लंकाधीश रावणाने जेव्हा हनुमानाला बंदी बनविण्याचा प्रयत्न करून त्याच्या शेपटीला आग लावण्यास सांगितली, तेव्हा हनुमानाने लंकेचा विध्वंस केला होता. पुराणातील ही कथा सर्वश्रूत असली तरी नागपूर जिल्ह्यात बेलोना येथे असे एक गाव आहे जेथे वर्षभर हनुमानाला बंदीत ठेवले जाते व वर्षातील केवळ अडीच दिवस त्याला बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे येथील हनुमान ‘बंदी हनुमान’ म्हणून प्रसिद्ध असून तो येथील विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापित आहे.
बंदी हनुमानाची आख्यायिका अशी की बेलोना गावात नरहरी जोशी नामक एक गृहस्थ राहत. वेदशास्त्रात निपुण असल्यामुळे त्यांना सर्वजण गुरुजी म्हणून संबोधित असत. सर्व ग्रामस्थ या गुरुजींना विचारल्याशिवाय कोणतेही शुभकार्य करीत नसत. एके दिवशी अचानक गावातील एका गोठ्याला आग लागली. गावातील प्रत्येक जण ही आग विझविण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांच्या प्रयत्नांनी हळूहळू आग आटोक्यात आली; परंतु त्याच वेळी ज्या ठिकाणी आग लागली होती तेथील जमिनीखालून आवाज येऊ लागला.
जमिनीखालून येणाऱ्या आवाजाने गावकरी अचंबित झाले व त्यांनी गुरुजींकडे याबाबत तोडगा विचारला. गुरुजींनी अंतर्ज्ञानाने येथे बाल हनुमानाची मूर्ती असल्याचे जाणले. जमीन खोदण्यास सुरुवात केली असता ग्रामस्थांना एक पेटी सापडली. ती पेटी ते काढणार तशी ती जमिनीत खाली जाऊ लागली. गुरुजींनी हनुमानाची प्रार्थना करून अजाणतेपणी काही चूक झाली असेल तर माफी मागितली. तेव्हा पेटीतून आवाज आला की मी वर येईन, पण फक्त अडीच दिवसांसाठी! त्यानंतर पुन्हा मी माझ्या स्थानावर जाईन. त्यावेळी गुरुजींनी भक्तिभावाने हनुमानाला विनंती केली की ‘तुझी इच्छा असेल तर तू अडीच दिवसच बाहेर ये, पण ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तरी तू येथे कायमचे वास्तव्य कर.’ गुरुजींची ही विनंती हनुमानाने मान्य केली व पेटी अलगद जमिनीच्या वर आली. पेटी उघडून पाहिली असता त्यात नमस्कार मुद्रेतील बाल हनुमानाची मूर्ती होती. ग्रामस्थांनी या मूर्तीची विधिवत पूजा–अर्चा करून गावातील विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून येथे हनुमानाचा प्रकटदिन सोहळा पार पडतो. २६० हून जास्त वर्षांची या उत्सवाला परंपरा आहे.
नागपूरमधील नरखेड तालुक्यातील बेलोना या गावाच्या मध्यभागी प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरातील गाभाऱ्यात विठ्ठल व रुख्मिणी यांच्या मूर्ती मुख्य असल्या तरी त्यांच्या बाजूला लाल रेशमी कपड्यात गुंडाळलेली हनुमानाची मूर्ती व या हनुमानाची प्रकटदिन रथयात्रा येथील प्रमुख आकर्षण आहे. हे बजरंगबली वर्षभर या विठ्ठल मंदिरात बंदिस्त असतात; परंतु ते जेव्हा अडीच दिवसांसाठी बाहेर येतात तेव्हा गावात उत्सवाचे वातावरण असते.
मूळ विठ्ठल–रुख्मिणी मंदिरातील हनुमानाची मूर्ती नेहमीच्या बलशाली स्वरूपात नसून बालस्वरूपात आहे. ही मूर्ती हात जोडून उभी आहे. अडीच दिवसांच्या प्रकटदिन उत्सवापैकी मार्गशीर्ष चतुर्थीला कापडात गुंडाळलेल्या या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी ही मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी गाभाऱ्यातील विठ्ठल–रुख्मिणी मूर्तीच्या समोर ठेवली जाते. त्यानंतर सायंकाळी मूर्ती रथात ठेवून रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेलाही सुमारे २६० वर्षांची परंपरा आहे. रथयात्रेच्या मार्गावर व प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. मंदिरासह संपूर्ण गावात रोषणाई करण्यात येते. संपूर्ण गाव यावेळी हजारो भाविकांनी गजबजून जातो. रात्री उशिरा ही रथयात्रा पुन्हा मंदिराजवळ येते.
दुसऱ्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात येतो, तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी हनुमान पुन्हा येथील विठ्ठल मंदिरात बंदी स्वरूपात राहतात. असे सांगितले जाते की उत्सव काळातील तीनही दिवशी हनुमानाच्या मुद्रा वेगवेगळ्या भासतात. पहिल्या दिवशी हास्यवदन मुद्रा, दुसऱ्या दिवशी शांत, तर तिसऱ्या दिवशी रौद्रमूर्तीचे दर्शन होते.
हनुमानाची मूर्ती जरी अडीच दिवसांसाठी बाहेर काढण्यात येत असली तरी हा कार्यक्रम मात्र गावकरी आठवडाभर साजरा करतात. येथील नोंदीनुसार या उत्सवासाठी येथे २ ते २.५ लाख भाविक येतात. नोकरी–व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे येथील ग्रामस्थ आवर्जून यावेळी येतात. असे सांगितले जाते की संत तुकडोजी महाराज व संत गुलाबबाबा यांनीही या रथयात्रेत सहभाग घेतला होता. नवसाला पावणारा व इच्छापूर्ती करणारा हा बाल हनुमान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संतानप्राप्तीसाठी बाल हनुमानाकडे नवस करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मंदिरात नर्मदामाता व महादेव यांचीही मंदिरे आहेत.
कोणत्याही धार्मिक उत्सवानंतर देवाला बंदीत अथवा झाकून ठेवण्याची आपल्याकडे प्रथा नसली तरी ही मूर्ती मात्र वर्षाचे ३६२ दिवस बंदीत असते. तेच या मंदिराचे वेगळेपण आहे. या मंदिरावर असलेली भाविकांची श्रद्धा व वर्षभरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे राज्य शासनाने या मंदिराचा तीर्थक्षेत्राच्या ‘क’ दर्जाच्या यादीत समावेश केला आहे.