‘करवीर माहात्म्या’त करवीरचा स्थानमहिमा सांगताना असे म्हटले आहे की या क्षेत्राच्या रक्षणासाठी त्याच्या चारी द्वारांवर शेषशायी विष्णू वसलेला आहे. (हातीं चक्र घेवोनि हरि। निद्रा करोनि शेषावरी। जे रक्षाया चहुद्वारीं। जळामध्यें राहतसे।।) यापैकी एका विष्णूचे स्थान बहिरेश्वर येथे आहे. गावाजवळ अतिशय रमणीय परिसरात हे तलावातील शेषनारायणाचे मंदिर आहे. मंदिरातील शाळीग्रामात घडवलेल्या शेषशायी विष्णू मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम आहे. हे मंदिर अकराव्या शतकात उभारले गेले असावे, असे सांगण्यात येते.
पेशवाई संपून इंग्रजांची राजवट सुरू झाल्याच्या काळात, इ.स. १८२१ ते १८३२ दरम्यान कोल्हापूर येथील कवी व ज्योतिषी दाजीबा जोशीराव यांनी ‘करवीर माहात्म्य’ हा ग्रंथ रचला होता. कोल्हापूर आणि परिसरातील विविध तिर्थांची व मंदिरांची माहिती व महिमा त्यात वर्णन केलेला आहे. त्यानुसार करवीर क्षेत्राच्या पूर्वेकडे अतिग्रे, दक्षिणेकडे कुर्डू, पश्चिमेला बहिरेश्वर आणि उत्तरेला तळसंदे ही चार विष्णूस्थाने आहेत. करवीर माहात्म्याच्या सातव्या अध्यायात बहिरेश्वर या स्थानाचा उल्लेख ‘पश्चिमाब्धि’ म्हणजे पश्चिमेकडील मोठा जलाशय असा करण्यात आला आहे. ग्रंथाच्या सातव्या अध्यायातील याबाबतचा श्लोक असा आहे – ‘पश्चिमेस पश्चिमाब्धि। पलाशतीर्थ असे ऐक। तयामाजीं देवनायक। जलशायी तिसरा असे।।’ याचा अर्थ असा की करवीर क्षेत्राच्या पश्चिमेस असलेल्या जलाशयात पलाशतीर्थ हा तलाव आहे व त्यात जलशायी विष्णूचे स्थान आहे.
शिलाहार राजा भोज (पहिला) याचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या तीरवाडबीड म्हणजेच सध्याच्या कसबा बीड नजीक बहिरेश्वर हे गाव आहे. प्राचीन काळी हे गाव कसबा बीडचाच एक भाग होते. बागायती शेतीने संपन्न असलेल्या या गावावर शेषनारायणाची कृपा असल्याची येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे. गावात दुधाचे मोठे उत्पन्न असल्याचे सांगतात. एकट्या बहिरेश्वर गावातून ६००० लिटर दुधाची पाठवणी केले जाते, असे येथील नागरिक अभिमानाने सांगतात. याच गावाजवळील तलावात अगदी मध्यभागी शेषनारायणाचे जलमंदिर आहे. हा तलाव ३० फूट खोल व मंदिराचा पाया त्याहून खोल आहे. या मंदिरात पूर्वी होडीने यावे लागत असे. त्यानंतर तेथे लाकडाचा साकव बांधण्यात आला होता. आता येथे सिमेंटचा पूल उभारण्यात आला आहे. पुलाच्या एका टोकाला हे छोटेखानी मंदिर आहे. लहान उंचीच्या या मंदिरास केवळ गर्भगृह व त्यावर पायऱ्या–पायऱ्यांचे पिरॅमिडसारखे शिखर आहे. त्यावर कमलपुष्परचनेत बसवलेला आमलक व उंच कळस आहे. मंदिराभोवती लहानसा प्रदक्षिणामार्ग आहे.
या मार्गात शिवलिंगाच्या आकाराचा स्तंभ आहे. येथे झालेल्या यज्ञाची खूण म्हणून तो उभारण्यात आल्याचे सांगतात. हा स्तंभ वरच्या बाजूला शिवलिंगासारखा गोलाकार आहे. त्याखाली अष्टकोन आणि त्याच्याही खाली हा स्तंभ चौकोनी बनतो. हा स्तंभ ब्रह्मा–विष्णू–महेशाचे प्रतिक मानला जातो. धर्मशास्त्रानुसार त्यातील सर्वात खालचा चौकोनी भाग ब्रह्मस्वरूप आहे. त्यावरील अष्टकोनी भाग विष्णूचा आहे आणि त्यावरील भागास शिव म्हटले जाते. या तीन आकारांनी मिळून शिवपिंडी तयार होते.
मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक तीन स्तरीय सतीशिळा आहे. त्यातील सर्व शिल्पे सुस्पष्ट आहेत. युद्धात मारल्या गेलेल्या वीरयोद्ध्याच्या सती गेलेल्या पत्नींच्या स्मरणार्थ ही शिळा उभारली असल्याचे त्यातील शिल्पांकनावरून दिसते. येथे विष्णूची एक भग्नमूर्तीही आहे. तसेच श्रीकृष्णाचे एक सुंदर कोरीव शिल्पही आहे. या शिल्पातील कृष्ण बासरी वाजवत आहे व त्याच्या मस्तकी उंच मुकूट आहे. त्याने पितांबर परिधान केलेला आहे. गळ्यात व कमरेला अलंकार आहेत. येथील तलाव एका दुष्काळात आटला होता. त्यावेळी तलावात या पाषाणमूर्ती सापडल्या होत्या, असे सांगण्यात येते.
मंदिरात संगमरवरी अधिष्ठानावर शाळीग्रामात कोरलेली शेषशायी विष्णूची अतिशय सुंदर मूर्ती विराजमान आहे. पाच ते सात फुटाच्या शाळीग्रामावर विष्णूचे अंकन शेषशायी स्वरूपात अर्थातच आडव्या स्वरूपात केलेले आहे. येथे पाच फण्यांच्या शेषावर विष्णू पहुडलेला आहे. मस्तकी मुकूट, अंगावर विविध आभूषणे धारण केलेल्या विष्णूचा उजवा हात डोक्याखाली आधार म्हणून ठेवलेला आहे. खालचा हात पोटावर नाभीनजीक आहे. वरच्या डाव्या हातात सुदर्शनचक्र आणि खालच्या हातात गदा आहे. विष्णूच्या नाभीतून आलेल्या कमळपुष्पात चतुर्मुख ब्रह्मदेवाची पद्मासनात स्थित मूर्ती कोरलेली आहे. नाभीतून कमल पुष्प उमलल्याने विष्णूस पद्मनाभ असेही म्हटले जाते. विष्णूच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी आहे. तेथेच खालील बाजूस गरुडाची नमस्कारमुद्रेतील प्रतिमा आहे. विष्णूच्या मुकुटाच्या बाजुला परमेश्वराचा प्रथम अवतार असलेला मत्स्य दिसतो. त्याच्या पुढे कूर्म, वराह, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण असे अन्य अवतारही कोरलेले आहेत. सगळ्यात शेवटी कल्की अवतार आणि त्यानंतर बुद्धमूर्ती आहे.
या मंदिरात दैनंदिन पूजा होते. गावातील महिला अनेकदा दुपारी वा सायंकाळच्या वेळी येथे येऊन भजने, गवळणी म्हणत असतात. दर सोमवारी येथे भाविकांची गर्दी असते. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी या मंदिर परिसरात वार्षिक जत्रोत्सव असतो. दूर–दूरहून आलेले भाविक मोठ्या संख्येने त्यात सहभागी होतात.
उपयुक्त माहिती