तीर्थ कुशावर्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीवर असलेले एक पवित्र तीर्थस्थान आहे. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर ती या ठिकाणी प्रगट होते, असे सांगितले जाते. कुशावर्त तीर्थ हे २१ फूट खोल नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड आहे. कुशावर्तात स्नान करून मग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. या तीर्थावर स्नान केल्याने पातकांचे क्षालन होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कुशावर्तासंदर्भात आख्यायिका अशी की ब्रह्मगिरी पर्वतावर प्राचीनकाळी गौतम ऋषी आणि अहिल्या यांचे वास्तव्य होते. एकदा या परिसरात मोठा दुष्काळ पडला. पाण्याअभावी पशू- पक्ष्यांसह परिसरातील नागरिकांचे हाल होत होते. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी गौतम ऋषींनी वरुणराजाची प्रार्थना केली. या प्रार्थनेमुळे वरुणराजा प्रसन्न झाला आणि भरपूर पाऊस पडल्याने हा परिसर धनधान्यांनी समृद्ध झाला. या घटनेनंतर गौतम ऋषींची कीर्ती सर्वदूर पसरली. याच दरम्यान महादेवांच्या जटांमधून वाहणाऱ्या गंगेचा पार्वतीला मत्सर वाटू लागला. महादेवांनी आपल्या जटांमधून गंगेला दूर करावे, असे पार्वतीला वाटत होते, परंतु या जटांमधून गंगेला वेगळे करणे अवघड असल्याने पार्वतीने गणपतीला विश्वासात घेऊन त्याच्यावर ही जबाबदारी सोपविली. त्यानुसार गणपतीने गाईचे रूप धारण केले. गौतम ऋषींच्या आश्रमाजवळील शेतामध्ये जाऊन ही गाय पीक खाऊ लागली.
आपल्या शेतामधील पीक गाय खात आहे हे पाहिल्यावर गौतम ऋषींनी एक दर्भाची काडी (गवताची काडी) अभिमंत्रित करून गाईकडे फेकली. त्या दर्भामुळे गाय तेथेच मृत पावली. त्यामुळे गौतम ऋषींना गोहत्येचे पातक लागले. त्यानंतर गणपतीने आपले मूळ रूप ऋषींना दाखवून सांगितले की, दक्षिणेत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तेथे गंगेस जाणे भाग आहे व त्यासाठी आपण महादेवांना प्रसन्न करून गंगेस पुन्हा पृथ्वीवर बोलवावे. ज्यामुळे त्यांना लागलेले गोहत्येचे पातकही धुतले जाईल. गणपतीच्या सांगण्यानुसार गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. त्यानंतर महादेवाने गंगेला भूतलावर जाण्यास सांगितले, परंतु गंगा भूतलावर येण्यास तयार नव्हती. अखेर शंकरांनी तांडवनृत्य करीत आपली जटा एका कातळावर आपटली आणि तिथून गंगेचा प्रवाह सुरू झाला. तिलाच ‘गौतमी गंगा’ या नावाने ओळखले जाते व ती आता गंगा गोदावरी म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, त्यानंतरही गोदावरी वारंवार लुप्त होऊ लागली होती. त्यामुळे मग गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी येथून वाहणारी गोदावरी नदी रोखण्यासाठी दर्भाच्या काड्यांचा बांध घालून (कुश) तिला या ठिकाणी अडवून ठेवले. तेच हे ‘कुशावर्त’ होय. हेच ‘कुशावर्त तीर्थराज’ म्हणूनही ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याचा कुशावर्त हा प्रारंभ बिंदू आहे. दर बारा वर्षांतून नाशिकमध्ये कुंभमेळा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो साधू, लाखो भाविक व पर्यटक या पवित्र कुंडात स्नानासाठी येतात.
तीर्थ कुशावर्त हे त्र्यंबकेश्वर गावाच्या मध्यभागी असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरापासून जवळ आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक कुंड आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कुंड किंवा तीर्थ हे ‘कुशावर्त तीर्थ’ म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याआधी भाविक येथे स्नान करतात. या तीर्थातून वाहत जाणाऱ्या पाण्यामुळेच गोदावरीला पुढे नदीचे स्वरूप आले आहे. याच परिसरात नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबळी, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी आदी धार्मिक विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी दररोज येथे शेकडो भाविक येत असतात.
कुशावर्तावर जिवंत पाण्याचे झरे असून, कुंडांची लांबी ९५ फूट, रुंदी ८५ फूट, तर खोली २१ फूट आहे. या कुंडात चारही दिशेने उतरण्यासाठी १५ पायऱ्या आहेत. कुंडाच्या चारही बाजूला अनेक ओवऱ्या आहेत. (तटबंदीसारख्या भिंतींमध्ये असणाऱ्या लहान लहान खोल्या) या ओवऱ्यांमध्येच अनेक धार्मिक विधी केले जातात.
ओवऱ्यांमध्ये ठिकठिकाणी अनेक शिल्पे आहेत. त्यामध्ये विष्णू, राम-लक्ष्मण-सीता, गोपींसह श्रीकृष्ण, नंदीवर बसलेले शिव-पार्वती, हंसावर आरूढ असणारी सरस्वती, हिरण्यकश्यपूचा वध करताना नृसिंह अशी अनेक शिल्पे पाहता येतात. ओवऱ्यांच्या चारही कोपऱ्यांवर देवालये आहेत. या देवालयांवरील कोरीवकामही सुबक आहे. या ठिकाणी महादेव आजही स्नानाला येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या तीर्थाच्या जवळच गंगा मंदिर, इंद्रेश्वर, गायत्री, बल्लाळेश्वर ही मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांचे स्थापत्य सुरेख आहे.
कुशावर्त तीर्थाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर महादेवाचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीतून वाजतगाजत कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी आणला जातो. त्यावेळी रुद्राभिषेक आणि मुखवट्याची षोडशोपचारे पूजा होते. हा पूजाविधी सुरू असताना नगारे वाजवले जातात. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी येथे हजारो भाविक यावेळी जमतात. येथेच अहिल्या नावाची छोटी नदी गोदावरीला मिळते, या संगमावर निपुत्रिक लोक संतान प्राप्तीसाठी पूजा करतात.
तीर्थ कुशावर्त यादव काळामध्ये बांधल्याचे उल्लेख आहेत. त्यानंतरच्या काळात अत्यंत लहान असलेल्या या कुंडाची होळकर यांचे फडणवीस रावजी महादेव पारनेरकर यांनी पुनर्बांधणी केली.
उपयुक्त माहिती: