दक्षिण गंगा, गौतमी गंगा, सप्त गोदावरी, गोला, गोलाई अशी अनेक नावे धारण केलेली गोदावरी भारतातील गंगा नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. नाशिकमध्ये उगम पावलेली ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांमधून १४६५ किमीचा टप्पा पार करीत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी ही ब्रह्म–विष्णू–महेशाचे स्वरूप असल्याची मान्यता आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात गोदावरीच्या व्युत्पत्तीची कथा दिली आहे. सर्व नद्यांमध्ये गोदावरी ही प्राचीन व श्रेष्ठ असून तिच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो व देवलोकाची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे म्हटले जाते की नर्मदेच्या तीरावर तप करण्याचे श्रेय फार मोठे आहे. भागीरथीच्या काठी आलेले मरण मोक्ष मिळवून देते. कुरुक्षेत्री दान दिल्यास अनेक पटीने पुण्य प्राप्त होते. या तिन्हींचे एकत्रित पुण्य गोदावरीच्या केवळ दर्शनाने होते, असे पुराणात सांगितले आहे. महर्षी वाल्मिकींना रामायण लिहिण्याची प्रेरणा हिच्याच तीरावर झाली. विंध्य पर्वत ओलांडून आलेले महर्षी अगस्ती ऋषींसह अनेक ऋषींनी गोदावरीच्या तीरावर वास्तव्य केले होते.
या नदीच्या उगमाबाबतची आख्यायिका अशी की महर्षी गौतम ऋषी यांच्या हातून गोहत्या घडली होती. या पापातून मुक्ततेसाठी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या केली व शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांनी शंकराकडे गंगेची मागणी केली, परंतु गंगा जटेतून बाहेर येण्यास तयार नव्हती. गंगेला भूतलावर अवतीर्ण करण्यासाठी शंकराने तांडव नृत्य केले. शंकराने आपल्या जटा जोराने जमिनीवर आपटून गंगेला जटेतून बाहेर काढले. ते स्थान म्हणजे आजचे ब्रह्मगिरी होय. ज्यावेळी गंगेचा उगम ब्रह्मगिरीवर झाला ती तिथी होती माघ शुद्ध दशमी. त्यावेळी गुरू सिंह राशीत होता व तो दिवस होता गुरुवारचा.
नाशिकमधून गोदावरी सप्तधारांनी वाहते. तिचे हे सात प्रवाह म्हणजे गौतमी, वसिष्ठा, कौशिकी, आत्रेयी, वृद्ध गौतमी, तुल्या आणि भारद्वाजी हे होत. यामुळेच तिला सप्त गोदावरी म्हणतात. त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थाच्या बाजूला व नाशिकमध्ये रामकुंडाच्या शेजारी गोदावरी मातेची मंदिरे आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीवर सुमारे १०८ कुंडे आहेत. त्यापैकी रामकुंड, कुशावर्त आदी ठिकाणी वर्षभर अनेक धार्मिक विधी केले जातात.
उत्तरेकडे गंगेला जे महत्त्व आहे तेच महत्त्व दक्षिणेकडे गोदावरीचे आहे. त्यामुळेच गोदावरीला दक्षिण गंगा, तर नाशिकला दक्षिण काशी असे म्हटले जाते. नाशिकमधील पंचवटी परिसरात अरुणा–वरुणा नदीचा प्रवाह गोदावरीस मिळतो. त्या संगमावर ब्रह्मदेवाने पापक्षालनासाठी तपश्चर्या केली होती, ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी शंकराने या संगमावर स्नान केले होते, श्रीरामांनी आपले वडील दशरथ यांचे श्राद्धविधीही याच ठिकाणी केले होते, असे संदर्भ अनेक ग्रंथांमध्ये आढळतात. समुद्र मंथनादरम्यान या नदीपात्रात अमृताचे काही थेंब पडल्याने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या तीरावर दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यावेळी अनेक थोर साधू या नदीत स्नान करीत असल्याने त्यांच्या तपाची ऊर्जा या पाण्यात उतरते व त्यामुळे गोदावरीत स्नान केल्याने सकारात्मक व आध्यात्मिक ऊर्जा भाविकांना मिळते, असे मानले जाते.
नाशिकच्या पुढे आग्नेयेकडे वाहणाऱ्या गोदावरीला २४ किमी अंतरावर उजव्या बाजूने दारणा नदी तर तेथूनच पुढे काही अंतरावर डाव्या बाजूने कादवा नदी येऊन मिळते. त्यापुढे नाशिक जिल्हा संपून गोदावरी कोपरगाव येथे नगर जिल्ह्यात प्रवेश करते. येथून गोदावरी दक्षिणवाहिनी होते. नगर जिल्ह्यातही गोदावरीच्या तीरावर अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर मंदिर, कोकमठाण येथील प्राचीन हेमाडपंती शिव मंदिर, गुरू शुक्राचार्य मंदिर, कचेश्वर मंदिर, श्रृंगऋषी मंदिर, विभांडक ऋषी मंदिर व संजीवनी पार या तीर्थांचा समावेश आहे.
अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवरून पुढे गोदावरी मराठवाड्यात प्रवेश करते. तेथे देवगड वरून वाहत आलेल्या प्रवरा नदीचा गोदावरीशी संगम होतो ते ठिकाण ‘प्रवरासंगम’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर ही नदी सातवाहनांची राजधानी ‘प्रतिष्ठाननगरी’ म्हणजेच पैठणला येते. तेथेच जायकवाडी (नाथसागर) प्रकल्प आहे. जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण असून त्याची क्षमता २९०९ दशलक्ष घनमीटर इतकी प्रचंड आहे. या प्रकल्पाजवळ वीजनिर्मिती प्रकल्पही आहे. पुढे जालना–बीड जिल्ह्याची सीमा बनलेली गोदावरी बीड जिल्ह्यात प्रवेश करते. पांचाळेश्वर येथे याच नदीपात्रात महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यानंतर राक्षसभुवन (शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक) येथे गोदावरीच्या तीरावर दुसऱ्या बाजीरावाने निजामाविरोधात पहिली लढाई जिंकली होती, अशी नोंद आहे. सिंधफणा, रेना, वाण व सरस्वती या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावलेल्या नद्या दक्षिणकडे वाहत पुढे गोदावरीस मिळतात. त्यानंतर ती पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते.
परभणी येथून पुढे शेळगाव, गंगाखेड (संत जनाबाईंचे जन्मस्थान) येथून जात असताना पुढे पूर्णा नदीला आपल्यात सामावून घेत गोदावरी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. या गोदावरीच्या तीरावर नांदेड शहरात शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांचा गुरुद्वारा आहे. त्यामुळे नांदेड हे शिखांच्या पाच पवित्र ठिकाणांपैकी एक समजले जाते. नांदेड शहराला पाणीपुरवठ्यासाठीही गोदावरीवर विष्णुपुरी बंधारा बांधण्यात आला आहे. त्यानंतर उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांचा प्रवास करत असताना महाराष्ट्र– तेलंगणा राज्याच्या सीमेवरील मांजरा नदी गोदावरीला मिळते आणि गोदावरी नदी महाराष्ट्रातील सुमारे ६६८ किमीचा प्रवास संपवून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.
नांदेड जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात प्रवेश केलेली गोदावरी नदी मंचेरिआलनंतर पुन्हा महाराष्ट्रात येते. गडचिरोली जिल्ह्याच्या वेशीवर गोदावरीचा प्राणहिता नदीशी संगम होतो. त्यानंतर ती तेलंगणातून पुढे जाते. पुढे काही अंतरावर तेलंगणा राज्यातील प्रवास संपवून गोदावरी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते. आंध्रात गोदावरी नदी ही पूर्व गोदावरी आणि दक्षिण गोदावरी या दोन जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. राजमहेंद्री येथे गोदावरी नदी दोन शाखेत विभागली जाते. ब्रह्मगिरीवरील जटा मंदिरातून उगम पावलेल्या या नदीचे पात्र पुढे राजमहेंद्रीला जाईपर्यंत ४.५ किमी एवढे विस्तीर्ण होत जाते. या नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ आहे ३,१२,८१२ चौ. किमी इतके. अशा पद्धतीने महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना सर्वार्थाने समृद्ध करत गोदावरी बंगालच्या उपसागरात विलीन होते.