अभय चरणारविंद (ए.सी.) भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांनी जगभरात कृष्णमंत्र आणि ‘कृष्णचेतना’चा प्रसार करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय श्रीकृष्णभावनामृत संघ’ (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस – इस्कॉन) या संस्थेतर्फे उभारण्यात आलेले राधा रासबिहारी मंदिर जुहू येथे स्थित आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करणारे हे मंदिर मुंबईच्या धार्मिक व सांस्कृतिक नकाशावरील एक महत्त्वाचे केंद्र आहे. ‘इस्कॉन जुहू मंदिर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील कृष्णजन्माष्टमीच्या सोहळ्यात सुमारे सात ते आठ लाख भाविक सहभागी होतात.
ब्रह्मज्ञानापेक्षा भगवद्भक्ती श्रेष्ठ आहे. सर्वांना सहजसुलभ असलेल्या भक्तीमार्गाने परमेश्वराची प्राप्ती करता येईल, असे सांगून हरिनामाचे माहात्म्य प्रस्थापित करणारे बंगालमधील लोकोत्तर वैष्णव संत म्हणजे चैतन्य महाप्रभू होय. त्यांनी सांगितलेल्या गौडीय वैष्णव तत्त्वविचारांवर चालणाऱ्या आणि जगभरात कृष्णभक्तीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या इस्कॉनची स्थापना १९६६ मध्ये न्यूयॉर्क शहरात ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांनी केली. ‘श्रील प्रभूपाद’ या नावानेही ते ओळखले जातात. स्वामींचा जन्म १ सप्टेंबर १८८६ रोजी कोलकात्यात झाला.
त्यांचे मूळ नाव अभयचरण डे होते. त्यांचे वडील गौरमोहन डे आणि आई रजनी हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्याकडून स्वामींवर लहानपणापासूनच कृष्णभक्तीचे संस्कार झाले. कोलकात्यातील ‘स्कॉटिश चर्च कॉलेज’मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. इंग्रजी, संस्कृत आणि विविध विषयांवर त्यांनी तेथे प्रभुत्व मिळवले. १९२२ मध्ये प्रभूपाद यांची भेट ‘भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर’ या गौडीय वैष्णव परंपरेतील संतांशी झाली. १९३३ मध्ये प्रभूपाद यांनी भक्तिसिद्धांत सरस्वती यांच्याकडून औपचारिक दीक्षा घेतली आणि ते वैष्णव परंपरेचे प्रचारक बनले. आपला संसार चालवण्यासाठी काही काळ त्यांनी औषधनिर्मितीचा व्यवसाय केला; परंतु १९५० नंतर त्यांनी सांसारिक जीवनातून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ कृष्णभक्ती तसेच आध्यात्मिक प्रचाराला वाहून घेतले. १९५९ मध्ये त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. या आश्रमात त्यांनी ‘अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी’ हे नाव धारण केले.
प्रभुपाद स्वामी यांनी श्रीकृष्णाची शिकवण इंग्रजी भाषेत न्यावी आणि तिचे धडे पाश्चात्त्य जगतात पोहोचवावेत, अशी त्यांचे गुरू भक्तिसिद्धांत सरस्वती यांची इच्छा होती.
त्यानुसार स्वामी प्रभुपाद यांनी ‘भगवद्गीता ॲज इट इज’ हा भाष्यग्रंथ लिहिला. ‘श्रीमद्भागवत’ आणि इतर वैष्णव ग्रंथांचे भाषांतरही त्यांनी केले. १९६५ मध्ये, वयाच्या ६९ व्या वर्षी, अनेक अडचणींवर तसेच प्रवासादरम्यान दोनदा आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांवर मात करून स्वामी प्रभुपाद अमेरिकेला गेले. त्यांच्या संकल्पनेतून तेथे इस्कॉनची स्थापना झाली. ‘भगवद्गीता’ आणि ‘श्रीमद्भागवत’ या ग्रंथांमधील शिकवण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, जातिभेद विसरून समाजाला एका सूत्रात बांधणे आणि साधे जीवन व उच्च विचारसरणीचा प्रसार करणे ही या संप्रदायाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी स्वामी प्रभुपाद यांनी ७० हून अधिक ग्रंथ लिहिले. त्यात ‘भगवद्गीता’, ‘श्रीमद्भागवत’ यांवरील भाष्य आणि ‘चैतन्य चरितामृत’ या प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. १४ नोव्हेंबर १९७७ रोजी वृंदावनातील ‘कृष्ण बलराम’ मंदिरात त्यांनी देह ठेवला. आज जगभरात या संप्रदायाची शेकडो मंदिरे, कृषी केंद्रे आणि शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. यातील जुहू येथील इस्कॉन मंदिर हे देशातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि प्रभावशाली इस्कॉन केंद्रांपैकी एक मानले जाते.
या मंदिराचा इतिहास इस्कॉनच्या विस्तारकाळाशी थेट निगडित आहे. मुंबईत इस्कॉनचे भव्य केंद्र उभारण्याची कल्पना खुद्द ‘श्रील प्रभुपाद’ यांची होती. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला ते आपल्या परदेशी शिष्यांसह मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी जुहू येथील हा विस्तीर्ण भूखंड मंदिरासाठी निवडला. त्या वेळी हा परिसर अविकसित होता व येथे दलदल होती. १९७२ मध्ये श्रील प्रभुपाद यांनी या जमिनीचा ताबा घेतला; परंतु ती सर्व प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची ठरली. जमीनव्यवहार, मालकीहक्क, आर्थिक अडचणी आणि कायदेशीर संघर्ष यांमधून हा प्रकल्प पुढे सरकत राहिला. जमीनमालकी हक्कावरून मोठे न्यायालयीन खटले उभे राहिले. सर्व कायदेशीर आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करून, येथे ३१ डिसेंबर १९७५ रोजी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. पुढच्या दोन वर्षांच्या कालावधीत येथे भव्य अशी मंदिरवास्तू उभारण्यात आली आणि १४ जानेवारी १९७८ रोजी, मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर, या राधा रासबिहारी मंदिराचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
जुहूच्या मुख्य रस्त्यावरून इस्कॉन मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात प्रवेश करतानाच,
या वास्तूच्या भव्यतेची आणि स्थापत्यसौंदर्याची अनुभूती येते. या संपूर्ण मंदिरसंकुलाची रचना प्राचीन मंदिर स्थापत्यशास्त्र, त्यातही खासकरून नागरशैली आणि आधुनिक नागरी गरजा यांचा मेळ घालून केलेली आहे. मंदिरास महिरपी कमानीचे प्रवेशद्वार आहे. उंच आवारभिंतीच्या आत मंदिराचे प्रशस्त प्रांगण आहे. त्यात समोरच पांढऱ्याशुभ्र संगमरवराने मढवलेला मंदिराचा भव्य प्रासाद उभा आहे. मंदिराच्या बांधकामात राजस्थानमधून आणलेला उच्च दर्जाचा मकराणा संगमरवर वापरण्यात आला आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात वैष्णव परंपरेतील अलंकारिक शैलीचे प्रतिबिंब असणाऱ्या विविध कमानी, चौकटी आणि स्तंभ आहेत. या मंदिर प्रासादाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे येथील भव्य शिखरे. मंदिरावर उत्तरभारतीय शैलीतील उंच, टोकदार आणि प्रमाणबद्ध शिखरे आहेत. बहुपदरी स्वरूपात उभारलेली ही शिखरे वरच्या दिशेने निमुळती होत जातात. शिखरावर शीर्षस्थानी कलश आणि ध्वजदंड आहेत. शिखरांच्या विविध स्तरांवर बारीक कोरीव नक्षीकाम केलेले आहे. मंदिरभवनाच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर राजस्थानी आणि मुघल स्थापत्यशैलीचा प्रभाव असणाऱ्या जाळीदार कमानी आणि झरोके आहेत.
मंदिरास विस्तीर्ण असा सभामंडप आहे. एकाच वेळी शेकडो लोक येथे उभे राहू शकतात. सभामंडपातील स्तंभ आणि फरसबंदी पूर्णपणे संगमरवरी आहे. सभामंडपाचे छत उंच आहे आणि त्यावर भव्य झुंबर टांगलेले आहे. सभामंडपातील विविध भित्तिचित्रांतून श्रीकृष्णाच्या चरित्रातील विविध प्रसंग, रासलीला, त्याचप्रमाणे चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनातील प्रसंग उभे केले आहेत.
इस्कॉनच्या परंपरेनुसार सभामंडपात गर्भगृहासमोर सुंदरशा संगमरवरी मखरामध्ये उंच वेदीवर ए.सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती प्रतिष्ठित केलेली आहे. गर्भगृहाच्या बाह्य संगमरवरी भिंतीवरही बारीक कोरीव नक्षीकाम आहे. येथे एकमेकांशेजारी तीन गर्भगृहे आहेत. गर्भगृहांना मोठे दरवाजे आहेत. सागवानी लाकडावर चांदीचे आणि सोन्याचे नक्षीकाम करून ते बनवले आहेत. या प्रवेशद्वारांच्या चौकटीच्या वरच्या बाजूस मयूरशिल्प आणि त्याभोवती सुंदर नक्षी अशी रचना आहे. मधल्या गर्भगृहात उंच वेदीवरील सोन्याचा मुलामा दिलेल्या भव्य लाकडी देव्हाऱ्यामध्ये राधा आणि रासबिहारी यांच्या मूर्ती विराजमान आहेत. पांढऱ्या संगमरवरात घडवलेल्या या सुंदर मूर्ती वस्त्रालंकारांनी शृंगारलेल्या आहेत.
या मूर्तींचा शृंगार दररोज बदलत असतो. त्याचप्रमाणे येथे ऋतूनुसार सजावट व पुष्परचना केली जाते. मुख्य गर्भगृहाच्या डाव्या बाजूच्या गर्भगृहात ‘गौरांग-निताई’ (चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू) यांच्या अष्टधातूच्या मूर्ती आहेत. दोन्ही हात उंचावलेल्या मुद्रेतील या प्रतिमा गौडीय वैष्णव परंपरेतील नामसंकीर्तनाच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक मानल्या जातात. उजवीकडील गर्भगृहामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. मंदिरातील या सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना प्रभुपाद यांनी स्वतः केली होती.
या मंदिरात सकाळी ४.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि पुन्हा सायंकाळी सुमारे ४.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. दैनिक पूजाविधींचे वेळापत्रकही अत्यंत नियोजित आहे. येथे पहाटे ४.३० वाजता मंगल आरती होते. यानंतर सकाळी ७.१५ वाजता शृंगार दर्शन आरती, दुपारी १२.३० वाजता राजभोग आरती, संध्याकाळी ७ वाजता संध्या आरती/गौर आरती आणि रात्री ८.३० वाजता शयन आरती होते. या आरती सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी होतात. जन्माष्टमी हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. या सोहळ्यात मध्यरात्रीच्या जन्मोत्सवापासून महाअभिषेक, कीर्तन आणि विशेष दर्शन होते. जन्माष्टमीच्या दिवशी आणि त्यानंतरच्या नंदोत्सवाच्या सोहळ्यात मिळून सुमारे सात ते आठ लाख भाविक सहभागी होतात, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे या सर्व गर्दीचे नियंत्रण, येथील सुरक्षा आणि अन्नवितरण यांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तर केला जातोच, परंतु शेकडो तरुण-तरुणी येथे स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करतात. रामनवमी, जगन्नाथ रथयात्रा, राधाष्टमी, गोवर्धनपूजा, गौरपूर्णिमा आणि नरसिंह जयंती हे सणही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. मंदिरातील रथयात्रा सोहळा सुप्रसिद्ध आहे. झूलन यात्रेदरम्यान राधा-कृष्णांच्या उत्सवमूर्तींना सुशोभित झोक्यावर विराजमान करण्याची परंपरा येथे पाळली जाते. राधाष्टमी आणि जन्माष्टमीच्या सोहळ्यांमध्ये विशेष पुष्पसजावट, अभिषेक आणि सामूहिक कीर्तनाचे आयोजन केले जाते. मंदिराच्या आवारात ‘गोविंदराज’ हे आधुनिक शाकाहारी उपाहारगृह आहे. याशिवाय, संप्रदायामार्फत दररोज हजारो गरिबांना विनामूल्य भोजन दिले जाते.