
‘विदर्भातील प्रयाग’ अशी ख्याती असलेले हिंगणा तालुक्यातील हनुमान गडावरील गणेश मंदिर देवस्थान वेणा व दुर्गा या २ नद्यांच्या संगमावर स्थित आहे. युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून माधवराव पेशव्यांनी हे मंदिर बांधून त्यात श्रीगणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली होती. मराठ्यांनी स्थापन केलेले हे देवस्थान आज हिंगणा तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, नागपूरकर भोसले आणि पेशवे यांच्यामध्ये तिढा निर्माण होऊन लढाईला तोंड फुटले होते. यामध्ये भोसले यांची सरशी झाली तरीही निजाम, मोगलांपेक्षा पेशवे जवळचे म्हणून भोसले राज्यकर्त्यांनी समंजस्याचे धोरण स्वीकारले व पेशव्यांचे येथील वर्चस्व मान्य केले. तेव्हा श्रीगणेशभक्त असलेल्या पेशव्यांनी येथे गणेश मंदिराच्या उभारणीसाठी भोसले यांच्याकडून जागा मागितली. त्यानुसार भोसले यांनी येथील २ नद्यांच्या संगमावरील हनुमान गडाची जागा सुचविली. आधीपासून येथे मणसामाय नामक देवीचे स्थान होते; परंतु ते दुर्लक्षित झाले होते. या स्थानाचे सुशोभीकरण करून १७८८ च्या फेब्रुवारी महिन्यात येथे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती.
पुढील १५० वर्षांत हे स्थान दुर्लक्षित झाले होते. सन १९४५ च्या दरम्यान येथे जालना येथील देवराज स्वामी आले. त्यावेळी नागफणीच्या जंगलामुळे येथे फिरणे कठीण होते. (जेथे नागफणीची झाडे असतात तेथे मोठ्या संख्येने सापांचा वावर असतो) त्यांनी येथील मंदिराची परिस्थिती पाहिली तेव्हा या स्थानाच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले. स्वामींनी स्वतःहून येथे साफसफाई करण्यास सुरुवात केली. येथील मूर्तीच्या हाताला इजा झाल्याने मूर्तीला गाभाऱ्यातून काढून तेथील
कडुनिंबाच्या झाडाखाली ठेवण्यात आली व नवीन मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला गेला; परंतु देवराज स्वामींनी सांगितले की जो कोणी नव्याने मूर्ती बनवेल त्याचे आयुष्य पुढे ६ महिनेच असेल. त्यामुळे कोणीही मूर्तिकार मूर्ती बनविण्यासाठी तयार होईना. तेव्हा स्वामी एका कारागिरास म्हणाले, ‘तुझ्या आयुष्याचे आता अडीच महिनेच उरले आहेत.’ स्वामींचे धारदार बोलणे व नजरेतील चमक यावरून त्या कारागिरास खात्री पटली व त्याने मूर्ती बनविली. मूर्ती बनविल्यानंतर मात्र त्या कारागिराला दीर्घायुष्य मिळाले. कालपरत्वे देवराज स्वामी याच ठिकाणी समाधिस्थ झाले. त्यांचे समाधीस्थान आजही गणेश मंदिर परिसरात आहे.
हनुमान गडावरील गणेश मंदिरात जाण्यासाठी कमानीवजा प्रवेशद्वार आहे. नदीच्या तीरापासून काहीशा उंचावर असलेल्या या मंदिर परिसरातून २ नद्यांच्या संगमाचे विहंगम दृश्य दिसते. वेणा नदी पश्चिमेकडून पूर्व वाहिनी होते; तर दुर्गा नदी दक्षिणेकडून येऊन तिचा वेणा नदीशी संगम होतो. या
नदीशेजारी मंदिर समितीतर्फे सुंदर उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. गणेश मंदिर हे दुमजली असून दर्शन मंडप, सभामंडप व गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. सभामंडपात काळ्या पाषाणातील मूषकराज असून त्यासमोरील गर्भगृहात एका उंच चौथऱ्यावर शेंदूरचर्चित गणेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती ४.५ फूट उंच व २ फूट रुंदीची काळ्या पाषाणाची आहे. २६ फेब्रुवारी १९९१ ला केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. या नूतनीकरणाच्या वेळी हिंगणा येथील भेंडी परिवारातर्फे बाजूला ठेवण्यात आलेल्या मूळ मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिरामध्ये अनेक देवी–देवतांच्या मूर्ती व स्वामींच्या समाध्या आहेत.
पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीस येथे मोठी यात्रा असते. याबाबत असे सांगितले जाते की एकदा या भागात संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज येणार होते. त्यांनी या मंदिरात दर्शनास यावे, अशी ग्रामस्थांकडून त्यांना विनंती करण्यात आली. त्यावर महाराजांनी सांगितले की मी गावात मुक्काम करणार नाही. माझ्यासमवेत असणारे सर्वजण मंदिरातच राहतील. शिवाय ५०० भक्तगणांसाठी महाप्रसाद बनवावा लागेल. त्यानुसार ग्रामस्थांनी लगबगीने मंदिराशेजारी सभामंडपाचे काम केले. १ जानेवारी १९६४ रोजी पौष चतुर्थीला तुकडोजी महाराजांनी भक्तांसह या मंदिरात मुक्काम केला होता. तेव्हापासून सुरू झालेला उत्सव आजही येथे साजरा होतो. येथील गणेश स्थानाबाबत एक आख्यायिका अशी की २००१ मध्ये दुष्काळसदृश्य वातावरण होते. पाऊस नसल्यामुळे येथील नद्या कोरड्या झाल्या होत्या. पाऊस पडावा म्हणून गावकऱ्यांनी गणेश मंदिरात १२१ अथर्वशीर्ष आवर्तनांचा संकल्प करण्याचे ठरविले. त्यानुसार गावात दवंडी देऊन सर्वांना याची कल्पना द्यावी, असे ठरले. यावेळी गावात दवंडी देण्यासाठी गेलेला माणूस परत मंदिरात परतला तो पावसात भिजूनच. प्रार्थनेनंतर दुसऱ्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली व येथील नद्या–नाले दुथडी भरून वाहू लागले.
हे गणेशस्थान जागृत असून हिंगणा तालुक्यातील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. दरवर्षी पौष महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला तालुक्यातील सुमारे १७० गावांतील भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात. नद्यांच्या संगमावर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे श्रावण व अधिक महिन्यात या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते. येथील सुंदर परिसर आणि भाविक व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्र शासनाने या स्थानाचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश केला आहे. वेळोवेळी सरकारकडून मिळणाऱ्या निधीमुळे येथील परिसराचे सौंदर्यीकरण झाले असून भाविकांसाठी अनेक सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.