बाराव्या शतकात महानुभव पंथाचे चक्रधर स्वामी यांचे रामटेक व आसपासच्या परिसरात वास्तव्य होते. या काळात ते मनसर येथील एका मोठ्या शिळेवर बसून भाविकांना उपदेश व ध्यानधारणा करीत असत. या शिळेला भाविक ‘आई’ असे संबोधतात. त्यांच्या स्पर्शाने व येथील वास्तव्याने पवित्र झालेल्या या शिळेचे येथे मंदिर असून ते मनशिळा, तसेच शिळाई (शिळाआई) मंदिर म्हणून आज प्रसिद्ध आहे. चक्रधर स्वामी यांच्या येथे असलेल्या स्थानाला ‘महास्थान’ अशी मान्यता आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की चक्रधर स्वामींचे रामटेक येथील गडावर दहा महिने वास्तव्य होते. रामटेक गडावरील राम मंदिराच्या शेजारी असलेल्या एका चौथऱ्यावर बसून ते ध्यानधारणा करीत. तेथील पुजारी दररोज आधी स्वामींची आरती करीत असे व त्यानंतर तो तेथील राम मंदिरात जाऊन पूजा–अर्चा करीत असे. काही दिवसांनी स्वामी तेथून निघून गेले तरी त्या पुजाऱ्याचा आरती करण्याचा क्रम मात्र तसाच होता. स्वामी ज्या चौथऱ्यावर बसत असत त्या चौथऱ्याची तो प्रथम आरती करीत असे. एकदा एका ब्राह्मणाने चौथऱ्याची आरती करीत असताना पुजाऱ्याला पाहिले व त्याला विचारले, ‘येथे कोणताही देव नाही, साधू नाही तरीही तू या चौथऱ्याची पूजा का करतो आहेस.’ त्यावर त्या पुजाऱ्याने सांगितले, ‘या स्थानावर चक्रधर स्वामी ध्यानधारणा करत असत. ते ईश्वरी पुरुष असून येथे त्यांचा कायम वास असतो.’
पुजाऱ्याच्या या बोलण्यावर ब्राह्मण साशंक होता. ईश्वरी पुरुष व ते नसतानाही त्यांचा येथे वास आहे, हे त्याला पटत नव्हते. हे कोण स्वामी आहेत, त्यांची भेट घ्यायला हवी, असे मनाशी ठरवून त्याने या पुजाऱ्याकडे स्वामींबद्दल विचारणा केली. चक्रधर स्वामी मनशिळेला आहेत, हे समजल्यावर तो ब्राह्मण डोक्यात विचारांचे काहूर घेऊन डोंगरवाटेने मनशिळा (आजचे मनसर) येथे पोचला. तेव्हा स्वामी एका मोठ्या शिळेवर उभे राहून तेथील परिसराचे अवलोकन करीत होते. तेव्हा स्वामी व ब्राह्मण यांची नजरानजर झाली. त्यावेळी स्वामी शिळेवरून खाली उतरले व त्या ब्राह्मणाच्या जवळ गेले. तेवढ्यात त्याला स्वामींच्या दैवत्वाची अनुभूती झाली. क्षणार्धात त्याच्या मनातील काहूर थांबला व चक्रधर स्वामी हे दैवी पुरुष असल्याचे त्याने जाणले. त्या ब्राह्मणाचा आदर–सत्कार स्वीकारून चक्रधर स्वामी येथून पुढच्या प्रवासाला निघाले. तेव्हापासून हे स्थान प्रसिद्ध असून येथे आलेल्यांना स्वामींच्या दिव्यत्वाची अनुभूती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मनसर येथे असलेल्या मोठ्या तलावाशेजारी उंच टेकडीवर एक भलीमोठी शिळा असून पायथ्यापासून तेथे जाण्यासाठी सुमारे १५० पायऱ्या आहेत. ज्या शिळेवर बसून चक्रधर स्वामी भाविकांना उपदेश व ध्यानधारणा करत असत, त्या शिळेला भाविक ‘आई’ असे संबोधतात. त्यामुळेच या शिळेभोवती बांधलेल्या मंदिराची शिळाई वा मनशिळा मंदिर अशी ओळख आहे. या शिळा मंदिराच्या परिसरातून मनसर या शहरवजा गावाचे विहंगम दृश्य दिसते. शिळा मंदिराच्या पायथ्याशी चक्रधर स्वामींचे स्थान असून ते स्थान भाविकांमध्ये ‘महास्थान’ म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात आसन व त्यावर चक्रधर स्वामींची मूर्ती आहे. या परिसरात श्रीकृष्ण व श्रीदत्त यांचीही मंदिरे आहेत.
चैत्र पौर्णिमा व महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला येथे उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक पौर्णिमेला सरासरी १० हजार, तर चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक येथे दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस आधी यात्रा सुरू होते व पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी संपते. उत्सव काळात दररोज येथे आरती व महापूजा झाल्यावर चक्रधर स्वामींना विडा अर्पण करण्यात येतो. मंदिराच्या पायथ्याशी महंत बांधेकर बाबांचा मठ आहे. तेथे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होतो. देशाच्या सर्व भागातून महानुभव पंथीय आवर्जून या यात्रेत सहभागी होतात. यावेळी महानुभाव पंथांचे महंत आणि संन्यासी गुलाबी रंगाचा, तर महंत स्त्रिया काळ्या रंगाचा पोशाख करतात.
हिंदू धर्मातील अनेक जातींमध्ये महानुभाव पंथ स्वीकारणारे भाविक असल्यामुळे हजारो भाविक येथील शिळा मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराशेजारी असणाऱ्या मठात १५० ते २०० भाविकांना राहण्याची सुविधा आहे. सकाळी ५ ते रात्री ९ या दरम्यान भाविक शिळा मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकतात. या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या व येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे राज्य सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे.