वज्रेश्वरी योगिनी मंदिर

वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे

पार्वती मातेचे रूप अशी मान्यता असलेल्या वज्रेश्वरी योगिनी देवीचे प्राचीन मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथे आहे. मुंबई-ठाण्यापासून जवळच असलेले देवीचे हे स्थान राज्यातील महत्त्वाच्या जागृत देवस्थानांपैकी एक आहे. वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी देवीला केलेला नवस फेडण्यासाठी श्रीमंत चिमाजी अप्पा यांनी बांधलेले हे मंदिर प्राचीन व पारंपरिक वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे. नवसाला पावणारी देवी, अशी ख्याती असलेली ही देवी अनेक ज्ञातींची कुलस्वामिनी आहे. या मंदिर परिसरात नदीतीरावर असलेली गरम पाण्याची अनेक कुंडे ही येथील मुख्य आकर्षण आहे. या कुंडांमध्ये स्नान केल्यावर त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

योगिनी देवीच्या व्युत्पत्तीबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार प्राचीन काळी कालिकाला (कलिकुट/काली) नावाच्या दैत्याने वडवली (वज्रेश्वरी गावाचे जुने नाव) परिसरात ऋषींना त्रास देणे सुरू केले. त्याने देवांविरुद्धही युद्ध पुकारले. त्यामुळे व्यथित झालेल्या देवांनी तसेच ऋषींनी वसिष्ठ ऋषींच्या नेतृत्वाखाली देवीला प्रसन्न करण्यासाठी त्रिचंडी यज्ञ केला. या यज्ञादरम्यान आहुती न दिल्याने संतप्त झालेल्या इंद्राने आपले वज्र यज्ञात फेकले. त्यामुळे भयभीत झालेल्या देवांनी तसेच ऋषींनी देवीची प्रार्थना केली. त्यानंतर येथे प्रकट झालेल्या देवीने वज्र गिळले, तसेच दैत्यांचाही वध केला. त्यानंतर श्रीरामांनी देवीला या परिसरात वास्तव्य करण्याची विनंती केली. तेव्हापासून ही देवी येथे वज्रेश्वरी नावाने ओळखली जाते.

मंदाकिनी पर्वताच्या एका टेकडीवर असलेले देवीचे मंदिर पूर्वी वज्रेश्वरी गावापासून आठ किमी अंतरावर असलेल्या गुंज गावात होते. पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केल्याने मंदिर येथे हलवण्यात आले. प्राचीन काळी एका झाडाखाली देवीची दगडी मूर्ती होती. पेशवाईच्या काळात मुंबईतील धारावीपासून दमण-गोव्यापर्यंतची अनेक गावे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. यावेळी पोर्तुगीजांकडून सतत प्रजेचा छळ होत असे. येथील नागरिकांचा प्रचंड धर्मछळ करण्यात येत असे. त्यामुळे या पोर्तुगीजांचा बिमोड करण्यासाठी श्रीमंत चिमाजी अप्पा यांनी वसईची मोहीम सुरू केली. या मोहिमेत तारापूर घेतल्यावर मराठ्यांनी ३ फेब्रुवारी १७७९ रोजी अशेरी किल्ला जिंकला. त्यानंतर सगळी फौज घेऊन चिमाजी अप्पा वज्रयोगिनीस गेले, अशी नोंद ‘साष्टीच्या बखरी’त आहे. या ठिकाणी काही दिवस त्यांनी मुक्काम केला होता. ‘वसईची मोहीम’ या यशवंत नरसिंह केळकर यांच्या इतिहासग्रंथात अशी नोंद आहे की ‘ या मोहिमेबाबत आप्पासाहेबांनी (चिमाजी अप्पा यांनी) वज्रेश्वरीच्या वज्रयोगिनीसही तुझें देऊळ बांधीन म्हणून नवस केला होता. त्याप्रमाणे पुढे ऑगस्टात त्या नवसापैकी काही भाग त्यांनी फेडला. आप्पासाहेबांच्या रोजकीर्दीत ६-८-१७३९ या तारखेस पुढील नोंद सापडते. ‘खर्च १२८३ रुपये २ आणे नवस श्रीवज्रजोगिणी मु. वडवली बाबत वसई वगैरे सोने नवसले होते त्यांपैकी त।। रामचंद्रगिरी गोसावी वजन गु।। सिऊबा नाई थोरात वजन तोले (तपशील.)’ देऊळ बांधण्याचा नवस आप्पासाहेबांकडून पुरा झाला नाही. कारण ते पुढे लवकरच वारले. तो त्यांचा नवस नानासाहेब पेशव्याने पुरा केला. त्यासंबंधी नानासाहेब पेशव्यांच्या रोजकीर्दीत नोंदी सापडतात.’ या वरून या मंदिराच्या नवसाचा काही भाग चिमाजी अप्पांनी फेडला तर बाकीचे मंदिर नानासाहेब पेशव्यांनी उभारले हे स्पष्ट होते. या मंदिराच्या सभामंडपाचा भाग बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांनी, तर मंदिराच्या पायऱ्या व दीपमाळ नाशिकचे प्रसिद्ध सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. या मंदिरास पेशव्यांनी वार्षिक ८९० रुपये एवढे अनुदान मंजूर केले होते.

तानसा नदीच्या काठाजवळ वसलेल्या वज्रेश्वरी या गावाचे मूळ नाव वडवली होते. वज्रेश्वरी देवीच्या मंदिरावरून गावाचे ‘वज्रेश्वरी’ असे पडले. हे मंदिर चारही बाजूंनी डोंगराने वेढले आहे. मंदिर परिसरात फुले-प्रसाद विक्रीची शेकडो दुकाने आहेत. समोरच मोठी सुमारे ६० फूट उंचीची दीपमाळ आहे. मंदिराच्या वास्तूची रचना किल्ल्याप्रमाणे आहे. सभोवताली असलेली तटबंदी आणि बुरुजांमुळे मंदिराकडे जाताना एखाद्या किल्ल्याकडे जात असल्यासारखे भासते. मंदिरात जाण्यासाठी जमिनीपासून ५१ दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. त्यापैकी काही पायऱ्या चढल्यावर एका पायरीवर कासवाची मूर्ती आहे. पायऱ्या चढून आल्यावर मंदिराची मोठी दगडी कमान लागते. हे मंदिराचे महाद्वार आहे. या महाद्वाराच्यावर नगारखाना व त्याच्या दोन्ही बाजूंना चौघड्यासाठी चौथरे आहेत. येथेच दिवाबत्तीसाठी दगडी कोनाडेही आहेत. मंदिराच्या प्रांगणात दगडी फरसबंदी आहे.

वज्रेश्वरी देवीच्या मुख्य मंदिराचा जोता सुमारे दीड फूट उंचीचा आहे. सभामंडप आणि दोन गर्भगृहे असे या मंदिराचे स्वरूप आहे. खुल्या सभामंडपात एका चौथऱ्यावर सिंहाची मूर्ती आहे. सभामंडपात अनेक लाकडी स्तंभ आहेत. वरच्या भागात रेणुका-वज्रेश्वरी-कालिका मातेची प्रतिमा आहे. मुख्य गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या उपगर्भगृहात गणेश तसेच मोरबा देवीची स्थाने आहेत. मुख्य गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर सोनेरी मुलामा दिलेल्या मखरात देवी विराजमान आहे. मध्यभागी देवीची शेंदूरचर्चित तेजोमय मूर्ती आहे. या मुकुटधारी देवीच्या हातात खड्ग आणि गदा आहे. तिच्या डावीकडे रेणुकामाता तर उजवीकडे कालिकामाता आहे. मूर्तींमागील प्रभावळीवर आकर्षक कलाकुसर आहे. या तिन्ही देवींच्या मूर्ती प्रकृती, संस्कृती आणि विकृती यांची तीन रूपे मानली जातात. हे मंदिर पूर्वाभिमुख असल्यामुळे वर्षातील काही दिवस येथील सकाळच्या वेळी गर्भगृहातील देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. या मंदिराच्या गर्भगृहांवर दोन शिखरे आहेत. त्यातील लहान शिखर हे घुमटाकार आकाराचे व त्यावर तीन आमलक व त्यावर शिखर अशा रचनेचे आहे. दुसरे मुख्य शिखर हे मोठे असून त्यावर अनेक शिखरांच्या प्रतिकृती आहेत.

वज्रेश्वरी देवी ही अनेक दैवज्ञ ब्राह्मण (सोनार), पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, सूर्यवंशी क्षत्रिय आदी ज्ञातींची कुलस्वामिनी आहे. नवसाला पावणारी देवी, असा लौकिक असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. चैत्र महिन्याच्या अमावस्येला देवीची यात्रा असते. त्या दिवशी रात्री दिव्यांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी, वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी देवीची प्रतिमा असलेल्या पालखीची मिरवणूक काढली जाते. शेकडो भाविक या वेळी उपस्थित असतात. येथे होळी, हनुमान जयंती, दत्त जयंती, कोजागिरी पौर्णिमा, गोधडेबुवा जयंती आदी उत्सव होतात. श्रावण महिन्यात येथे शिवउपासना केली जाते. येथे नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होतो. देवीला महाअभिषेक केल्यानंतर दीपप्रज्ज्वलन, काकड आरती होते. त्यानंतर घटस्थापना करण्यात येते. या उत्सवादरम्यान देवीचा गोंधळ, भजन, अखंड नामकीर्तन तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होतात. विजयादशमीला होणारी पालखी शोभायात्रा हे येथील खास आकर्षण असते. उत्सवादरम्यान मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यांतून तसेच गुजरात राज्यातूनही हजारो भाविक या उत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी येतात.

मंदिराच्या प्रांगणात डाव्या बाजूला असलेल्या एका मोठ्या वृक्षासमोर शिवपिंडी आणि नंदी आहे. त्यासमोर छोटी दीपमाळ आहे. दीपमाळेसमोरच कपिलेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदीची पांढरा रंग दिलेली दगडी मूर्ती आहे. नंदीसमोर मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक डावीकडे गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहात शिवपिंडी व मागे गणपती व पार्वतीमाता यांच्या मूर्ती आहेत. मंदिर परिसरात दत्त मंदिर तसेच हनुमान मंदिरही आहे. येथेही भाविक पूजा करतात. दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. गर्भगृहात एका चौथऱ्यावरील देव्हाऱ्यात दत्तमूर्ती आहे. हनुमान मंदिराजवळ असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर गिरीगोसावी महंत चैतन्य गोधडे बाबा यांचे समाधी मंदिर आहे. समाधी मंदिरात गोधडे बाबांच्या समाधीच्या मागे चौथऱ्यावर रेणुका-वज्रेश्वरी-कालिकामाता यांच्या प्रतिमा आहेत. या समाधी मंदिराच्या परिसरातून खाली असलेली तानसा नदी व वज्रेश्वरी गावाचे विहंगम दृश्य दिसते.

या मंदिराच्या परिसरातील गणेशपुरी, अकलोली, दातीवली अशा पाच किलोमीटरच्या परिघातील गावांत गरम पाण्याची सुमारे २१ कुंडे आहेत. वज्रेश्वरी मंदिराजवळील कुंडांना अग्निकुंड, सूर्यकुंड, चंद्रकुंड, वायुकुंड, रामकुंड, लक्ष्मणकुंड व सीताकुंड अशी नावे दिलेली आहेत. या कुंडांमधील पाण्याचे तापमान ४३ ते ४९ अंश सेल्सिअसपर्यंत असते. पाणी उष्ण असल्याने त्यांना उन्हाळी असे म्हणतात. या गरम पाण्यामध्ये गंधक व अन्य खनिजे असतात. त्यातील औषधी गुणधर्मामुळे या कुंडांमध्ये स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, असे मानले जाते. गरम पाण्याचा झरा म्हणजे भूऔष्णिक (जिओथर्मल) जागा असते. भूगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कात आलेले पाणी तापते. काही ठिकाणी ते भूगर्भातून वर येते. दख्खनचे पठार हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाखो वर्षांपूर्वी तयार झाले. त्यामुळे या भागात काही ठिकाणी असे झरे आढळतात. सकाळी ५, ११.१५ व सायंकाळी ८.१५ वाजता मंदिरात देवीची आरती होते. दररोज सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना वज्रेश्वरी योगिनी देवीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • भिवंडीपासून २८ किमी, तर ठाणे शहरापासून ५४ किमी अंतरावर
  • भिवंडी, ठाणे, कल्याण व पालघर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने येथील वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home