प्राचीन काळापासून जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखले जाणारे ‘अतिशय क्षेत्र बाहुबली’ हे जैन धर्मियांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. कुंभोजगिरीवरील या स्थानी सुमारे ३५० वर्षांपूर्वी नांद्रे गावातील जैन मुनी बाहुबली महाराज यांनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या चमत्कारांमुळे या क्षेत्रास ‘अतिशय क्षेत्र बाहुबली’ या नावाने ओळखले जाते. दक्षिण भारतातील ‘मिनी शत्रुंजय’ म्हणूनही हे स्थान देशविदेशात ओळखले जाते. सुमारे आठशे वर्षांचा इतिहास असलेल्या या स्थानी भगवान बाहुबलीची २८ फूट उंचीची भव्य व आकर्षक मूर्ती आहे.
जैन धार्मिक परंपरेनुसार भगवान बाहुबली हे जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांचे पुत्र होते. हिंदू धर्मग्रंथ व पुराणांचे सुप्रसिद्ध अभ्यासक व इंग्रजी लेखक देवदत्त पटनायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभनाथ ऊर्फ ऋषभदेव हे महापराक्रमी सम्राट होते. त्यांना १०० पुत्र व दोन कन्या होत्या. ऋषभदेवांनी संसारत्याग करण्यापूर्वी आपल्या मुलांना १०० राज्ये दिली. तर ब्राह्मी आणि सुंदरी या मुलींना लिहिण्याची आणि मोजण्याची कला दिली. आपल्या देशास ज्याच्यावरून भारत हे नाव पडले तो भरत राजा हा त्यांचा मोठा पुत्र. त्याची सम्राटपदी नियुक्ती होणार होती. त्याचे मांडलिक म्हणून राहणे हे त्याच्या भावांना अमान्य होते. त्यामुळे त्यांनी आपापली गादी सोडून संन्यास स्वीकारला. भरत राजाच्या एका भावाने मात्र तसे केले नाही. त्याचे नाव होते बाहुबली.
त्यामुळे भरताने बाहुबलीविरोधात युद्ध पुकारले. पण अनावश्यक रक्तपात टाळण्यासाठी असे ठरवण्यात आले की या भावांनी द्वंद्वयुद्ध करून प्रश्न सोडवावा. या द्वंद्वात बाहुबली प्रबळ ठरला. तो भरतावर अखेरचा प्रहार करून त्यास गारद करणार, इतक्यात त्यास आत्मसाक्षात्कार झाला. आपण आपल्या थोरल्या भावाला हरवून काय प्राप्त करणार आहोत, असे त्याला वाटले आणि त्याने युद्ध संपवले. संसारत्याग केला आणि तो तप करण्यासाठी वनात निघून गेला. एका ठिकाणी उभे राहून त्याने साधना सुरू केली. त्याचे जगाचे भान सुटले. देहजाणीव सुटली. त्याच्या अंगावरील वस्त्रे विदिर्ण होऊन गळून पडली. त्याच्या अंगावर मुंग्या, साप चढू लागले. वेलींनी त्याच्या पायांना विळखा घातला. पण त्याने डोळे उघडले नाहीत. बारा वर्षे तो तप करीत होता. पण त्याच्या मनात आपण तप करतो आहोत, आपण ज्ञानी झालो आहोत, हा अंहकार होता. अखेर एकदा त्यास भेटण्याकरीता त्याची बहिण आली. त्याला पाहून ती म्हणाली, ‘हत्तीवरून खाली उतर.’ त्या वाक्याने त्याच्या मनातील शेवटचा अडथळा दूर झाला आणि त्यास निर्वाणप्राप्ती झाली.
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बाहुबलीची ५७ फूट उंचीची विशाल मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या पायाशी मराठी भाषेतील एक शिलालेख आहे. त्यावर ‘श्री चावुंडराजें करवियलें श्रीगंगराजे सुत्ताले करवियले’ असे म्हटलेले आहे. याचा अर्थ बाहुबलीची ही प्रतिमा चावुंडराय ऊर्फ चामुंडराय यांनी घडविली आणि गंगराजाने त्या भोवतीचा वेढा बांधला. कर्नाटकातील पश्चिम गंग राजवंशातील गंगराज हा एक राजा होता व चावुंडराय हा त्याचा सेनापती आणि प्रधान होता. त्याने इ.स. ९८१ मध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. गोमटेश्वर बाहुबली म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या मूर्तीचे शिल्पकार अरिष्ट नेमी हे होते. याच मूर्तीची प्रतिकृती कुंभोज येथे पाहावयास मिळते.
या स्थानाचा इतिहास असा सांगतात की आठव्या शतकापासून हे स्थान जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखले जात होते. या ठिकाणी मिरज तालुक्यातील नांद्रे येथील मुनिश्री १०८ बाहुबली महाराज हे तपस्या करीत असत. त्यांच्याविषयी आख्यायिका अशी की ते सिद्धपुरूष होते व त्यांना मंत्रविद्या अवगत होती. त्यामुळे या टेकडीवरील जंगलात असलेली हिंस्त्र श्वापदे येथे येणाऱ्या भक्तांना कधीही उपद्रव करीत नसत. या ठिकाणी बाहुबली महाराज यांची चरणचिन्हे स्थापित आहेत. इ.स. १८५१ मध्ये प्रभाचंद्र मुनी, १८५८ मध्ये कमलाकर मुनी यांनीही तपस्या केल्याच्या नोंदी आहेत. १९२७ च्या चातुर्मासात आचार्य शांतिसागर महाराज यांनी जैन परंपरेनुसार येथे वास्तव्य केले होते.
कुंभोज गावाच्या वेशीवर असलेल्या एका टेकडीवर सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे बाहुबली मंदिर आहे. या मंदिराच्या खालच्या बाजुला डोंगर उतारावर १९६३ मध्ये बाहुबलीची महामूर्ती व १९८३ मध्ये बाहुबली तीर्थक्षेत्राची निर्मिती करण्यात आली. जमिनीपासून काहीशा उंचावर असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून या क्षेत्रात प्रवेश होतो. येथून सुमारे २८ फूट उंचीची भगवान बाहुबली यांची मूर्ती लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वारापासून सुमारे ५० पायऱ्या चढून या मूर्तीनजीक जाता येते. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजुला सुरुवातीला सोंड उंचावून स्वागत करणाऱ्या हत्तींची शिल्पे आहेत. त्यावरील भागात अनेक सिद्धक्षेत्रांच्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये श्री शत्रुंजय, राजगृही, सिद्धवर, कुंडलगिरी, कुंथलगिरी, बडवानीजी, खंडगिरीजी, द्रोणागिरी, मांगीतुंगी, मुक्तगिरी, गजपंथ, तारंगा, सोनागिरी, पावागिरी यांचा समावेश आहे.
बाहुबली महामूर्ती ही शुभ्र रंगाची आहे. मूर्तीच्या पायाखालील बाजुस गाय व वाघीण यांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. त्यामध्ये गाय ही वाघिणीच्या पिलाला व वाघिण ही गायीच्या वासराला दूध पाजत आहेत. या महामूर्तीच्या शेजारी सम्मेदशिखर तीर्थधाम, अष्टापद / कैलासगिरी सिद्धक्षेत्र, श्रुतसंवर्दख गिरनार सिद्धक्षेत्राच्या प्रतिकृती आहेत. सन १९८४ मध्ये आचार्य विद्यानंद मुनीराज यांच्या प्रेरणेने येथील प्राचीन जिनालयांचा म्हणजे जैन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला. कुंभोजगिरी येथील या पवित्र क्षेत्राला महाराष्ट्र सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ब वर्गाचा दर्जा देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. हातकणंगले तालुक्यातील हे जैन धर्मियांचे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे रोज मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.
उपयुक्त माहिती