भगवती मंदिर

कोटकामते, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

निसर्गरम्य कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेल्या कोटकामते गावात भगवती देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. चहूबाजूंनी डोंगर व बारमाही वाहणारी नदी अशा निसर्गसमृद्ध परिसरात स्थित असलेले हे मंदिर कोकणातील जागृत देवस्थानांपैकी एक आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी जीर्णोद्धार केलेले हे देवस्थान अद्यापही अस्तित्वात असलेल्या देवस्थान इनामांपैकी एक आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, अशी ख्याती असलेल्या भगवती देवीचा नवरात्रोत्सव संस्थानिकांना शोभेल अशा शाही थाटात आजही साजरा केला जातो.

भगवती देवीबाबत आख्यायिका अशी की गर्भगृहात उजवीकडे असलेली पावणाई देवी ही पूर्वी कोटकामते गावची ग्रामदेवता होती. एकदा भगवती देवी पावणाई देवीला भेटण्यासाठी आली. बराच वेळ गप्पागोष्टी झाल्यावर भगवती देवी पावणाई देवीला म्हणाली, ‘इतक्या लांबून मी तुला भेटण्यासाठी आले, पण तू मला साधे पाणीही विचारले नाहीस.’ त्यावर पावणाई देवी मंदिराच्या आवारातील विहिरीवर पाणी आणायला गेली. त्यावेळी भगवती देवी ही पावणाई देवीच्या रिकाम्या झालेल्या आसनावर बसली. काही वेळाने पाणी घेऊन आलेल्या पावणाई देवीने ‘मी आता कुठे बसू’ अशी विचारणा केली. त्यावर ‘तू माझ्या उजवीकडे बस’, असे भगवती देवीने तिला सांगितले. तेव्हापासून भगवती देवी कोटकामते या गावची ग्रामदेवता बनली.

कोटकामते या गावाचा इतिहास असा की मराठ्यांचे आरमार प्रमुख व कोकण किनाऱ्याचे स्वयंघोषित राजे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी देवगड व साळशी या महालांच्या मध्ये असलेल्या या गावामध्ये एका भुईकोटाची उभारणी केली होती. या कोटामुळेच कामते गाव कोटकामते म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही या भुईकोटाचे बुरूज आणि तटबंदीचे अवशेष येथे पाहायला मिळतात. त्याकाळी दर्यावर मोठी सत्ता असलेल्या इंग्रज आणि पोर्तुगीजांशी कान्होजींचा सतत झगडा होत असे. इंग्रजांच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनिरुद्ध संचारास कान्होजींच्या आरमाराचा अडथळा होत असे. विजयदुर्ग हा किल्ला आंग्रे यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी आपल्या जंगी आरमारासह १७१७ मध्ये विजयदुर्गवर हल्ला केला; परंतु आंग्र्यांनी त्यांचा दारूण पराभव केला. त्यानंतर इंग्रज व पोर्तुगीज यांनी एकत्र येऊन नोव्हेंबर १७२१ मध्ये कुलाब्यावर हल्ला केला. त्यावेळी बाजीराव पेशवे आंग्रे यांच्या साह्यास सैन्यासह आल्याने इंग्रज व पोर्तुगीजांची पाचावर धारण बसली व त्यांनी आंग्रे यांच्याशी तह केला. हा तह ९ जानेवारी १७२२ मध्ये पार पडला. अशा प्रकारे आंग्रे यांनी इंग्रज व पोर्तुगीज या दोघांवरही वचक बसवला होता. अशी आख्यायिका आहे की या युद्धाच्या वेळी ‘विजयी झाल्यास तुझे भव्य मंदिर उभारेन, तसेच देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’, असा नवस कान्होजी आंग्रे यांनी कोटकामते गावातील भगवती देवीला केला होता. त्यानुसार त्यांनी इ.स. १७२५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसा उल्लेख असलेला शिलालेख आजही मंदिरात पाहायला मिळतो. तो पुढीलप्रमाणे आहे – ‘श्री भगवती ।श्री। मछक षोडश शत सत्पचत्वारिंशत माधिक संवछर विश्वात सुनमा ॥ सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामय देवी देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण ॥१॥ १६४७’. कालौघात देशभरातील इतर व्यक्तिगत इनामे आणि संस्थाने रद्द झाली असली कोटकामते गावचे इनाम मात्र आजही चालू आहे. या गावातील प्रत्येक जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर आजही प्रमुख कब्जेदार म्हणून ‘इनामदार श्री भगवतीदेवी संस्थान कोटकामते’ असा शिक्का असतो. मंदिराच्या न्यासाचे नावही ‘इनामदार श्री भगवती देवी संस्थान’ असे आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या टुमदार गावातील देवी भगवती मंदिर परिसर शांत व प्रसन्न आहे. भगवती देवीच्या मंदिरासमोरील चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची उग्रमुद्रेतील मूर्ती आहे. या मूर्तीमागे एक तोफ आहे. जवळच असलेल्या छोट्या पारावर देवीचे निशाण उभारण्यासाठी असलेली उंच, लाकडी ढालकाठी आहे. मंदिराच्या प्रवेशपायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दोन तोफा आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा दिंडी दरवाजा आहे. त्यावर दुमजली बांधकाम आहे. वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. या प्रवेशद्वारावर वीणावादन करणाऱ्या नारद आणि तुंबर यांची सुंदर रंगीत शिल्पे आहेत.

प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. संपूर्ण खुल्या रचनेच्या या सभामंडपात सुरूदार, पुरुषभर उंचीचे व कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. त्यावर चौरसाकार ताशीव लाकडी स्तंभ आहेत व ते एकमेकांना लाकडी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या कमानीवर पाना-फुलांची नक्षी तसेच मयूर कोरलेले आहेत. दुसऱ्या सभामंडपाच्या दर्शनी भागातील कमानीवर गजमुखे कोरलेली आहेत.

या सभामंडपातून पाच-सहा पायऱ्या उंचावर दुसरा सभामंडप (गोपूर) आहे. हा सभामंडप अर्धखुल्या प्रकाराचा आहे व त्यात बाजूने भाविकांना बसण्यासाठी दगडी कक्षासने आहेत. या सभामंडपात देवीची पालखी ठेवण्यात आलेली आहे. आकाराने मोठ्या असलेल्या या पालखीवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. पालखीचे पाय देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या पायाप्रमाणे आहेत.

गोपुरातून अंतराळात प्रवेश करण्याच्या दरवाजाच्या भिंतींजवळ शिलालेख आहे. त्यात कान्होजी आंग्रे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. अंतराळाच्या द्वारपट्टीवर आकर्षक नक्षीकाम आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गणेशच्या उभ्या स्थितीतील चित्ताकर्षक मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती कोरलेली आहे व तिच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत. अंतराळात सहा मोठे लाकडी स्तंभ आहेत. या खांबांचा घेर हा दोन माणसांच्या कवेत जेमतेम मावेल एवढा आहे. या स्तंभांवर कार्तिकस्वामी, तसेच गणेश व त्यांच्या भक्त व सेवकांची सुंदर काष्ठशिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांच्या शीर्षस्थानी नागप्रतिमांची मालिका आहे. अंतराळाच्या कडीपाटावर (छताचा आतील लाकडी भाग) लाकडी वाशांवर नक्षीकाम केलेले आहे व त्यामधील भागांत कमलपुष्पे व त्यात अणुकुचीदार उलटे कळस बसविलेले आहेत. अंतराळात डाव्या बाजूला चार तरंगदेवता आहेत. गर्भगृहात काळ्या पाषाणात कोरलेली भगवती देवीची सुबक व रेखीव मूर्ती आहे. या मूर्तीच्या वरील बाजूला दोन गजराज देवीवर पुष्पवृष्टी करताना कोरलेले आहेत. देवीच्या उजव्या हातात खड्ग आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना जय-विजय आहेत.

मुख्य मंदिराच्या शेजारी पावणाई देवीचे मंदिर आहे. त्यात देवीची संगमरवरी मूर्ती आहे. जवळच एक विहीर असून तिच्या शेजारी धर्मशाळा आणि पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूला रामेश्वर आणि जटेश्वर यांची मंदिरे आहेत.

या मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होतात. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला ‘देसरुढ’ नावाचा वार्षिक उत्सव होतो. आषाढ शुद्ध त्रयोदशी ते आषाढ पौर्णिमा या कालावधीत भावई देवीचा उत्सव होतो. श्रावण कृष्ण प्रतिपदा ते श्रावण कृष्ण अष्टमीपर्यंत येथे अखंड हरिनाम सप्ताह होतो. अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी दहीकाल्याने त्याची सांगता होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात पुरुष मंडळी फुगड्या घालतात. नवरात्रोत्सव हा येथील मुख्य उत्सव असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत संस्थानिक थाटात हा शारदीय नवरात्रोत्सव पार पडतो. या काळात देवीच्या अंगावर चांदीचे कवच चढवण्यात येतात. देवीची पालखीही चांदीच्या आभूषणांनी सजवली जाते.

या उत्सवादरम्यान पहाटे पाच वाजता काकड आरती होते. त्यानंतर देवीची षोडषोपचारी पूजा झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होते. सकाळी ९ वाजता सनईवादन, १० वाजता शास्त्रीय संगीताची बैठक, सायंकाळी ४ वाजता पुन्हा सनईवादन आणि ५ वाजता शास्त्रीय संगीताची बैठक होते. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत मंदिरात भजने व प्रवचने होतात. त्यानंतर देवीची पालखी प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडते. त्यानंतर कीर्तन व सर्वात शेवटी देवीचा संचार असे कार्यक्रम होतात. अष्टमीच्या दिवशी संचार झालेली देवी ग्रामस्थांच्या घरोघरी भेटीला जाते. नवमीच्या दिवशी मंदिरात होम होतो. त्याच दिवशी महाप्रसाद होतो. विजया दशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाचा तसेच चार देवतांच्या संचारासह सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. नवरात्रोत्सवात सनई वाजवण्याचा मान मुस्लिम समाजाला असतो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही पाळली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर परिसरात पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात येतो. सीमा संरक्षक देवतांचा शांतवन विधी किंवा मानकऱ्यांच्या घरांना ग्रामदेवतेने भेट देण्याचा कार्यक्रम यास कोकणातील गावऱ्हाटीमध्ये डाळप असे म्हणतात. येथे पौष महिन्यात ‘डाळप स्वारी’ नावाचा त्रैवार्षिक उत्सव होतो.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून १६ किमी, तर तळेरेपासून ४० किमी अंतरावर
  • देवगडहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : डॉ. मुकुल प्रभुदेसाई, अध्यक्ष, मो. ७३५०४७४९६३,
  • लक्ष्मण पाटकर, उपाध्यक्ष, मो. ८८०५५८७८०८
Back To Home