‘जें सर्वतीर्थांनी युक्त सुंदर। प्राचीन प्रख्यात पापनाशकर।’ असे ‘करवीर माहात्म्य’कारांनी ज्या दक्षिण काशी करवीरचे वर्णन केले आहे. याच प्रमाणे ‘जेथें तिळातिळावर। लिंगरूपें असती हर। म्हणोनि पृथ्वींत इतर। यासम क्षेत्र नसे।।’ असेही या नगरीचे महिमान सांगितले आहे. अशा या कोल्हापूरमध्ये गोमती संगमाच्या पूर्वेस कोटीतीर्थ आणि त्यालगत कोटेश्वर मंदिर वसलेले आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या तीर्थात स्नान व पिंडदान करून कोटेश्वराची पूजा केल्याने पितरांना मुक्ती मिळते. पुष्करेश्वर तीर्थ या नावानेही हे तीर्थ ओळखले जाते.
कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिरापासून सुमारे तीन किमी अंतरावर असलेल्या या पवित्र तीर्थाची आख्यायिका अशी सांगितली जाते की अगस्ती ऋषी व त्यांची पत्नी लोपामुद्रा हे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी करवीर नगरीत आले होते. त्यांनी पंचगंगेच्या तीरावर मुक्काम केला होता. येथील मनकर्णिका तीर्थावर स्नान केल्यानंतर त्यांनी महालक्ष्मी व काशी विश्वेश्वर, रंकवैभव, कुंडलेश्वर, कुक्कुटेश्वर, महर्गल आदी देवांचे दर्शन घेतले. त्यानंतर ब्रम्हेश्वराची पूजा करून मलापकर्षण तीर्थात स्नान करून मळलेली वस्त्रे टाकून दुसरी वस्त्रे नेसून ते कोटीतीर्थावर आले. त्यावेळी लोपामुद्रेने अगस्तींना कोटीतीर्थाचे माहात्म्य सांगण्यास सांगितले. त्यांनी असे सांगितले की या कोटीतीर्थावर ३३ कोटी देव आणि ६६ कोटी असूर यांच्यात जोरदार युद्ध झाले.
या युद्धात देवांचा पराभव होणार होता पण त्यावेळी सर्व देवांनी श्री महालक्ष्मीचा धावा केला. त्याबरोबर आपले गण, रंगवैभव, महर्गल, सिद्धबटुक, काळ वेताळ, नवकोटी सख्या तसेच कात्यायिनी, योगिनी यांच्यासवे देवीने दैत्यांचा पाडाव केला. देवीच्या हातून आता आपले मरण अटळ आहे असे पाहून, सर्व दैत्य देवीस शरण आले. तिला म्हणाले की आता आम्हाला जीवाची आशा नाही. तुझ्या हातून आम्हास मरण यावे, स्वर्गाची दारे उघडून आम्हाला मुक्ती मिळावी, एवढीच आमची इच्छा आहे. याच तीर्थावर तू आम्हा ६६ कोटी असुरांचा वध कर आणि हे तीर्थ कोटीतीर्थ म्हणून प्रसिद्ध होऊ दे, सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरू दे, असा वर असुरांनी मागितला. देवीने तत्काळ तथास्तु म्हटले व दैत्यांना मुक्ती मिळाली. त्यामुळे यास कोटीतीर्थ असे नाव पडले. याबाबत अशीही आख्यायिका सांगण्यात येते, की पूर्वी कोटीतीर्थाचे नाव पुष्करेश्वर होते व प्राचीन काळी येथे भानुराजाची कोटी जन्मांची पातके फिटल्याने या तीर्थास कोटीतीर्थ असे नाव पडले.
कोटीतीर्थ तलावाचा परिसर हा अत्यंत रमणीय आहे. तलावाच्या सभोवताली मोठमोठ्या वृक्षांची दाटी आहे. मुख्य रस्त्यावरून छोट्याशा मैदानातून आत गेल्यानंतर कोटेश्वर मंदिराचे लोखंडी प्रवेशद्वार लागते. आतील प्रांगणात तलावाच्या काठावर कोटेश्वराचे प्राचीन मंदिर उभे आहे. या मंदिराचा अलीकडे जीर्णोद्धार व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिराचा सभामंडप आधुनिक पद्धतीने बांधल्याचे दिसते.
दगडी बांधणीतील या मंदिराची सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे. मंदिराचे शिखर दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. त्यावर चारही बाजूंनी कोष्टके व कमळ पाकळ्यांची नक्षी असलेला आमलक आणि त्यावर कळस आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. त्यात तलावाच्या बाजूने प्रवेश होतो. सभामंडपाच्या समोर दगडी चौथऱ्यावर नंदीची प्राचीन मूर्ती विराजमान आहे. त्याच्या मागच्या बाजूस, तलावाकडे तोंड करून नागदेवतेचे दगडी शिल्प आहे. नंदीच्या चौथऱ्यालगत जुना, परंतु छोटा असा पाषाणाचा नंदीही आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास महिरपी तोरण आहे. आत डावीकडे उंच आसनांवर त्रिमुखी दत्ताची धातूची मूर्ती आहे. तिच्या शेजारी विठ्ठलाची मूर्ती आहे. येथेच शिवपिंडी, तसेच शंकराचा मोठा नागफण्याचे छत्र असलेला पितळी मुखवटा आहे. या ठिकाणी राम-लक्ष्मण-सीता यांच्या सुबक संगमरवरी मूर्तीही आहेत. सभामंडपात महादेवाची तसेच महालक्ष्मीची तसबीर आहे.
मंदिराचे अंतराळ छोटे आहे व त्यास लोखंडी गज असलेला लाकडी दरवाजा आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार कमी उंचीचे आहे. आत कोटेश्वराची काळ्या पाषाणातील पिंडी आहे व त्यावर अभिषेकपात्रातून जलाभिषेक सुरू असतो. या शिवलिंगाचे माहात्म्य दाजीबा जोशीराव रचित ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथाच्या २९व्या अध्यायात नमूद आहे. कोटेश्वराच्या दर्शनाने पितरांना मोक्ष मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे पराशर ऋषींनी स्नान केले होते, असेही या ग्रंथात म्हटलेले आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस हनुमानाची, गणरायाची, तसेच साईबाबांची मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात तीन वीरगळही आहेत. मंदिरानजीक स्वामी समर्थांचे मंदिर, तसेच नारायणदास महाराज यांची समाधी आहे.
कोटीतीर्थावर कोटेश्वर मंदिरापासून काही अंतरावर स्वामी समर्थांचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात औदुंबराचे मोठे झाड आहे. झाडाला खालील बाजूने षटकोनाकृती संगमरवरी दगडाचा वापर करून बांधकाम करण्यात आले आहे. या झाडाला भाविक प्रदक्षिणा घालतात. तिथून आत मुख्य मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप खूपच प्रशस्त आहे. सभामंडपाच्या मधोमध संगमरवरी अधिष्ठानावर स्वामी समर्थांची प्रतिमा आहे. दत्त संप्रदायातील थोर पुरुष व दत्तगुरूंचा तिसरा अवतार म्हणजे स्वामी समर्थ असे मानले जाते. भाविकांना नामस्मरणासाठी व ग्रंथवाचनासाठी मंदिरात सोय करण्यात आली आहे.
कोटेश्वर महादेव मंदिराजवळच दक्षिणेस नारायणदास महाराज यांचे समाधी मंदिर आहे. असे सांगण्यात येते की इ.स. १८९४ मध्ये नारायणदास महाराज येथे आले होते. या परिसरात त्यांचे वास्तव्य असे. कालांतराने त्यांनी येथेच एक साधी इमारत बांधली. १९३३ मध्ये त्यांनी येथे समाधी घेतली. त्यांनी बांधलेल्या मुख्य इमारतीखालील एका दालनात त्यांची समाधी आहे. येथेही रोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.