कल्याणमधील तिसगाव येथील प्राचीन मंदिरातील जरी आणि मरी या स्वयंभू देवी आगरी–कोळी बांधवांच्या आराध्यदेवता आहेत. जरी आणि मरी या मूळच्या उग्र प्रवृत्तीच्या देवता आहेत. गावावरील रोगराईचे अरिष्ट दूर करणाऱ्या देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. येथील जरीमरी मंदिराला तिसाई मंदिर असेही म्हटले जाते. भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या देवी अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे चैत्र पोर्णिमेला भरणाऱ्या जत्रेदरम्यान ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे आदी भागांतून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून जातो.
मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, मरीआई आणि जरीआई या देवी रोगांशी निगडित आहेत. पूर्वी प्राणघातक असलेल्या साथीच्या रोगांच्या देवी कल्पून त्यांची पूजा केली जात असे. यातील मरी ही पटकी व देवी यांसारख्या रोगांच्या साथीची देवी आहे, तर जरी ही तापाच्या साथीची देवी आहे. या जरीमरीचे स्थान गावामध्ये एका कोपऱ्यात किंवा गावाबाहेरील झाडाखाली असते. तिच्या पुजाऱ्यास पोतराज वा पोतुराजा असे संबोधतात. ते मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरताना दिसतात. लोकसमजुतीनुसार, पोतराज या मरीआईच्या भगताच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते. या पोतराजास काही ठिकाणी कडकलक्ष्मी असेही म्हणतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की जरी–मरीआईच्या कोपामुळे या रोगांच्या साथी येतात. त्यांना संतुष्ट केल्यास रोगराईचे संकट टळते.
तिसगाव येथील या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी या परिसरात जंगल होते. येथील टेकडीवर लोक गायी–गुरांना चरण्यासाठी आणत. एका दिवशी येथील गणा गायकवाड नावाची व्यक्ती गुरांना घेऊन टेकडीवर गेली असता, अचानक सोसाट्याचा वारा सुटला. या वाऱ्याबरोबर त्याच्या कानी देवींचा आवाज पडला. ‘आम्ही येथील तलावात पाषाणाच्या रूपात आहोत. आम्हाला तलावातून बाहेर काढून स्थापना कर’, असे देवींनी त्याला सांगितले. गणाने गावात येऊन काही जाणत्या लोकांच्या कानावर ही घटना घातली. दुसऱ्या दिवशी सर्व जण तलावाजवळ आले. त्यानंतर गणाने तलावात बुडी मारून मूर्तींचा शोध घेतला. काही वेळाने तो मूर्ती हातात घेऊन बाहेर आला. त्यानंतर एका शुभमुहूर्तावर ग्रामस्थांनी तलावासमोरील पिंपळाच्या झाडाखाली छोटे कौलारू मंदिर बांधून त्यात देवींची प्रतिष्ठापना केली. कालांतराने सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९५६ मध्ये मंदिराचे तत्कालीन मुख्य विश्वस्त माधवराव उर्फ बापूसाहेब ओक यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा द्वितीय जीर्णोद्धार करण्यात आला. १९९६ मध्ये मंदिराचा तिसरा जीर्णोद्धार झाला. त्यादरम्यान मंदिराचे संगमरवरीकरण तसेच गर्भगृहाचे सुशोभीकरण करण्यात आले. २०११ मध्ये येथे मूर्तींचे वज्रलेपन, पुनःप्रतिष्ठापना तसेच ध्वजारोहण सोहळा झाला.
या मंदिराच्या साक्षीने कल्याण आणि वसईच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडल्याची नोंद आहे. ‘सुभे कल्याण’ (विवेकानंद गोडबोले, इतिहास संशोधन मंडळ कल्याण, १९७४) या पुस्तकानुसार, पेशवाईतील सरदार गंगाजी नाईक अणजूरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे पेशव्यांनी पोर्तुगिजांविरोधातील वसईची मोहीम आखली. श्रीमंत चिमाजी अप्पा हे या मोहिमेवर निघाले. त्याची नांदी या मंदिराच्या पटांगणात झाली. त्यावेळी सरदार अणजूरकर यांनी कल्याणला येऊन भवानीचा गोंधळ घालण्याच्या निमित्ताने नामाजी देशमुख, भिकाजी हैबतराव आदी मंडळींना येथे पाचारण केले व त्यांना मोहिमेची कामे नेमून दिली. कल्याणमधील तिसगाव नाक्यावर असलेल्या मंदिराच्या कमानीपासून चालत काही अंतरावर आल्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर लागते. मंदिराच्या शिखरांवर आकर्षक नक्षीकाम आहे. देवींच्या मूर्ती सापडलेला तलाव मंदिराच्या समोरच आहे. या तलावाचे २००६ मध्ये नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. या तलावाच्या मध्यभागी कमळावर बसलेल्या देवींच्या मूर्ती आहेत. या कमळाभोवती सोंड उंचावलेल्या पाच हत्तींची शिल्पे आहेत.
तलावासमोरील पिंपळाजवळ सात आसरा देवींचे तांदळे आहेत. आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्या जलदेवता असतात. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात वा साती आसरा असे म्हणतात. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा व मकरी अशी त्यांची नावे होत. ‘द फोकलोअर ऑफ बॉम्बे’ आर. ई. एन्थोव्हेन यांच्या १९२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनपर ग्रंथात अशी माहिती देण्यात आली आहे की आसरांना काही भागात मावलाया असेही म्हणतात. ठाणे जिल्ह्यातील लोकसमजुतीनुसार सर्व जलसाठ्यांनजीक सात आसरांचे वास्तव्य असते. काहींच्या मते, ज्या तलावात कमळे असतात तेथेच त्या राहतात. या आसरा मुले आणि आणि तरूणींना त्रास देतात. साती आसरांच्या तांदळ्यांच्या जवळच छोटी गणेशमूर्ती आहे. येथे पुष्पहार व प्रसादाची दुकाने आहेत. समोरच आकर्षक बांधकाम असलेले संगमरवरी जरीमरी अर्थात तिसाई मंदिर आहे. मंदिरासमोर मोकळे प्रांगण आहे. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिराच्या समोर खांमदेवाचे (खांबदेवाचे) स्थान आहे. येथे या देवाचा खांब आहे व त्याला सोन्याचा गिलावा असलेला पत्रा चढवण्यात आला आहे. यात्रेदरम्यान येथे कोंबड्या–बकऱ्यांच्या बळीच्या रूपात देवींचा मान दिला जातो.
दर्शनमंडप, सभामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणा मार्ग असे तिसाई मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपात भाविकांना बसण्यासाठी लोखंडी बाकडे आहेत. सभामंडपाच्या भिंतींच्या दोन्ही बाजूंना देवळ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी कीर्तीमुख कोरलेले आहे. सभामंडपात जाळ्या असलेल्या खिडक्यांमुळे येथे पुरेसा प्रकाश व खेळती हवा असते. सभामंडपाच्या मध्यभागी गर्भगृह आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या खाली मध्यभागी कीर्तिमुख आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती आहे. त्यावरच्या भागात कलश आहे. प्रवेशद्वाराच्या खांबांच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. गर्भगृहात मूळच्या चांदीच्या नक्षीदार मखरास सोनेरी रंगाचा मुलामा चढवण्यात आला आहे. त्यावर वेलबुट्ट्यांची नक्षी व मध्यभागी कीर्तीमुख आहे. मखरातील नक्षीदार प्रभावळीवर कळस कोरण्यात आलेला आहे. मखराच्या वरच्या कोपऱ्यांवर सूर्य–चंद्र आहेत. मखरात मध्यभागी जरी–मरी यांच्या शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहेत. मूळच्या पाषाणी मूर्तींवर मुखवटा चढवण्यात आला आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाला लागून असलेल्या उजवीकडील भिंतीत कोरलेल्या हत्तीच्या सोंडेतून मूर्तींवरील अभिषेकजल सोडण्यात येते.
गर्भगृहालगतच डाव्या बाजूला राम मंदिर आहे. मंदिरात श्रीराम–सीता–लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. त्यासमोर नमस्कारमुद्रेत बसलेल्या हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तींच्या डावीकडे एका चौथऱ्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. तिसाई मंदिरात जानेवारी महिन्यात चंडियाग तेजोत्पत्ती तसेच पुनःप्रतिष्ठापन यांचा वर्धापन दिन सोहळा होतो. याच महिन्यात उरणनजीकच्या करंजे येथून येथे तिसाई देवीची पालखी येते. येथे माघी गणेशोत्सव, महाशिवरात्री, रामनवमी, गुरुपोर्णिमा, नारळी पोर्णिमा, नवरात्रोत्सव, दीपावली आदी सण–उत्सव साजरे होतात. जून महिन्यात होणाऱ्या गावच्या ‘साथ’ या कार्यक्रमात देवींना गोड नैवद्य दाखवला जातो. यावेळी देवींचा मानपान तसेच प्रसाद वाटपही होते. नवरात्रोत्सवात घटस्थापना, कीर्तन, होम–हवन, घट उत्थापन तसेच विजयादशमी सोहळा होतो.
चैत्र पोर्णिमेला परिसरात देवीची दोन दिवसांची मोठी जत्रा भरते. पोर्णिमेला पहाटे देवींना अभिषेक–पूजा केली जाते. त्यानंतर देवींचा शृंगार केला जातो. गर्भगृहात फुलांची आरास केली जाते. देवीची पालखी सायंकाळी गावातून फिरते. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. वाटेत पालखी एका शिळेजवळ विश्रांतीसाठी थांबवण्यात येते. या ठिकाणी आता तुळशीवृंदावन बांधण्यात आले आहे. पालखी मंदिराजवळ आल्यावर मंदिर परिसराला पालखीच्या पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी विसर्जित होते. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा मिरवणूक सोहळा सुरू असतो. यात्रेदरम्यान देवींचे मानपान करण्यात येते. येथे पूर्वी देवींना कोंबड्या–बकऱ्यांचे नैवद्य दिले जात असत. मात्र काही वर्षांपासून देवींना वालाचे बिरडे किंवा उसळ तसेच गोडधोड पदार्थांचा शाकाहारी नैवद्य दाखवण्यात येतो. भाजलेल्या तांदळाच्या पीठाच्या (भुज्याचे पीठ) लाडूंचा नैवद्यही दाखवला जातो. मात्र मंदिराच्या पूर्वेस असलेल्या खांमदेवाच्या स्थानी नवस केलेले कोंबड्या, बकरे, मेंढे यांचे बळी दिले जातात.
यात्रेदरम्यान परिसरात पाऊल ठेवायलाही जागा नसते. तिसगाव नाका ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा खेळणी, प्रसाद, मिठाई, विविध वस्तूंची विविध दुकाने, आकाशपाळणे वगैरे लागलेले असतात. यात्रेदरम्यान परिसरात कुस्त्यांचे जंगी सामनेही होतात. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणचे मल्ल त्यात भाग घेतात. या यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांसाठी कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या परिहवन उपक्रमातर्फे विशेष बसेसही सोडण्यात येतात.
उपयुक्त माहिती