मल्लिकार्जुन मंदिर

रामपुरी (बुद्रुक), ता. मानवत, जि. परभणी

गोदावरी, अमृता व पवित्रा या तीन नद्यांच्या संगमावर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामपुरी (बुद्रुक) येथे मल्लिकार्जुन महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ‘बारा हनुमंतांची रामपुरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातील प्राचीन मंदिरांमुळे हे जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात हनुमानाच्या बारा मंदिरांबरोबरच पौराणिकदृष्ट्या महत्त्वाची अशी आठ-दहा शिवालयेही आहेत. त्यातील मल्लिकार्जुन मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाची ब्रह्मदेव व श्रीविष्णू यांनी पूजा केल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. या मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या तीरावर धनुष्यासारखा आकार केलेले ‘पापदंड (पापनाश) तीर्थ’ आहे. या तीर्थाजवळ पापदंडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘पापनाश तीर्थात’ स्नान केल्यास पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मल्लिकार्जुन मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेव आणि श्रीविष्णू यांच्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण, यावरून एकदा वाद झाला. तो मिटवण्यासाठी ते शिवशंकरांकडे गेले. तेव्हा, “तुमच्यापैकी ज्याला माझ्या शिवलिंगाचे उगमस्थान किंवा अंतस्थान दिसेल, तो श्रेष्ठ समजावा,” असे महादेवांनी सांगितले. त्यानुसार ब्रह्मदेव व श्रीविष्णूंनी शिवलिंगाचे उगमस्थान किंवा अंतस्थान शोधण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव ऊर्ध्व दिशेने तर श्रीविष्णू अधोदिशेने निघाले. परंतु दोघांपैकी एकालाही शिवलिंगाचा आरंभ किंवा अंत शोधता आला नाही. अखेर त्या दोघांनी पृथ्वीवर येऊन शिवशंकरांची प्रार्थना केली आणि शिवशंकर लिंगाकार झाले. ब्रह्मदेव आणि श्रीविष्णू यांनी परिसरात नुकत्याच उमललेल्या ‘मल्लिका’ व ‘अर्जुन’ या वृक्षांची फुले अर्पण करून या शिवलिंगाची पूजा केली. त्यामुळे या शिवलिंगाला ‘मल्लिकार्जुन महादेव’ असे नाव पडले.

प्राचीन काळी ‘प्रभावती नगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या परभणीपासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर रामपुरी हे गाव आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या गावाच्या शिवारात वनवासादरम्यान प्रभू रामचंद्रांचे काही काळ वास्तव्य होते, अशी मान्यता आहे. या गावात हनुमानाच्या मुख्य मंदिराबरोबरच ‘मोठा मारुती’, ‘नवरा हनुमान’, ‘दसरा हनुमान’ आणि ‘शनि हनुमान’ अशी मारुतीची पाच मंदिरे आहेत. तसेच परिसरातील शेतशिवारात हनुमानाची सहा मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमुळे या गावाला ‘बारा हनुमंतांची रामपुरी’ असेही म्हणतात. या गावात पापदंडेश्वर, ब्रह्मेश्वर, सोमेश्वर, धर्मेश्वर, सिद्धेश्वर, खंडेश्वर, रामेश्वर, गोकर्णेश्वर व नर्मदेश्वर आदी नावांनी प्रसिद्ध असलेली अनेक शिवालये आहेत. त्यांच्या संदर्भातही स्वतंत्र पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत.

मल्लिकार्जुन मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पापदंडेश्वर मंदिर आहे. शिव-पार्वती विवाहाच्या वेळी पार्वतीच्या सौंदर्यामुळे मोहित झालेले ब्रह्मदेव कामविव्हल झाले. या घटनेमुळे लज्जित झालेल्या ब्रह्मदेवांना आपल्या हातून पाप घडल्याची खंत वाटू लागली. या पापापासून मुक्ती कशी मिळवावी, अशी पृच्छा त्यांनी शिवशंकरांकडे केली. त्यावर महादेवांनी मल्लिकार्जुन मंदिरापासून काही अंतरावर सर्व तीर्थांचे जल एकत्र केले आणि ते एका कुंडात टाकले. “या कुंडात स्नान केल्यावर तुमच्या पापाचा नाश होईल,” असे शिवशंकर ब्रह्मदेवांना म्हणाले. त्यानुसार ब्रह्मदेव व अन्य देवांनी या कुंडात स्नान केले. त्यामुळे त्यांचे पाप नष्ट झाले. म्हणून या तीर्थाला ‘पापदंड (पापनाश) तीर्थ’ आणि येथील शिवलिंगाला ‘पापदंडेश्वर’ असे नाव पडले. पापदंड तीर्थाचा आकार धनुष्यासारखा आहे. या धनुष्याची दोरी म्हणजे गोदावरी नदी असल्याचे सांगण्यात येते. या धनुष्याच्या एका टोकाला ‘पापदंडेश्वर’ तर दुसऱ्या टोकाला ‘रामेश्वर’ मंदिर आहे.

कालांतराने सर्व देव-देवतांनी येथील मल्लिकार्जुन शिवलिंगाची अमृताने पूजा करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्वर्गातून अमृत, कल्पवृक्ष व फुले आणली. मात्र देव-देवतांनी अमृत पृथ्वीवर आणले असल्याचे समजताच हजारो दैत्य येथे आले. अमृत मिळवण्यासाठी ते देव-देवतांना त्रास देऊ लागले. त्यामुळे सर्व देव-देवतांनी अमृताच्या रक्षणासाठी शिवशंकरांचा धावा केला. त्यानंतर महादेवांनी पाठवलेल्या भैरवाने ६४ योगिनींच्या शक्तींच्या मदतीने दैत्यांचा संहार केला. त्यानंतर देव-देवतांनी मल्लिकार्जुन व भैरवाची पूजा करत भैरवाला येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. ती मान्य करून भैरव मल्लिकार्जुन मंदिराच्या दक्षिण दिशेला आणि सर्व योगिनी ईशान्य दिशेला राहिल्या. येथील भैरव ‘क्रोधभैरव’ म्हणून प्रसिद्ध आहे. पूजा करण्यापूर्वी महादेवांनी सर्व देव-देवतांना गणेशाची स्थापना करण्यास सांगितले. या गणेशाचे स्थान पापदंडेश्वर मंदिरानजीक आहे. मल्लिकार्जुन महादेवाची पूजा करण्यासाठी आणलेले अमृत देव-देवतांनी परिसरातील एका विहिरीत ठेवले. त्यानंतर अनेक तीर्थेही येथे आली. ती विहिरीबाहेर येथे येऊन वाहू लागली. या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या नदीला ‘अमृता नदी’ असे म्हणतात. त्यानंतर ब्रह्मदेवांनी या क्षेत्रात ब्रह्मेश्वर महादेवाची तर अन्य देव-देवतांनी अन्य शिवलिंगांची स्थापना केली. मल्लिकार्जुन महादेवाच्या पूजेकरिता पंचामृत बनवण्यासाठी लागणाऱ्या दुधाची गरज भागवण्यासाठी देव-देवतांनी स्वर्गातून कामधेनूला येथे आणले. ही पूजा करताना पंचामृताचे पाट वाहू लागले. त्याचे पुढे नदीत रूपांतर झाले आणि ती नदी पवित्रा नदी म्हणून प्रसिद्ध झाली.

या परिसरात पूर्वी सोमनाथ नावाचा पापी मनुष्य राहत होता. एके दिवशी चोरांच्या हातून तो मारला गेला. मृत्यूनंतर यमदूत सोमनाथला घेऊन जात असताना त्याच्या दृष्टीस मल्लिकार्जुन व पापदंडेश्वर मंदिर पडले. या मंदिरांच्या दर्शनाने त्याचे पाप नष्ट झाले. त्यानंतर त्याला कैलासावर नेण्यासाठी येथे आलेल्या शिवदूतांचे यमदूतांशी भांडण सुरू झाले. ते सोडवण्यासाठी येथे आलेल्या यमाला शिवशंकरांनी या तीर्थांचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर यम आपल्या दूतांसह निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने स्थापन केलेल्या शिवलिंगाला ‘धर्मेश्वर’ या नावाने ओळखले जाते. या घटनेनंतर कृत्यांचा पश्चात्ताप झालेल्या सोमनाथने येथे तप करून शिवलिंगाची स्थापना केली. ते शिवलिंग ‘सोमेश्वर’ म्हणून प्रसिद्ध आहे.

ब्रह्मदेवांना सनक, सनंदन, सनातन व सुजात असे चार पुत्र होते. आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हावी यासाठी ते चौघे एकदा ब्रह्मदेवांकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना पापदंड तीर्थाची महती सांगत या तीर्थात स्नान करून तप करण्यास सांगितले. त्यानुसार येथे आलेल्या या चौघांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला ‘सिद्धेश्वर’ असे नाव पडले. कालांतराने येथे गौतम ऋषींनी तप केले. त्यासाठी त्यांनी गंगेची मागणी केली. त्यामुळे नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावलेल्या गंगेला पापदंड तीर्थाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. ती वैशाख पौर्णिमेच्या दिवशी येथे आली. या दिवशी पापदंड तीर्थात स्नान केल्यास पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. मल्लिकार्जुन मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभलेला आहे. पेव्हरब्लॉकची फरसबंदी केलेल्या भव्य प्रांगणात आंबा, नारळ, चिंच अशी अनेक झाडे आहेत. प्रांगणात मधोमध हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारण्यात आलेल्या मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन होते. या मंदिरासमोर गणेशाची प्राचीन मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन प्राचीन मूर्ती आहेत. मंदिरासमोर तसेच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस नंदीच्या दोन मूर्ती आहेत. त्यांपैकी एक भग्नावस्थेत आहे. प्रवेशद्वार आकाराने लहान असल्याने नतमस्तक होऊन आत प्रवेश करावा लागतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. स्तंभपादावर उभ्या असलेल्या येथील स्तंभांवर विविध आकार कोरलेले आहेत. वितानावरही नक्षीकाम आहे. सभामंडपात मोठ्या शाळुंकेमध्ये एक शिवलिंग आहे. सभामंडपात समोरील बाजूस दोन देवकोष्टके आहेत. अंतराळाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभांच्या पायथ्याशी मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. त्यावर कलाकुसर असून खालील भागात काही मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृह १५ ते २० फूट खोल आहे. आठ-दहा दगडी पायऱ्या उतरून येथे यावे लागते. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये मल्लिकार्जुन शिवलिंगाचे दर्शन घडते.

या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर कालौघात नष्ट झाले आहे. मंदिराच्या बाह्यभिंतींवर काही देवकोष्टके कोरण्यात आली आहेत. मंदिरासमोरच एका छोट्या चौथऱ्यावर हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूला उघड्यावर एक शिवलिंग आहे. नजीकच असलेल्या स्थानाला ‘सीतान्हाणी’ असे म्हणतात. मंदिर परिसरात काही खोल्याही आहेत.

गावातील सर्वात जुन्या असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरातील शिवलिंगावर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. दर दिवशी येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव असतो. त्यानिमित्त येथे सप्ताहाचेही आयोजन करण्यात येते. मुख्य उत्सवाच्या दिवशी येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या दिवशी येथे ‘मल्लिकार्जुन महापुराण’ आणि ‘शिवपुराण’ यांचेही पठण केले जाते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • मानवत येथून ३२ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून ३३ किमी अंतरावर
  • मानवत व परभणी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

मल्लिकार्जुन मंदिर

रामपुरी (बुद्रुक), टी. हुमानत, जिला. परभनी

Back To Home