पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेले नारायणपूर हे क्षेत्र येथील प्राचीन नारायणेश्वर महादेव मंदिर आणि आधुनिक काळातील एकमुखी दत्त मंदिर यांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. भगवान दत्तात्रेयांचे सौम्य आणि अद्वैत तत्त्वाचे प्रतीक असलेले एकमुखी रूप हे या क्षेत्राचे मुख्य आकर्षण आहे. हे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे दत्तजयंतीचा मोठा उत्सव असतो. सलग तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
नारायणपूरचा ऐतिहासिक संदर्भ अत्यंत प्राचीन आहे. या गावाचे प्राचीनत्व येथील नारायणेश्वर मंदिरामुळे सिद्ध होते. हेमाडपंती शैलीतील ते मंदिर साधारणतः तेराव्या शतकातील यादव काळात बांधले गेले आहे. हे क्षेत्र पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असल्यामुळे राजकीयदृष्ट्याही ते महत्त्वाचे राहिले आहे. मराठ्यांच्या इतिहासात नारायणपूरचे नाव पुरंदरच्या तहाशी जोडले गेले आहे. सन १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग यांच्यात झालेला हा ऐतिहासिक तह याच परिसरात पार पडला होता. या तहाच्या अटींनुसार महाराजांना स्वराज्यातील २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. स्वराज्याच्या संघर्षाच्या काळात हे क्षेत्र अनेक राजकीय हालचालींचे केंद्र राहिले आहे.
या स्थानाशी संत चांगदेव महाराजांची कथा जोडलेली आहे. ती अशी की चांगदेव महाराज हे चौदाशे वर्षे जगलेले महान हठयोगी होते. त्यांचे मूळ गाव नारायणपूर असल्याची मान्यता आहे. पुराणांमधील माहितीनुसार, जेव्हा चांगदेव महाराज वाघावर बसून आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले, तेव्हा त्यांचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर माउली आणि त्यांची भावंडे एका चालत्या भिंतीवर बसून त्यांना सामोरे गेले. या घटनेनंतर चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईंचे शिष्यत्व पत्करले आणि येथेच तपश्चर्या केली.
भगवान दत्तात्रेयांच्या संदर्भात हे स्थान एकमुखी दत्त रूपासाठी प्रसिद्ध आहे. सामान्यतः दत्तात्रेयांची तीन मुखे असलेली मूर्ती पाहायला मिळते. परंतु येथे ते एकमुखी स्वरूपात विराजमान आहेत. अशी मान्यता आहे की एकमुखी रूप हे ‘अद्वैत’ सिद्धांताचे प्रतीक आहे. ते अनेकत्वाकडून एकत्वाकडे जाण्याचा मार्ग दर्शवते. या स्थानाची आख्यायिका अशी की सद्गुरू नारायण तथा अण्णा महाराजांनी येथील नारायणेश्वराच्या मंदिरात तपश्चर्या केली होती. तिथे त्यांना नारायणेश्वराने ध्वनीरूपात दर्शन दिले. मात्र तेवढ्याने अण्णा महाराजांचे समाधान झाले नाही. त्यांनी भगवंताकडे प्रकटरूपात दर्शन देण्याची याचना केली. त्यावेळी भगवंतांनी त्यांना गुरुकृपा करून घेण्याची आज्ञा दिली. त्यानंतर नारायणेश्वराची आज्ञा घेऊन अण्णा महाराज आता ज्या ठिकाणी एकमुखी मंदिर आहे, त्या ठिकाणी असलेल्या औदुंबराच्या लहानशा झाडाला रोज प्रदक्षिणा घालू लागले. एके दिवशी अण्णा महाराजांना येथे दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला. तिथेच त्यांनी विष्णूच्या निर्गुण पादुका, शंकराची पिंडी व नंदीची प्रतिष्ठापना केली आणि तीनमुखी दत्त मंदिर उभारले. साधारण १९६४ च्या आसपास हे मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर १९८६ मध्ये एकमुखी दत्ताची सहा भुजा असलेल्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे करण्यात आली. तेव्हापासून हे क्षेत्र दत्त संप्रदायाचे एक प्रमुख केंद्र बनले.
नारायणपूर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. पुण्याहून येथे येण्यासाठी कात्रज घाट किंवा दिवे घाट अशा दोन मार्गांचा वापर करता येतो. हे क्षेत्र सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असल्यामुळे येथील परिसर अत्यंत निसर्गसमृद्ध आहे. मंदिर परिसरात एका बाजूला प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक दत्त मंदिर आहे. श्री दत्त मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी येथे भक्त निवास आणि प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. परिसरातील मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर एका प्रांगणात प्रवेश होतो. येथे पुजासाहित्य विक्रीची शेकडो दुकाने आहेत. येथे एक प्राचीन आणि मोठे औदुंबराचे झाड आहे. दत्त संप्रदायात त्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या वृक्षाखाली भगवान विष्णूच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत.
एकमुखी दत्त मंदिर हे ‘नागर’ शैलीत बांधलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते शिखरापर्यंतची रचना भव्य आहे. मंदिराचा सभामंडप मोठा असून त्याच्या भिंतींवर ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथातील विविध प्रसंगांचे चित्ररूप वर्णन केले आहे. सभामंडपातून पुढे आल्यावर मुख्य गर्भगृह आहे. त्यात शुभ्र संगमरवरातून घडविलेली एकमुखी दत्ताची सहा भुजा असलेली मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात डमरू, शंख, चक्र,
माळा, कमंडलू आणि गदा आहेत. मंदिराच्या खालून वर निमुळत्या होत जाणाऱ्या शिखरावर सुवर्ण कळस आहे. मंदिराच्या या वास्तुत प्राचीन दगडी कोरीव काम आणि आधुनिक संगमरवरी कलेचा समन्वय आहे.
नारायणपूर येथे वर्षभर विविध धार्मिक उत्सव आणि सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मार्गशीर्ष पौर्णिमेला येणारी दत्तजयंती हा येथील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. हा सोहळा सलग तीन दिवस चालतो. या उत्सवासाठी हजारो भाविक येथे येतात. या काळात भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. गुरुवारी सकाळी ५ वाजता रुद्राभिषेक आणि काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. दुपारी महाप्रसादाचे वाटप होते आणि रात्री ९:३० वाजता दत्तप्रभूंचा पालखी सोहळा निघतो, त्यावेळी शेकडो भाविक उपस्थित असतात. मध्यरात्री १२:३० वाजता होणारी शेवटची आरती हा येथील एक विशेष धार्मिक विधी मानला जातो.
नारायणपूरचे हे दत्त मंदिर जागृत देवस्थान आहे. येथे दर्शनासाठी आल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सलग २१ गुरुवारी येथे येण्याचा संकल्प केल्यास २१ गुरुवार पूर्ण होण्यापूर्वीच भाविकांचे इच्छित काम पूर्ण होते, असा अनेक भाविकांचा अनुभव आहे.