महाराष्ट्रातील मरीआईचे उपासक पोतराज दक्षिण भारतात मदगी किंवा मादगुड म्हणून ओळखले जातात. पोतराज हा द्रविड भाषेतील पोत्तूराजू या शब्दाचा अपभ्रंश आहे. पोत्तू म्हणजे रेडा किंवा बोकड व याचा बळीविधी पार पाडणारा तो पोत्तूराजू होय. देऊळवाले पोतराज, खास गाणी म्हणणारे पोतराज, स्थानिक पोतराज असे त्यांचे प्रकार आहेत. महाराष्ट्रातील काही खास देवालयात पोतराजांची परंपरा आजही कायम आहे. तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिर त्यापैकीच एक आहे. आजही या मंदिरात नव्या पोतराजाच्या विधी संपन्न केल्या जातात. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की गावातील गुराख्यांची मुले ऐन दुष्काळात या ठिकाणी आपली गुरे चरायला घेऊन आली होती. त्यावेळी एक गाय पाण्यावाचून येथे मरून पडली. त्याच वेळी महालक्ष्मी देवी म्हातारीच्या रुपात मुलांसमोर प्रकट झाली व भूक लागली आहे, असे म्हणून त्यांच्याकडे जेवण मागू लागली. त्या मुलांनी म्हातारीला भाकरी दिली.
भाकरी खाऊन झाल्यावर तिने पिण्यासाठी पाणी मागितले. आपल्याकडे पाणी नाही व पाण्यावाचूनच ही गाय मरून पडली आहे, असे या गुराख्यांनी म्हातारीस सांगितले. गुराख्यांचे म्हणणे
ऐकून म्हातारीने आपल्या हातातील काठी रागाने जमिनीवर आपटली व जमिनीतून पाण्याची कारंजी उडू लागली. पाणी पाहून गुराखी आनंदाने नाचू लागले व ते पाणी अंगावर उडाल्याने मृत गायही जिवंत झाली. त्याच वेळी म्हातारी महालक्ष्मी देवीच्या रुपात प्रकट झाली व येथील पाषाणात गुप्त झाली. हा प्रकार गुराख्यांनी गावकऱ्यांना सांगितली व गावकऱ्यांनी कालांतराने या ठिकाणी देवीचे मंदिर बांधले.
महामार्गावरून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. या कमानीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळाच्या सभोवताली खाद्यपदार्थ व पुजा साहित्याची अनेक दुकाने आहेत. वाहनतळापासून मंदिराकडे जाताना दुसरी स्वागत कमान आहे. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यावर दीपमाळा आहेत. प्रांगणात मध्यभागी लोखंडी ध्वजस्तंभ आहे. मंदिराच्या मागील बाजूला प्राचीन विहीर आहे.
या विहिरीतील पाण्याने शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. कोरीव पाषाणात बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूंनी बारा चौकोनी स्तंभ आहेत. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूला कठडे आहेत आणि समोरील बाजू खुली आहे. सभामंडपाच्या छताला नवसाच्या अनेक पितळी घंटा टांगलेल्या आहेत. जमिनीवर मध्यभागी कोरीव पाषाणात बांधलेला यज्ञ कुंडाचा चौथरा आहे. यज्ञकुंडावर चारही बाजूंना पशू शिल्पे व त्याशेजारी पाषाणी दिवा (माल्टा) आहे. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर महालक्ष्मी देवीची चित्रे रंगविलेली आहेत.
चार स्तंभांवर तीन कमानी असे बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात मध्यभागी चौथऱ्यावर सिंह शिल्प व त्यापुढे कासव शिल्प आहे. गर्भगृहाच्या रजतपटल सुशोभित द्वारशाखांवर पर्णलता, पुष्पलता नक्षी व द्वारपाल शिल्पे आहेत.
ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर मृगशिल्पे आहेत. गर्भगृहात चांदीच्या नक्षीदार वज्रपिठावर देवीची स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. मूर्तीला चांदीचा मुखवटा व मस्तकी चांदीचा मुकुट आहे.
सभामंडपाच्या छतावर प्रवेशद्वाराकडील बाजूला दोन्ही बाजूस सिंहशिल्पे आहेत. सिंहशिल्पांच्या मध्यभागी देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर उंच व निमुळते दोन थरांचे शिखर आहे. मंदिराच्या प्रांगणातून समोरील टेकडीकडे जाण्यासाठी पन्नास ते साठ पायऱ्या असलेला पायरी मार्ग आहे. या टेकडीवर देवीचे न्हाणीघर आहे. येथे देवी रोज स्नानासाठी जाते, असे सांगितले जाते. येथे प्राचीन मंदिर आहे व त्यात देवीची मूर्ती आहे.
या देवीची यात्रा वर्षातून दोन वेळा साजरी केली जाते. माघ वद्य पक्षातील पहिल्या मंगळवारी देवीची वार्षिक यात्रा साजरी केली जाते. या यात्रेस कायरं म्हणतात. या वेळी दहिभाताचा तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीची खणानारळाने ओटी भरतात. यावेळी गावापासून मंदिरापर्यंतचा रस्ता कडूलिंबाच्या डाहळ्यांनी झाडण्याची प्रथा आहे. गावात मानकऱ्यांच्या वाड्यावर देवीच्या स्तुतीपर गायनाचे कार्यक्रम व मानपान केले जातात.
यात्रेच्या वेळी देवीची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, वाजत गाजत गाव प्रदक्षिणेला निघते. गावातील मानकऱ्यांच्या घरी भेटी देवून संध्याकाळी पालखी मंदिराकडे वळते. संध्याकाळ ते मध्यरात्रीपर्यंत शोभेच्या दारूकामाने परीसर उजळून निघतो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे जंगी सामने आयोजीत करण्यात येतात. जिल्हाभरातील नामवंत पैलवान या कुस्त्यांत सहभागी होतात. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो रसिक येथे जमा होतात. यात्रेच्या दिवशी लहान मुलांचे जावळ काढण्यासाठी शेकडो भाविक मंदिरात येतात. यावेळी दिक्षा घेतलेल्या नव्या पोतराजांना दान देण्याची प्रथा आहे. अरादी, वाघ्या, पोतराज यांच्या वाद्य व गायनाने मंदिर परीसर दणाणून जातो. आषाढ मासातील शेवटच्या शुक्रवारी देवीची आखाडबोन यात्रा भरते. या यात्रेच्या वेळी पशुबळी देण्याची प्रथा आहे. दोन्ही यात्रांच्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात.