महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये राणीसावरगाव हे गाव वसले आहे. या गावातील रेणुका मातेचे देवालय हेमांडपंती शैलीतील असून ते माहूरच्या मुख्य रेणुका मंदिराचे उपपीठ म्हणून ओळखले जाते. देवीचे मूळ स्थान मुख्य गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका निसर्गरम्य टेकडीवर स्थित आहे. या टेकडीला ‘मूळपीठ’ असे म्हटले जाते. या मूळपीठाची स्थापना रेणुका मातेचे पुत्र भगवान परशुराम यांनी केली होती, अशी मान्यता आहे. ही देवी परभणी जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची कुलदेवता मानली जाते. येथे दरवर्षी चैत्र महिन्यात ‘तेलधुनी जत्रा’ नावाने प्रसिद्ध असलेली मोठी जत्रा भरते आणि शारदीय नवरात्रोत्सवातही येथे मोठा उत्सव होतो.
या मंदिराच्या स्थापनेविषयी आणि देवीच्या आगमनाविषयी काही आख्यायिका स्थानिक पातळीवर सांगितल्या जातात. त्यानुसार, रेणुका देवीचे मूळ स्थान माहूर हे आहे. माहूरची रेणुका देवी आणि तुळजापूरची तुळजाभवानी या दोन्ही बहिणी एकमेकींना भेटण्यासाठी या सावरगावात येत असत आणि येथील विस्तीर्ण माळावर त्या दोघी सारीपाट खेळत असत. रेणुका देवीचे मूळ पीठ गावातील मुख्य मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या टेकडीवर स्थित आहे आणि या टेकडीवरील मंदिरापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. या टेकडीवरून देवी प्रत्यक्ष गावात कशी आली, याबद्दलही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.
अनेक वर्षांपूर्वी या गावामध्ये राहणारी चांभार समाजातील एक मुलगी या देवीची भक्त होती. ती नित्यनेमाने टेकडीवरील मंदिरात पूजेसाठी जात असे. एके दिवशी ती नेहमीप्रमाणे पूजेसाठी टेकडीवर गेली, मात्र पूजेमध्ये मग्न झाल्यामुळे तिला वेळेचे भान राहिले नाही. रात्र झाल्यामुळे तिला त्या रात्री टेकडीवरील मंदिरातच मुक्काम करावा लागला. त्या वेळी तिच्या या अनन्य भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने तिला प्रत्यक्ष दर्शन दिले. देवीने तिला सांगितले की “तुला यापुढे माझ्या दर्शनासाठी येथे येथे येण्याची गरज नाही, मी स्वतः तुझ्यासोबत तुझ्या घरी येते.” परंतु देवीने तिच्यासमोर एक अट ठेवली की “वाटेत जाताना मागे वळून पाहू नकोस, तसे केल्यास मी त्याच ठिकाणी अंतर्धान पावेन.” त्यानुसार ती मुलगी पुढे आणि देवी तिच्या पाठीमागून चालायला लागली. चालता चालता देवी खरोखरच आपल्या मागे येत आहे का, हे पाहण्यासाठी त्या मुलीने मागे वळून पाहिले. त्या वेळी तिला वस्त्र आणि अलंकारांनी शृंगारलेल्या देवीचे दिव्य दर्शन झाले, परंतु अटीनुसार देवी त्याच ठिकाणी जमिनीत गुप्त झाली. देवीचे केवळ मुख जमिनीच्या वर राहिले आणि ती मुलगी देखील त्याच जागेवर गतप्राण झाली. देवी गुप्त झालेल्या त्याच पवित्र जागेवर कालांतराने सध्याचे मुख्य मंदिर उभारण्यात आले.
रेणुका मातेच्या या वास्तव्यामुळे या गावाला पूर्वी ‘राणूमाईचे सावरगाव’ असे नाव पडले होते आणि पुढे त्याचे रूपांतर ‘राणी सावरगाव’ असे झाले. गावातून गोमती नदी वाहते आणि या नदीमुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. नदीच्या पश्चिम भागाला सावरगाव पेठ आणि पूर्व भागाला रेणुकादेवी पेठ असे म्हणतात. मुख्य मंदिर या पूर्व भागातच स्थित आहे.
या मंदिरातील पूजा आणि अर्चा करण्याचे पारंपरिक हक्क गळाकाटू घराण्याकडे आहेत. या घराण्याविषयी उपलब्ध माहितीनुसार, सुमारे दहा पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज गोविंद देशपांडे हे रेणुकामातेचे निस्सीम उपासक होते. अत्यंत गरिबीला कंटाळून त्यांनी देवीचरणी आपली मान कापून अर्पण केली होती, अशी आख्यायिका आहे. त्यांच्या या त्यागामुळे देवीने त्यांच्यावर कृपा केली आणि तेव्हापासून त्यांचे आणि त्यांच्या वंशजांचे आडनाव ‘गळाकाटू’ असे पडले. पुढे देवीच्या अनुग्रहाने त्यांना राणी सावरगाव येथील जहागीरी मिळाली. जहागीरी मिळाल्यानंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आजही या गळाकाटू वंशजांकडे बहमनी राजे, औरंगजेब आणि निजाम यांनी मंदिर आणि जहागीरीविषयीचे हक्क बहाल करणारी जुनी अधिकृत कागदपत्रे उपलब्ध आहेत.
यामध्ये विविध फर्माने, सनदा, महजरनामे आणि इनामे यांचा समावेश आहे, अशी नोंद सरकारी गॅझेटिअरमध्ये करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने या मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन या स्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.
मुख्य मंदिराच्या दक्षिण बाजूला महाद्वार बांधलेले आहे. या महाद्वाराच्या उजव्या बाजूला नीलकंठेश्वर महादेवाचे एक छोटेसे मंदिर आहे. महाद्वाराच्या अगदी समोर हेमांडपंती स्थापत्यशैलीत बांधलेली एक दगडी विहीर आहे. या विहिरीला ‘कल्लोळतीर्थ’ असे नाव आहे आणि काही स्थानिक लोक या विहिरीला ‘देवीचे तीर्थ’ किंवा ‘बारवतीर्थ’ असेही म्हणतात. या तीर्थाच्या जवळ खजुराई देवीची एक प्राचीन मूर्ती आहे. कल्लोळतीर्थाला लागूनच गोविंद महाराज गळाकाटू, किदास महाराज, पालेकर महाराज, शामबुवा महाराज, केरकरबुवा आणि परदेशी बाबा आदी साधुपुरुषांच्या समाध्या आहेत.
मंदिराच्या प्रांगणात समोर दोन दीपमाळा उभ्या आहेत. तसेच मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दीपमाळा आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवीचे वाहन असलेल्या सिंहाची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन द्वारपाल आणि त्याखालील भागात काही मूर्ती कोरलेल्या दिसतात. या त्रिशाखीय प्रवेशद्वारावर कलाकुसर केलेली आहे. द्वारपट्टीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प आहे. या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर यात्रेकरूंच्या विश्रांतीसाठी चारही बाजूंनी ओवऱ्या म्हणजेच दगडी खोल्या बांधलेल्या आहेत. मंदिराच्या समोरील भागात एक होमकुंड आहे. या होमकुंडावर दगडी छत बांधलेले आहे. त्याचा आकार शिखरासारखा दिसतो आणि हे छत हेमांडपंती स्थापत्यशैलीतील चार भक्कम खांबांवर आधारलेले आहे. या होमकुंडाला लागूनच देवीचे वाहन असलेल्या सिंहाची एक मूर्ती आहे.
रेणुका मातेचे हे मुख्य मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या दर्शनी भागावर म्हणजेच बाहेरील रचनेवर मुस्लिम वास्तुशिल्पाचा प्रभाव दिसून येतो. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेश शिल्प कोरलेले आहे.
गर्भगृहाच्या आत रेणुका देवीचा सुमारे चार फूट उंचीचा तांदळा विराजमान आहे. या शेंदूरचर्चित तांदळ्यावर देवीचे डोळे, भुवया, नाक आणि ओठ कोरलेले आहेत. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू आणि नाकात सोन्याची नथ आहे. देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आणि मागील बाजूला चांदीची प्रभावळ आहे. देवीच्या उजव्या बाजूला तिचे पुत्र भगवान परशुराम यांचे स्थान आहे. मुख्य मंदिरामध्ये देवीच्या समोर दोन बाय दोन फूट आकाराचा एकचौकोनी दगड आहे. या ठिकाणी भाविक आपला नवस फेडण्यासाठी बोकडाचा बळी देतात. मंदिर परिसरामध्ये विठ्ठल-रखुमाईसह अन्य काही देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. मंदिराच्या पूर्व दिशेला गणेश मंदिर, उत्तर दिशेला जोगाई मंदिर तर दक्षिण दिशेला दत्त मंदिर आहे. हेमांडपंती स्थापत्यशैलीत बांधलेल्या या दत्त मंदिरातील दत्तात्रयांच्या मूर्तीसमोर एक शिवलिंग स्थापित आहे. दरवर्षी दत्तजयंतीला या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून येथे एक धर्मशाळाही बांधण्यात आली आहे. या जागृत देवतेच्या दर्शनासाठी वर्षभर अनेक भाविक येथे येतात. नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता म्हणून देवीला चांदीचे कान आणि नाक अर्पण करण्याची प्रथा येथे आहे.
मंदिरात वर्षभरात अनेक धार्मिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंतीपासून ते एकादशीपर्यंत या ठिकाणी ‘तेलधुनी जत्रा’ नावाची मोठी जत्रा असते. या काळात देवी दररोज वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होते. जत्रेच्या दहा दिवसांमध्ये रोज रात्री देवीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. या काळात दररोज भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अष्टमीच्या दिवशी मंदिरात विशेष होमहवन केले जाते.
याशिवाय शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते एकादशी या कालावधीतही येथे जत्रा भरते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरात घटस्थापना केली जाते. येथील घटस्थापनेनंतर गावातील घराघरामध्ये घट बसवले जातात. अनेक ग्रामस्थ नऊ दिवस कडक उपवास करतात. रोज सायंकाळी मंदिरात महाआरती केली जाते. अष्टमीच्या दिवशी मंदिरात होमहवन सोहळा पार पडतो. दसऱ्याच्या दिवशी मंदिरातून देवीची पालखी मिरवणूक काढली जाते आणि या पालखीमध्ये भगवान परशुरामाची मूर्ती ठेवली जाते. ही पालखी उचलण्याचा मान गावातील भोई समाजाला आहे. सर्व ग्रामस्थ सीमोल्लंघनासाठी या पालखीसोबत देवीचे मूळ मंदिर असलेल्या टेकडीवर म्हणजेच मूळपीठावर एकत्र जमतात. टेकडीवरील माळावर रावणदहन झाल्यावर ही पालखी गावातील केदारेश्वर मंदिरामध्ये येते. त्यानंतर पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. वाटेत ठिकठिकाणी सुवासिनी या पालखीचे मनाभावाने पूजन करतात. त्यानंतर पालखी गावातील शनिमंदिरात येते आणि तेथून मुख्य मंदिरात परत आल्यावर या मिरवणुकीची सांगता होते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या उत्सवकाळात अहमदपूर येथून थोर संत चुडामणी महाराज यांची पालखी या मंदिरात येते. या पालखीसोबत सुमारे पाच हजार भाविक पायी चालत येतात. या संपूर्ण उत्सवाच्या काळात मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शनासाठी येता येते.