निसर्गसंपन्न अशा देवगड तालुक्यात पांढऱ्या वाळूच्या नितांत सुंदर समुद्रकिनारी श्री क्षेत्र कुणकेश्वर वसलेले आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थस्थानी कुणकेश्वराचे भव्य व देखणे असे मंदिर आहे. येथील शंभुमहादेवाचे स्थान कणकेच्या बनात असल्याने त्यास कुणकेश्वर हे नाव प्राप्त झाले. कुणकेश्वराचे हे स्थान अत्यंत प्राचीन व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यास सुमारे अकराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. या मंदिरात कुणकेश्वराच्या दर्शनासाठी साक्षात् छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याचे सांगण्यात येते.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की एकदा एका ब्राह्मणाची गाय नेहमीपेक्षा कमी दूध देऊ लागली. तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. त्यावेळी त्याला असे दिसले की ती गाय कणकेच्या बनात एका विशिष्ट ठिकाणी जाऊन तेथे पान्हा सोडते. ती गाय असे करीत असताना त्याने तिला फटका मारण्याचा प्रयत्न केला. गाय घाबरून पळाली; परंतु तो फटका एका पाषाणावर बसला व त्यातून रक्त येऊ लागले. आश्चर्याने त्याने पाहिले तर तो पाषाण म्हणजे स्वयंभू शिवलिंग होते. तेव्हापासून तो त्या पाषाणाची नित्य उपासना करू लागला. आजही कुणकेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगावर त्या प्रहाराचा व्रण असल्याचे सांगण्यात येते. कुणकेश्वराच्या या मंदिराचा एका अरबी व्यापाऱ्याने जीर्णोद्धार केल्याची कथाही येथे सांगण्यात येते.
याबाबतची दंतकथा अशी की एकदा एका अरब व्यापाऱ्याचे जहाज वादळात सापडले. तेव्हा तो देवाची प्रार्थना करू लागला. तेवढ्यात त्याला पूर्व दिशेला लांबवर तेवत असलेल्या दिव्याचा प्रकाश दिसला. त्यावेळी त्या नंदादीपाकडे पाहून त्याने नवस केला की या संकटातून सुखरूप वाचलो तर तेथे मोठे धन खर्चून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करीन. काही वेळाने त्याचे जहाज किनाऱ्यावर सुखरूप लागले. तेव्हा तो त्या छोट्या शिवालयात गेला व तीन वर्षांत प्रचंड धन खर्चून त्याने तेथे मोठे मंदिर बांधले. असेही सांगितले जाते की आपणांस देवाच्या पायाशी कायमची जागा मिळावी म्हणून त्या व्यापाऱ्याने या मंदिराच्या शिखरावरून खाली उडी मारली व प्राणत्याग केला. त्याचे थडगे कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे. मात्र ऐतिहासिक कादंबरीकार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार, ही कथा बनावट आहे. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम राज्यकर्त्यांच्या नजरेत धूळ फेकून मंदिर सुरक्षित राहावे यासाठी ते अरब व्यापाऱ्याने बांधले असल्याची कहाणी त्या काळी मुद्दाम पसरवण्यात आली होती. ही कहाणी नारो निळकंठ यांनी रचल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार नारो निळकंठ हे काही दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य होते. शिवराज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य म्हणून नारो निळकंठ आणि त्यांचे बंधू रामचंद्रपंत निळकंठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे वडील निळोपंत मुजुमदार हे मृत्यू पावल्यानंतर त्यांची मुजुमदारी ज्येष्ठ पुत्र नारो निळकंठ यांच्याकडे जाणार होती; परंतु ते अकर्ते असल्याने ती रामचंद्रपंतांना मिळाली. रामचंद्रपंत हे शिवछत्रपतींच्या आज्ञापत्राचे लेखक होत. इतिहासकार कमल देसाई यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या ग्रंथानुसार रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कुडाळ ते तुंगभद्रेपर्यंतच्या प्रांताची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मराठ्यांची कोकणातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी औरंगजेबाने १५ सप्टेंबर १६८३ मध्ये शाहआलम बहाद्दूर (शहाजादा मुअज्जम) याची नेमणूक केली होती. त्यावेळी रामघाट उतरून तो सावंतवाडीत आला. तेव्हा मराठ्यांनी त्याला सळो की पळो करून सोडले होते. मोगल इतिहासकार खाफीखान याच्यानुसार, ‘या मोहिमेत त्याची कित्येक माणसे व जनावरे दगावली. सैन्यात घोडे शिल्लकही राहिले नाहीत. स्थानिक शत्रूसैन्याने (म्हणजे मराठ्यांनी) मोगल सैन्याच्या सर्व मार्गांची कोंडी करून त्यांचा दाणागोटा तोडला. मोगल सैन्याची अवस्था अत्यंत बिकट, दैवाधीन झाली. शहाजाद्याला त्या प्रदेशात अधिक काळ राहणे अशक्य झाले. अखेरीस त्याने माघार घेण्याकरीता सम्राट औरंगजेबाकडे अनुज्ञा मागितली.’ साधारणतः तीन महिने शाह आलम कोकणाच्या या भागात होता. त्याच्यासमवेत या भागाचा जाणकार असा नागोजी मराठा हा सरदारही होता. या काळात त्याच्या सैन्याची नजर कुणकेश्वराकडे वळली. याबाबत अशी कथा सांगण्यात येते की शाह आलमचा मंदिरास त्रास होऊ नये यासाठी नारो निळकंठ यांनी कुणकेश्वराच्या मंदिर परिसरातील एका छोट्या मंदिरातील मूर्ती हटवून तेथे थडग्याचा आकार निर्माण केला. नंतर मंदिराचा कळस तासून त्यास घुमटासारखा आकार दिला व कुणकेश्वर मंदिर अरब व्यापाऱ्याने बांधल्याची हूल उठवली. मात्र तरीही शाह आलमच्या फौजेने कुणकेश्वरावर हल्ला केला. त्यावेळी नारो निळकंठ यांनी मोठा पराक्रम गाजवला व मराठ्यांच्या फौजेने तो हल्ला परतवून लावला. मात्र मंदिराची झालेली हानी पाहून नारो निळकंठ यांना मोठा धक्का बसला. पुढे त्यातूनच त्यांचे कुणकेश्वर येथे निधन झाले. त्यांची समाधी या मंदिराच्या परिसरात आहे व तेथे तुळशी वृंदावन बांधलेले आहे.
कुणकेश्वराचे हे स्थान अत्यंत प्राचीन असल्याच्या नोंदी आहेत. सन १४३६ मधील एका संस्कृत ताम्रपटात कुणकेश्वराचा उल्लेख आहे. ‘नागदेवाचा ताम्रपट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ताम्रपटात असा उल्लेख आहे, की ‘… काश्यप गोत्राचा देवशर्मा नामक ब्राह्मण हा ब्रह्मज्ञांमध्ये श्रेष्ठ, यजुर्वेदांत पारंगत आणि षट्कर्मात गढलेला असा होता. तेथे (म्हणजे जान्हवीतीरावर) तुरूष्क लोकांची स्वारी झाल्यामुळे तो कोकणात गेला. इंदुल (हल्लीचे हिंदळे) नामक प्रशस्त गावात राजाने त्याचा पुनःपुन्हा सन्मान केला. नंतर राज्यलक्ष्मी प्राप्त होऊन त्यास कुणकेश्वरस्थ भगवान् शंकराच्या प्रसादाने पुत्र झाले.’ अशा या प्राचीन मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. शिवकाळातही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.
हे मंदिर समुद्रतटावरील उंच टेकाडावरील सपाट जागेवर उभे आहे. समुद्र किनाऱ्याकडील बाजूने मंदिर परिसरास मोठी तटबंदी आहे. मंदिराकडील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पूजा साहित्याची काही दुकाने व उपाहारगृहे आहेत. समोरच मंदिराची भव्य कमान आहे. तेथून काही पायऱ्या चढून वर येताच उजव्या बाजूस मंदिर आवाराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. संपूर्ण लाल चिऱ्यात बांधलेले, एखाद्या गडाच्या प्रवेशद्वारासारखे दिसणारे हे प्रवेशद्वार आहे. बारा-तेरा पायऱ्या चढून त्यातून मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. समोरच कुणकेश्वराच्या भव्य मंदिराचे उंचच उंच असे शिखर दृष्टीस पडते. या शिखराची उंची सुमारे २२ ते २४ मीटर एवढी आहे. कोकणी स्थापत्य शैलीत बांधलेला भव्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह व त्यावर उंच शिखर असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपासमोर जुन्या घडणीचा कोरीव काम केलेला दगडी दीपस्तंभ आहे. त्याच्या शेजारी एका छोट्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.
येथे खुल्या प्रकारच्या सभामंडपातून ११ पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या बाजूला छोट्या कोनाड्यांत अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. अंतराळात समोरच एका चौरंगावर छोटी शिवपिंडी आहे व त्यापुढे एका छोट्या स्तंभावर नंदीची मूर्ती आहे. भाविक या नंदीच्या कानात आपल्या मनोकामना सांगतात. या मंदिरात अशा प्रकारे नंदीच्या दोन मूर्ती आहेत हे विशेष.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार हे प्राचीन व दगडी आहे. त्यात तीन द्वारशाखा आहेत. दाराच्या चौकटीच्या वर ललाटबिंब स्थानी गणेश आहे. द्वारशाखांवर दशावतार कोरलेले आहेत. ही शिल्पे प्राचीन महाराष्ट्रीय शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. विशेष म्हणजे या शिवमंदिराच्या द्वारावर ललाटबिंबाच्या वरील भागात म्हणजे उत्तररांगेत शेषशायी विष्णूचे मोठे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पात शेष आणि विष्णूचे पाय दाबत बसलेली लक्ष्मीही दिसते. शेषशायी विष्णू समुद्रात असल्याचे दाखवण्यासाठी येथे शेषाच्या आजूबाजूस मत्स्याकृती कोरलेल्या आहेत. गर्भगृहात कुणकेश्वराची प्राचीन शिवपिंडी आहे.
तारकाकृती आकाराच्या या मंदिरास सभामंडपातील प्रवेशद्वार धरून एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. तेथे मुखमंडप व तेथून चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. डावीकडील मुखमंडपातील पायऱ्यांच्या बाजूस असलेल्या आधार भिंतीवर गरुड, हनुमान, विष्णूचा मत्स्यावतार, तसेच अमृतकुंभ घेऊन उडत असलेला गरुड यांची महाराष्ट्रीय शैलीतील मोठी उठावशिल्पे आहेत, तर उजवीकडील बाजूस असलेल्या मुखमंडपातील पायऱ्यांच्या बाजूच्या आधार भिंतीवर नारद, तुंबर, वामन आणि कपिला गाय यांची उठावशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर शिखरापर्यंत ठिकठिकाणी देवतांच्या कोरीव मूर्ती यात पंचमुखी गाय व तिचे वासरू, नमस्कार मुद्रेतील गरुड, राक्षसाशी युद्ध करणारा हनुमान व कृष्ण यांचा समावेश आहे. गर्भगृहाच्या भिंतीच्या तळाकडील दुसऱ्या स्तरावर व्यालरांग आहे.
मंदिराच्या सुमारे पाऊण एकर परिसरामध्ये जोगेश्वरी देवी, गणपती, देव नारायण व श्री मंडलिक यांची मंदिरे आहेत. येथील श्री देव नारायण मंदिरातील मूर्तीच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. या शिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश करताच समोरच एक छोटे मंदिर आहे. या मंदिरात अरब व्यापाऱ्याचे थडगे असल्याचे सांगण्यात येते. मात्र मंदिरावर केवळ ‘समाधी मंदिर’ असे लिहिलेले आहे. मंदिर आवारात डावीकडील मुखमंडपाच्या समोर नारो निळकंठ यांच्या समाधीचे तुळशी वृंदावन आहे. तसेच मंदिराच्या समुद्रतटाकडील भागात एका उंच चौथऱ्यावर अनघड स्वरूपाचे शिवलिंग आहे.
कुणकेश्वराच्या मंदिरात एकादष्णी, रुद्राभिषेक, लघुरुद्र आदी विधी केले जातात. येथे चैत्र महिन्यात रोज देवाची पालखी निघते, तसेच गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीस येथे मोठी यात्रा साजरी होते. लाखो भाविक त्यावेळी कुणकेश्वराच्या दर्शनास येतात. या दिवशी कुणकेश्वराच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील देवांचे तरंग येथे येतात. माघ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी भाविक येथे समुद्रस्नान करतात. दर श्रावणी सोमवारीही येथे भाविकांची गर्दी होते. येथील नितांत रमणीय अशा समुद्रकिनाऱ्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकांचीही येथे सतत गर्दी असते. या देवस्थानच्या परिसरात समुद्रकिनारी २१ शिवलिंगे आहेत. ओहोटीच्या वेळी त्यांचे स्पष्ट दर्शन होते. ही शिवलिंगे पांडवांनी घडवलेली असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.