‘अशी एकही हिंदू व्यक्ती – मग ती निर्धन असो वा सधन, शिक्षित असो वा अशिक्षित – नसेल की जिला भुलेश्वर आणि मुंबादेवीची माहिती आहे, परंतु माधवबाग मात्र माहीत नाही.’ १३२ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ या के. रघुनाथजी यांच्या पुस्तकातील हे विधान ‘माधवबाग’चे मुंबईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील स्थान अधोरेखित करीत आहे. दक्षिण मुंबईच्या अर्थकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या भुलेश्वर-सी.पी. टँक या व्यापारी परिसरात वसलेल्या या माधवबागेत लक्ष्मी-नारायणाचे दीड शतकाचा इतिहास असलेले मंदिर वसले आहे.
ब्रिटिश वसाहतकाळात अठराव्या-एकोणिसाव्या शतकात मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आणि देशातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून आकारास येत होते. गुजरात, राजस्थानमधून आलेल्या व्यापारी समाजाने येथे मोठा जम बसवला होता. भुलेश्वर, काळबादेवी, झवेरी बाजार, कावसजी पटेल टँक परिसरात गुजराती, कच्छी व्यापारी समाज मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला होता.
या काळात मुंबईतील विविध समुदायांतील धनवंतांनी आपल्या धार्मिक श्रद्धा आणि अस्मिता जपण्यासाठी, सांस्कृतिक-सामाजिक आवश्यकतांची पूर्ती करण्यासाठी येथे आपापली देवालये स्थापन केली. लक्ष्मी-नारायण मंदिर हे त्यापैकी एक होय. पौराणिक कथांनुसार, सृष्टीचा पालनहार असलेला विष्णू आणि धनसमृद्धीची देवता लक्ष्मी यांना हे मंदिर समर्पित आहे. माधवबाग संकुलाची आणि त्यातील या मंदिराची स्थापना मुंबईतील तत्कालीन धनसंपन्न व्यापारी व सावकार वरजीवनदास व नरोत्तमदास शाह या बंधूंनी इ.स. १८७५ मध्ये केली.
वरजीवनदास शाह हे मूळचे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील घोघा या गावचे. सौराष्ट्र-काठियावाडमध्ये मूळ असलेल्या कपोल या गुजराती वैश्य/बनिया ज्ञातीमध्ये २८ जानेवारी १८१७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज रुपाजी धनजी हे घोघातून प्रथम दीव येथे स्थलांतरित झाले. तेथे ते पोर्तुगीजांचे कंत्राटदार म्हणून काम करीत असत. सन १६९२ मध्ये ते मुंबईस आले व ईस्ट इंडिया कंपनीचे कंत्राटदार म्हणून काम करू लागले. याच बरोबर त्यांनी येथे व्याजाने पैसे देण्याचा व्यवसायही सुरू केला. कंत्राटदारी आणि सावकारीच्या या व्यवसायातून त्यांनी येथे मोठी धनसंपत्ती कमावली.
त्यांचे ज्येष्ठ पुत्र आणि पुढे मुंबईचे नगरशेठ झालेले मनोरदास, नातू रणछोडदास, तसेच पणतू माधवदास यांनी आपला हा कौटुंबिक व्यवसाय अधिक वृद्धिंगत केला. माधवदास यांना मोहनदास, मूलजीभाई, गोपालदास, नरोत्तमदास आणि वरजीवनदास अशी पाच मुले होती. सन १८३७ मध्ये मोहनदास यांचे निधन झाले. त्यानंतर या पाच मुलांपैकी नरोत्तमदास आणि वरजीवनदास यांनी एकत्र येऊन आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. अल्पावधीत वरजीवनदास यांचे एक यशस्वी व प्रतिष्ठित व्यापारी म्हणून नाव झाले. त्या काळात, सन १८७४ मध्ये सी.पी. टँक परिसरातील एक मोठी जागा त्यांनी खरेदी करून विकसित केली. त्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येते. ही जागा त्यावेळी लालबाग म्हणून ओळखली जाई. वरजीवनदास यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या परिसराला ‘माधवबाग’ असे नाव दिले.
मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात या माधवबागेस महत्त्वाचे स्थान आहे. ब्रिटिश सरकारने बालविवाह रोखण्यासाठी, मुलींचे विवाहाचे वय १४ वा १६ वर्षांहून कमी असता कामा नये, असा कायदा करण्याचे सन १८८६ मध्ये ठरवले. त्या वेळी या कायद्यास विरोध करण्यासाठी वरजीवनदास यांनी माधवबागेत मोठी सभा आयोजित केली ही. त्यास १५० सनातनी हिंदू नेते उपस्थित होते. या मोठ्या विरोधामुळे त्या वर्षी त्या कायद्याचे विधेयक मंजूर झाले नाही. वरजीवनदास यांना हिंदूंप्रमाणेच मुस्लिम समाजातही मोठा मान होता. ११ ऑगस्ट १८९३ मध्ये काळबादेवीतील हनुमान लेन येथे मोठा हिंदू-मुस्लिम दंगा झाला. पाहता पाहता तो परळ, कामाठीपुरा, ग्रँट रोड, चिंचपोळी, माझगांव, तसेच टँक बंदर भागात पसरला. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने नाविक दलाच्या दोन तुकड्या उतरवल्या होत्या. तीन दिवस ती दंगल चालली.
त्या वेळी हिंदू-मुस्लिम समाजात शांतता आणि बंधुभाव प्रस्थापित व्हावा या हेतूने वरजीवनदास यांनी ३१ ऑगस्ट रोजी आपल्या निवासस्थानी हिंदू व मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांची बैठक बोलावली होती. याच माधवबागेत वैदिक धर्म तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते व सामाजिक-आध्यात्मिक नेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे वडील वैजनाथशास्त्री आठवले यांनी सन १९२६ मध्ये श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा स्थापन केली. पांडुरंगशास्त्री यांच्या स्वाध्याय चळवळीचे बीजारोपण झाले ते येथेच. अशा या माधवबागेच्या निर्माणानंतर पुढच्याच वर्षी, विक्रम संवत् १९३१ वैशाख शुद्ध द्वादशीच्या मुहूर्तावर येथे लक्ष्मी-नारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
एका उंच कमानदार प्रवेशद्वारातून माधवबागेच्या विस्तीर्ण प्रांगणात प्रवेश होतो. आत प्रवेशद्वाराच्या लगत उजवीकडे शमीचा वृक्ष आहे. अनेक भाविक या वृक्षाची पूजा करतात. येथे उजवीकडे इच्छापूर्ती गणेशाचे मंदिर आहे. वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात उंच वेदीवर गणेशाची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. येथील भिंतीवर अष्टविनायकांच्या प्रतिमा आहेत. समोर काही अंतरावर उजव्या बाजूस लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे.
एकोणिसाव्या शतकातील देशज स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिराची उभारणी भीमा रामजी या तत्कालीन सुप्रसिद्ध स्थापत्यविशारदाने केली आहे. सभामंडप, गर्भगृह, उंच शिखर अशी संरचना असलेल्या या मंदिराच्या बांधकामात पोरबंदर पाषाणाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे. काही फूट उंच जगतीवर बांधलेल्या या सभामंडपाच्या तिन्ही बाजूंना संगमरवरी पायऱ्यांची रचना आहे. या पायऱ्यांनजीक गजराजांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. सभामंडप खुल्या प्रकारचा आहे आणि त्यात प्राचीन पद्धतीचे गोलाकार कोरीव दगडी स्तंभ आहेत. महिरपी कमानींनी हे स्तंभ एकमेकांस जोडलेले आहेत. सभामंडपाचे छत समतल आहे. त्याच्या समोरील भागात कठड्यावर योगासनातील दोन ऋषीमूर्ती आहेत. मध्यभागी संगमरवरी देव्हाऱ्यात हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपाच्या वितानावरील सुंदर नक्षीकामावर गुजराती आणि राजस्थानी मंदिर स्थापत्यकलेचा स्पष्ट प्रभाव आहे.
मंदिराच्या गर्भगृहास त्रिशाखीय संगमरवरी प्रवेशद्वार आहे. द्वारचौकटीच्या स्तंभशाखेवर सुबक कोरीव नक्षीकाम केलेले आहे. द्वारचौकटीच्या वरच्या उतरांग भागामध्ये गणेश आणि रिद्धी-सिद्धीच्या मोठ्या मूर्ती विराजमान आहेत.
आत उंच अधिष्ठानावर लक्ष्मी-नारायणाची संगमरवरी पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. रेशमी वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेल्या या मूर्तीविषयी अशी आख्यायिका सांगण्यात येते की या मंदिराची स्थापना करण्याचे निश्चित झाले, तेव्हा त्या काळातील सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराला या मूर्तीच्या घडणीचे काम देण्यात आले होते. मूर्तिकाराने आपले कलाकौशल्य पणाला लावून, अत्यंत एकाग्रतेने ही श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती साकारली. मूर्ती पूर्ण झाल्यानंतर तिचे रूप इतके सात्त्विक, जिवंत आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे झाले होते की खुद्द तो मूर्तिकारही त्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. या मूर्तीमध्ये प्रकट झालेल्या सौंदर्याने भारावून जाऊन त्या मूर्तिकाराने आपले उर्वरित संपूर्ण आयुष्य इतर कोणतीही मूर्ती न घडवता, केवळ याच लक्ष्मीनारायणाच्या चरणाशी सेवा करण्यात व्यतीत करण्याचा संकल्प केला. येथे प्रदक्षिणामार्गावर आणि संकुलात श्री लक्ष्मीनारायणासोबतच मुरलीधर श्रीकृष्ण आणि कालभैरवी महालक्ष्मी माता यांचीही स्वतंत्र उप-मंदिरे आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर सुमारे १७ फूट उंचीचे शिखर आहे. या शिखराची रचना अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. चौरस आणि गोलाकारांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून उभारलेल्या या शिखरावर चारी दिशांनी ऋषींच्या मूर्ती आहेत.
त्यातील देवकोष्ठकांत श्रीकृष्णाबरोबर विविध देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत. शिखराच्या शीर्षभागी मोठा घुमट आहे. त्यावर द्विस्तरीय कलश आहे.
या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत भाविकांना देवदर्शन घेता येते. येथे सकाळी ६.३० वाजता मंगल आरती होते. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता शृंगार आणि राजभोग आरती होते. रात्री ७ वाजता सायंआरती व भोग होतो आणि रात्री ८.३० वाजता शयन आरती होते. रामनवमी आणि कृष्णाष्टमी हे या मंदिरातील मुख्य उत्सव होत. हे दोन्ही उत्सव या मंदिरात अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या दिवशी मुख्य गर्भगृहाला आणि संपूर्ण मंदिराला विशेष फुलांची आणि दिव्यांची आरास केली जाते. व्यापारी परिसर जवळ असल्याने दीपावलीत आश्विन अमावास्येला म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथे अलोट गर्दी होते. या काळात लक्ष्मीनारायणाला ५६ पदार्थांचा विशेष नैवेद्य (अन्नकूट) दाखवला जातो.
या मंदिर संकुलाच्या पाठीमागच्या भागात एक गोशाळा आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला काही अंतरावर माधवबागेचे संस्थापक शेठ वरजीवनदास शाह यांचा संगमरवरी अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. २७ मे २०२५ रोजी या मंदिराचा १५० वा वर्धापन दिन सोहळा येथे अत्यंत भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.