संत जनाबाई जन्मस्थान मंदिर

गंगाखेड, ता. गंगाखेड, जि. परभणी

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा॥’ या संत नामदेवांच्या प्रसिद्ध अभंगातील संतमेळीत समाविष्ट असणाऱ्या आणि स्वतः अनेक अभंगांची रचना करणाऱ्या संत जनाबाई यांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात आहे. हे शहर गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणवून घेणाऱ्या संत जनाबाई या पंढरपूरच्या विठुरायाच्या परम भक्त होत्या. प्रत्यक्ष विठ्ठलही त्यांच्या कामात मदत करत असे, अशी आख्यायिका आहे. वेळप्रसंगी प्रत्यक्ष पांडुरंगासोबत भांडण करणाऱ्या जनाबाई यांची साध्या, सोप्या भाषेतील अभंग व इतर रचना महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारापाशीच समाधी घेतलेल्या संत जनाबाईंच्या जन्मगावी त्यांचे सुंदर मंदिर उभारण्यात आलेले आहे. वारकरी संप्रदायाचे असंख्य अनुयायी तसेच गंगाखेडमध्ये येथे येणारे अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.

प्राचीन काळी ‘प्रभावती नगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेला परभणी जिल्हा हा संतनगरी म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण भागाला मोठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. विसोबा खेचर, संत नामदेव, भास्करभट्ट बोरीकर, रंगनाथ स्वामी मोगरीकर, शिर्डीचे साईबाबा, निवृत्तीबुवा ठाकूर, तुकाराम महाराज (येळेगावकर), योगानंद सरस्वती महाराज उर्फ गांडा महाराज, संतकवी योगानंद स्वामी महाराज, श्रीकृष्णाजी महाराज, सखाराम महाराज, शुकानंद महाराज आदी संत व महापुरुष येथे होऊन गेले. संत जनाबाई या त्यापैकीच एक आहेत. संत नामदेवांची परमभक्त असलेल्या संत जनाबाई यांचा जन्म तेराव्या शतकात गंगाखेड गावातील राजेंद्र पेठेत राहणाऱ्या एका कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करुंड असे होते. विठ्ठलाचे परम भक्त असलेले हे दाम्पत्य नियमितपणे पंढरपूरची वारी करत असे.

लग्नानंतर अनेक वर्षे अपत्य नसलेल्या या दाम्पत्याने एकदा पंढरपूरच्या वारीदरम्यान अपत्यासाठी विठुरायाला प्रार्थना केली. त्याच रात्री विठ्ठलाने दमा यांची स्वप्नात भेट घेऊन दृष्टांत दिला. “तुला मुलगा होणार नाही. मात्र, तुझ्या पत्नीच्या पोटी अत्यंत सद्गुणी कन्या जन्माला येईल. ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल. ती कृतयुगात पद्मिनी होती. भविष्यात संत नामदेवांशी तिचा संबंध येणार असल्याने, पंढरपूरमधील नामदेवांचे वडील दामाशेठ यांच्याकडे या मुलीला सोपवून दे,” असे विठ्ठलाने दमा यांना सांगितले. त्यानुसार दमा यांच्या घरात जनाबाई यांचा जन्म झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर दमा यांनी विठ्ठलाच्या आज्ञेनुसार जनाबाई यांना पंढरपूर येथे राहणाऱ्या दामाजी शिंपी यांच्याकडे ठेवले. पुढे दमा यांचेही निधन झाले. त्यामुळे दामाजी शिंपी यांच्या घरातच जनाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. दामाजी शिंपी यांचे संपूर्ण कुटुंब विठ्ठलभक्ती करणारे होते. त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाचे नियम आणि विचार पाळले जात होते. दामाजी यांचे कुटुंब चौदा जणांचे होते. दामाजी यांनी जनाबाईंचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. चांगल्या आणि देवभक्त स्वभावामुळे जनाबाई लवकरच या कुटुंबातील एक सदस्य झाल्या. या घरात पडेल ती कामे त्या करत असत. दामाजी शिंपी यांचे पुत्र असलेले नामदेव हे जनाबाईंपेक्षा वयाने पाच-सात वर्षे लहान होते. जनाबाई स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणवून घेत असत. संत नामदेवांच्या सोबत राहून जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. संत नामदेव हेच त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. संत ज्ञानेश्वर-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या काळातील बहुतेक सर्व संतांना संत जनाबाई यांनी प्रत्यक्ष पाहिले होते.

नामदेवांच्या घरात काम करताना अनेकदा प्रत्यक्ष विठ्ठल जनाबाई यांना मदत करत असे. त्या चुलीवर भाकऱ्या करून विठ्ठलाला जेवू घालत, अशा अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. एकदा पंढरपूरच्या मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांच्यावर देवाच्या दागिन्यांची चोरी केल्याचा आरोप केला होता. “आदल्या दिवशी विठुराया माझ्या घरी झोपला होता. त्यानेच तो दागिना घरात सोडला असावा,” असे जनाबाईंनी सांगितले. मात्र, लोकांना ते खरे वाटले नाही. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा होणार असलेल्या लोखंडी खांबाजवळ संत जनाबाई टक लावून पाहत देवाचे गुणगान गात असताना, तो खांब वितळला आणि नदीत वाहून गेला, असेही सांगितले जाते. दागिने चोरीचा आळ आल्याच्या प्रसंगावरून त्यांचा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा अभंग प्रसिद्ध आहे. आपण सोन्या-नाण्याची नव्हे, तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंद केल्याचे त्या अभंगातून त्या सांगतात.

कोणतेही शालेय शिक्षण नसलेल्या संत जनाबाई यांनी लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत अभंग व इतर रचना केल्या. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग ‘नामदेव गाथे’मध्ये आहेत. संत नामदेव यांच्या शतकोटी अभंगांमध्ये जनाबाईंचे साडेबारा कोटी अभंग असल्याची आख्यायिका आहे. परंतु, आजच्या काळात त्यांच्या उपलब्ध असलेल्या अभंगांची संख्या तीनशेहून अधिक नाही. त्यांनी कवीच्या भूमिकेची जाणीव ठेवून अभंगरचना केली नाही. मनातून आलेल्या त्यांच्या भावना काव्यरूपाने बाहेर पडल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या अभंगांतून संत नामदेवांविषयीचा आदरभाव, विठ्ठलाला मारलेली हाक, ज्ञानेश्वरांच्या महानतेचा आदर, चोखामेळ्याविषयीची भक्ती व्यक्त होते. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या मनाला जाऊन भिडते. त्यांनी तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत गोरोबा, संत चोखामेळा, संत सेनामहाराज आदींच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणाऱ्या काव्यरचनाही केल्या. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून हजारो महिला आजही जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. त्यांच्या काव्यातून प्रेम, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्रीविषयीच्या भावना ठळकपणे दिसून येतात. ‘कृष्णजन्म’, ‘थाळीपाक’, ‘प्रल्हादचरित्र’, ‘बालक्रीडा’, ‘हरिश्चंद्राख्यान’ आदी रचनाही त्यांच्या नावावर आहेत. ‘थाळीपाक’ व ‘द्रौपदी स्वयंवर’ या आख्यानांमुळे संत एकनाथांचे नातू महाकवी मुक्तेश्वरांना प्रेरणा मिळाल्याचे सांगितले जाते. शके १२७२ मध्ये आषाढ कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर समाधी घेतली.

महाराष्ट्रात संत जनाबाई यांची तीन मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक मंदिर गंगाखेड येथे आहे, तर दुसरे मंदिर त्यांची कर्मभूमी असलेल्या पंढरपूरमध्ये आहे. ‘मरोनिया जावे। बा माझ्या पोटी यावे’, अशा शब्दांमध्ये संत ज्ञानदेवांना आपल्या पोटी जन्म घेण्याची विनंती करणाऱ्या संत जनाबाईंचे मंदिर आळंदी येथेही आहे. गंगाखेड येथील हे संत जनाबाईंचे स्मारक मंदिर उभारण्यासाठी १९५४ मध्ये गावात एका समितीची स्थापना करण्यात आली. या स्मारकासाठी गंगाखेड शहराबाहेर गोदावरी नदीला जेथे कपिला नदी मिळते, ते ठिकाण निवडण्यात आले. प्रथम एका छोट्या चौथऱ्यावर संत जनाबाई यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आता या ठिकाणी मोठे मंदिर बांधण्यात आले आहे. गंगाखेड रेल्वे स्थानकापासून हे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे.

गावातील मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर हे स्मारक मंदिर उभे आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराबाहेर डाव्या बाजूला मोठे तुळशीवृंदावन आहे. सभामंडपाच्या मध्यभागी अनेक खांब आहेत. येथे संत जनाबाई यांची पालखीही ठेवलेली आहे. गर्भगृहात प्रवेश केल्यावर प्रथम संत जनाबाई यांची चांदीच्या पादुकांचे दर्शन होते. त्यामागील चौथऱ्यावर मधोमध जनाबाई व त्यांना जात्यावर दळण दळण्यास मदत करणाऱ्या विठुरायाच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडे संत नामदेवांची, तर उजवीकडे हे स्मारक मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेणारे संत मोतीराम महाराज यांची मूर्ती स्थापित आहे. मागील भिंतीला लागून असलेल्या चौथऱ्यावर विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडे काचबंद कपाटात जनाबाई व त्यांना जात्यावर दळण दळण्यास मदत करणाऱ्या विठुरायाच्या तांब्याच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर डाव्या बाजूस ह. भ. प. मारुती महाराज दस्तापूरकर यांची समाधी आहे. गर्भगृहाच्या उजवीकडे संत मोतीराम महाराज यांची समाधी पहावयास मिळते. त्या मागे असलेल्या चौथऱ्यावर हनुमान, गणेश, विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. तसेच येथे एक शिवलिंगही आहे.

गावातील अनेक ग्रामस्थ येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. वारकरी संप्रदायाचे असंख्य अनुयायी येथे आवर्जून भेट देतात. मंदिरात सतत वीणेकरी वीणेचे वादन करत असतात. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आदींचा समावेश असतो. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी या मंदिरातून पंढरपूर येथे पायी पालखी जाते. १९७२ पासून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • गंगाखेड एसटी बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून ३८ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून गंगाखेडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

संत जनाबाई जन्मस्थान मंदिर

गंगाखेड़, तालुका गंगाखेड़, जिला परभणी

Back To Home