मुदगलेश्वर मंदिर

मुदगल, ता. पाथरी, जि. परभणी

गणेशाचे अंशावतार असलेल्या मुदगल ऋषींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या मुदगल येथे असलेले मुदगलेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले, गोदावरी पात्रातील हे तीर्थक्षेत्र पूर्वी ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जात असे. पुत्रप्राप्तीसाठी येथे पार्वतीसह आलेल्या शिवशंकरांना मुदगल ऋषींच्या अनुग्रहामुळे गणेशप्राप्ती झाल्याची पौराणिक कथा आहे. मुदगल ऋषींनी येथेच ‘गणेशपुराण’ या ग्रंथाची रचना केली, अशी मान्यता आहे. गोदावरी पात्राला लागूनच हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मुदगलेश्वर मंदिराप्रमाणेच, नदीपात्रात मुदगल ऋषींनी प्रतिष्ठापना केलेले मुदगल गणेश तसेच नृसिंह मंदिरांचेही येथे दर्शन होते. या क्षेत्राला उत्तर काशीचे महत्त्व आहे. येथे काशी आणि त्र्यंबकेश्वरप्रमाणेच अनेक धार्मिक विधी करण्यासाठी असंख्य लोक येतात.

मुदगल ऋषींच्या अवताराची कथा ‘मारीच पुराणा’त आढळते. अंगिरस ऋषींना एके दिवशी वाटेत मुदगल स्वरूपातील बालक आढळले. ते त्या मुलाला आपल्या आश्रमात घेऊन आले. त्यांची पत्नी श्रुती हिने या बालकाचे पुत्रवत पालन केले. एकदा गणेशाने आकाशवाणीद्वारे अंगिरस ऋषींना असे सांगितले की “माझा अंश असलेल्या श्रेष्ठ गणेशभक्ताने तुझ्या घरी अवतार घेतला आहे. तू त्याचे नाव मुदगल असे ठेव.” गणेशाच्या आज्ञेनुसार अंगिरस ऋषींनी या बालकाचे यथाविधी व्रतबंधादी संस्कारपूर्वक संगोपन केले. पुढे मुदगल ऋषींचा विवाह अत्री ऋषी आणि सती अनुसूया यांची कन्या तसेच दत्तात्रेयांची बहीण भागीरथी हिच्याशी झाला. त्यानंतर ईश्वरप्राप्तीसाठी मुदगल ऋषींनी तप करण्यास सुरुवात केली. शेतातील धान्याची कापणी पूर्ण झाल्यानंतर जमिनीवर पडलेले धान्यकण वेचून घेत ते तपाचरण काळात जीवितधारणा करत असत. पंधरा दिवसांनंतर द्वादशीला पारणे करताना एका द्रोणात मावेल, एवढेच अन्न एकत्र करून उपोषणयुक्त अवस्थेत त्या अन्नसामग्रीने पंच महायज्ञ संपादित करत असत. या तपाचरणात विघ्न आणण्यासाठी इंद्राने दुर्वास ऋषींना मुदगल ऋषींच्या निवासस्थानी पाठवले. मुदगल ऋषींनी दुर्वास ऋषींना तीन महिने या तपात विघ्न आणू दिले नाही. त्यामुळे संतुष्ट होऊन दुर्वास ऋषी स्वतःच्या निवासस्थानी परत गेले. नंतर त्यांना स्वर्गात नेण्यासाठी एक विमान आले. मात्र, तेथे चित्तस्वास्थ्य मिळत नाही; तसेच तेथे काही प्रमाणात भेदवृत्तीही असल्याचे सांगून मुदगल ऋषींनी स्वर्गात जाण्याबद्दल अनिच्छा दर्शवली. त्यामुळे त्यांना न घेताच विमान परत गेले. काही दिवसांनी मुदगल ऋषी व त्यांची पत्नी भागीरथी यांना झालेल्या पुत्राचे नाव ‘मौदगल्य’ असे ठेवण्यात आले. पुढे पत्नी व पुत्राला मुदगल येथील आश्रमात ठेवून मुदगल ऋषी तप करण्यासाठी निघून गेले. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेल्या गणेशाने त्यांना दर्शन दिले. “भक्तिमार्गाचा विकास करण्यासाठी मी तुझी नियुक्ती करत आहे,” असे सांगून श्री गणेशाने त्यांना ‘मुदगल पुराणा’ची रचना करण्यास सांगितले. हेच पुराण नंतर ‘गणेशपुराण’ म्हणून प्रसिद्ध झाले. कालांतराने मुदगल ऋषींनी दक्ष प्रजापतीला या पुराणाचे कथन केले. ते ऐकण्यासाठी स्वतः गणेश येथे येत. त्यानंतर गणेशाने येथेच वास्तव्य केले. येथे ‘गणेशपुराणा’ची रचना केली असल्याच्या मान्यतेमुळे या ठिकाणाला मोठे महत्त्व आहे. मुदगल हे गाव गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले आहे. या गावाचे मूळ नाव ‘वडगाव’ असे होते. मुदगल ऋषींच्या वास्तव्याने या गावाला ‘मुदगल’ हे नाव पडले असावे, असे काही जणांचे म्हणणे आहे. पुत्रप्राप्तीसाठी या ठिकाणाचे विशेष महत्त्व आहे. महादेवही पुत्रप्राप्तीसाठी पार्वतीसह येथे आले होते. मुदगल ऋषींच्या अनुग्रहाने त्यांना गणेशाची प्राप्ती झाली, असेही म्हणतात. येथे ‘गणेश तीर्थ’, ‘तारा तीर्थ’, ‘पत्र तीर्थ’ व ‘मुदगल तीर्थ’ या नावांची तीर्थे आहेत. लंकेत रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला जात असताना प्रभू रामचंद्र मुद्दाम मुदगलक्षेत्री आले होते. येथील गणेश तीर्थामध्ये त्यांनी रावणाला तिलांजली दिली. “रावणाला चिरशांती लाभू दे,” अशी प्रार्थनाही त्यांनी केली. श्रीकृष्णानेही येथे भेट दिली होती, असे सांगितले जाते. गोदावरी नदीच्या पात्रात नृसिंह मंदिर आणि मुदगल गणेश मंदिर आहे. नदीपात्रातील मंदिरात पाण्यामुळे आठ ते दहा महिने जाता येत नव्हते. त्यामुळे शंभू तेली नावाच्या शिवभक्ताने शके १७७६ मध्ये (सन १८५४ मध्ये) येथे पात्रानजीकच्या उंचवट्यावर नवीन मंदिर बांधले. त्याला ‘मुदगलेश्वर मंदिर’ असे म्हणतात. शंभू तेली हे नदीपात्रात असलेल्या नृसिंह मंदिरात तप करत असत. एकदा ते ध्यानस्थ बसलेले असताना नदीला पूर आला. तीन दिवस हा पूर टिकला. शंभू तेली यांचे या पुरामुळे निधन झाले, असे लोकांना वाटले. मात्र, पूर ओसरल्यावर ते जिवंत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले, असेही सांगण्यात येते. मुदगलेश्वर मंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची चित्रे रंगवण्यात आली आहेत. लाकडी दरवाजातून आत आल्यावर छोटे प्रांगण लागते. नदीपात्राच्या बाजूने दगडी भिंत बांधण्यात आली आहे. प्रांगणातून काही पावले पुढे आल्यावर मंदिराच्या समोरील भिंतीनजीक नंदीची मूर्ती आहे. काही पावलांवर भिंतीनजीक असलेल्या चौथऱ्यावर नागेश्वर आणि बुद्धेश्वर नावांची शिवलिंगे तसेच महारुद्र हनुमानाची मूर्ती आहे. समोरच असलेल्या मंदिराची संरचना आठ उंच लाकडी स्तंभ असलेला सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल शिल्पे आहेत. तसेच, द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी शिवपिंड आहे. मंदिर परिसरात ऋषिकेशानंद महाराज यांची समाधी आहे.

नदीपात्रात असलेले मुदगल गणेश आणि नृसिंह मंदिरात येण्यासाठी काही पायऱ्या उतराव्या लागतात. नदीपात्रात सुरुवातीला मुदगल ऋषींनी प्रतिष्ठापना केलेल्या मुदगल गणेश मंदिराचे दर्शन होते. हे मंदिरही हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. हे मंदिर जिंतूरचे वतनदार कोठेकर यांच्या घराण्याने बांधले. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात भिंतीमध्ये कोरलेल्या देव्हाऱ्यात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहेत. डावीकडील देवकोष्टकांमध्ये विष्णूनारायण, सूर्यनारायण यांच्या मूर्ती आहेत. उजवीकडील पहिल्या देवकोष्टकात असलेल्या शिवशंकरांच्या मूर्तीच्या जटेमध्ये गंगा आहे. या मूर्तीच्या बाजूला पार्वती आहे. जवळच असलेल्या अन्य देवकोष्टकात महालक्ष्मीचे स्थान आहे.

या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर समोरच काही पावलांवर नृसिंह मंदिर आहे. हे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिर अकराशे वर्षांहूनही प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. या पूर्वाभिमुख दगडी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला एक शिलालेख आहे. अन्य शिवमंदिरांमध्ये गर्भगृहासमोर शिवशंकरांचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती आढळते. मात्र, येथे मंदिराच्या प्रवेशद्वारातच नंदी विराजमान आहे. सभामंडपातील स्तंभ दगडी स्तंभपादावर उभे आहेत. त्यावर विविध आकार कोरलेले आहेत. सभामंडपात गर्भगृहासमोरील जागेत कासवमूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी मध्यभागी कीर्तिमुख कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्या मध्यभागी असलेल्या ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. येथे नृसिंह आणि शिवशंकरांची एकत्रित पूजा होते. या गर्भगृहात मुदगल ऋषी, त्यांची पत्नी भागीरथी, पुत्र मौदगल्य आणि स्नुषा जाबाला यांच्या प्राचीन मूर्तीही आहेत. नृसिंह तसेच मुदगल गणेश मंदिरांची शिखरे कालौघात नष्ट झाली आहेत.

नृसिंह मंदिराच्या मागील बाजूस एक त्रिकोणी दगडी चौथरा आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कितीही मोठा असला, तरी या चौथऱ्यामुळे पाणी विभागते. त्यामुळे शेकडो वर्षांनंतरही हे मंदिर सुस्थितीत आहे. पंधरा वर्षांपूर्वी गोदावरी नदीला भरपूर पाणी असे. त्यामुळे उन्हाळा सुरू होईपर्यंत या मंदिराचा बराचसा भाग पाण्याखाली जात असे.

येथील तिन्ही प्राचीन मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येथे येतात. गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करून भाविक येथील मंदिरांमध्ये दर्शन घेतात. महाशिवरात्रीला येथे मोठा जत्रोत्सव असतो. या दिवशी अनेक भाविक रांगा लावून मुदगलेश्वराचे दर्शन घेतात. या दिवशी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. या यात्रेदरम्यान पालखी मिरवणूकही काढण्यात येते. या पालखीत मुदगलेश्वराबरोबरच नृसिंहांचाही मुखवटा ठेवण्यात येतो. येथील गोदावरी नदीच्या पात्राजवळ त्रिपिंडी विधी आणि दशक्रिया विधी करण्यासाठीही अनेक जण येतात. येथे पुत्रप्राप्तीसाठी नागबळीचा विधीही केला जातो.

उपयुक्त माहिती

  • पाथरी येथून २४ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून ४४ किमी अंतरावर
  • पाथरी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२२८५५२०८

मुद्गलेश्वर मंदिर,

मुद्गल, तालुका पाथरी, जिला परभणी

Back To Home