परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात असलेल्या पोखर्णी येथील प्राचीन मंदिरात वास करणारे नृसिंह हे शिवशंकरांचे रूप मानले जातात. (विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असलेले नृसिंह स्थानिक आख्यायिकेनुसार शिवशंकराचे रूप असल्याची मान्यता आहे.) गोलासुराचा वध केल्यानंतर त्यांनी इंद्राणी नदीच्या पूर्व तीरावर वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे. हे मंदिर मराठवाड्यातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. येथील नृसिंह अतिशय जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. या पुरातन मंदिरातील नृसिंहांच्या ऐश्वर्याचा उपभोग आपण घेऊ शकत नाही, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या भावनेतून गावात एकही दुमजली घर बांधले जात नाही. तसेच येथील लोक छत्री किंवा लाकडी पलंगाचा वापर करत नाहीत. राज्य सरकारने या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.
या मंदिराशी संबंधित अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. प्राचीन काळी प्रभावती नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी शहरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर रामपुरी हे गाव आहे. या गावात हनुमानाची बारा मंदिरे असल्यामुळे या गावाला ‘बारा हनुमंतांची रामपुरी’ असे म्हणतात. एका आख्यायिकेनुसार, रामपुरी गावातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावरील पापदंडेश्वर क्षेत्रात प्राचीन काळी अनेक ऋषी-मुनींचे वास्तव्य होते. तेथे च्यवन ऋषींनी आपला आश्रम स्थापन केला होता. काही कारणांमुळे त्यांच्या पत्नीच्या पोटी गोलाकार शरीराचे, दैत्यासारखे मूल जन्माला आले. गोल आकारामुळे या बालकाचे नाव गोलासुर ठेवण्यात आले. गोलासुराने ब्रह्मदेवाची खडतर तपस्या करून अनेक वर मिळवले. या वरांच्या प्रभावामुळे उन्मत्त होऊन गोलासुर सर्वांना त्रास देऊ लागला. त्याला कंटाळून सर्व देव आणि मानवांनी शिवशंकरांना साकडे घातले.
गोलासुराचा वध करण्यासाठी शिवशंकरांनी नृसिंहाचे रूप धारण केले. त्यांनी इंद्राणी, वैष्णवी आणि नारसिंही अशा तीन शक्ती किंवा मातृका उत्पन्न केल्या. नृसिंह आणि गोलासुर यांच्यात अनेक वर्षे युद्ध चालले. अखेर या युद्धात गोलासुराचा संहार करून नृसिंहांनी पृथ्वीला संकटातून मुक्त केले. रामपुरी गावाजवळ इंद्राणीचा माळ नावाचा एक प्रसिद्ध भाग आहे. हा माळ म्हणजेच युद्धात मारला गेलेला गोलासुर आहे, असे मानले जाते. या माळावरून उगम पावणाऱ्या नदीचे नाव इंद्राणी किंवा इंदाडी असे आहे. या ठिकाणी इंद्राणी देवीचे मंदिर देखील आहे. गोलासुराचा वध केल्यानंतर नृसिंहांनी इंद्राणी, वैष्णवी आणि नारसिंही यांच्यासह या माळावर काही काळ वास्तव्य केले. कालांतराने या माळावर राहणे नकोसे वाटल्यामुळे नृसिंहांनी शिवशंकरांची प्रार्थना केली. तेव्हा शिवशंकरांनी त्यांना इंद्राणी नदीच्या पूर्व तीरावर राहण्यास सांगितले.
त्यानुसार नृसिंह इंद्राणी नदीच्या पूर्व तीरावरील सध्याच्या ठिकाणी आले. त्यांनी येथे एक पुष्करणी म्हणजेच विहीर खोदली. त्यानंतर त्यात सर्व तीर्थांचे पाणी आणून टाकले. त्यानंतर ते या पुष्करणीजवळ राहू लागले. शिवशंकर आणि नृसिंह हे एकच स्वरूप असल्याने कालांतराने महादेवही येथे आले. या पुष्करणीमुळेच या गावाला नंतर पोखर्णी असे नाव पडले.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, येथील नृसिंहांचे पूर्वी रामपुरी येथे वास्तव्य होते. तेथून या ठिकाणी आलेल्या नृसिंहांनी शिवशंकरांकडे जागेची मागणी केली. महादेवाने त्यांना जागा दिली. “येथे येणाऱ्या लोकांना प्रथम माझे दर्शन झाले पाहिजे” अशी अट त्यांनी घातली. या अटीमुळेच या मंदिरातील नृसिंहांचे गर्भगृह मुख्य भागापासून थोड्या बाजूला बांधण्यात आले आहे. मंदिरात वास करणारे नृसिंह साळापुरीवरून येथे आले, असेही सांगितले जाते. या ठिकाणी पूर्वी प्राचीन शिवालय होते. नृसिंहांनी या गावातील पाटलाला स्वप्नात दृष्टांत दिला. त्यांनी या शिवालयात दोन खण जागा देण्यास सांगितले, अशीही एक कथा प्रसिद्ध आहे.
गावातील लोकांची येथील नृसिंहांवर अपार श्रद्धा आहे. नृसिंहांच्या कृपेमुळेच गावात संपन्नता आली आहे, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. हे मंदिर दुमजली आहे.
त्यामुळे गावात कोणीही मंदिरापेक्षा उंच किंवा दुमजली घर बांधत नाही. तसे केल्यास संबंधित व्यक्तीला वाईट अनुभवांनासामोरे जावे लागते, असे मानले जाते. या मंदिराच्या बांधकामात भाजलेल्या विटांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे गावात घरे बांधताना भाजलेल्या विटांचा वापर केला जात नाही. त्याऐवजी लोक दगडांचा किंवा सिमेंटच्या विटांचा वापर करतात. नृसिंहांचा विश्राम करण्याचा पलंग लाकडी आहे. म्हणूनच गावातील एकाही घरात लाकडी पलंग वापरला जात नाही. नृसिंहांच्या मूर्तीवर छत्र आहे. त्यामुळे गावात कोणतीही व्यक्ती स्वतःसाठी छत्री विकत घेत नाही. केवळ पाहुण्यांनी किंवा गावाबाहेरील व्यक्तीने भेट दिलेली छत्रीच ग्रामस्थांना वापरता येते. नृसिंहांना लाभलेल्या ऐश्वर्याचा उपभोग आपण घेणे योग्य नाही. या भावनेतून गावात पूर्वीपासून ही अनोखी परंपरा पाळली जाते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना पूर्वी गावातील पंचायतीकडून दंड केला जात असे.
गावातील मुख्य कमानीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या समोर एक मोठे प्रांगण आहे. या प्रांगणात पूजासाहित्य आणि प्रसादाची विक्री करणारी विविध दुकाने आहेत. प्रांगणाच्या मध्यभागातून मंदिरापर्यंत येण्यासाठी छताची मार्गिका बांधण्यात आलेली आहे. मंदिराच्या दुमजली वास्तूला एक भव्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची रंगीत चित्रे आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी गणेशाचे चित्र आहे. अगदी वरच्या बाजूस दोन्ही बाजूंना सिंहांची शिल्पे आहेत. तसेच मध्यभागी नृसिंहांची मूर्ती विराजमान आहे.
या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिरासमोरील प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणाच्या चारही बाजूंनी दुमजली ओवऱ्या बांधलेल्या आहेत. समोरच लाकडी स्तंभांवर उभारलेला एक अर्धखुला मंडप आहे. पत्र्याचे छत असलेल्या या मंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. समोरील भिंतीवर डाव्या बाजूला लक्ष्मीचे चित्र रंगवले आहे. त्याच्या शेजारीच हिरण्यकशिपूचा वध करतानाची नृसिंहांची प्रतिमा दाखवली आहे. उजवीकडील भिंतीवर श्रीविष्णू आणि महादेवांची चित्रे आहेत. येथून पुढे मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या समोर असलेल्या गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग प्रतिष्ठित आहे. या शिवलिंगावर मुखवटा बसवलेला आहे. या पिंडीच्या मागील बाजूस गणेशाची तीन फूट उंचीची संगमरवरी मूर्ती आहे.
महादेवाच्या गर्भगृहातून बाहेर पडल्यावर डावीकडे नृसिंहांचे स्वतंत्र गर्भगृह आहे. या गर्भगृहात एका छोट्या चौकटीतून प्रवेश करावा लागतो. ही प्रवेशचौकट अतिशय अरुंद आणि कमी उंचीची आहे. एक माणूस वाकूनच आत जाऊ शकेल, अशी ही रचना आहे. मात्र कितीही जाड व्यक्ती या चौकटीतून सहज आत जाऊ शकते, असे सांगितले जाते. या गर्भगृहात एका वेळी केवळ तीन ते चार व्यक्तीच उभ्या राहू शकतात. पुरुष भाविकांना अंगावरील शर्ट काढूनच या गर्भगृहात प्रवेश करावा लागतो.
गर्भगृहात उजव्या हाताला नृसिंहांची वालुका पाषाणात घडवलेली उग्र रूपातील मूर्ती विराजमान आहे. त्यांच्या मांडीवर दैत्य हिरण्यकशिपू आहे. या मूर्तीवर सुवर्णलेपन केलेला मुखवटा बसवलेला आहे. मूर्तीच्या मागे सोन्याचा मुलामा दिलेली सुंदर प्रभावळ आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नृसिंहांचा शयनकक्ष आहे. या ठिकाणी नृसिंह देवी लक्ष्मीसह विश्राम करतात, अशी श्रद्धा आहे.
या मंदिराच्या मागील बाजूस एक लहानसे गणेश मंदिर आहे. मंदिर परिसरात काही प्राचीन ऐतिहासिक मूर्ती आहेत. मंदिराच्या मागे हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेली एक प्राचीन पुष्करणी म्हणजेच बारव आहे. बाराव्या शतकात बांधलेल्या या पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. उन्हाळ्यातही या पुष्करणीतील पाणी कधीही आटत नाही, असे सांगितले जाते. मंदिर परिसरात एक सुंदर बगीचा तयार केलेला आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी येथे भक्तनिवासाची सोय आहे.
येथील जागृत नृसिंहांच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. येथील नृसिंह हे मराठवाड्यातील चिद्रावार, निलावार, वडखेळकर, पार्डीकर, पाचे, रुद्रवार, मोरे तसेच अनेक गोत्री कुलकर्णी, देशपांडे, डुब्बेवार आणि जुज्जलवार अशा कुटुंबांचे कुलदैवत आहे. मंदिरात दररोज सकाळी अभिषेक केला जातो. दर शनिवारी आणि एकादशीला भजनाचे आयोजन केले जाते. वैशाख महिन्यातील नृसिंह जयंतीच्या दिवशी या परिसराला मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या उत्सवसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून हजारो भाविक येतात. या दिवशी पहाटे महापूजा झाल्यानंतर मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक विधी पार पडतात. सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. यावेळी ‘नरहरि शामराज की जय’ असा जयघोष केला जातो. तसेच गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. या प्रसंगी गावातून देवाच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था नृसिंह संस्थानातर्फे केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी देखील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नृसिंहांच्या पालखीची संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा होते. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. पौष महिन्यात येथे विशेष पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.