रामलिंग मंदिर

येडशी, ता. धाराशिव, जि. धाराशिव

हिंदू धर्मात श्रीराम जितके वंदनीय, तितकेच महादेव पूजनीय आहेत. ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी श्रीराम हा विष्णूचा अवतार मानला जातो. तरीही श्रीराम महादेवाला पूजनीय मानतात. महादेवाची कृपा होती म्हणून श्रीराम सीतेच्या स्वयंवरात शिवधनुष्य उचलू शकले. लंका मोहिमेवर निघाले तेव्हा श्रीरामांनी वाटेत अनेक ठिकाणी शिवपिंडी स्थापन केल्या. यात दक्षिण भारतातील रामेश्वर मंदिर अधिक प्रसिद्ध आहे. श्रीरामाने स्थापन केलेल्या शिवमंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर धाराशिव जिल्ह्यातील येडशी या गावी आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी मान्यता आहे.
हे प्राचीन मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. अलिकडील काळात मंदिराच्या सभामंडपाचे नुतनीकरण करून मंदिरास आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. या मंदिराबाबत अख्यायिका अशी की रावणाने सीतेला पळवून नेले तेव्हा वाटेत जटायू व रावणाचे युद्ध झाले. सीतेच्या शोधात फिरत असताना रामाची येथे जखमी जटायूशी गाठ पडली. जटायूला पाणी पाजण्यासाठी रामाने जमिनीत बाण मारून पाण्याचा झरा निर्माण केला. श्रीरामाला सीतेच्या अपहरणाची सर्व हकीगत सांगून जटायूने प्राण सोडले. जटायूचे अंतिम कार्य करून रामाने येथे शिवपिंडी स्थापन केली. त्यामूळे हे मंदिर रामलिंग नावाने ओळखले जाते.
हे मंदिर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील येडशी अभयारण्याचा भाग आहे. मंदिरापेक्षा उंच डोंगर माथ्यावर प्रशस्त वाहनतळ आहे. या वाहनतळाभोवती अनेक उपहारगृहे व पुजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. येथून खाली डोंगरांच्या कुशीत असलेल्या मंदिरापर्यंत कोरीव पाषाणात बांधलेल्या १५१ पायऱ्या आहेत. पायरीमार्गाच्या प्रारंभ बिंदूवर मंदिराची स्वागत कमान आहे. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूस दगडी कठडे आहेत. पायरी मार्गाच्या मध्यावर डाव्या बाजूच्या कठड्यात प्राचीन दीपमाळ आहे. प्रवेशद्वारापासून काही अंतरावर तपस्वी म्हैसुरकर महाराजांची समाधी आहे.
मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत पूर्व व पश्चिम दिशेस प्रवेशद्वारे आहेत. पश्चिम दिशेचे मुख्य प्रवेशद्वार दुमजली आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना व छताला बाशिंगी कठडा आहे. तटबंदीला लागून सुमारे पंधरा ते वीस ओवऱ्या आहेत. मंदिरात येणारे भाविक या ओवऱ्यांचा वापर धर्मशाळा म्हणून करतात. ओवऱ्यांना लागून तटबंदीवर जाण्यासाठी जीने आहेत. प्रांगणात एका बाजूला चौथरा व त्यावर शिवपिंडी आहे. हे सिध्देश्वराचे स्थान असल्याचे सांगितले जाते.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरास एकूण २४ गोलाकार स्तंभ आहेत. त्यापैकी बाह्य बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. चार स्तंभ असलेल्या मुखमंडपात जटायू समाधीस्थळ आहे. त्यापुढे श्रीराम व लक्ष्मण जखमी जटायूला पाणी पाजत असल्याची शिल्पे आहेत. पुढे सभामंडपात चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती व त्याशेजारी पितळी नंदी आहे. उत्सवाच्या वेळी या पितळी नंदीच्या पाठीवरून महादेवाच्या मुखवट्याची मिरवणूक काढली जाते.
खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात दर्शनरांगेची व्यवस्था आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांत भैरव द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील देवकोष्टकांत शंकर-पार्वतीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी व त्यावर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. या कठड्यावर आठ कोनांवर सोळा नंदीमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर सुमारे तीस फूट उंचीचे सात थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या तिसऱ्या थरात आठ देवकोष्टके आहेत. पाचवा थर अधिक उंच व निमुळता आहे. शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात काही प्राचीन मूर्ती आहेत. त्यात महादेव, विष्णू, मारूती, शिवपिंडी, विरगळ व नंदीमूर्ती यांचा समावेश आहे. असे सांगितले जाते की या मूर्ती हजार ते बाराशे वर्षे प्राचीन आहेत.
मंदिराच्या मागील बाजूस डोंगरात धबधबा व कुंड आहेत. येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येतात. येथून काही अंतरावर डोंगरात असलेल्या गोमुखातून अखंड पाण्याचा प्रवाह सुरू असतो. याच ठिकाणी श्रीरामाने बाण मारून पाण्याचा झरा निर्माण केला होता, अशी श्रद्धा आहे. या गोमुखातील पाण्याने महादेवाचा नित्य अभिषेक केला जातो. येथून काही अंतरावर सीतेचे न्हाणीघर आहे. मंदिर परिसरात वनविभागाने तयार केलेले टेहळणी बुरूज आहेत. त्यावर बसून परिसरातील निसर्ग, प्राणी व पक्षांचे निरीक्षण करता येते. परिसरात भाविकांना बसण्यासाठी विसावा केंद्र आहे.
मंदिरात चंपाषष्ठी हा पाच दिवस चालणारा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीला मंदिरात विशेष गर्दी असते. श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात सुमारे एक लाखांहून अधिक भाविक येतात. कार्तिक अमावस्येला सिध्देश्वर स्थानापासून रामलिंग मंदिरापर्यंत नवसाचे दंडवत घातले जातात. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला मध्यरात्री बारा वाजता पितळी नंदीवर रामलिंग महादेवाचा मुखवटा बसविला जातो व या नंदीच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. सूर्योदयाच्यावेळी जटायू समाधीजवळ फुले वाहून वर्षभराचे पीक, पाणी व इतर घटनांचा अंदाज व्यक्त करणारी ‘भाकणूक’ केली जाते. त्यानंतर देवास गुळ खोबऱ्याचा नैवद्य दाखवितात. दर सोमवार, पौर्णिमा, अमावस्या व सुट्टीच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • धाराशिवपासून २७ किमी अंतरावर
  • धाराशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : पुजारी, मो. ८००७९९६१५२, ९६३७४५६८५२
Back To Home