केपे तालुक्यातील अवेडे येथे असलेले शांतादुर्गा चामुंडेश्वरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की तेथील देवीचे मुळस्थान हे सासष्टी येथील कुडतरी गावात आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या मंदिरात देवी शांतादुर्गा आणि चामुंडेश्वरी यांच्या मूर्ती एकमेकांच्या शेजारी एकाच वज्रपिठावर प्रतिष्ठापित आहेत. सोळाव्या शतकापासूनचा इतिहास असलेले हे मंदिर गोव्यातील प्राचीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.
असे सांगितले जाते की शांतादुर्गा चामुंडेश्वरी देवीचे मूळ मंदिर इ.स. १५६० पर्यंत सासष्टीतील कुडतरी गावातील सांदीवल किंवा सांदेल्व नामक वाडा येथे स्थित होते. त्या काळात पोर्तुगीजांच्या क्रूर धर्मांधतेमुळे येथील स्थानिकांना परागंदा व्हावे लागले. पोर्तुगीजांनी त्यावेळी अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. मंदिरातील देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी आधीच अनेक मूर्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. कुडतरी येथील मंदिरातील शांतादुर्गा व चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीही अशाच प्रकारे प्रथम चंद्रवाडी क्षेत्रात हलवण्यात आल्या. त्यानंतर केपे तालुक्यातील अवडे (अवेदेम) गावातील घुडो वाडा येथे त्यांची स्थापना करण्यात आली. ते मंदिर जरी अवेडे येथे असले तरीही ते ‘शांतादुर्गा चामुंडेश्वरी कुडतरी महामाया देवस्थान’ या म्हणजेच कुडतरी गावाच्या नावानेच ओळखले जाते.
स्कंद पुराणातील सह्याद्रीखंडानुसार, देवी शांतादुर्गा ही दुर्गा देवीचे शांत रूप मानले जाते. ती शिव आणि विष्णू यांच्यातील युद्धात मध्यस्थी करून शांती प्रस्थापित करणारी आहे. असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाने हे युद्ध थांबवण्यासाठी शक्तीची प्रार्थना केल्यावर देवीने शिव आणि विष्णू यांच्यात सलोखा घडवला होता. काही प्राचीन ग्रंथात, १७व्या शतकात झालेल्या गोव्यातील वैष्णव आणि शैव संप्रदायांतील संघर्षांचा उल्लेख आहे. ही कथा त्या संघर्षांचे प्रतीक मानली जाते. दुसरी आख्यायिका अशी की देवी तप करणाऱ्या ऋषी शांतामुनीसमोर प्रकट झाली आणि नंतर मुंगीच्या वारुळात अंतर्धान पावली. त्यामुळे तिला अनेक ठिकाणी सातेरी किंवा वारुळ रूपातही पूजले जाते. या देवळात दिसणारे देवीचे चामुंडेश्वरी रूप महिषासुर वधाशी जोडले जाते. चामुंडेश्वरी आणि शांतादुर्गा या दोन्ही देवी एकत्र असणे हे येथील वैशिष्ट्य मानले जाते.
रस्त्याच्या शेजारीच असलेले हे मंदिर काहीसे खोलगट जागेत आहे. प्रांगणाभोवती असलेल्या आवारभिंतीत मंदिराची मुख्य प्रवेशकमान आहे. या कमानीच्या दोन स्तंभांच्या वरील बाजुला सोंड उंचावलेले दोन गजराज व त्यांच्या मध्यभागी कमळपुष्पातील शिखर रचना आहे. या प्रवेशकमानीतून सात ते आठ पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोरील एका मोठ्या चौथऱ्यावर पाच थरांची मोठी दीपमाळ व तुलसी वृंदावन आहे. दीपमाळेच्या प्रत्येक थरावर गोलाकार दीपकोष्टकांची रचना आहे. मुखमंडप, सभामंडप व अंतराळ अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या मुखमंडपात प्रवेश करण्यासाठी तीन बाजुने पायऱ्या आहेत.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर लाकडी कोरीव स्तंभशाखा आहेत. या प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर लाकडी कोरीव नक्षीकाम व त्यावर कीर्तीमुख आहे. बंदीस्त स्वरुपाच्या सभामंडपात मध्यभागी एका काचेच्या पेटीत मोठी पितळी समई आहे. सभामंडपाच्या पुढच्या बाजुला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडे द्वारपालमूर्ती आहेत.
गर्भगृहाच्या द्वारचौकटीवर वैशिष्ट्यपूर्ण लाकडी नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर मध्यभागी लाकडात कोरलेली गणपतीची मूर्ती व मूर्तीशेजारी दोन्ही बाजुला गजराज आहेत. गर्भगृहात एकाच वज्रपिठावर चामुंडेश्वरी आणि शांतादुर्गा महामाया यांच्या पाषाणी मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींवर चांदीचे मुकूट व पाठशिळेवर कोरीव कलाकुसर आहे. प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहातून बाहेर जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. येथील सभामंडप दुपाखी कौलारू रचनेचा आहे. गर्भगृहावर छतावर बाशिंगी कठडा व त्यामध्ये मध्यम उंचीचे शिखर आहे. या शिखरावर आमलक व कळस आहे.
मंदिराच्या प्रांगणात ब्राह्मणदेव, क्षेत्रपाल व रवळनाथाचे स्थान आहे. असे सांगितले जाते की चामुंडेश्वरीचे मूळ मंदिर असलेल्या कुडतरीत प्राचिन काळी तेरा दैवते होती. सांतेरी, नारायण, चंडेश्वरी, क्षेत्रपाल, सातुलिया, रवळनाथ, चंद्रनाथ, दुर्गादेवी, भगवती, सोलवेश्वर, महेश्वर, गणेश आणि केशनाथ अशी त्यांची नावे सांगितली जातात. अवेडे गावात असलेली शांतादुर्गा, चामुंडेश्वरी, लक्ष्मीनारायण, रवळनाथ, गणपती इत्यादींची मंदिरे कुडतरी येथे असलेल्या मूळ दैवतांचीच रुपे मानली जातात.
या मंदिराचा वर्धापन दिन चैत्र कृष्ण सप्तमीला साजरा केला जातो. श्रावणातील प्रत्येक रविवारी व सोमवारी येथे भजन होते आणि शेवटच्या सोमवारी देवीची पालखी निघते. आश्विन पौर्णिमेला कोजागिरी उत्सव साजरा केला जातो. वसंत पंचमी, ललिता पंचमी, माघ शुक्ल पंचमी, लक्ष्मीपूजन, तुलसीविवाह, फाल्गून पौर्णिमा, होळी असे सण येथे उत्साहात साजरे होतात. नवरात्रीचा उत्सव येथे विशेष उत्साहात साजरा होतो. येथील मुख्य वार्षिक उत्सव म्हणजे जत्रा किंवा जत्रोत्सव. तो पौष शुक्ल त्रयोदशी ते पौर्णिमा या काळात साजरा होतो. या तीन दिवसांच्या उत्सवात परिसर आणि मंदिर सजवले जाते. मंदिरात विशेष पूजेचे आयोजन होते. यावेळी होणाऱ्या आरती आणि उत्सवाची पर्वणी साधण्याकरिता शेकडो भाविक येथे येतात.