आत्मारामबुवांचे राम मंदिर

जगन्नाथ शंकरशेट मार्ग, ठाकूरद्वार, मुंबई

गिरगाव-ठाकूरद्वार या भागात विविध देवदेवतांची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आत्मारामबुवा यांनी स्थापन केलेले राममंदिर हे यातील एक सुप्रसिद्ध देवालय आहे. किंबहुना याच मंदिरामुळे या भागास ठाकूरद्वार असे नाव पडले. या मंदिरास ‘पाठारे प्रभूंचे ठाकूरद्वार’ असेही म्हणतात. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उभारण्यात आलेल्या या मंदिरामध्ये काळ्या पाषाणातील रामपंचायतन प्रतिष्ठित आहे. या मूर्ती आणि मंदिराच्या बांधकामातील काळ्या पाषाणाचा मुबलक वापर यामुळे हे मंदिर ‘काळाराम मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. येथील ‘गोरा राम मंदिर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झावबांच्या श्रीराम मंदिरानजीक असलेले हे मंदिर गिरगाव-ठाकूरद्वार परिसरातील असंख्य श्रीरामभक्तांचे श्रद्धास्थान आहे.

गिरगाव म्हणजे गिरिग्राम. सन १९०० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’ या इतिहासकार गेर्सन दा कुन्हा यांच्या पुस्तकानुसार, गिरगाव या नावाची उत्पत्ती गिरी आणि ग्राम या दोन शब्दांच्या समुच्चयातून झालेली आहे. हा भाग मलबार टेकडीच्या (मलबारगिरी) पायथ्याशी असल्याने त्यास गिरिग्राम असे म्हणण्यात येऊ लागले व त्याचा अपभ्रंश गिरगाव असा झाला. ‘ग्रेटर बॉम्बे डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या पहिल्या खंडानुसार, गिरगाव हे ब्रिटिश काळातील एक छोटेसे खेडे होते. १७४४ ते १७६४ या काळात मुंबईतील लोकसंख्या ८० ते ८५ हजारांवर गेली. याच काळात ब्रिटिशांनी मुंबई बेटांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना केल्या आणि नव्या गोद्या उभारल्या. १७५४ मध्ये शहराच्या भिंतीच्या आत म्हणजेच कोटाच्या आत नवी घरे बांधण्यास मनाई करण्यात आली, तसेच कोट (Fort) भागातील अनेक घरे हटवण्यात आली. याच काळात गिरगावमधील वस्ती हळूहळू वाढू लागली.

एकोणिसाव्या शतकात या भागाच्या विकासास मोठी चालना मिळाली. १८१९ मध्ये मुंबईच्या गव्हर्नरपदी ‘इश्टूर फाकडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची नियुक्ती झाली. त्यांनी मुंबईत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, करआकारणी आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या. १८१९ मध्ये येथे अपोलो बंदर वाहतुकीस खुले झाले. १८२७ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना झाली. सभा, बैठका, तसेच वाचनालयासाठी येथे टाऊन हॉल उभारण्यात आला. याच सुमारास, गिरगावनजीक ठाकूरद्वार या भागात सन १८२८ मध्ये आत्मारामबुवा यांनी या राममंदिराची स्थापना केली.
आत्मारामबुवा यांच्या अंगी साधूंची लक्षणे असून ते फार दयाळू होते. ते परमार्थ बोधक व सुरस अशी कथा करीत असत. त्यांच्या अंगी मोठा उदारपणा होता आणि त्यांनी आपले आयुष्य सत्कर्मांत घालविले, अशा शब्दांत सन १८६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात गोविंद नारायण माडगावकर यांनी त्यांचा गौरव केला आहे. या पुस्तकानंतर सुमारे वर्षभराने, सन १८६४ मध्ये अनंत वासुदेव मराठे यांनी ‘महंत आत्मारामबुवा रामदासी – मंदिराची व्यवस्था, उत्सव इत्यादींच्या माहितीसह’ या शीर्षकाची पुस्तिका प्रसिद्ध केली. या पुस्तकानुसार, दक्षिण कोकणातील विजयदुर्ग-राजापूर परिसरातील वसिष्ठ गोत्री पळसुले-देसाई उपनावाच्या एका गरीब कुटुंबात आत्मारामबुवा यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मसाल १७४६ असल्याचे सांगण्यात येते. ते समर्थ रामदास स्वामींच्या शिरगाव मठाचे सांप्रदायी होते. लहानपणीच त्यांचा विवाह झाला होता, परंतु संसारात न रमता त्यांनी समर्थ रामदासस्वामींप्रमाणे भरतखंडाचा प्रवास केला. या यात्रेनंतर ते पुन्हा कोकणात आले आणि सावंतवाडीत आपल्या भाच्याच्या घरी त्यांचे वास्तव्य असे. याच काळात एकदा वालावल येथे गेले असताना त्यांना एक स्वप्नदृष्टांत झाला. श्री शिवशंकरांनी त्यांना सांगितले की ‘मी येथील वाण्याच्या घरी त्याच्या पाट्यावर आहे. रोज माझा मिरच्या वाटण्यासाठी उपयोग होतो, त्यामुळे माझ्या अंगाची आग होत असते; तेव्हा तू मला तेथून नेऊन कुठे तरी सुस्थळी ठेव.’ सकाळी उठल्यावर त्यांनी शोध घेतला असता, त्या वाण्याचे घर आणि तेथील तो शिवलिंगरूप वरवंटा त्यांना आढळला. तो घेऊन ते सावंतवाडीस परतले.

त्यावेळी तिसरे खेमसावंत ऊर्फ राजर्षी (कारकीर्द १७५५ ते १८०३) हे सावंतवाडीचे संस्थानिक होते. आत्मारामबुवांना झालेल्या साक्षात्काराचे वृत्त समजल्यावर आणि वालावल येथून आणलेल्या त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना सावंतवाडीत करण्याचा त्यांचा मनोदय कळाल्यावर, त्यांनी शहरातील माठेवाडा या भागातील मोठ्या जागेत सन १७९९ मध्ये ‘आत्मेश्वर’ या नावाने मंदिर उभारले व त्यात या शिवलिंगाची स्थापना केली. त्याचप्रमाणे आत्मारामबुवा यांना काशीमध्ये सापडलेल्या स्फटिकलिंगाची स्थापना ‘प्राणेश्वर’ या नावाने केली.

येथील देवस्थानाची व्यवस्था झाल्यानंतर आत्मारामबुवा १८२८ च्या सुमारास मुंबईत आले. येथे त्यांची भेट भाऊ रसेल यांच्याशी झाली. भाऊ रसेल यांचे मूळ नाव लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य होते. पाठारे प्रभू समाजातील भाऊंचा जन्म १७८८ चा होता आणि ते मूळचे रायगड जिल्ह्यातील कारंजा येथील होते. १८०१ साली वयाच्या १२ व्या वर्षी ते मुंबईत आले. ते इंग्रजी शिकले, तसेच त्यांनी दप्तरी लेखन आणि कारकुनी (Clerical work) कौशल्ये हस्तगत केली (१८०१ मध्ये टंकलेखन अस्तित्वात नव्हते). धाकटा कुलाबा येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘गन कॅरेज फॅक्टरीत’ ते कामास लागले. तेथे ते कॅप्टन रसेल यांच्या हाताखाली मुख्य कारकून म्हणून काम करीत असत. याच रसेल यांनी भाऊंना व्यवसायात उतरण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंनी कंपनी सरकारची बांधकामाची, तसेच जमीन भरणीची कंत्राटे घेतली. आक्रुली, दिंडोशी आणि चिंचवली ही गावे त्यांनीच वसवली. ‘फेरी व्हॉर्फ’ हे मुंबईतील पहिले वेट डॉक त्यांनीच बांधले, जे ‘भाऊचा धक्का’ या नावाने सुप्रसिद्ध आहे. कॅप्टन रसेल यांचे ते विश्वासू असल्याने त्यांना ‘भाऊ रसेल’ असे टोपणनाव पडले. भाऊ हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे भक्त होते. आत्मारामबुवांचे व्यक्तिमत्व व कार्य यामुळे भाऊ प्रभावित झाले होते. त्यांच्या साहाय्याने आत्मारामबुवा यांनी अनेक लोकांकडून देणग्या मिळवून गिरगावमध्ये जागा खरेदी केली आणि तेथे आपल्या आराध्य दैवताचे म्हणजेच प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले. या मंदिरात भाद्रपद शुद्ध द्वादशी, शके १७५०, २० सप्टेंबर १८२८ रोजी श्रीरामपंचायतनाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली.

इतिहासकार गेर्सन दा कुन्हा यांच्यानुसार, आत्मारामबुवांच्या मंदिरामुळे या परिसरास ठाकूरद्वार असे नाव प्राप्त झाले. या मंदिरास ‘आत्मारामबुवांचे ठाकूरद्वार’ असे म्हणत असत, असे दा कुन्हा ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’मध्ये सांगतात. बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांच्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या १८८९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातही, ‘आत्माराम बावा यांचे देवालय आहे त्यास ठाकुरद्वार म्हणतात’, असे नमूद केले आहे. पूर्वी पालवाचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगन्नाथ शंकरशेट मार्गावर हे मंदिर उभे आहे. मराठा स्थापत्यशैलीतील दुमजली हवेलीसारखे हे मंदिर आहे. त्याकाळी त्यास ३० ते ४० हजार रुपये खर्च झाल्याचे गोविंद नारायण माडगावकर यांनी म्हटले आहे. २५ सप्टेंबर १९२८ रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

या वर्दळीच्या रस्त्यावर, उंच इमारतींच्या मध्ये हे मंदिर स्थित आहे. मंदिरासमोर छोटे फरसबंदी केलेले अंगण आहे. प्रशस्त दुमजली सभामंडप आणि त्यात मूळ मंदिर अशी या देवालयाची रचना आहे. सभामंडपास भव्य असे कमानीकार प्रवेशद्वार असून त्याच्या वरच्या भागात उतरते छप्पर असलेली नगारखान्यासारखी रचना आहे. प्रशस्त सभामंडपात चौकोनाकार लाकडी खांब आहेत आणि मंडपातील चौकाच्या वर लाकडी कठडे लावलेला सज्जा आहे. बिलोरी काचेचे झुंबर आणि जुन्या प्रकारच्या काचेच्या हंड्यांमुळे या सभामंडपास ऐतिहासिक बाज प्राप्त झाला आहे. या सभामंडपामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले मूळ मंदिर आहे. उंच जगतीवर (Foundational plinth) स्थित असलेल्या या मंदिरास तीन पायऱ्या आहेत. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथे मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देणारे दगडी प्रवेशद्वार असून त्यास कोरीव काम केलेले स्तंभ आणि वर महिरपी कमान आहे. आतील गर्भगृहास सुंदर व वजनदार असा लाकडी दरवाजा असलेले प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या उंच मूर्ती आहेत. या सभामंडपास घुमटाकार वितान आहे. आत दगडी देवळीमध्ये उंच वेदीवर श्रीरामपंचायतन विराजमान आहे. या मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेल्या असून त्या वस्त्रालंकारांनी सुशोभित आहेत. बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या रामरक्षा स्तोत्रामधील ध्यानश्लोकात श्रीरामाचे वर्णन ‘वामांकारूढ सीता’ असे केले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती अशाच स्वरूपाची आहे. येथे श्रीरामाच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या पुढे वेदीवर देवी भगवतीची मूर्ती तसेच आत्मारामबुवांचा चांदीचा मुखवटा विराजमान आहे. या देवळीच्या वर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे.

येथील सभामंडपामध्ये आत्मारामबुवांचे समाधीस्थान आहे. मंदिराच्या स्थापनेनंतर सात-आठ वर्षांत वृद्धापकाळामुळे आत्मारामबुवांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांनी लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य तथा भाऊ रसेल, वासुदेव विश्वनाथ, काशीनाथ मोरोजी, बाळकृष्ण वासुदेवजी व राघोबा गोविंदजी या तत्कालीन प्रतिष्ठित व्यक्तींचे विश्वस्त मंडळ नेमून त्यांच्याकडे मंदिर सोपवले. यानंतर त्यांनी रामभाऊ पातोडेकर या मुलास दत्तक घेतले आणि त्याला मंदिराचा व्यवस्थापक म्हणून नेमले. अशी व्यवस्था लावल्यानंतर २ सप्टेंबर १८३६ (श्रावण वद्य सप्तमी, शके १७५८) रोजी आत्मारामबुवांनी राममंदिराच्या आवारातच समाधी घेतली. मंदिरात काळ्या पाषाणातील मोठ्या दगडी चौथऱ्यावरील दगडी देवळीमध्ये बुवांची समाधी आहे. येथे बुवांची प्रतिमा, मुखवटा तसेच हनुमानाची मूर्ती विराजमान आहे.

या मंदिराच्या परिसरातच श्री दत्त व स्वामी समर्थ मंदिर आहे. सन १८७० च्या सुमारास श्रीराममंदिराच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेत कृष्णनाथबुवा ऊर्फ बापूबुवा हे मंदिराचे पुजारी राहात असत. त्यांनी पुढे या दत्त मंदिरात स्वामी समर्थांच्या पादुका, विठ्ठल-रखुमाई, देवी भगवती व गणपती यांच्या मूर्ती तसेच शिवलिंगाची स्थापना केली. श्रीराममंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, अक्कलकोट स्वामी समर्थांची पुण्यतिथी (चैत्र कृ.१३), नवरात्र, दत्तमूर्ती स्थापनादिन (ज्येष्ठ कृ. ८), आत्मारामबुवांची पुण्यतिथी (श्रावण कृ. ७), गोकुळाष्टमी, रामपंचायतन स्थापनादिन (भाद्रपद शु. १२), दत्तजयंती तसेच दासनवमी हे उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात.

रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान हरिकीर्तनाने सुरू होतो. दुपारी १२.३९ वाजता रामजन्माचा विशेष क्षण साजरा केला जातो. संध्याकाळी ५ ते १० या वेळेत भक्तांना बालस्वरूप श्रीरामांचे दर्शन मिळते आणि प्रसाद वितरित केला जातो.

या सोहळ्यास भक्तांची मोठी मांदियाळी जमते. उत्सवांच्या वेळी कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र शुद्ध एकादशीला श्रींची पालखी काढली जाते, जी विश्वस्त व भक्तांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी नेली जाते.

मंदिरात दर चातुर्मासात तसेच अधिक मासात पुराण पठण व कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते. भाविक सकाळी ७ ते १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत देवदर्शन घेऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२०१०४५८८

आत्मारामबुवा का राम मंदिर

जगन्नाथ शंकरशेत मार्ग, ठाकुरद्वार, मुंबई

Back To Home