला असे नाव देण्यात आले. मूर्ती सापडण्याची ही घटना सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येते. वरळीचा बांध पूर्ण होऊन येथे शेतीभाती पिकू लागल्याचा आणि लोकवस्ती वाढल्याचा तो काळ होता. त्या वेळी ग्रामस्थांनी देवींच्या मूर्तींसाठी येथे छोटे मंदिर उभारले. माटुंगा हे नियोजित उपनगर म्हणून विकसित होत असतानाच्या काळात, १९२५ मध्ये ब्रिटिश सरकारने ती जागा मंदिरास इनाम दिली. प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर यांच्या ‘मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे’ या पुस्तकानुसार १६ मार्च १९८५ रोजी मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गोविंद खैरनार यांनी येथील मनमाला देवीचे आणि हनुमानाचे मंदिर उद्ध्वस्त केले होते. मात्र ग्रामस्थांनी ते पुन्हा उभारले. ९ मे १९८७ रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त एस. राममूर्ती यांच्या हस्ते देवीच्या मंदिरावर सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात आली.

माटुंग्यातील शांत परिसरामध्ये हे मंदिर वसले आहे. मंदिर आवारास आधुनिक बांधकामाचे भव्य प्रवेशद्वार आहे. त्याच्या स्तंभांवर द्वारपालांची दोन आगळीवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. हे द्वारपाल शैवपंथीय आहेत आणि या शिल्पांवर कोळी समाजपरंपरेचा प्रभाव आहे. कोळी पद्धतीचे कटीवस्त्र व माथ्यावर उभट टोपीसारखा मुकुट वगळता ते अनावृत आहेत. त्यांच्या हातात मोठे त्रिशूळ आहे. त्यांनी सर्पाकार यज्ञोपवीत धारण केले आहे. अशा प्रकारचे द्वारपाल शिल्प दुर्मिळ आहे. या प्रवेशद्वाराच्या वर गोलाकारात श्रीयंत्र कोरलेले आहे. त्यावर त्रिशूळ शिल्प आहे. या छताच्या दोन्ही कोपऱ्यांत दोन सिंहमूर्ती आहेत. आत काही अंतरावर डावीकडे गावदेवीचे स्थान आहे. येथे एका उंच चौथऱ्यावर गावदेवीची पाषाण मूर्ती विराजमान आहे. त्याशेजारीच मनमाला देवीचे मंदिर स्थित आहे. मंदिराचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे आहे. तीन पायऱ्या उंचीच्या जगतीवर मंदिर उभे आहे. या पायऱ्यांच्या डावीकडे छोट्या संगमरवरी देवळीत साईबाबांची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर डावीकडे उंच व आडव्या चबुतऱ्यावर देवी मनमालासह कान्होपात्रा, चंपावती, केवडावती, जरीमरी, शीतलादेवी आणि खोकलादेवी या साती आसरांच्या मूर्ती विराजमान आहेत. त्यांच्याबरोबर कान्हू गवळी आणि राखणदार तसेच संतोषी माता आणि गणेशाची मूर्तीही या अधिष्ठानावर विराजमान आहेत. यातील साती आसरा तसेच राखणदार व कान्हू गवळी यांच्या मूर्ती विविध प्रकारच्या अनघड पाषाणाच्या आहेत. या पाषाणावर कवड्यांसारखे डोळे लावलेले आहेत. यातील खोकलादेवीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही मूर्ती म्हणजे प्राचीन मंदिराच्या दगडी कोरीव स्तंभाचा एक भग्नावशेष आहे. त्यावरही दोन डोळे लावलेले आहेत. या सर्व मूर्तींना भरजरी वस्त्राने लपेटलेले आहे. कान्हू गवळी आणि राखणदार म्हणजे भैरव यांच्या पाषाणावर गांधीटोपीचा मुकुट आहे. या उंच चबुतऱ्याच्या मागच्या भिंतीवर तुळजाभवानी मातेची मोठी प्रतिमा लावलेली आहे. मंदिरावर साधारणतः त्रिकोणाकार शिखर आहे आणि त्यावर सोनेरी कलश आहे. या मंदिराच्या अंगणात एक विहीर आहे; ती पुरातन आहे आणि तिचे पाणी आजारावर गुणकारी असल्याची लोकश्रद्धा आहे.

या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सव हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव असतो. चैत्री नवरात्रोत्सव तुलनेने साध्या पद्धतीने साजरा केला जातो. आश्विन नवरात्रोत्सव मात्र अतिशय थाटामाटाने व विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ८ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०२२ २४३७३३२०

सत आसरा मनमाला देवी मंदिर

माटुंगा (पश्चिम), मुंबई

Back To Home