पौराणिक आख्यायिकेनुसार बाणगंगा तलावात स्नान केल्याने आत्म्यास मोक्षप्राप्ती होते, अशी धारणा आहे. वाळकेश्वर येथील या तलाव परिसरात प्राचीन वालुकेश्वर मंदिरापासून काही अंतरावर रामेश्वर महादेवाचे पावणेदोनशे वर्षांहून अधिक जुने मंदिर आहे. रामेश्वर म्हणजे प्रभू श्रीरामाचा ईश्वर होय. हे मंदिर श्रीरामाने स्थापन केलेल्या बाणगंगा तीर्थाच्या जवळ असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाविक आजही येथील वालुकेश्वराच्या दर्शनानंतर या मंदिरात रामेश्वराचे दर्शन घेतात. या मंदिरासमोरच गणेशाचे ऐतिहासिक मंदिर आहे.
मलबार हिल हा मुंबईतील एक सर्वांत ‘मूल्यवान’ निवासी परिसर आहे. येथील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या वाळकेश्वर भागात बाणगंगा तलाव स्थित आहे. हा तलाव अरबी समुद्राच्या अत्यंत जवळ आहे, तरीही याचे पाणी गोड आहे. हा एक भूगर्भशास्त्रीय आविष्कार मानला जातो. ठाणे आणि सध्याच्या मुंबई परिसरातील विविध बेटांवर इसवी सनाच्या नवव्या शतकापासून पुढची चार शतके उत्तर कोकणच्या शिलाहार घराण्याची सत्ता होती. इ.स. १०५० मध्ये अंबरनाथ येथील प्रसिद्ध शिवालय बांधणारे छित्त व मम्मुनी राजे याच शिलाहार घराण्यातील होते.
या शिवभक्त शिलाहार राजांच्या काळात, बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात बाणगंगा तलावाची निर्मिती झाली. या तीर्थाचा उल्लेख ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथातही आहे.
मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब याने इ.स. ११४२ मध्ये मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यांना मुंबई बेटे सर करण्यासाठी पाठवले होते. त्यांनी वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. बखरीतील उल्लेखानुसार, “येसाव्या पासुन जुहु। यावत् वाहिनळे। राजण फार पाहोन वाळुकेश्वरी गेले। बाणगंगा देखिली। हनुमानप्रतिमा लक्षिली। तेथे स्थिर जाले दिवस।। ५.।।” यावरून बाराव्या शतकात येथे बाणगंगा हे एक प्रसिद्ध तीर्थ होते, हे स्पष्ट होते. पुढे सन १७१५ मध्ये या तलाव परिसराचे नूतनीकरण करण्यात आले. यानंतर सुमारे शंभर वर्षांनी, १५ ऑगस्ट १८०९ रोजी ब्रिटिश प्रवासवर्णनकार मारिया ग्रॅहम (लेडी कॅलकॉट) यांनी या भागाला भेट दिली होती. त्या सांगतात, “त्या जुन्या मंदिरापासून (मलबार पॉईंट येथील मूळ वालुकेश्वर मंदिर) साधारण अर्ध्या मैलावर मला एक अत्यंत सुंदर गाव दिसले. तेथे पूर्णपणे ब्राह्मणांचीच वस्ती होती. गावाच्या मध्यभागी एक मोठे तळे आहे. त्याच्या काठावर काही सुंदर झाडे आणि उंच,
पिरॅमिडच्या आकाराचे खांब आहेत. सणासुदीच्या दिवशी या खांबांवर रोषणाई केली जाते. तळ्याभोवती असलेला एक रुंद रस्ता त्याला मंदिरांपासून वेगळा करतो. येथे घरांपेक्षा मंदिरांची संख्याच जास्त आहे. ही मंदिरे प्रामुख्याने ‘महादेव’ या नावाने शिवाला आणि त्यांची पत्नी पार्वतीला समर्पित केलेली आहेत.” (‘जर्नल ऑफ ए शॉर्ट रेसिडन्स इन इंडिया’, दुसरी आवृत्ती, १८१३, पा. १०). या गावातील ब्राह्मण इंग्रजी बोलू आणि लिहू शकतात, अशी नोंदही मारिया ग्रॅहम यांनी केली आहे.
या तलावाच्या निर्मितीचा संबंध प्रभू श्रीरामचंद्रांच्या वनवासकाळाशी जोडलेला आहे. ‘ज्ञानोदय’ या वृत्तपत्रात १८६०-६१ च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या आख्यायिकेनुसार, प्रभू श्रीराम लक्ष्मणासह लंकेकडे जात असताना या ठिकाणी आले होते. येथे त्यांनी वालुकेश्वराचे लिंग स्थापन केले. त्या वेळी श्रीरामांना तहान लागल्यामुळे त्यांनी भूमीत बाण मारून पाणी निर्माण केले. दुसऱ्या एका कथेनुसार, बाणगंगा तलावाची निर्मिती परशुरामाने केली. परशुराम हे भृगुकच्छ म्हणजेच भरुचपासून केरळपर्यंतच्या भूमीचे निर्माते आणि विष्णूचा सहावा अवतार मानले जातात. महेंद्रगिरीवर राहत असताना परशुरामाने स्वतःला थोडासा भूप्रदेश देण्याची विनंती समुद्राला केली होती. मात्र समुद्राने ती अमान्य केल्यामुळे परशुरामाने क्रोधित होऊन बाण मारला आणि उत्तरेकडील कच्छपासून कन्याकुमारीपर्यंतचा समुद्र मागे हटवला. परशुरामाने मारलेल्या १४ बाणांपैकी एक बाण सध्याच्या वाळुकेश्वर टेकडीच्या ठिकाणी पडला. त्यामुळे येथे हे पवित्र तीर्थ निर्माण झाले. श्रीराम किंवा परशुराम यांनी बाण मारून हे तीर्थ निर्माण केल्यामुळे याला बाणगंगा असे म्हणतात. हा आयताकृती तलाव तब्बल पन्नास फूट खोल आहे. त्याच्या चारही बाजूंनी विशिष्ट पद्धतीने दगडी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. तेथे विविध धार्मिक विधी, पितृपक्षाचे कार्य आणि श्राद्ध यासाठी भाविकांची गर्दी होते.
राज्य सरकारने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेल्या या तलावाच्या काठावर हे रामेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिराची स्थापना ब्रिटिश वसाहतकाळात, इ.स. १८४२ मध्ये राघोबा जिवाजी जयकर यांनी केली होती. ते प्रभू ज्ञातीतील सधन गृहस्थ होते. कृष्णराव रघुनाथजी नवलकर अर्थात के. रघुनाथजी यांनी या मंदिराच्या स्थापनेनंतर ५३ वर्षांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यांनी त्या वेळच्या मंदिराचे वर्णन आपल्या ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ (१८९५) या पुस्तकात लिहून ठेवले आहे. त्या वर्णनानुसार, हे मंदिर ताशीव दगडात बांधलेले होते. त्याच्या गर्भगृहात संगमरवरी फरशी होती आणि सभामंडपाची जमीन काळ्या म्हणजेच शहाबादी फरशीची होती. त्या वेळी गर्भगृहाचा आकार १५ बाय १२ फूट आणि सभामंडपाचा आकार २३ बाय १२ फूट होता. सभामंडपात सव्वा दोन फूट उंचीचा दगडी नंदी होता. पुढे डिसेंबर १९३४ मध्ये मंदिराच्या सभामंडपात संगमरवरी फरशी बसवण्यात आली. यानंतर सन २००५ मध्ये ‘नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशन’ने दिलेल्या निधीतून ‘इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई’ या संस्थेने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
एकोणिसाव्या शतकातील मराठा आणि गुजराती स्थापत्यशैलीचे मिश्रण असलेल्या या मंदिराची मूळ संरचना आणि सौंदर्य या जीर्णोद्धारातही कायम राखण्यात आले आहे. उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिराच्या प्रांगणात जुन्या पद्धतीचा दीपस्तंभ आहे. मंदिरास कातीव दगडांच्या पाच पायऱ्या आहेत. सभामंडप जाळीदार भिंतीचा आणि उतरत्या कौलारू छपराचा आहे. मंदिराच्या गर्भगृहावर नागर स्थापत्यशैलीत घडवलेले उरूशृंग पद्धतीचे उंच शिखर आहे. त्यावर चारही बाजूंनी देवकोष्ठके आहेत. शिखरावर चक्राकार आमलक आहे आणि त्यावर कलश बसवला आहे. मंदिराच्या सभामंडपास लाकडी प्रवेशद्वार आहे. आत सागवानी स्तंभ आहेत. गर्भगृहासमोर दगडी चौथऱ्यावर पाषाणाची सुबक नंदीमूर्ती विराजमान आहे. त्यासमोर कूर्मशिल्प आहे. मंदिराचे गर्भगृह दगडी बांधणीचे आहे.
त्याच्या प्रवेशद्वारावरून मंदिराच्या ऐतिहासिकतेचा अंदाज येतो. या द्विशाखीय दगडी प्रवेशद्वाराच्या द्वारस्तंभांच्या खालच्या भागामध्ये सुंदर पुष्पाकृती कोरलेल्या आहेत. द्वारचौकटीस उंच मंडारक आहे. त्यावर मध्यभागी अर्धचंद्रशीला आणि त्याच्या दोन्ही बाजूला कीर्तिमुखे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारास दगडी महिरपी कमान आहे. ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. द्वारचौकटीच्या वर तीन मंदिर शिखरे कोरलेली आहेत. मधल्या शिखरावर कीर्तिमुख आहे, तसेच त्याच्या कलशस्थानी मयूरशिल्प आहे. सर्वांत कडेस दोन देवळ्यांसारखे स्तंभ आहेत आणि त्यांवर बदकशिल्पे कोरलेली आहेत. बाणगंगा तलावात आजही मोठ्या प्रमाणावर बदक आहेत, हे विशेष. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन सुबक अशा दगडी देवळ्या आहेत. गर्भगृहात मध्यभागी भूतलावर रामेश्वराची पिंड प्रतिष्ठापित आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या शिवपिंडीत सुमारे पाऊण फूट उंचीचे शिवलिंग आहे. पिंडीच्या शाळुंकेच्या प्रनाळ (अभिषेकाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेली व्यवस्था) भागानजीक चौथऱ्यावर पार्वतीची मूर्ती विराजमान आहे. काळ्या पाषाणात घडवलेली ही प्राचीन मूर्ती सुमारे दीड फूट उंचीची आहे. येथे पार्वती समपाद आणि चतुर्भुज आहे. मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात कमलपुष्प व त्यावर शिवपिंड आहे, तर डाव्या हातातील पुष्पात गणेशमूर्ती आहे. उर्वरित दोन हात खाली सोडलेले आहेत. त्यातील उजव्या हातात रुद्राक्षमाला आणि डाव्या हातात कमंडलू आहे. मूर्तीच्या कानात लोंबणारी कुंडले, गळ्यात मण्यांचा हार, हातात बांगड्या, पायात तोडे असे अलंकार आहेत. मस्तकी मुकुट धारण केलेला आहे. अशाच प्रकारची, परंतु पितळी मूर्ती येथील वालुकेश्वर मंदिरात शिवपिंडीनजीक आहे. गर्भगृहाच्या मागच्या भिंतीवर कोरलेल्या दगडी देवकोष्ठकात पार्वतीची संगमरवरात कोरलेली व वस्त्रालंकारांनी शृंगारलेली मूर्ती आहे. प्राचीन मंदिरांतील संकेतांनुसार गर्भगृहातील देवकोष्टकाची रचना ही सहसा गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासम असते. येथील देवकोष्टकही त्याच पद्धतीचे आहे.
या मंदिरासमोर, छोट्या रस्त्याच्या पलीकडे, बाणगंगेस जाणाऱ्या पायरी मार्गाच्या लगत गणेशाचे मंदिर स्थित आहे. राघोबा जिवाजी जयकर यांनी सन १८४२ मध्ये रामेश्वर मंदिर बांधले, त्याच वेळी या गणेश मंदिराचीही स्थापना केली. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप उतरत्या कौलारू छपराचा आहे. गर्भगृहावर मुस्लिम स्थापत्यशैलीची छाप असलेले गोल घुमटाकार शिखर आहे. त्यावर आमलक आणि कलश आहे. उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिरास पाच दगडी पायऱ्या आहेत. गर्भगृहात उंच वेदीवर उभारलेल्या सुंदर शिसवी देव्हाऱ्यामध्ये गणेशाची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे.
रामेश्वर मंदिरात सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येते. सोमवार हा शिवशंकराचा वार समजला जातो. या दिवशी येथे अनेक भाविक रामेश्वराच्या दर्शनासाठी येतात. श्रावणी सोमवार, श्रावणी अमावस्या, तसेच महाशिवरात्र या दिवशी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. महाशिवरात्र हा येथील सर्वांत महत्त्वाचा उत्सव आहे. त्या दिवशी मंदिर परिसर रोषणाईने सजवला जातो. येथील गणेश मंदिरात वैशाख शुद्ध त्रयोदशीला मोठा उत्सव साजरा केला जातो. या दोन्ही मंदिरांचा कारभार ‘राघोबा जिवाजी अँड गोपिकाबाई आर. जिवाजी चॅरिटेबल ट्रस्ट’द्वारे पाहिला जातो.