काळबादेवी हे महाकाली अर्थात कालिकामातेचे रूप. याच देवीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर पायधुणी येथे महाकालीचे अडीचशे वर्षांहून अधिक जुने असलेले मंदिर स्थित आहे. महाकाली ही त्वष्टा कासार ज्ञातीची कुलदेवता मानली जाते. दुराचाऱ्यांचा वध करणारी ही देवी त्वष्टा कासार समाजात रक्षणकर्ती देवता म्हणून पूजली जाते. या समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन येथे या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर मुंबईतील या समाजातील असंख्य कुटुंबांचे श्रद्धास्थान आहे. वैशाख पौर्णिमेला देवीची यात्रा असते. या सोहळ्यात हजारो नागरिक सहभागी होतात.
‘देवी माहात्म्या’तील आख्यायिकेनुसार, मूळ प्रकृती आदिमाया भगवती महालक्ष्मीने तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून महाकाली आणि महासरस्वती ही दोन रूपे निर्माण केली आणि त्यांना आपापल्या गुणांनी योग्य अशी स्त्री-पुरुषांची एकेक जोडी उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महाकाली ही जशी संहारिणी आहे, तशीच ती विश्वजननी व पोषिणीही आहे, असे मानले जाते. या देवीची सर्वात प्रसिद्ध आख्यायिका रक्तबीज नावाच्या राक्षसाशी संबंधित आहे. ‘दुर्गा सप्तशती’च्या आठव्या अध्यायानुसार, रक्तबीज हा एक शक्तिशाली राक्षस होता.
त्याला शंकराकडून असे वरदान प्राप्त झाले होते की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तर त्यातून त्याच्यासारखाच दुसरा रक्तबीज राक्षस निर्माण होईल. त्यामुळे तो अजेय बनला होता. त्याच्या दुराचारापासून देवगणांची सुटका करण्यासाठी देवी दुर्गेने महाकाली अवतार धारण केला. रक्तबीजाशी लढताना त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडू नये म्हणून कालीने विशाल रूप धारण केले. तीच महाकाली होय. तिने रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच प्राशन केले. अशा प्रकारे तिने या महाभयंकर असुराचा नायनाट केला.
त्वष्टा कासार समाज हा स्वतःस त्वष्टा ऋषींचा वंशज मानतो. त्वष्टा ही वैदिक देवतासमुहातील एका देवतेचेही नाव आहे. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, ‘हा देवांचा कारागीर होता. याने इंद्राचे वज्र तयार केले, ब्रह्मणस्पतीसाठी लोखंडाची कुऱ्हाड तयार केली, तर सोमपान करण्यासाठी ‘चमस’ नावाची पात्रे तयार केली. यानेच धृतराष्ट्राकरिता इंद्रप्रस्थ (महाभारत, आदिपर्व, २२७·५९), कृष्णाकरिता द्वारका (भागवत १०·५०) व इंद्राकरिता लंका (रामायण, उत्तरकांड, ५) निर्माण केली. सेतू बांधणारा नळ हा याचाच मुलगा होय. यालाच प्रजापती आणि विश्वकर्मा अशीही नावे पडली आहेत. कारण हस्तकौशल्याने जे करावयाचे त्याचा अधिकार यासच होता, असा उल्लेख ब्रह्मांडपुराणात (३·१·८६) आहे.’ ब्रह्मवैवर्त पुराणात विश्वकर्म्याची अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे की विश्वकर्म्याचा धृताची नावाच्या अप्सरेशी संबंध आला. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्या अप्सरेला शाप दिला. त्याच्या परिणामी तिने गोपाच्या घरी जन्म घेतला, तर विश्वकर्म्याला ब्राह्मणाचा जन्म प्राप्त झाला. या जन्मामध्ये या दोघांची प्रयागक्षेत्री भेट झाली आणि त्यांच्यापासून माळी, कासार, शिंपल्याचे काम करणारे, तसेच सोनार, पाथरवट वगैरे लोक निर्माण झाले. असे सांगण्यात येते की त्वष्टा कासार समाजातील कारागीर प्राचीन काळी जेव्हा धातूकाम करायचे, तेव्हा उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी ते महाकालीची आराधना करीत. महाकाली ही केवळ संहाराचे प्रतीक नाही, तर ती ‘मोक्ष’ देणारीही देवता आहे. ती भक्तांच्या मनातील अहंकार, अज्ञान आणि वाईट विचारांचा नाश करते.
तिची उपासना केल्याने शत्रूवर विजय मिळतो आणि भीतीपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
पूर्वी पायधुणी हे मुंबईतील एक सामान्य खेडे होते. या विषयी गोविंद नारायण माडगांवकर त्यांच्या ‘मुंबईचें वर्णन’ या १८६३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सांगतात की ‘ह्मातारपाखाडी, उमरखाडी, माजगांव, माहीम, हीं अलाहिदा बेटें असून मधून लहान खाऱ्या पाण्याच्या खाड्या होत्या. जिला आम्ही पायधुणी म्हणत असतों तेथून ही सलग खाऱ्या पाण्याची खाडी होती आणि भरती आली म्हणजे भेंडी बाजारापासून चिंचबंदर पर्यंत पाणी भरून जाई. ह्या जाग्यास पायधुणी असें नांव पडण्याचें कारण असें सांगतात कीं, पूर्वी माहीम, वरळी, व माटुंगें एथून लोक येऊन ह्या खाडींत पाय धुऊन मुंबईस येत, म्हणून तीस पायधुणी असें नाव पडलें.’ बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांच्या ‘मुंबईचा वृत्तांत’ (१८८९) या पुस्तकानुसार, साधारणतः १७९० च्या दशकापर्यंत पायधुणीपर्यंत भरतीचे पाणी येत असे. त्या कालखंडात, सन १७६२ मध्ये येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली.
मंदिराच्या स्थापनेनंतर सुमारे दशकभरात पायधुणीच्या विकासास प्रारंभ झाला. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी मध्य आणि दक्षिण मुंबईतील देवळांची टिपणे असलेले ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ हे पुस्तक १८९५ साली प्रसिद्ध केले. या पुस्तकातही या मंदिराची नोंद आहे.
येथील वर्दळीच्या रस्त्यावर दुकानांच्या गर्दीमध्ये या मंदिराचे छोटेसे प्रवेशद्वार आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप १९११ साली बांधण्यात आला. सभामंडपात, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन मोठी देवकोष्ठके आहेत. यातील डाव्या देवकोष्ठकात गणेशाची, तर उजव्या देवकोष्ठकात कालभैरवाची मूर्ती विराजमान आहे. येथील द्वारचौकटीला नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याचे आवरण आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंब स्थानी गणेशाची कोरीव मूर्ती विराजमान आहे, तर उत्तरांग भागामध्ये शेषशायी लक्ष्मी-नारायणाची मोठी प्रतिमा आहे. गर्भगृहात चांदीच्या भव्य देव्हाऱ्यामध्ये महाकालीची काळ्या पाषणातील मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या वरच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातात तलवार आहे. खालच्या डाव्या हातात डमरू, तर उजव्या हातामध्ये पात्र आहे.
वस्त्र, अलंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेल्या या मूर्तीच्या मस्तकी मकरकुंडले असलेला सोनेरी मुकुट आहे. येथे देवीच्या पायानजीक व्याघ्रमूर्ती आहे. महाकाली, गणेश व कालभैरव या तिन्ही मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना ९ जून २०११ रोजी करण्यात आली. या मूर्ती त्वष्टा कासार समाजातील शिल्पकार राजीव ह. तालीम यांनी घडवल्या आहेत.
मंदिराच्या गर्भगृहावर चारही बाजूंनी वर निमुळते होत गेलेले उरूशृंग प्रकारचे शिखर आहे. त्यावर चारही बाजूंनी देवकोष्ठके आहेत. वर आमलक आणि सुवर्ण कलश आहे. शिखरावर धर्मध्वज फडकत आहे. १८५७ चे बंड सुरू असतानाच्या काळात या मंदिरावरील कलशाची स्थापना करण्यात आली, तर त्यानंतर शंभर वर्षांनी, म्हणजे १९५७ साली या कलशास सोन्याचा मुलामा देण्यात आला.
या मंदिरात भाविक रोज सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या कालावधीत देवीचे दर्शन घेऊ शकतात. मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी या मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते. येथे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, आषाढ कृ. १४ व फाल्गुन अमावस्येस महापूजा (दांडी पूजन), कोजागरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, वसंत पंचमी, होळी, विजयादशमी हे सण व उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. मंदिरात नवरात्रीचा उत्सवही मोठ्या धुमधडाक्यात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या काळात अश्विन शुद्ध षष्ठीस मातेचा गोंधळ व नवमीस होमहवन केले जाते. वैशाख पौर्णिमा हा महाकाली माता मंदिराचा स्थापना दिन. या दिवशी येथे देवीची मोठी यात्रा भरते. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवास वैशाख शुद्ध १४ रोजी सायंकाळी दीपप्रज्वलन करून प्रारंभ होतो. वैशाख पौर्णिमेस सकाळी मातेस अभिषेक घातला जातो. वैशाख कृष्ण प्रतिपदेस सायंकाळी मातेची मंदिर प्रदक्षिणा व पालखी सोहळा असतो. या सोहळ्यात सर्वच समाजातील लोक मोठ्या संख्येने भाग घेतात.