आदि शंकराचार्य मंदिर / श्री शंकर मठम्

श्रद्धानंद मार्ग, माटुंगा, मुंबई

श्रद्धावान हिंदूंसाठी दक्षिणामूर्ती किंवा खुद्द शिवस्वरूप मानले जाणारे आदि शंकराचार्य भगवत्पाद यांना समर्पित असलेले मंदिर माटुंगा येथे आहे. दाक्षिणात्य शैलीत बांधण्यात आलेल्या श्री शंकर मठामध्ये हे मंदिर स्थित आहे. ८७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मठ-मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आदि शंकराचार्य हे मुख्य आराध्य दैवत असलेले हे भारतातील मोजक्या मंदिरांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे हे असे एकमेव मंदिर आहे की जेथे कांची आणि शृंगेरी पीठाचे शंकराचार्य दरवर्षी भेट देतात. मुंबईतील वैदिक संस्कृतीचे जतन करणाऱ्या या मंदिर-मठात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.

हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि कौमार (कार्तिकेयांची उपासना करणारा पंथ) या सहा हिंदू पंथांच्या अनुयायांना एकत्रित करण्याचे लोकसंग्राहक महत्कार्य साधणारे ‘षण्मठस्थापकाचार्य’ म्हणून आद्य शंकराचार्यांचा गौरव केला जातो. त्यांनी आदित्य, अंबिका, विष्णू, गणनाथ आणि महेश्वर या तत्कालीन पाच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी मार्ग पंचायतन पूजेच्या द्वारे दाखवून दिला. सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा अशा ‘आस्तिक’ व बौद्ध, जैन, लोकायत अशा ‘नास्तिक’ दर्शनांचे पद्धतशीर खंडन करून केवलाद्वैत तत्त्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी करणे, हे आचार्यांचे सर्वांत मोठे योगदान मानले जाते. त्यांच्या कार्यकाळाबद्दल अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही. मात्र साधारणतः इ.स. ७८८ ते ८२० हा त्यांचा काळ मानला जातो.

आद्य शंकराचार्य यांचा जन्म केरळातील अलवाये शहरानजीकच्या कालडी नामक खेड्यात झाला होता. त्यांचे कुळ कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मणांचे होते. त्यांचा जन्म, कार्यकाळ आदी बाबी विवाद्य असल्याने त्यांचे ग्रंथ हेच त्यांचे खरे जीवनचरित्र मानले जाते व पुढील श्लोकात त्यांचे चरित्र सांगितले जाते. – ‘अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद । षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात।।’ याचा अर्थ असा की ‘आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व ३२व्या वर्षी महाप्रस्थान.’ श्रीमद्‌भगवद्‌गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र मिळून प्रस्थानत्रयी होते. त्यावरील महान भाष्यकार, केवलाद्वैत म्हणजे एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य, जीवात्मा त्याहून भिन्न नाही व इतर सर्व विश्व मिथ्या आहे या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक आणि ‘पूर्वज वेडा होता म्हणून आपणही वेडे असायला पाहिजे असा काही नियम नाही’ (नहि पूर्वजो मूढ आसीदित्यात्मनि मूढेन भवितव्यमिति किंचिदस्ति प्रमाणम् – ब्रह्मसूत्र २.१.११) अशा मार्मिक शब्दांत धर्मसुधारणावाद प्रतिपादन करणारे युगकर्ते वेदान्ती म्हणून आद्यशंकराचार्य ओळखले जातात. आपल्या ३२ वर्षांच्या जीवनकालात आचार्यांनी प्रस्थानत्रयीवरील भाष्यांखेरीज सुमारे ४०० स्फुट ग्रंथ लिहिले. ‘दक्षिणामूर्ती स्तोत्र’, ‘हरिमीडे’, ‘आनन्दलहरी’, ‘सौंदर्यलहरी’ ही त्यांनी रचलेली स्तोत्रे विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्या तत्त्वज्ञानाची परंपरा अखंड चालू राहावी यासाठी त्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व शृंगेरी असे भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. या चार मठांव्यतिरिक्त त्यांनी काशीचा सुमेर मठ तसेच कांचीचे कामकोटीपीठ याचीही स्थापना केली थी. या मठांवर आद्य शंकराचार्यांनी अधिकारी पीठाधीश नेमले. ती परंपरा आजही कायम आहे.

देशात आदि शंकराचार्य आराध्य दैवत असलेली मोजकी मंदिरे आहेत. त्यातील शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेले कालडी, कांचीपुरम् तसेच एनाथूर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. माटुंगा येथील शंकर मठातील मंदिर हे त्यांपैकी एक होय. या मठाच्या स्थापनेची कथा अशी सांगण्यात येते की सुब्रमण्य शास्त्रीगल हे चेन्नई मधील एक वैदिक पंडित होते. ते आदि शंकराचार्यांचे परमभक्त होते. १९३९ साली ते उपजीविकेसाठी मुंबईत आले. येथे ते वैदिक पंडित म्हणून लोकांकडून विविध धार्मिक विधी करून घेत असत. या काळात त्यांना वारंवार आदि शंकराचार्यांचा स्वप्नदृष्टांत होऊ लागला. वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्राची शिकवण लोकांना द्यावी, एक केंद्र सुरू करण्याची प्रेरणा या स्वप्नांद्वारे आदि शंकराचार्य त्यांना देत होते. या दृष्टान्तांनी अस्वस्थ झालेल्या सुब्रमण्य शास्त्रीगल यांनी तामिळनाडूतील कांचीपुरम् येथे जाऊन कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांची भेट घेतली. त्यावेळी स्वामींनी त्यांना आदि शंकराचार्यांनी मांडलेल्या केवलाद्वैत या तत्त्वज्ञानावर आधारित वेदवर्ग सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी १९३९ मध्ये माटुंगा येथे या मठाची स्थापना केली. असे सांगितले जाते की प्रथम सुब्रमण्य शास्त्रीगल यांच्या घरात (खोली क्र. २१८, महावीर बिल्डिंग) वेदवर्गास प्रारंभ झाला होता. शिष्यसंख्या वाढल्यानंतर हा वर्ग दोन खोल्यांच्या घरात (खोली क्र. १-२, मोहन मॅन्शन. सध्याचे धाबावाला मॅन्शन) स्थलांतरित करण्यात आला. सन १९५४ मध्ये समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन मठासाठी मोठी इमारत बांधण्याचे ठरवले. त्यानुसार माटुंगा येथील श्रीनिवास इमारत विकत घेऊन तेथे या मठाची स्थापना करण्यात आली.

सन १९५९ मध्ये एम. व्यंकटरामय्या या सद्‌गृहस्थांनी मठास आदि शंकराचार्यांची संगमरवरी मूर्ती अर्पण केली. या मठात बाणलिंग, पंचायतन तसेच चंदनी आचार्य-पादुका आहेत. त्या कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांनी दिल्या, तर शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी येथील गणपतीची मूर्ती आणि दैनंदिन पूजेसाठी शालिग्राम दिला. १० मे १९७८ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर द्वारका पीठाचे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद तीर्थ स्वामी यांच्या हस्ते पहिला कुंभाभिषेक करून, सध्याच्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या तीन मजली मठाच्या दुसऱ्या मजल्यावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराचा दर्शनी भाग दाक्षिणात्य मंदिर शैलीत उभारलेला आहे. मंदिरास एक भव्य राजगोपुर आहे. त्यास विश्वातील पाच तत्त्वांचे वा पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणारे पाच भाग आहेत. या गोपुरास स्थूल लिंग असेही म्हटले जाते. त्यात शिवशंकर, विष्णू, ब्रह्मा आणि शंकरतत्त्वांच्या प्रतिमा आहेत. गोपुराच्या दोन्ही बाजूंना शंखनिधी आणि पद्मनिधी आहेत. गोपुराच्या बाजूस असलेल्या भिंतींवर (सालाई गोपुरावर) उजवीकडील वरच्या देवकोष्ठांत गणपती, व्यास आणि अगस्ती यांच्या प्रतिमा आहेत, तर डावीकडील वरच्या देवकोष्ठांत मुरुगन, वल्ली आणि देवसेना यांच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या आवारात प्रवेश करताच समोरच दहा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या बाजूला ऐरावत आणि पुष्पदंत या गजराजांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या बाजूला पश्चिम आणि नैऋत्य या दिशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वायू आणि वरुणाच्या प्रतिमा आहेत. आवारात उजव्या बाजूला वरसिद्धी विनायक आणि डाव्या बाजूला आंजनेय (हनुमान) यांची सुशोभित मंदिरे आहेत. या पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धमंडपात प्रवेश होतो. समोरच भिंतीवर, कुरुक्षेत्रावर अर्जुनास गीतोपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भव्य उठावचित्र आहे. येथेच एका काचपेटीमध्ये अष्टभुजा दुर्गादेवीची मूर्ती विराजमान आहे. येथून डाव्या बाजूस २२ पायऱ्यांचा जिना आहे. तो चढून मंदिराच्या महामंडपात प्रवेश होतो. महामंडपाच्या प्रवेशद्वारावरील तुळईवर ३६ कमळे आहेत. त्या प्रत्येक कमळाला ३६ पाकळ्या आहेत. या प्रवेशद्वाराला ‘तोरण वासल’ असे म्हणतात. हिंदू धर्मातील सांख्य दर्शनात धर्माची २४ तत्त्वे सांगितली आहेत. पुराणे ३० तत्त्वे सांगतात, तर काश्मिरी शैव आगमामध्ये एकूण ३६ तत्त्वे सांगितलेली आहेत. यात शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर, शुद्धविद्या, माया, कला, विद्या, काल, पुरुष, प्रकृती, बुद्धी, महाभूते इत्यादी तत्त्वांचा समावेश होतो. ही ३६ कमलपुष्पे या ३६ तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात.

मंदिराचा महामंडप संगमरवरी फरसबंदी असलेला व प्रशस्त स्वरूपाचा आहे. महामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच स्तंभ आहेत. त्यावर दत्तात्रेय, नारायण, पद्मोद्भव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपाद आणि गोविंद भगवत्पाद यांच्या मूर्ती आहेत. ही आदिगुरू शंकराचार्यांची गुरु परंपरा आहे. महामंडपाच्या भिंतींवर शंकराचार्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रंगवलेले आहेत. वितानावर १००८ पाकळ्यांचे पौराणिक कमळ आहे. त्याच्या मध्यभागी बिंदुकोण आहे. तो आदि पराशक्तीचे निवासस्थान मानला जातो. समोर उंच व रुंद अशा अधिष्ठानावर मंदिराचे गर्भगृह आहे. पाच पायऱ्या चढून या अधिष्ठानावर प्रवेश होतो. दाक्षिणात्य शैलीतील या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पारंपरिक द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस स्वर्णलक्ष्मीची प्रतिमा आहे. येथे दोन्ही बाजूला दोन द्वारसेवकांच्या मोठ्या मूर्ती आहेत. आत उंच अशा संगमरवरी वेदीवर जगद्‌गुरू आद्य शंकराचार्य यांची शांत मुद्रेतील, काषायवस्त्र परिधान केलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती पांढऱ्या संगमरवरात घडवलेली आहे. वेदीच्या पुढे छोटीशी हिमशिखरासारखी रचना आहे आणि त्यावर शिवलिंग विराजमान आहे. त्याच्या पुढे शंकराचार्यांची पंचधातूची छोटी मूर्ती विराजमान आहे. वेदीलगत उंच चौथऱ्यावर शंकराची नटराज स्वरूपातील मूर्ती आहे. गर्भगृहाबाहेरील प्राकारात आगमशास्त्रांनुसार घडवलेल्या गणेश, शक्ती, सूर्य, विष्णू, दक्षिणामूर्ती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती असलेली छोटी मंदिरे आहेत. या सर्व देवतांना केलेल्या अभिषेकाचे तीर्थ पुन्हा गर्भगृहात जाते. तेथील शिवलिंग आणि आदि शंकराचार्यांच्या मूर्तीस प्रदक्षिणा घालून ते गोमुखाद्वारे बाहेर येते. गर्भगृहाच्या मागच्या बाजूस असलेल्या भिंतीवर आदि शंकराचार्य, शृंगेरी शारदा पीठातील देवी शारदांबा यांच्या प्रतिमांबरोबरच या मंदिरास आजवर भेट देऊन गेलेल्या सर्व शंकराचार्यांच्या मोठ्या तसबिरी लावलेल्या आहेत.
या मंदिरात भाविक रोज सकाळी ५.३० ते ११ आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ९ या दरम्यान आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. अक्षय्य तृतीयेला मंदिर प्रतिष्ठापना दिन साजरा केला जातो. या दिवसाचा प्रारंभ सूर्यनमस्काराने होतो. यानंतर मंदिरातील विविध देवतांना कलशाभिषेक केला जातो. त्यांना नववस्त्रे, अर्चना, नैवेद्य आणि दीपप्रदान हे विधी केले जातात. सन १९४१ पासून या मठमंदिरात ११ दिवसांचा शंकर जयंती सोहळा साजरा केला जातो. या काळात येथे महारुद्र केला जातो. मंदिरात कांची आणि शृंगेरी पीठाच्या आचार्यांचा जयंती आणि वर्धंती सोहळाही साजरा केला जातो. नवरात्रोत्सव, तसेच रामनवमी, स्कंद षष्ठी, गणेश चतुर्थी, अरुद्र दर्शनम, वैकुंठ एकादशी, अन्नाभिषेकम आदी सण व उत्सव वैदिक पद्धतीने साजरे केले जातात. रामनवमी उत्सवात प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस येथे संस्कृत रामायणाचा पाठ केला जातो. महाशिवरात्रीस येथे सायंकाळी ४ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत चार यमपूजा केल्या जातात. या पूजांच्या वेळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.
या मठात नियमित वेद आणि संस्कृत वर्ग घेतले जातात. येथून आतापर्यंत ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी वेद शिक्षणाचा लाभ घेतला आहे. मठाच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळेत सुमारे ३९ विद्यार्थी यजुर्वेद आणि सामवेदाचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या परीक्षा कांची मठाच्या ‘वेद रक्षण निधी ट्रस्ट’ मार्फत घेतल्या जातात. हा मठ केरळमधील पालक्कड येथील वेद संरक्षण समिती, महाराष्ट्रातील देऊळगाव राजा येथील श्रौत वेद पाठशाळा, परभणी येथील यज्ञेश्वर प्रतिष्ठान वेदशास्त्र पाठशाळा, तामिळनाडूतील ऋग्वेद पाठशाळा आणि कुंभकोणम, परभणी व पुणे येथील गुरुकुलांनाही साहाय्य करतो. याशिवाय, मठातर्फे ३१ वैदिक पंडित आणि अग्निहोत्रींना प्रत्येकी ५००० रुपये मासिक निवृत्तिवेतन दिले जाते. यातील बहुतेक पंडित ७५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. दरवर्षी एका संस्कृत विद्वानाला ‘आदि शंकर पुरस्कार’ दिला जातो. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. धार्मिक कार्यांव्यतिरिक्त मठातर्फे गरिबांना वैद्यकीय मदत, शहरातील अनेक कर्करोगग्रस्तांना अन्न आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवले जाते.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२४०१४३९७
    मो. ७७३८६७४३९७, ७७३८४१३१२९

आदि शंकराचार्य मंदिर / श्री शंकर मठ

श्रद्धानंद मार्ग, माटुंगा, मुंबई

Back To Home