पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुण्यातील गणपती म्हटले की डोळ्यांसमोर सर्वात पहिले श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे नाव येते. नवसाला पावणारा गणपती म्हणून या दैवताची ख्याती जगभर आहे. या गणपतीला पुण्यातील सर्वात श्रीमंत आणि अत्यंत उदार दैवत मानले जाते. हे मंदिर आणि दरवर्षी येथे होणारा सार्वजनिक उत्सव पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो.
या मंदिराची स्थापना १८९३ मध्ये झाली. त्यामागील कथा अशी की मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा गावचे दगडूशेठ गाडवे हे व्यवसायानिमित्त पुण्यात आले. त्यांनी बुधवार पेठेत आपला मिठाईचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा व्यवसाय खूप मोठा असल्याने लोक त्यांना ‘हलवाई’ या नावाने ओळखू लागले. पुढे तेच त्यांचे आडनाव झाले. दगडूशेठ एक यशस्वी व्यापारी होते. अत्यंत शीलवान आणि दानशूर म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन ब्रिटिशांनी त्यांना ‘नगरशेठ’ हा बहुमान दिला. दगडूशेठ यांना व्यायामाची आवड होती. ते स्वतः निष्णात मल्ल होते. ते पुण्यातील प्रसिद्ध जगाबा तालमीचे वस्ताद म्हणून ओळखले जात. त्यांनी अनेक मल्ल घडवले होते.
दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यात अचानक एक दुःखद घटना घडली. १८९२ च्या सुमारास पुण्यावर प्लेगच्या महामारीचे भीषण संकट आले. या साथीच्या आजारात त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला गमावले. मुलाच्या मृत्यूमुळे या दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मनात संसाराविषयी विरक्ती निर्माण झाली. याच कठीण काळात त्यांची भेट आध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराज यांच्याशी झाली. महाराजांनी या शोकाकुल दांपत्याला धीर दिला. महाराजांनी त्यांना श्रीदत्तात्रेय आणि गणपतीची मूर्ती स्थापन करण्याचा सल्ला दिला. या दैवतांची सेवा आपल्या मुलाप्रमाणे करा असे त्यांनी सांगितले. ही दैवते तुमचे नाव आणि कीर्ती जगभर पसरवतील असा आशीर्वाद महाराजांनी दिला. महाराजांच्या शब्दांनी दगडूशेठ यांना नवी उमेद मिळाली. त्यांना जगण्याचे बळ मिळाले.
त्यांनी बुधवार पेठेत गणपतीची मातीची मूर्ती आणि दत्ताची संगमरवरी मूर्ती स्थापन केली. आजही श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि गणपती मंदिर त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. या गणपतीचा इतिहास भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेला आहे.
१८९३ मध्ये या गणपतीची स्थापना झाली. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून मिळाले. त्या काळात ब्रिटिशांनी राजकीय सभांवर बंदी घातली होती. धार्मिक कार्यक्रमांना मात्र कायदेशीर परवानगी होती. ही संधी ओळखून लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले. यामुळे लोक एकत्र आले. त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली. १८९६ मध्ये दगडूशेठ हलवाई यांनी आपल्या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. ही पुण्याच्या इतिहासातील मोठी घटना आहे.
सुरुवातीच्या काळात हा गणपती ‘कोतवाल चावडीचा गणपती’ म्हणून ओळखला जात असे. याला ‘बाहुलीच्या हौदाचा गणपती’ असेही म्हणत. डॉक्टर विश्राम घोले यांनी आपल्या मृत मुलीच्या स्मृतीसाठी तिथे एक हौद बांधला होता. त्या हौदावर एक बाहुली होती. त्यावरून या परिसरातील गणपतीला हे नाव पडले. आज मंदिरात जी भव्य मूर्ती आहे ती मंडळाची तिसरी मूर्ती आहे. पहिली मूर्ती १८९३ मध्ये बाबुराव नाईक यांनी तयार केली होती.
ती सध्या शुक्रवार पेठेतील राम मंदिरात आहे. त्यानंतर १८९६ मध्ये दुसरी मूर्ती तयार केली. ती सध्या ट्रस्टच्या कोंढवा येथील केंद्रात आहे. सध्याची प्रसिद्ध मूर्ती १९६८ मध्ये मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केली गेली. या मूर्तीची निर्मिती कर्नाटकचे प्रख्यात शिल्पकार श्री. शंकरअप्पा शिल्पी यांनी केली.
मूर्ती बनवण्याचे काम सुरू असताना मोठे सूर्यग्रहण होते. या ग्रहणकाळात शिल्पकाराने देवाची विशेष आराधना केली. मूर्तीच्या उदरभागात एक सिद्ध केलेले श्रीयंत्र बसवले आहे. या यंत्रामुळे मूर्तीचे आध्यात्मिक तेज काळानुसार वाढत राहील अशी भक्तांची श्रद्धा आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचे आकर्षण अनेक दिग्गज व्यक्तींना आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी आपले पहिले गाणे याच गणपतीच्या मंडपात गायले होते. भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी १९७५ मध्ये या गणपतीची आरती केली होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनी या गणपतीला नवस बोलला होता. अमिताभ बच्चन बरे झाल्यानंतर त्यांनी स्वतः पुण्यात येऊन गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले. आजही अनेक कलाकार, राजकारणी आणि खेळाडू या गणपतीच्या दर्शनासाठी येतात.
या मंदिराची स्थापत्यशैली प्राचीन भारतीय मंदिर परंपरा आणि आधुनिक भव्यता यांचा संगम आहे. मंदिराचे मुख्य बांधकाम दगडी आणि संगमरवरी पाषाणात केले आहे. प्रवेशद्वार अत्यंत भव्य आणि नक्षीदार आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भिंतींना लावलेली काचेची तावदाने. यामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या भक्तांना गणेशाचे दर्शन सहज घेता येते. मंदिराच्या गर्भगृहातील भिंतींवर बारीक आणि कलात्मक नक्षीकाम केले आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी ७.५ फूट उंच आणि ४ फूट रुंद अशी गणेशाची सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती भव्य आकारासोबतच सुबकता आणि तेजामुळे भाविकांना भुरळ घालते. गणपतीचे कान, हात आणि मुकुट शुद्ध सोन्याचे आहेत. त्यावर हिरे, माणके आणि पाचू यांसारखी मौल्यवान रत्ने आहेत.
मंदिराचे शिखर आणि कळस पारंपरिक भारतीय स्थापत्यशैलीची साक्ष देतात. मंदिराच्या छतावरील कठड्यावर स्वस्तिक चिन्ह आणि मंगल कलश यांची सजावट आहे.
हे शिखर अनेक स्तरांमध्ये विभागलेले आहे. वरच्या दिशेला ते निमुळते होत जाते. संपूर्ण शिखराला सोनेरी झळाळी दिली आहे. त्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर ते अधिक सुंदर दिसते. शिखराच्या प्रत्येक स्तरावर कोरीव काम केले आहे. त्यामध्ये लहान मेघडंबरी आणि गवाक्षांची रचना आहे. शिखराच्या शिरोभागी सोन्याचा कळस आहे. मुख्य शिखराच्या आजूबाजूला लहान आकाराचे घुमट आणि छत्र्यांची रचना केली आहे. यामुळे ही वास्तू एखाद्या राजवाड्यासारखी भासते. रात्रीच्या वेळी जेव्हा या शिखरावर विद्युत रोषणाई केली जाते तेव्हा मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते.
या मंदिरात गणेश जयंती, संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यांसारखे सण साजरे होतात. गणेशोत्सवाच्या काळात येथे दरवर्षी देशातील प्रसिद्ध मंदिरांचे भव्य देखावे साकारले जातात. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत या गणपतीचा रोषणाई केलेला रथ पाहण्यासाठी हजारो नागरिक गर्दी करतात. ऋषिपंचमीच्या दिवशी होणारे हजारो महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण हा येथील शिस्तबद्ध उपक्रम आहे. दररोज सकाळी साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांना या गणपतीचे दर्शन घेता येते. सकाळी, दुपारी व सायंकाळी येथे आरती केली जाते. यासह अभिषेक आणि मूर्तीचा शृंगार केला जातो. रात्री १०.३० वाजता शेजारती होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट शैक्षणिक महत्त्वासोबतच आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान देते. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे आणि गरजू रुग्णांवर उपचार करणे अशा प्रकारच्या सेवाही ट्रस्टतर्फे दिल्या जातात.